निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 08/06/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 15/06/2012
तक्रार निकाल दिनांकः- 04/02/2014
कालावधी 01 वर्ष. 07 महिने. 20 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
माणिक पिता विठ्ठलराव ढगे. अर्जदार
वय 40 वर्षे. धंदा.व्यापार व शेती. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा. देवलगाव पोस्ट रेणाखळी ता.पाथरी जि.परभणी.
विरुध्द
शाखाधिकारी. गैरअर्जदार.
दि ओरिएंटल इन्शुरंन्स कं.लि. अॅड बी.ए.मोदानी.
शाखा कार्यालय,दौलत बिल्डींग,शिवाजी चौक,
परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या वाहनाचा अपघात विमा देण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने इ.स.2006 मध्ये सान्या मोटार्स औरंगाबाद कडून टाटा इंडीका (डिझेल) गाडी टाटा मोटार्स लि.कडून कर्ज घेवुन खरेदी केली होती, सदर वाहनाची आर.टी.ओ. परभणी येथे नोंद करण्यात आली व सदर वाहनास MH-22 / H-1188 असा नंबर दिला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर वाहनाच्या नोंदणी पुस्तकावर टाटा मोटार्स लि. हायर परचेस अॅग्रीमेंट बाबत नोंद करण्यात आली. सदर वाहनाबाबत घेतलेल्या कर्जाची परतफेड दिनांक 20/03/2010 पर्यंत करायची होती.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराच्या सदर वाहनाचा अपघात दिनांक 17/05/2008 रोजी झाला व त्यात वाहनाचे अतोनात नुकसान झाले. अर्जदाराने सदर वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडे काडून गाडी विमाकृत केली होती, ज्याचा पॉलिसी क्रमांक 182003/31/2008/389 होती. सदरची गाडी गैरअर्जदाराकडे विमाकृत असलेमुळे त्याने अपघातानंतर त्वरित अपघाता बद्दल माहिती गैरअर्जदाराला दिली व विमादावा क्रमांक 182003/31/2009/000089 दाखल केला. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार विमा कंपनीच्या निर्देशाप्रमाणे सर्व्हेअर परळीकर यांनी स्पॉट सर्व्हे केला व अपघातग्रस्त वाहन टाटा मोटार्स अधिकृत सर्व्हीस सेंटर “ प्रेम मोटार्स परभणी ” येथे आणण्यात आले, त्यानंतर वाहनाच्या झालेल्या नुकसानी बाबत फायनल सर्व्हे सर्व्हेअर तोतला यांनी केला व त्या प्रमाणे वाहनाच्या दुरुस्तीचे काम प्रेम मोटार्स परभणी याने सुरु केले.
अर्जदाराचे म्हणण की, अर्जदाराने वाहन दुरुस्तीसाठी काही सामान त्याने प्रिमीयर अॅटो वर्क्स नांदेड यांचेकडून खरेदी केले व त्याचे बिल रु. 3,850/- एवढे झाले प्रेम मोटार्सने क्रेडीट इन्व्हाईस क्रमांक 181, 189 व 183 अन्वये एकुण रु. 1,74,466/- चे स्पेअर पार्टस् वाहनास बसवले व त्याची मजुरी रु. 55,250/- एवढी झाली व संपूर्ण वाहन दुरुस्तीसाठी रु. 2,33,296/- खर्च लागला व त्यातील 2,29,716/- रु. प्रेम मोटार्स यांना देणे बाकी आहे. अर्जदाराचे म्हणणे की, अपघात विमादावा दाखल करतांना त्याने आवश्यक ती कागदपत्रे गैरअर्जदाराकडे दाखल केलेली आहेत, व काम पूर्ण झाल्यानंतर इंशुरन्स कंपनीने अर्जदारास प्रेम मोटार्सचे फायनल बील, पेमेंटच्या पावत्या दाखल करण्यास सांगीतले व ही कागदपत्रे दाखल झाल्यावर वाहनाचे फायनल इन्सपेक्शन करुन सर्व्हेअरच्या अहवाला प्रमाणे क्लेम रक्कम अर्जदाराच्या वाहनावर फायनान्सचा बोजा असले कारणाने टाटा मोटार्स लि. देण्यात येईल, असे विमा कंपनीने अर्जदारास सांगीतले.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या मालकीच्या सदर गाडीवर टाटा फायनान्सचा बोजा होता व कर्ज रक्कम देणे बाकी होते, प्रेम मोटार्सचे पूर्ण पैसे दिल्याशिवाय अर्जदारास फायनल कॅश बिल व पेमेंटच्या पावत्या देता येणार नाही, असे प्रेम मोटार्सने सांगीतले, कारण क्लेमचा चेक फायनान्स कंपनीच्या नावे निघणार होता, विमा कंपनीने नाहरकत पत्र आणले तरच क्लेम रक्कम प्रेम मोटार्सला देता येईल, असे सांगीतले, परंतु कर्ज बाकी असल्याने तसे पत्र देण्यास टाटा कंपनी तयार नव्हती.
अर्जदाराचे म्हणणे की, इ.सं. 2009 मध्ये क्लेम केल्यावर व वाहन दुरुस्त झाल्यावर अर्जदाराकडे पैसे नसले कारणाने सतत 2 वर्ष अर्जदार काहीही करु शकला नाही व शेवटी अर्जदाराने एप्रिल 2011 मध्ये फायनान्सकडे कर्जाची संपूर्ण रक्कम भरली व त्याप्रमाणे दिनांक 30/04/2011 रोजी त्यांचे N.O.C. घेतले. सदर कागदपत्र आर.टी.ओ. कार्यालयास देवुन दिनांक 25/05/2011 रोजी सदर वाहनावरचा बोजा कमी केला. त्यानंतर अर्जदार विमा कंपनीस भेटला असता त्यांनी अर्जदारास तोंडीच सांगीतले की, सदरची फाईल 2009 मध्येच बंद केली आहे. व अर्जदारास धक्का बसला कारण त्यास विमा कंपनीने लेखी कांहीही विमा दाव्याबाबत कळविले नव्हते, शेवटी अर्जदाराने 09/09/2011 रोजी विमा कंपनीस पत्र दिले व फाईल ओपन करुन प्रेम मोटार्सच्या नावे क्लेम देण्यात यावे, अशी विनंती केली, तरी देखील विमा कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही, पुन्हा अर्जदाराने दिनांक 18/08/2011 रोजी दुसरे पत्र विमा कंपनीस दिले, शेवटी विमा कंपनीने अर्जदाराच्या नावे दिनांक 27/09/2011 रोजी पत्र दिले व त्यात नमुद केले की, अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता न केले कारणाने त्यानी 08/10/2009 रोजी फाईल बंद केली आहे व पॉलिसीच्या नियम क्रमांक 7 प्रमाणे सदर फाईल ओपन करता येत नाही व वाहनाचे पुन्हा परिक्षण करता येत नाही, व कुठलाही क्लेम अर्जदारास देता येत नाही असे कळविले.
अर्जदाराचे म्हणणे की, वाहनाची तपासणी, सर्व्हेअर रिपोर्ट या गोष्टी पूर्ण झाल्या होत्या व केवळ शेवटचे कॅश बिल व पावत्या न दिल्याने विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारला व दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की, अशी कोणतेही कंडीशन असल्याबाबतची कागदपत्रे विमा कंपनीने अर्जदारास दिली नव्हती व 08/10/2009 रोजी देखील अर्जदारास कळविले नव्हते, व विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व अर्जदाराचे म्हणणे की, विमा कंपनीने दिनांक 27/09/2011 रोजी लेखी पत्र देवुन अर्जदाराचा विमादावा नाकारला व तेच या तक्रारीचे मुळ कारण आहे, म्हणून सदरची तक्रार मुदीतत आहे. अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदाराना असा आदेश द्यावा की, त्याने अर्जदाराचे वाहन क्रमांक MH-22/H-1188 च्या पॉलिसी अंतर्गत त्याचा विमादावा मंजूर करावा व वाहन दुरुस्तीसाठी लागलेली रक्कम रु. 2,33,296/- अर्जदारास दिनांक 27/09/2011 पासुन रक्कम देई पर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याजसह अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, व मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. अश विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 7 कागदपत्राच्या यादीसह कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये 1) Copy of Credit Invoice No. 181, 182, and 183 of Rs. 1,74,466/- 2) Copy of Labour Charges 3) Copy of Invoice No.112, 4) copy of Invoice of Termination of contract Tata Motors, 5) Copy of R.C. Book of MH-22/H-1188, 6) Copy of Letter issued by insurance company to applicant, 7) Copy of Letter of applicant. इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. व ती खारीज होणे योग्य आहे व तसेच विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदार हा वाहन क्रमांक MH-22/H-1188 चा मालक आहे, हे मान्य आहे, परंतु सदरचे वाहन हे अर्जदाराने टाटा फायनान्स कडून हायर परचेस अॅग्रीमेट प्रमाणे खरेदी केली होती व त्याची नोंद गाडीच्या कागदपत्रावर करण्यात आली होती हे अमान्य आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने हे अमान्य केले आहे की, अर्जदाराच्या सदर गाडीचा अपघात दिनांक 17/05/2008 रोजी झाला व त्यात गाडीचे खुप नुकसान झाले होते. सदरची गाडी त्यांच्याकडे विमाकृत केली होती हे मान्य केले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, सदर गाडीच्या अपघाता नंतर अपघाता बद्दल सुचना मिळाल्यानंतर विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नोंदवुन घेतला व त्यानंतर सर्व्हेअर परळीकर यांनी घटनेच्या ठिकाणचा सर्व्हे केला व सर्व्हेअर तोतला यांनी अंतीम अहवाल विमा कंपनीच्या आदेशा प्रमाणे तयार केला व तसेच विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने दाखविले वाहन दुरुस्तीसाठी लागणारा खर्च चुकीचा व खोटा दाखविला व तो अमान्य आहे. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने सदर अपघात विमादावा दाखल करताना अपुरे कागदपत्र दाखल केले होती, अर्जदाराने प्रेम मोटार्सचे फायनल बिल व पेमेंटच्या पावत्या विमा प्रस्तावा सोबत दाखल केले नव्हते.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराची सदरची फाईल 2009 मध्येच बंद केली होती व सदरची फईल परत एकदा सुरु करा म्हणून अर्जदाराने दिनांक 09/06/2011 रोजी विमा कंपनीस पत्र दिले, याबद्दल विमा कंपनीने दिनांक 27/09/2011 रोजी अर्जदारास पत्र पाठवुन कळविले की, अर्जदाराची सदर फाईल ही 08/10/2009 रोजीच बंद करण्यात आली आहे.व पॉलिसीच्या नियम क्रमांक 7 प्रमाणे सदरचा क्लेम परत चालु करता येत नाही व वाहनाचे पुनर्निरिक्षण करता येत नाही वरील तांत्रिक मुद्यावर विमा कंपनीने अर्जदाराचा दावा नाकारला, हे अर्जदाराचे म्हणणे चुकीचे आहे. तसेच सदरची तक्रार ही मुदत बाहय आहे. कारण विमादावा हा विमा कंपनीने 2009 सालीच बंद केली आहे, म्हणून सदरची तक्रार चालवणे योग्य नाही व ती खारीज होणे योग्य आहे. विमा कंपनीचे अतिरिक्त लेखी जबाबात म्हणणे की, सर्व्हेअरचा अहवाली प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने अर्जदारास कागदपत्राची पुर्तता करण्यास सांगीतले, परंतु अर्जदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर विमा कंपनीने अर्जदारास लेखी पत्र देवुन सदर कागदपत्राची पुर्तता करणेस सांगीतले, तरीही अर्जदारने कोणताही प्रतिसाद दिला नाही व शेवटी विमा कंपनीने दिनांक 12/08/2008 रोजी आर.पी.ए.डी.व्दारे सदर कागदपत्राची अर्जदाराने पुर्तता न केलेमुळे त्याची फाईल बंद करण्यात आली असे सांगीतले.
अर्जदाराची सदरची तक्रार ही मुदत बाहय असले कारणाने व विमा कंपनीने सेवेत त्रुटी दिली नसले कारणाने सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हणणे आहे.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 11 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
विमा कंपनीने नि.क्रमांक 14 वर 7 कागदपत्राच्या यादीसह 7 कागदपत्रे दाखल केली आहे, ज्यामध्ये सर्व्हेअर तोतला यांचा सर्व्हे रिपोर्ट, विमा कंपनीने अर्जदारास लिहिलेले पत्र, विमा कंपनीने अर्जदारास पाठविलेले पॉकीट, अर्जदाराने विमा कंपनीस लिहिलेले पत्र, विमा कंपनीने अर्जदारास लिहलेले पत्र, पॉलिसीची प्रत. इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराची सदरची तक्रार ही मुदत बाहय आहे काय ? नाही.
