(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 24/08/2011)
1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 14.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदार क्र.1 निर्मीत वोल्सवॅगन जेटा 1.9 टी.डी.आय.एम. टी डी ट्रेडलाइन ही कार दि.13.01.201. रोजी रु.11,50,000/- गैरअर्जदारांना देऊन बुक केली. दि.18.01.2010 रोजी सदर वाहन करेदी करता रु.2,35,043/- पुन्हा गैरअर्जदारांना देऊन वाहन खरेदी केले. सदर वाहन खरेदी केल्यावर तात्पुरती नोंदणी, विमा, डेपोचार्ज करीता रु.29,814/- तसेच अधिकची वारंटीपोटी रु.6,000/- असे एकूण रु.14,06,857/- गैरअर्जदारांना अदा केले व करारापोटी तक्रारकर्त्यास आणखी रु.1,15,207/-खर्च आला. सदरचे वाहन खरेदी केल्यावर एक महिन्याच्या आत त्यात खराबी आली दि.26.02.2010 रोजी सदर वाहन चालवित असतांना अचानक कारमधुन धुर निघू लागला. कारमध्ये भरपुर कुलर असतांनाही कारमधील थर्मामीटर कारचे तापमान 90˚ C पेक्षा जास्त तपमान दाखवीत होते. सदर घटनेची माहिती गैरअर्जदार क्र.3 यांना दिल्यानंतर त्यांनी कार घटनास्थळातून स्थलांतर केली. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या नागपूर येथील विक्रेत्याकडून अशी माहिती मिळाली की, सदर कारच्या क्लचप्लेट, प्रेशर प्लेट आणि बेअरींगमध्ये बिघाड झाला होता. तक्रारकर्त्याने दि.06.03.2010 रोजी सदर बाबींची माहिती ई-मेलव्दारे गैरअर्जदार क्र.1 यांना देऊन सदर वाहन नव्याने बदलवुन देण्याची विनंती केली असता गैरअर्जदार क्र.1 यांनी वोल्सबर्ग येथील मुख्यालयातून त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थता दर्शवुन तक्रारकर्त्याचे मेलची प्रत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविल्याची माहिती दिली. परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीस प्रतिसाद दिला नाही, म्हणून पुन्हा तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना तक्रारीच्या अनुषंगाने मेल पाठविला त्याच्या प्रति त्यांचे प्रतिनिधी श्री. प्रसाद फळसाळकर यांना पाठवुन वाहन दिलवुन देण्याची विनंती केली. परंत गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीचे प्रतिउत्तर दिले नाही. गैरअर्जदारांनी वारंटी कालावधीत फक्त सुटे भाग बदलवुन देण्याची अट टाकली असली तरी ती एकतर्फी असल्यामुळे तक्रारकर्त्याला बंधनकारक नाही. गैरअर्जदारांनी सदर तांत्रीक दोषयुक्त वाहन तक्रारकर्त्याला विकून सेवेतील कमतरता दिली म्हणून सदर तक्रार मंचात दाखल केली असुन ती व्दारे सदर वाहन बदलवुन द्यावे किंवा वाहनाची पूर्ण रक्कम रु.15,22,064/- परत करावी, तसेच दि.27.02.2010 पासुन प्रतिदिन रु.2,000/- प्रमाणे टॅक्सीचे भाडे द्यावे, नुकसानभरपाईपोटी रु.5,00,000/- व तक्रारीचा खर्च द्यावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता गैरअर्जदार क्र.1 हे नोटीस प्राप्त होऊन मंचात उपस्थित राहीले नाही व त्यांनी आपल्या कथन दाखल केले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.29.03.2011 रोजी पारित केला. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना नोटीस प्राप्त होऊन ते मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपला जबाब दाखल केला आहे.
