श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – 23/08/2011) 1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी रु.30,000/- मुदत ठेवी अंतर्गत गैरअर्जदार संस्थेकडे दि.11.04.2007 ला गुंतविले होते व सदर मुदत ठेव ही 21.05.2009 रोजी परीपक्व होणार होती. तक्रारकर्त्यांना रकमेची गरज भासल्याने त्यांनी गैरअर्जदारांना मुदत ठेवीतील रक्कम ही मुदतपूर्व मागणी केली. परंतू गैरअर्जदार संस्थेने ती फेटाळली. तक्रारकर्त्यांनी रकमेची मागणी केली असता त्यांनी ही रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्यांच्या मते ही सेवेतील त्रुटी आहे. म्हणून त्यांनी मंचासमोर तक्रार दाखल करुन, रु.30,000/- ही रक्कम 18 टक्के व्याजासह मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारीसोबत मुदत ठेवीची प्रत व गैरअर्जदारांना दिलेल्या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठविण्यात आली असता त्यांनी तक्रारीस संयुक्तपणे लेखी उत्तर दाखल केले व नमूद केले आहे की, मंचास सदर तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. सर्वच ठेवीदारांनी एकाच कालावधीत गुंतविलेल्या रकमांची मागणी केल्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत आलेली आहे आणि कर्ज रकमेची वसुली करुन गुंतवणुकदारांना/ठेवीदारांना ते रकमा भविष्यकाळात परत करतील. याबाबत तक्रारकर्त्यांना सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नाही व सेवेत त्रुटी दिलेली नाही असे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे म्हणणे आहे. 3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. गैरअर्जदारांचे वकिलांनी त्यांचा लेखी जवाब हाच लेखी युक्तीवाद म्हणून ग्राह्य धरण्यात यावा अशा आशयाचे पुरसिस दाखल केले. मंचाने सदर प्रकरणी दाखल शपथपत्रे व दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. गैरअर्जदारांनी मंचाचे अधिकार क्षेत्राबाबत घेतलेला मुद्दा, वरिष्ठ न्यायालयांचे अनेक निकालांद्वारे यापूर्वीच निकाली काढलेला आहे. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तऐवज क्र. 1 वरील मुदत ठेवीच्या प्रमाणपत्राच्या प्रतीवरुन, तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार संस्थेकडे रु.30,000/- ही 21.04.2007 ते 21.05.2009 या कालावधीकरीता 10.5 टक्के व्याजाने गुंतविली होती, ही बाब सत्य असल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्त्यांनी सदर ठेवीची मागणी ही मुदतपूर्व केलेली आहे. परंतू गैरअर्जदारांनी ती अद्यापही तक्रारकर्त्यांना अदा न केल्याने सदर मुदत ठेवीचा परीपक्वता अवधी हा पूर्ण झालेला आहे, म्हणून तक्रारकर्ते सदर प्रकरणी रु.36,917/- ही रक्कम व्याजासह मिळण्यास पात्र आहे. मंचाचे मते ठेवीदारांनी/तक्रारकर्त्यांनी त्यांची जमा रक्कम परत मागितल्यानंतरही ती परत न करणे ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. 5. तक्रारकर्त्यांनी रकमेची मागणी ही मुलाच्या शिक्षणाकरीता केलेली आहे आणि रक्कम न मिळाल्याने त्यांना निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला असावा व पर्यायाने मंचासमोर येऊन दाद मागावी लागली, म्हणून मंचाचे मते तक्रारकर्ते मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांना, रु.30,000/- ही रक्कम दि.21.05.2009 पासून रकमेच्या संपूर्ण अदाएगीपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांना, रु.5,000/- मानसिक त्रासाच्या भरपाईपोटी व रु.2,000/- तक्रारीच्या खर्चापोटी द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा वैयक्तीकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |