निकाल
दिनांक- 08.10.2013
(द्वारा- श्री विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार प्रदिप विश्वनाथ चक्रे यांनी सदरील तक्रार सामनेवाले यांनी सेवा देण्यास कसूर केला व त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले त्याकरिता नुकसान भरपाई मिळावी म्हणून दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी पिठाची गिरणी चालविण्यासाठी सामनेवाले यांचेकडून विज पुरवठा घेतलेला आहे. सदरील व्यवसायावर तक्रारदार व त्यांचे कूटूंबिय उदरनिर्वाह चालतो. तक्रारदार यांचे वडील विश्वनाथ लहानाजी चक्रे हे मयत झालेले आहेत.तक्रारदार यांचे वडील यांनी दि.17.06.2009 रोजी सामनेवाले यांचेकडे अर्ज देऊन पिठाचे गिरणीसाठी विज पुरवठा घेतलेला आहे. तेव्हापासून तक्रारदार हे सदरील पिठाची गिरणी चालवून उदरनिर्वाह करतात. सामनेवाले यांचे अधिकारी प्रत्येक महिन्याला येऊन विज मिटरचे वाचन करुन त्यांची नोंद घेऊन जात असत व त्याप्रमाणे बिल तक्रारदार यांना देत असत. तक्रारदार हे नियमितपणे बिल भरीत आलेले आहेत.दि.15.03.2012 रोजी तक्रारदार हे बाहेर गेले असता सामनेवाले यांचे कर्मचारी तक्रारदार यांचे पिठाचे गिरणीवर आले व काही एक न विचारता किंवा कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता तक्रारदाराचे विज कनेक्शन तोडले व त्यांचे जुने मिटर काढले व त्याठिकाणी नवीन विज मिटर बसवले.तक्रारदार यांनी चौकशी केली असता सामनेवाले यांनी सांगितले की, सदरील मिटर चूकीचे रिडींग दाखवत आहे. त्यामुळे दूसरे नवीन मिटर बसवले आहे. दि.16.3.2012 रोजी तक्रारदार हे बार्शी नाका कार्यालयामध्ये गेले व नविन मिटरला कनेक्शन जोडून देण्या बाबत विनंती केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रु.38,000/- भरण्यास सांगितले. तसेच तक्रारदार यांना सांगण्यात आले की, त्यांचे विरुध्द लातूर कार्यालयाने फौजदारी केस दाखल केलेली आहे. तक्रारदार यांना कधीही मिटरमध्ये फेरफार केलेला नाही किंवा विजेची चोरी केलेली नाही. तक्रारदार हे सुशिक्षीत बेकार असून त्यांना डोळयाने कमी दिसत असल्यामुळे ते दूसरे काम करु शकत नाहीत. पिठाची गिरणी 20 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे कूटूंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. तक्रारदार यांचे विज कनेक्शन तोडल्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नूकसान झाले आहे. सामनेवाले यांनी विज कनेक्शन तोडून व नवीन कनेक्शन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सेवेत त्रूटी ठेवलेली आहे. सबब, तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे विजेचे कनेक्शन जोडून देण्याचा आदेश देण्यात यावे व झालेल्या मानसिक व शारीरिक रक्कम रु.25,000/- देण्याचा हूकूम व्हावा.
सामनेवाले हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. विज पुरवठा तक्रारदार यांचे वडिलांचे नांवे केलेले आहे. मिटर हे तक्रारदार यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांचे वडील हे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे वडील मयत झाल्याबददल कधीही कळविले नाही व मिटर त्यांचे नांवे करुन घेतले नाही.