4. गैरअर्जदार क्र.2 यांच्या कथनानुसार ते भारतभर नियुक्त केलेल्या विक्रेत्यांमार्फत वॉल्क्सवॅगेन ग्रुपच्या वाहनाचे खरेदी-विक्री सर्व्हीसिंगचे व्यवहार करतात. त्यांच्या ग्राहकांना विक्रीच्या वाहनाबाबत निगडीत कामाकरीता अटी व शर्तीवर हमी देते. वॉल्क्सवॅगन गाडया ह्या उच्च दर्जाच्या असुन कडक दर्जाच्या चाचण्या व सुरक्षीततेच्या चाचण्या पार पाडल्यानंतर तक्रारकदारास विक्री करता गैरअर्जदार क्र.3 च्या स्वाधीन करण्यांत आली. गैरअर्जदार क्र.2 यांच्या कथनानुसार सदर वाहनातील कथीत मुद्याबाबत तक्रारकर्त्या ऐवजी श्री. जयंत पाटील हे गैरअर्जदार क्र.2 यांचेशी संपर्क साधुन होते. वास्तविक तक्रारकर्त्याची सदर वाहनाबाबत कधीच तक्रार नव्हती, तक्रारकर्त्याने सदर वाहन मुंबई येथून मोबदला देऊन खरेदी केलेले आहे. तसेच नोंदणी क्रमांक देखील मुंबईवरुन काढलेला आहे. त्यामुळे कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याकरीता मुंबई न्यायालयास अधिकार आहे.
5. गाडी चालकाच्या किंवा तक्रारकर्त्याच्या व्यापक ड्राइविंग सवईचा (जी सवय वाईट मानल्या गेली आहे) परिणामी क्लचप्लेट, प्रेशर प्लेट आणि बेअरींगमध्ये बिघाड झाला या व्यतिरिक्त कुठलीही तक्रार नाही. दुरुस्ती ही गैरअर्जदार क्र.2 च्या आश्वासन धोरणा बाहेरील असतांना देखिल (गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्त्यास पूर्ण दुरुस्ती खर्च सामावुन घेण्याकरता प्रस्तावीत केले होते) गैरअर्जदार क्र.2 यांचे विक्रेता सादीक मोटर्स प्रा. लि. यांनी सदर गाडी वेळीच दुरुस्त केली ती दि.12 एप्रिल 2010 पासुन स्वाधीन करण्यांस तयार असतांना तक्रारकर्त्याने ती परत नेली नाही व सदरचे वाहन बदलवुन मागत आहे.
6. सदर दोष हा वाहन ढोबळपणाने नीट हाताळले नसल्यामुळे निर्माण झाला तो उत्पादन दोष नाही. गाडीच्या व्यापक ड्रायव्हींगमुळे क्लचप्लेटला हानी पोहचल्यामुळे किंवा जळाल्याने गिअर बॉक्स यंत्राची पूर्ण शक्ती स्थानांतर करण्यास क्लच असमर्थ झाल्याने यंत्राचे उष्णतामान 10 डिग्री सेल्सीयसच्या वर वाढले. क्लचप्लेट जळाल्यानंतरही गाडीची व्यापक ड्रायव्हींग करणे हे यंत्राला 90 डिग्री सेल्सीयसच्या वर जास्त उष्णता मिळणे हे कारण आहे. दि.29.02.2010 रोजी सदरचे वाहन सदर विक्रेत्याच्या कार्यशाळेत तक्रारकर्त्याने आणले. बोनटमधील वाईट कार्याच्या कारणंचे निदान लावण्याकरीता क्लच असेंबली सिस्टम डिसअसेंबल करण्याची अनुमती प्राप्त करुन घेण्याकरीता श्री. जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधुन होते. परंतु ते अनुमती देण्यांस नाखुष होते त्यासाठी 1 महिना लागला. दि.29, मार्च 2010 रोजी श्री. जयंत पाटील यांना ई-मेल पाठवून त्यांची अनुमती मागितल्यावर त्यांनी त्यास दि.29, मार्च 2010 रोजी पहिल्यांदा उत्तर देऊन असे भासविले की, प्रकरण हाताळण्याकरता त्यांना कधीच अनुमती मागितली नव्हती, ते वास्तविक पूर्णतः खोटे आहे. ‘डायरेक्ट इन्फॉरमेशन सिस्टीम सर्व्हिस’ नुसार विक्रेत्याने ग्राहकांच्या वाहनांबाबतच्या मुद्यांचे उत्तर गैरअर्जदार क्र.2 यांना देतांना त्यानुसार सदर विक्रेत्याने तक्रारकर्त्याच्या वाहनाचा अहवाल गैरअर्जदार क्र.2 यांना पाठविला. त्यामधे क्लचप्लेट, रिलीज बेअरींग बदली करण्याची गरज आहे. पुढचा अहवाल क्लच डिसेंबली केल्यानंतर पाठविण्यांत येईल असे कळविले व ते तक्रारकर्त्याच्या अनुमतीला अधीन आहे. श्री. जयंत पाटील यांनी अनुमती दिल्यानंतर क्लचप्लेट अनेकदा उघडण्यांत आल्यावर क्लचप्लेट जळून गेल्याचे निदर्शनास आले व तो वाहन निर्मीती दोष नसुन व्यापक ड्रायव्हींगचा परिणाम आहे.