2 गैरअर्जदार विमा कंपनी अर्जदाराच्या मालकीची गाडी क्रमांक
MH-22/H-1188 चा अपघात विमादावा मंजूर करण्याचे
नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा वाहन क्रमांक MH-22/H-1188 चा मालक आहे व सदरची गाडी ही विमा कंपनीकडे विमाकृत होती व सदर वाहनाचा अपघात विमा कालावधीतच म्हणजे 17/05/2008 रोजी झाला होता, ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे.
अर्जदाराने त्याचा गाडीचा अपघात नुकसान भरपाई विमादावा दाखल केला होता, ही बाब देखील अॅडमिटेड फॅक्ट आहे, परंतु विमा कपंनीचे म्हणणे की, सदरचा अर्जदाराचा अपघात विमादावा हा इ.सं. 2009 मध्येच फेटाळून फाईल बंद केली होती व सदरची नोटीस अर्जदारास तामील झाली होती, याबाबत विमा कंपनीने कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही, याचाच अर्थ असा निघतो की, अर्जदारावर सदरची विमा फाईल बंद केल्याबाबतची नोटीस तामील झाली नव्हती व याबाबत अर्जदारास माहिती झाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीकडे सदरची फाईल परत एकदा ओपन करा, म्हणून दिनांक 09/06/2011 रोजी अर्ज केला होता, ही बाब नि.क्रमांक 14/4 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते व अर्जदाराच्या सदरच्या पत्रास विमा कंपनीने दिनांक 27/09/2011 रोजीच्या पत्रान्वये अर्जदाराची फाईल 2009 मध्येच बंद झाली असे कळविले होते, व सदर फाईल बंद बाबतची माहिती अर्जदारास सदर पत्राव्दारे कळविली होती, ही बाब नि.क्रमांक 14/5 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते, म्हणजेच सदरची अर्जदाराची तक्रार ही मुदतीत आहे, असे मंचाचे ठाम मत आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देत आहोंत.
मुद्दा क्रमांक 2.
अर्जदाराचे वाहन क्रमांक MH-22/H-1188 चा अपघात झाला होता ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे, फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, अपघाता मध्ये अर्जदाराच्या मालकीच्या सदर वाहनाचे किती रु. चे नुकसान झाले होते, याबाबत अर्जदाराचे म्हणणे की, सदर अपघतात वाहनाचे 2,33,296/- रु. चे नुकसान झाले होते, हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने संबंधीत प्रेम मोटार्सचे शपथपत्र मंचासमसोर दाखल केले नाही, केवळ पावत्या दाखल केले आहेत, त्यामुळे सदरच्या पावत्या पुराव्यात ग्राहय धरणे मंचास योग्य वाटत नाही, याउलट गैरअर्जदार विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री.एम.आर.तोतला यांनी सदर अपघातात वाहनाची पहाणी करुन अंतीम सर्व्हे रिपोर्ट तयार केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या वाहनाचे सदर अपघताता मध्ये 1,78,027/- रु. चे नुकसान झाले होते, ही बाब नि.क्रमांक 14/1 वर दाखल केलेल्या फायनल सर्व्हे रिपोर्ट वरुन सिध्द होते. याचाच अर्थ असा निघतो की, विमा कंपनीने अर्जदारास वाहन अपघात विमादावा रक्कम म्हणून 1,78,027/- रु. देणे बंधनकारक होते व ते विमा कंपनीने अर्जदारास न देवुन व अर्जदाराची फाईल बंद करुन निश्चितपणे अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 2 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराचे
वाहन क्रमांक MH-22/H-1188 चा अपघात नुकसान भरपाई विमादावा पोटी
अर्जदारास रु. 1,78,027/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख अठ्याहत्तर हजार
सत्तावीस फक्त ) द्यावेत.
3 गैरअर्जदार विमा कंपनीने आदेश मुदतीत तक्रार अर्ज खर्चा पोटी रु. 2,000/-
फक्त ( अक्षरी रु. दोनहजार फक्त ) अर्जदारास द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.