सौ. जयश्री येंडे, मा. सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 28/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी विविध गैरअर्जदारांच्या रकमा जमा करण्याच्या योजनेंतर्गत दाम दुप्पट योजनेत रु.11,000/- गैरअर्जदार संस्थेकडे दि.24.08.2004 पासून 24.02.2010 पर्यंत गुंतविले होते. सदर ठेव सन 2010 ला परिपक्व झाली. तक्रारकर्त्यांना रकमेची गरज असल्याने, त्यांनी गैरअर्जदार संस्थेस 03.03.2010 ला मागणी केली. रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास नोटीस पाठविली. तसेच वारंवार लेखी व तोंडी तक्रारकर्त्यांनी रकमेची मागणी केली असता त्यांना गैरअर्जदारांनी रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्यांच्या मते ही सेवेतील त्रुटी आहे. म्हणून त्यांनी मंचासमोर तक्रार दाखल करुन, मुदत ठेवीची रक्कम व्याजासह मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई, नोटीसचा खर्च व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारीसोबत बचत खात्यांच्या प्रती व गैरअर्जदारांना दिलेल्या नोटीसची प्रत दाखल केलेली आहे.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना पाठविण्यात आली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल करण्याकरीता मंचाने संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही व उपस्थितही झाले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.18.10.2011 रोजी पारित केला.
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार सतत गैरहजर. म्हणून मंचाने सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्याचे ठरविले. मंचाने सदर प्रकरणी दाखल शपथपत्रे व दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तऐवज क्र. 1 ते 3 वरील पासबुक, मुदत ठेवीच्या प्रमाणपत्रावरुन व पत्रावरुन तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार संस्थेकडे असलेली मुदत ठेवीची रक्कम, जी तक्रारीत नमूद केले आहे, ती बाब सत्य असल्याचे निदर्शनास येते. गैरअर्जदारांनीही सदर बाब लेखी उत्तर देऊन किंवा दस्तऐवज देऊन, सबळ पूराव्यासह नाकारलेली नाही. तसेच तक्रारकर्त्यांना रकमेची आवश्यकता असल्याने, त्यांनी गैरअर्जदार संस्थेला रक्कम परत मागितली, परंतू गैरअर्जदार संस्थेने त्यावर कोणतीही पावले उचलली नाही, असा उल्लेख तक्रारकर्त्यांनी प्रशासक यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
5. मंचाचे मते गैरअर्जदार संस्थेने तक्रारकर्त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांची रक्कम परत करणे गरजेचे होते. सदर रक्कम मागणी करुनही परत न करणे ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. तसेच तक्रारकर्त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम दि.24.02.2010 रु.22,000/- हीसुध्दा गैरअर्जदारांनी परिपक्व झाल्यावर तक्रारकर्त्याने मागणी करुनही परत केलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्ते सदर प्रकरणी त्यांच्या मुदत ठेवीचे परीपक्वता मुल्य व्याजासह मिळण्यास पात्र आहेत.
6. गैरअर्जदारांनी मुदत ठेवीची रक्कम स्वतःजवळ ठेवून कुंठीत केलेली आहे, मात्र परत करण्याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत व व्याजही त्यावर पुढे दिलेले नाही. तक्रारकर्त्यांचे वय बघता त्यांना, मुदत ठेव परीपक्व झाल्यावरही ती परत न मिळाल्याने निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला असावा व पर्यायाने मंचासमोर येऊन दाद मागावी लागली, म्हणून मंचाचे मते तक्रारकर्ते मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांना, रु.22,000/- ही रक्कम दि.24.02.2010 पासून रकमेच्या संपूर्ण अदाएगीपावेतो रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्याव्या.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांना, रु.3,000/- मानसिक त्रासाच्या भरपाईपोटी व रु.2,000/- तक्रारीच्या खर्चापोटी द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा वैयक्तीकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.