7. गैरअर्जदार क्र.2 यांचे विक्रेता सादीक मोटर्स यांनी सदरचे वाहन वेळेत दुरुस्ती केल्यानंतर सुचना देऊनही तक्रारकर्त्याने ते नेले नाही, उलट श्री. जयंत पाटील यांना अवैधरित्या ई-मेल पाठविणे सुरु ठेवले व वाहन बदलवुन देण्याची मागणी केली, ती संयुक्तिक नाही व बेकायदेशिर आहे.
8. गैरअर्जदार क्र.3 यांच्या कथनानुसार गैरअर्जदारां विरुध्दचा कुठलाही वाद हा मुंबईतील कोर्टातच चालू शकतो. त्यांचे कथनानुसार सदर वादग्रस्त वाहनात अचानक धुर निघुन वाहनात बिघाड निर्माण झाला. तसेच वाहनाचे तापमान 10 डिग्री सेल्सीअसपेक्षा जास्त होते याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. तक्रारकर्त्याने त्यासंबंधात कुठलेही दस्तावेज दाखल केले नाही अथवा तज्ञांचा अहवाल सादर केला नाही. सदर बाबीची माहिती तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.3 यांना कधीही दिलेली नाही.
जर सदर बिघाड झाला असेल तर तो तक्रारकर्त्याच्या चुकीच्या ड्रायव्हींगमुळे झालेला आहे. तक्रारकर्त्याने सदर बाबीं संदर्भात गैरअर्जदार क्र.3 यांचेशी कधीही पत्रव्यवहार केला नाही. वाहनात निर्मीती दोष असल्याबाबत कुठल्याही तज्ञांचा अहवाल सादर केला नाही, वास्तविक गैरअर्जदार क्र.3 यांनी तक्रारकर्त्यास कार वेळेत दिली तसेच त्यासंबंधातील दस्तावेज देखिल वेळेत दिलीत यासंदर्भात तक्रारकर्त्याची कुठलीही तक्रार नाही. सदर कारवर वारंटी गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेली आहे.
9. वरील सर्व बाबी लक्षात घेता सदरची तक्रार चालविण्यायोग्य नाही म्हणून ती दंडासह खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती गैरअर्जदार क्र.3 यांनी केलेली आहे.
10. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत पृष्ठ क्र. 8 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात पावत्या व गैरअर्जदारांना पाठविलेल्या ई-मेलच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत.
11. सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता दि.09.08.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता युक्तिवादाकरीता अंतिम संधी देऊनही गैरहजर, गैरअर्जदार क्र.1 व 3 चे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकूण प्रकरण गुणवत्तेवरील निकालाकरीता ठेवण्यांत आले. सदर प्रकरणी दाखल तक्रार व दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// निष्कर्ष //-
12. सदर प्रकरणातील वस्तुस्थिती व दस्तावेजांवरुन असे निदर्शनास येते की, निर्वीवादपणे तक्रारकर्त्याने दि.13.01.201. रोजी रु.11,50,000/- गैरअर्जदारांना देऊन बुक केली. दि.18.01.2010 रोजी सदर वाहन करेदी करता रु.2,35,043/- पुन्हा गैरअर्जदारांना देऊन एकूण रु.13,85,043/- एवढा मोबदल्याला वाहन खरेदी केले. त्यासोबत व विमा डेपोचार्ज रु.29,614/- व अधीकचे वारंटीपोटी रु.6,500/- तसेच पंजीयनाचे वेळी वाहन करासह रु.1,15,207/- एवढा खर्च तक्रारकर्त्याने केल्याचे दिसुन येतो. तक्रारकर्त्याचे शपथपत्र, दाखल दस्तावेज व ई-मेल वरुन असे दिसुन येते की, दि.26.02.2010 रोजी म्हणजेच वाहन खरेदी केल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यात वाहनातुन अचानक धुर निघुन जळाल्याचा वास येऊन वाहन बंद पडले.
