(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :22/08/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 03.12.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्ती नलिनी सुधीर सुर्यवंशी यांची तक्रार अशी आहे की, तिने गैरअर्जदाराकडून घरगुती कामाकरीता वित्तीय सहाय्य मिळण्याकरीता अर्ज केला होता. दि.25.11.2005 रोजी तक्रारकर्तीला गैरअर्जदारांकडून पत्र मिळाले व त्यामधे रु.23,778/- चा धनादेश संलग्न असल्याचे लिहीले होते, मात्र त्यासोबत धनादेश संलग्न नव्हता. याबाबत चौकशी करण्यापूर्वी तक्रारकर्तीच्या भावाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाल्यामुळे तिला धनादेशाबाबत चौकशी करता आली नाही व ती भावाच्या गावी निघुन गेली. एक महिन्यानंतर परत आल्यावर तिने गैरअर्जदारांकडे धनादेशाबाबत विचारपूस केली असता गैरअर्जदारांचे शाखेत दिपक नावाचे एजंटने तक्रारकर्तीचा धनादेश कल्पना सुर्यवंशी हीला दिल्याचे सांगितले. त्यानंतर कल्पना सुर्यवंशीला भेटून धनादेशाची मागणी केली असता तिने सदर रक्कम तिचे खात्यात जमा केल्याचे व कर्जाच्या रकमेची स्वतः परतफेड करणार असल्याचे सांगितले. यानंतर तक्रारकर्तीने गैरअर्जदारांची भेट घेऊन सदर घटनेची माहिती दिली व तिला मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेची मागणी केली असता गैरअर्जदाराने ती देण्यांस नकार दिला.
3. तक्रारकर्तीला दि.19.10.2006 रोजी वकीलांमार्फत काऊंसिलींगबाबत पत्र मिळाले त्यात रु.34,684.17 एवढी थकबाकी दर्शविली, सदर रक्कम देण्यांस तक्रारकर्तीने नकार दिला व दि.27.10.2010 रोजी सदर पोलिस स्टेशन, नागपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारकर्तीने वारंवार गैरअर्जदारांना कर्जाच्या रकमेची मागणी केली व कर्जाचा धनादेश कल्पना सुर्यवंशीला का दिला याबाबत विचारणा केली असता गैरअर्जदारांनी उत्तर देण्यांस टाळाटाळ केली. तसेच नियमाप्रमाणे सेवा न देता कर्जाच्या रकमेची मागणी करुन मानसिक त्रास देत असल्यामुळे तिने सदर तक्रार मंचात दाखल करुन तीव्दारे नुकसान भरपाई दाखल रु.1,00,000/- मिळावे, मुळ कागदपत्रे परत करावे, कर्ज मंजूरीचा धनादेश न देता कर्जाचे थकबाकी बद्दलची कारवाई बंद करावी व कल्पना सुर्यवंशी हिचेकडून सदर कर्जाचे परतफेडीसाठी योग्य कारवाई करावी अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता गैरअर्जदार यांनी मंचात हजर होऊन आपल्या उत्तरातील प्राथमिक कथनात तक्रारकर्तीची तक्रार चुकीची, खोटी व मंचाची दिशाभुल करण्याचे उद्देशाने दाखल केलेली असुन ती खारिज करण्यांची मंचास विनंती केली आहे. तसेच त्यांनी आपल्या गुणवत्तेवरील उत्तरात त्यांचेकडून खाजगी ऋण घेते वेळी तक्रारकर्तीसोबत कल्पना सुर्यवंशी सहऋण घेणार असल्याचे नमुद केले आहे. तसेच वादातील धनादेश तक्रारकर्तीने कर्जाच्या मागणीपत्रावर जो पत्ता नमुद केला होता, त्या पत्त्यावर सुपूर्द करण्यांत आल्याचे नमुद केले आहे. गैरअर्जदाराने आपल्या जबाबात, त्यांनी भारतीय रिजर्व बँकेने दिलेल्या नियम आणि व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन केल्याचे नमुद केले आहे. त्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील सर्व विपरीत विधाने नाकबुल केली,
त्यामुळे त्यांना दोषी धरण्यांत येऊ नये असा उजर घेतला आहे.
5. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 11 कर्ज मंजूरीचे पत्र, पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची प्रत, काऊंसिलींगचे पत्र, नोटीस इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.08.08.2011 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर, मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारकर्त्यास बँकेचे पासबुक दाखल करण्याबाबत निर्देश देऊन प्रकरण निकालाकरीता ठेवले. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. यातील तक्रारकर्तीचे स्पष्ट निवेदन असे आहे की, तिला कोणतीही रक्कम प्रत्यक्षात प्राप्त झालेली नाही, त्या संबंधाने तिने खाते उतारा दाखल केलेला आहे. त्यामध्ये सुध्दा तिला अशी रक्कम प्राप्त झाल्याचे दिसुन येत नाही आणि महत्वाची बाब म्हणजे यातील तक्रारकर्तीने कर्जासाठी भरलेला अर्ज गैरअर्जदारांनी मंचासमक्ष दाखल केलेला आहे, तो Annexure ‘A’ या स्वरुपात आहे, त्यामध्ये बँक खाते म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र क्र.35114 असा नमुद करण्यांत आलेला आहे. तक्रारकर्तीने यासंबंधात बँक ऑफ महाराष्ट्र कडून जे दस्तावेज दाखल केलेले आहे त्यावरुन खाते क्रमांक 35114 हा कल्पना सुर्यवंशी हीच्या नावाचा आहे, हे स्पष्ट होते. आणि दि.09.12.2005 रोजी त्यामध्ये रु.23,778/- एवढी रक्कम जमा झाल्याचे दिसुन येते. गैरअर्जदारांचे म्हणण्याप्रमाणे धनादेश क्र.835442 हा तक्रारकर्तीच्या नावाने देण्यांत आला होता. याउलट खाते क्र.35114 जो कल्पना सुर्यवंशी च्या नावाने आहे त्यामधे जमा झालेल्या धनादेशाचा क्रमांक 835442 असा आहे. यावरुन एक बाब स्पष्ट होते की, सदरचा धनादेश हा कल्पना सुर्यवंशीच्या खात्यात जमा झाला तक्रारकर्तीच्या खात्यात नाही. गैरअर्जदारांनी ही बाब सिध्द केली नाही की, त्यांनी प्रत्यक्षात रक्कम ही तक्रारकर्तीला दिली व ती तिला मिळाली. अश्या परिस्थितीत तक्रारकर्तीची तक्रार सत्य आहे हे स्पष्ट होते. तक्रारकर्तीने या संबंधात गैरअर्जदारांचे वेळोवेळी ल क्ष वेधले मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व तक्रारकर्तीला योग्य दाद दिली नाही, ही त्यांचे सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे.
8. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिलेली असुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याकडे संबंधीत प्रकरणात कर्जाच्या रकमेची मागणी करु नये आणि वसुलीची कारवाई बंद करावी.
3. गैरअर्जदारांनी प्रथम तक्रारकर्तीला मानसिक त्रासापोटी रु.25,000/- एवढी नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदारांनी या प्रकरणात दोषी व्यक्तिचा/कर्मचा-याचा शोध घेऊन नुकसान भरपाईची रक्कम त्यांचेकडून वसुल करावी. तसेच तक्रारीच्या
खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे.
4. गैरअर्जदारांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30
दिवसांचे आंत करावे.