सामनेवाला यांनी पूढे असे कथन केले की, दि.15.3.2012 रोजी सामनेवाले यांचे भरारी पथकाचे अधिकारी, तक्रारदार यांचे घरी विज मिटर तपासणी काम केले. मिटरची तपासणी केली असता सदर मिटर हे मंद गतीने फिरत असल्याचे दिसून आले. सदर मिटरमध्ये तक्रारदार यांनी अडथळे टाकलेले आढळून आले. मिटरमध्ये छेडछाड करुन मिटर मंद गतीने फिरण्यासाठी व्यवस्था केली. त्यामुळे सदरील मिटर जप्त करण्यात आले. तसा अहवाल देण्यात आला. तक्रारदार यांनी विजेचे चोरी केल्याचे निष्पन्न झाले, तक्रारदार यांचे विरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांनी रु.38,257/- ची विज चोरी केलेली आहे ते त्यांस भरण्यास सांगितले. त्यांनी बिल न भरल्यामुळे विज पुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांना थकीत बिल भरावे व तदनंतर त्यांना नियमाप्रमाणे कनेक्शन देण्यात येईल असे कळविले आहे. सबब, सामनेवाले यांची विनंती की, त्यांनी सेवेत कोणतीही त्रूटी ठेवलेी नाही, तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी पुरावाकामी आपले शपथपत्र दाखल केले. तक्रारदार यांनी कोटेशनची पावती, बिलाची पावती, विज मिटरचे बिल दाखल केले आहे. सामनेवाले हयांनी कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही अगर शपथपत्र दाखल केले नाही. तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर, सामनेवाले यांचे वकीलाचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली ही बाब तक्रारदार
यांनी शाबीत केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई
मिळणेस पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व तक्रारीचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांचे कथन की, विज मिटर हे त्यांचे वडिल विश्वनाथ लहानाजी चक्रे यांचे नांवावर दि.13.06.2009 रोजी घेतले आहे. त्यांचे पूढे असे कथन आहे की, तक्रारदार हे पिठाची गिरणी चालवून कूटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांनी वेळोवेळी सर्व बिल भरलेली आहेत. सामनेवाले यांचे अधिकारी यांनी अनाधिकृतरित्या येऊन विज पूरवठा खंडीत केला व नवीन मिटर बसवले. तसेच नवीन मिटर यांस कनेक्शन देण्यास नकार दिला. त्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे.
याउलट सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. विज जोडणी ही तक्रारदार यांचे वडिलांचे नांवे आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झाल्यानंतर त्यांनी त्यांचे नांवावर मिटर करुन घेण्यासाठी कोणतीही तजविज केली नाही. तसेच सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी मिटरमध्ये छेडछाड करुन मिटर कमी वेगाने कसे फिरेल यासाठी व्यवस्था केली आहे. सामनेवाले यांचे अधिकारी यांनी दि.15.3.2012 रोजी तपासणी केली असता मिटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले. तक्रारदार यांनी विज चोरी केल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार यांचे विरुध्द फौजदारी केस दाखल करण्यात आली आहे. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांना रु.38,257/- भरल्यास ते नवीन मिटरमध्ये विज पुरवठा देण्यास तयार आहेत.
तक्रारदार यांचा पुरावा पाहता व सामनेवाले यांचे कथन यांचा एकत्रित विचार करता तक्रारदार यांचे नांवे विज मिटर घेतलेले नसल्यामुळे तक्रारदार हे ग्राहक होऊ शकत नाहीत. तक्रारदार यांचे वडिलांचे नांवे विज पुरवठा घेतलेला आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झाल्यानंतर ते मिटर वारस या नात्याने तक्रारदार यांनी ते त्यांचे नांवे करुन घेणे आवश्यक होते. असे लक्षात येते की, तक्रारदार यांनी मिटरमध्ये छेडछाड केली व सदरील बाब सामनेवाले यांचे अधिका-यांनी तपासणी केली असता आढळून आली. त्या बाबत फौजदारी कारवाई सामनेवाले यांनी केली आहे. तक्रारदार यांना बिला बाबत काही वाद असल्यास विज कायदा कलम 126 अन्वये योग्य त्या सक्षम अधिका-याकडे दाद मागता येते. तसेच सामनेवाले यांनी इलेक्ट्रीकल अँक्ट कलम 135 अन्वये काही कारवाई केल्यास त्या बाबतही सदरील कायदया अन्वये तक्रारदार यांना दाद मागता येते.
इलेक्ट्रीकल अँक्ट 2003 व ग्राहक संरक्षण कायदा 1986 हे व्यक्तीला न्याय देण्यासाठी समांतर असे कायदे आहेत. ग्राहक मंचासमोर तक्रार दाखल करण्याकामी तक्रारदार हा ग्राहक (कलम 2 (1) (ड) ) या संज्ञेत यावयास हवा. तक्रारदार यांचे तक्रारीचा विचार केला असता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत ही बाब सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार यांनी मागणी केलेली दाद मिळण्यास ते पात्र नाहीत. सबब, तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
सबब, मंच मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक