निकालपत्र
निकाल दिनांक – १७/०६/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
________________________________________________________
१. तक्रारदार हे वाळकी ता.जि. अहमदनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी त्यांच्या घरगुती वापरासाठी महिंद्रा कंपनीचे बोलेरो जीप नंबर एमएच-१६-एटी-६९७५ हे वाहन विकत घेतले. त्याचा इंजीन क्रमांक जीपीडी-४जे७७२७२ असा असुन त्याचा चेसीस क्रमांक एमए१एक्सएक्स२जीपेकेडी६ असा आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या सदर वाहनाचा सामनेवाले विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. त्याचा पॉलिसी क्रमांक १५१८०४३११३०१००००३७०८ असा असुन त्याचा कालावधी दिनांक १०-१०-२०१३ ते ०९-१०-२०१४ असा होता. दिनांक २७-०६-२०१४ रोजी तक्रारदार त्यांचे ड्रायव्हर परसराम आनंदा परकाळे हे यांचे मित्र नामे चिन्नान वेल्लाई कुंदेवेर यांना पिंपरी येथुन शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनासाठी त्यांचे जीपने घेऊन गेले होते. सदरहु वाहन वाटेफळ गांवचे शिवारात हॉटेल विश्वशांती समोर समोरून येणारा ट्रक नंबर पीबी-४६एम-६२६५ या वाहनाने धडक दिली. त्यामध्ये जीपरील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला व इतर इसम सोबत असलेले श्री.चिन्नान जखमी झाले व त्याचा जगीच मृत्यू झाला. ड्रायव्हर यांनी सदरील अपघाताची नोंद नगर तालुका पोलीस स्टेशन अहमदनगर येथे गेले व गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर T११६/२०१४ दाखल केला. त्यानंतर तक्रारदाराने विमा कंपनीला वाहनाला अपघात होऊन वाहनाचे पुर्णपणे नुकसान झाल्याबद्दल सांगितले व तक्रारदाराने विमा कंपनीकडे संपुर्ण कागदपत्रांसह विमा दावा सादर केला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे सांगण्यावरून सदर वाहन क्रेनच्या सहाय्याने त्यांचे अधिकृत शोरूमला जमा केले. त्यानुसार शोरूममधील संबंधीतांनी त्या वाहनाचे १००% नुकसान झालेबाबत कळविले. जोपर्यंत तुमचा विमा दावा मंजुर होत नाही तोपर्यंत तुमचे वाहन दुरूस्त करता येणार नाही. तोपर्यंत तक्रारदार यांचे वाहन त्यांनी ताब्यात ठेवले. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीकडे विमा दाव्याबाबत चौकशी केली. परंतु सामनेवाले यांनी दिनांक २०-१०-२०१५ रोजी पत्र देऊन अपघाताचे दिवशी सदरील वाहनावरील ड्रायव्हरचा पोलीसासमोरील दिनांक ०३-०७-२०१४ रोजीचा जबाब पाहता गाडी चिन्नान चालवित होते व विमा कंपनीचे अधिकारी यांच्यासमोर जबाब देतांना परसराम आनंदा परकाळे यांनी ते गाडी चालवित असल्याचा जबाब दिलेला आहे. दोन्ही जबाबामध्ये विसंगती असल्याचे एकमेव कारणावरून तक्रारदार यांचा क्लेम बेकायदेशिररित्या नामंजुर केला. अशाप्रकारे तक्रारदाराचे वाहनाचे नुकसान भरपाई झाले आहे व सदरची नुकसान भरपाई सामनेवाले विमा कंपनीने विमा दावा नामंजुर करून अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्यामुळे तक्रारदाराने तक्रार दाखल करून परिच्छेद क्रमांक ९ प्रमाणे मागणी केली आहे.
२. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी कथन निशाणी १२ नुसार प्रकरणात दाखल करून त्यामध्ये सदरील वाहनचा विमा उतरविल्याची बाब मान्य केलेली आहे. तक्रारदार यांनी वाहनाचा अपघात झाल्यानंतर सामनेवालेंनी त्यांच्या इन्व्हेस्टीगेटरला त्या ठिकाणी पाठवुन तपासणी करण्यास सांगितले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, ड्रायव्हर परसराम आनंदा परकाळे यांनी त्यांच्या जबाबात असे सांगितले की, ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी त्यांचे सोबत असलेले श्री.चिन्नान हे वाहन चालवित होते व सदरचे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच पोलिसांनी दिलेल्या शपथपत्रामध्ये मी स्वतः वाहन चालवित होते, असे सांगितले. त्यामुळे दोन्ही शपथपत्रामध्ये तफावत आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराला दिनांक १३-०३-२०१५ रोजी पत्र पाठवुन विचारले की, ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी वाहन कोण चालवित होते याविषयी माहिती मागितली व त्या ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसन्स दाखल करण्याकरीता कळविले. परंतु तक्रारदार यांनी ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केले नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा दिनांक २०-१०-२०१५ रोजी तक्रारदाराला पत्र देऊन विमा दावा नामंजुर केल्याचे कळविले. सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर करून सेवेत कोणतीही कमतरता केलेली नाही. अशाप्रकारे तक्रारदाराने तक्रारीत केलेली मागणी चुकीची आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले यांनी मंचासमक्ष केली आहे.
३. तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेल कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.व्ही. बी. चितळे यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र, दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
(३) | आदेश काय ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हे वाळकी ता.जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे व त्यांनी त्यांच्या घरगुती वापरासाठी महिंद्रा कंपनीचे बोलेरो जीप नंबर एमएच-१६-एटी-६९७५ हे वाहन विकत घेतले वर सदरील वाहनाचा सामनेवाले विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. त्याचा पॉलिसी क्रमांक १५१८०४३११३०१००००३७०८ असा असुन त्याचा कालावधी दिनांक १०-१०-२०१३ ते ०९-१०-२०१४ असा होता. अशाप्रकारे सामनेवाले व तक्रारदार यांच्यामध्ये ग्राहक असे नाते निर्माण झाले. सदरील बाबत तक्रारदाराने प्रकरणात पॉलिसी दाखल केलेली आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२) : दिनांक २७-०६-२०१४ रोजी तक्रारदार त्यांचे ड्रायव्हर परसराम आनंदा परकाळे हे तक्रारदाराचे मित्र नामे चिन्नान वेल्लाई कुंदेवेर यांना पिंपरी येथुन शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनासाठी त्यांचे जीपने घेऊन गेले होते. सदरहु वाहन वाटेफळ गांवचे शिवारात हॉटेल विश्वशांती समोर समोरून येणारा ट्रक नंबर पीबी-४६एम-६२६५ या वाहनाने धडक दिली. त्यामध्ये जीपवरील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला व सोबत असलेला व्यक्ती श्री.चिन्नान जखमी होऊन जागीच मरण पावले. त्यानंतर अपघाताची नोंद नगर तालुका पोलीस स्टेशन अहमदनगर येथे केली व गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर T११६/२०१४ नोंदविण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने विमा कंपनीला वाहनाला अपघात होऊन वाहनाचे पुर्णपणे नुकसान झाल्याबद्दल सांगितले व तक्रारदाराने विमा कंपनीकडे संपुर्ण कागदपत्रांसह विमा दावा सादर केला. तक्रारदार यांनी तक्रारीत असे कथन केले की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे सांगण्यावरून सदर वाहन क्रेनच्या सहाय्याने त्यांचे अधिकृत शोरूमला जमा केले. त्यानुसार शोरूममधील संबंधीतांनी त्या वाहनाचे १००% नुकसान झालेबाबत कळविले. जोपर्यंत तुमचा विमा दावा मंजुर होत नाही तोपर्यंत तुमचे वाहन दुरूस्त करता येणार नाही. तोपर्यंत तक्रारदार यांचे वाहन त्यांनी ताब्यात ठेवले. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीकडे विमा दाव्याबाबत चौकशी केली. परंतु सामनेवाले यांनी दिनांक २०-१०-२०१५ रोजी पत्र देऊन अपघाताचे दिवशी सदरील वाहनावरील ड्रायव्हरचा पोलीसासमोरील दिनांक ०३-०७-२०१४ रोजीचा जबाब पाहता गाडी चिन्नान चालवित होते असे आहे व विमा कंपनीचे अधिकारी यांच्यासमोर जबाब देतांना परसराम आनंदा परकाळे वाहन चालक हे गाडी चालवित असल्याचा जबाब दिलेला आहे. दोन्ही जबाबामध्ये विसंगती असल्याचे एकमेव कारणावरून तक्रारदार यांचा क्लेम बेकायदेशिररित्या नामंजुर केला, ही बाब नामंजुर केल्याच्या पत्रावरून स्पष्ट होते व सामनेवाले यांनीसुध्दा लेखी कैफीयतीमध्ये नामंजुर केल्याचे सदरचे कारण नमुद केले आहे. तक्रारदाराने त्याचे तक्रारीसोबत वाहनाचा अपघात झाला याबाबत कागदपत्र दाखल केलेले आहेत. अपघात झालेबाबत व सामनेवाला विमा कंपनीला सदरील वाहनाचे पॉलिसीबद्दल कोणताही वाद नाही. तसेच सामनेवाले यांनी वाहन चालकाच्या जबाबामध्ये तफावत असल्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदाराचे डायव्हर यांचा वाहन चालविण्याचे परवान्याची मागणी केली परंतु तक्रारदार यांनी ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केले नाही. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार अपघाताच्यावेळी वाहन चालकाकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, या कारणासाठी विमा दावा नाकारण्यात येतो असा बचाव लेखी कैफीयतीमध्ये घेतला. परंतु प्रकरणातील दस्तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारदाराने ड्रायव्हरचा वैध वाहन चालविण्याचा परवाना दाखल केलेला आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी लेखी कैफियतीमध्ये घेतलेला बचाव ग्राह्य धरता येणार नाही. तसेच सामनेवाले यांनी विमा दावा नामंजुर केल्याच्या पत्रामध्ये असे नमुद केले की, वाहन चालकाने दिलेल्या जबाबामध्ये तफावत आहे. त्यामुळे विमा दावा सदरच्या कारणावरून नामंजुर करणे संयुक्तिक वाटत नाही, असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी सदरहु वाहनाची तपासणी करून सर्व्हे रिपोर्ट दाखल करणे आवश्यक होते. यावरून हे स्पष्ट होते की, सामनेवाले यांचे सेवेत त्रुटी आहे. म्हणुन मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (३) : वरील संपुर्ण कथनावरून व दाखल कागदपत्रांवरून नेमके वाहनाचे किती व कोणते नुकसान झाले, ही बाब स्पष्ट झाली नाही व तक्रारदारानेसुध्दा कोणतेही खर्चाचे कागदपत्र दाखल केलेले नाहीत. तसेच वाहनाचे फोटो दाखल नाहीत. केवळ १००% नुकसान झाले असे तक्रारीत कथन केले, परंतु तो पुरावा धरता येणार नाही व सामनेवाले यांनीसुध्दा नामंजुर केल्याचे पत्रावरून नामंजुर केल्याचे कारण संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मंचाने असा निष्कर्ष काढला की, सदरचा विमा दाव्याची सामनेवाले यांनी पुन्हा पडताळणी करून योग्य तो निर्णय घ्यावा. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदाराच्या वाहनाच्या नुकसानीची नियमाप्रमाणे आकारणी करून होणारी नुकसानभरपाईची रक्कम तक्रारदाराला द्यावी. |
३. सामनेवालेने यांनी तक्रारदाराला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |