(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 28/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.19.03.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तिने गैरअर्जदारांकडे त्यांचे दाम दुप्पट योजनेत दि.20.05.2005 रोजी रु.7,000/- मुदत ठेव स्वरुपात ठेवलेले होते. सदर ठेवीची परिपक्वता रुक्कम रु.14,000/- द.सा.द.शे.13% व्याजासह मिळणार होते.
3. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीने सन-2005 रोजी गैरअर्जदार संस्थेच्या आवर्ती ठेव योजनेत 1 वर्षासाठी खाते उघडून त्यात रु.200/- प्रमाणे प्रतिमाह जमा केले. त्यानंतर मुलीच्या लग्नाकरीता गरज पडेल म्हणून सदरची रक्कम काढुन न घेता नवीन खाते उघडून ती रक्कम प्रतिमाह रु.200/- प्रमाणे नवीन वर्षाकरीता जमा करीत होती, अशा रितीने 2009 पर्यंत तक्रारकर्तीने पैसे भरले. तक्रारकर्तीने देय रकमेची वारंवार मागणी केल्यानंतर गैरअर्जदारांनी एक बचत खाते उघडून त्यामधे आवर्ती ठेवींचे पैसे जमा केले. दि.13.08.2009 रोजी सदर खात्यात रु.12,440/- एवढी रक्कम जमा असल्याचे नोंद सुध्दा गैरअर्जदारांनी घेतली, त्यापैकी गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास केवळ रु.4,000/- अदा केले. तसेच तक्रारकर्तीने वारंवार विनंती करुनही अद्याप पावेतो गैरअर्जदारांनी देय रक्कम व्याजासह परत केली नाही ही, ही गैरअर्जदारांची कृति अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब असुन सेवेतील कमतरता आहे. तक्रारकर्त्याने सदरीची तक्रार मंचात दाखल करुन मुदत ठेवींची रक्कम 13% व्याजासह व आवर्ती ठेवींची रक्कम रु.8,440/- 24% व्याजासह परत मिळावी, शारीरिक मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- व तक्रारीचा खर्चपोटी रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 4 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
6. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता गैरअर्जदार क्र.2 यांना संधी देऊनही ते मंचात हजर झाले नाही व आपले लेखी उत्तर दाखल केले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण विना लेखी जबाब चालविण्याचा आदेश मंचाने दि.18.11.2011 रोजी पारित केला आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 हे मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
7. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या कथनानुसार तक्रारकर्ती ही ‘ग्राहक’ नाही तसेच सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही. गैरअर्जदार क्र.1 यांच्या कथनानुसार ते संस्थेचे सदस्य म्हणून निवडून आले होते, परंतु त्यांनी दि.11.02.2011 रोजी राजीनामा दिलेला आहे. सदरचा व्यवहार हा गैरअर्जदारांच्या कार्यकाळात झालेला नाही, तसेच गैरअर्जदार संस्थेवर प्रशासकीय नेमणूक झालेली आहे, त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 हे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई देण्यांस जबाबदार नाही. तक्रारकर्तीने पैसे जमा करीत होती याबाबत कुठलाही दस्तावेज दाखल केलेला नाही, तसेच गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस आतापर्यंत रु.12,440/- मधुन दोन वेळा 2-2 हजार रुपये काढण्याची परवानगी दिलेली आहे.
वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नसल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
8. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.12.03.2012 रोजी आली असता गैरअर्जदार गैरहजर, मंचाने तक्रारकर्तीचा युक्तिवाद यापुर्वीच ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
9. वरीष्ठ न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निवाडयातील आशयाचा विचार करता तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ‘ग्राहक’ आहे, तसेच सदरची तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार आहे.
10. प्रस्तुत प्रकरणातील एकंदर वस्तुनिष्ठ पुरावे, तक्रारकर्तीचे शपथेवरील कथन व दस्तावेज पाहता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने गैरअर्जदारांच्या संस्थेमधे त्यांच्या ‘दामदुप्पट’, या योजनेत दि.20.05.2005 रोजी एकूण रु.7,000/- 13% व्याजावर मुदत ठेव स्वरुपात ठेवलेले होते. तक्रारकर्तीच्या शपथपत्रानुसार दि.20.11.2010 रोजी सदर ठेवीच्या परिपक्वता मुल्यापोटी तक्रारकर्तीस रु.14,000/- मिळणार होते, असे दिसुन येते.
11. दस्तावेज क्र.2 वरील बचत खाते पुस्तिकेवरुन हेही दिसुन येते की, तक्रारकर्तीच्या नावे रु.8,440/- एवढी रक्कम दि.11.11.2009 रोजी जमा होती व सदरच्या रकमा मागणी करुनही देय व्याजासह तक्रारकर्तीस दिल्या नाहीत. गैरअर्जदारांनी मंचात उपस्थित राहून तक्रारकर्तीचे म्हणणे नाकारले नाही अथवा तक्रारकर्तीच्या म्हणण्या विरुध्द कुठलाही पुरावा सादर केला नाही, त्यामुळे तक्रारकर्तीच्या तक्रारीत तथ्य आहे, या निष्कर्षाप्रत हे मंच येते.
12. प्रकरणातील सदर बाबी लक्षात घेता, वारंवार विनंती करुन गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीची देय रक्कम परत केली नाही, ही गैरअर्जदारांची कृति निश्चितच सेवेतील कमतरता आहे. तक्रारकर्तीची मुदत ठेव रक्कम देय व्याजासह देय तारखेस देण्याची जबाबदारी ही गैरअर्जदारांची होती. ती त्यांनी पार पाडली नाही म्हणून मुदत ठेवीचे परिपक्वता मुल्य (रु.14,000/-), रकमेवर सदरच्या देय तारखेस असणारे व्याज (परिपक्वता तारखेस), तसेच सेव्हींग अकाऊंटमधील रक्कम त्यावर नियमाप्रमाणे असणा-या व्याजासह देण्याची जबाबदारी गैरअर्जदारांची राहील, असे या मंचाचे मत आहे.
सबब सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर येते.
2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस मुदत ठेवीची परिपक्वता रक्कम रु.14,000/- द.सा.द.शे.9% व्याजासह तसेच आवर्ती ठेवींची रक्कम रु.8,440/- दि.11.11.2009 पासुन प्रत्यक्षात हाती येईपर्यंत बचत ठेवींवर नियमाप्रमाणे असणा-या व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- द्यावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा पुढील कालावधीकरीता आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.12% व्याज देय राहील.