13. वरीष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निरनिराळया निवाडयांचा आशय असा दिसतो की, संपूर्ण गाडी बदलविण्यासाठी Manufacturing Defect सिध्द करणे आवश्यक आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे विक्रेता सादीक मोटर्स प्रा. लि. यांनी गैरअर्जदार क्र.2 यांना पाठवलेला ई-मेल दि.23.03.2010 दस्तावेज पान क्र.70 वरुन तसेच पान क्र.86 वरील अहवालावरुन असे दिसुन येते की, “Cluctch Plate, Pressure Plate, Release Bearing needs to be replace”, यावरुन सदर वाहनात Manufacturing Defect आहे, असे म्हणता येणार नाही. किंवा तसा सबळ पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. परंतु हेही तितकेच खरे की, प्रसिध्द कंपनीची सदर उत्तमदर्जाची गाडी रु.13,85,043/- एवढा मोबदला देऊन खरेदी केल्यानंतर एक ते सव्वा महिन्यात सदर गाडीमधुन धुर निघून त्यातील भाग जळले ही तेवढीच गंभीर बाब आहे. तसेच सदरची नवीन गाडी तक्रारकर्त्यास वर्कशॉप मधे दुरुस्त करायला टाकावी लागली. त्यानंतर सदर गाडी दि.29.02.2010 रोजी गाडी दुरुस्तीला टाकल्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांचा विक्रेता सादीक मोटर्स बोनटमधील वाईट कार्याच्या कारणांचे निदान लावण्याकरीता क्लच असेंबली सिस्टम डिसअसेंबल करण्याची अनुमती श्री. जयंत यांना मागितल्याचे दिसुन येते.
14. गैरअर्जदार क्र.2 यांच्या जबाबावरुन असे निदर्शनास येते की सदर गाडी गैरअर्जदार क्र.2 यांचा विक्रेता यांनी दुरुस्त केलेली आहे व दुरुस्तीचा खर्च व त्यातील बदललेल्या भागांचा खर्च गैरअर्जदार क्र. 2 यांनी सोसायची तयारी दर्शविली आहे. सदर वाहनाची 2 वर्षांची वारंटी दिलेली आहे, तरीपण तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडून संपूर्ण खर्च रु. रु.13,85,043/- एवढी मोठी रक्कम देऊन खरेदी केल्यावर सदर गाडी 1 ते सव्वा महिन्यात खराब होणे ही बाब निश्चितच गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे व ते त्यासाठी जबाबदार आहेत. तक्रारकर्त्याने सदर गाडी बदलवुन नवीन गाडी किंवा गाडीची संपूर्ण किंमत परत देण्याची मागणी या मंचाला मान्य करता येणार नाही. परंतु सदोष सुटे भाग बदलवुन कुठलेही चार्जेस न घेता तक्रारकर्त्यास सदर वाहन दुरुस्त करुन द्यावे. तसेच गाडी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा गाडीत दोष निर्माण झाला तर तक्रारकर्ता या मंचात दाद मागू शकतो. करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास गाडीतील सदोष सुटे भाग कुठलेही चार्जेस न घेता
बदलवुन तक्रारकर्त्यास सदर वाहन दुरुस्त करुन द्यावे.
3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास नुकसान भरपाईपोटी रु.1,00,000/- अदा करावे. तसेच दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- द्यावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.