निकालपत्र
दिनांक 07.12.2013
(घोषित द्वारा ः-श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार श्रीमती अनिता अशोक भोसले यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचे पती अशोक देवराव भोसले यांचा दि.09.07.2010 रोजी विद्युत शॉक लागून मृत्यू झाला.घटनेची फिर्याद भाऊसाहेब रुस्तूम गाडे यांनी पाटोदा पोलिस स्टेशन येथे दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला, तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी मयताचे शवविच्छेदन केले व अहवाल दिला. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढलेला आहे. तक्रारदाराने पतीच्या निधनानंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गतचा नुकसान भरपाईचा दावा तालुका कृषी अधिकारी पाटोदा यांचे मार्फत सर्व कागदपत्रासह सामनेवाले क्र.1 व 2 याच्याकडे दाखल केला.संपूर्ण कागदपत्र देऊन सामनेवाले यांनी विमा दावा मंजूर केला नाही व दाव्या संदर्भात कोणतेही पत्र तक्रारदारास दिलेले नाही. म्हणून तक्रारदार यांनी तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, तक्रारदारास सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तरित्या विमा दावा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 12 टक्के व्याज मिळावे तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले.तक्रारदार हा शेतकरी होता व कूटूंबाची जबाबदारी त्यांचेवर होती हे त्यांना माहीत नाही म्हणून नकार देतात. हे मान्य नाही की, तक्रारदार यांचे पतीची जमिन ही मौजे निरगुडी येथे आहे. विमा तालुका कृषी अधिकारी यांचे ब्रोकींग इन्शुरन्स कंपनी व विमा कंपनी यांनी संयूक्तपणे काढला आहे ही बाब मान्य आहे. सदर शेतकरी यांनी सामनेवाले यांचे कडे कूठलाही हप्ता भरलेला नाही म्हणून ते या न्यायालयात या सामनेवाले विरुध्द दाद मागण्यास पात्र नाही.रितसर अर्ज कंपनीकडे मुदतीत पाठवलेला नाही त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच येत नाही. अर्ज पाठवल्याबाबतची पोहच पावती तक्रार अर्जासोबत दाखल नाही.तक्रारदाराचा विमा दावा कंपनीने नामंजूर केलेला नाही त्यामुळे तक्रारीस कारण घडलेले नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर नोटीस मिळूनही हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
सामनेवाले क्र.3 हे नोटीस मिळूनही हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. विमा प्रस्ताव त्यांचेकडे दि.19.10.2010 रोजी प्राप्त झाला. तो प्रस्ताव त्यांनी दि.12.10.2010 रोजी विमा कपंनीस वेळेत सादर केलेला आहे. सामनेवाले क्र.3 यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवलेली नाही. म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी पुराव्याचे समर्थनार्थ स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच प्रपत्र, क्लेम फॉर्म क्र.1 व 2, 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा,फेरफार चा उतारा,एफ.आय.आर. मरणोत्तर पंचनामा,घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी अशोक देवराव भोसले व अशोक
देवराव पोटभरे हे दोन्ही नांव एकाच व्यक्तीची आहे
ही बाब सिध्द केली आहे काय ? नाही.
2. तक्रारीत मागणी केलेली रक्कम मिळण्यास तक्रारदार
पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदारांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले. त्यातील कथन असे की, तक्रारदार यांनी त्यांचे मयत पती अशोक देवराव भोसले यांच्या निधनानंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्याकामी सामनेवाले क्र.3 यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराचे मयत पती अशोक देवराव भोसले यांच्या नांवे निरगुडी ता.पाटोदा जि.बीड येथे गट नं.530 मध्ये शेत जमिन आहे. ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी 7/12 उतारा, 8-अ,6-क तलाठी प्रमाणपत्र फेरफार नक्कल दाखल केली आहे. सदर कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र हे मयत अशोक देवराव भोसले यांच्या नांवे नसून ते कागदपत्र अशोक देवराव पोटभरे यांच्या नांवावर आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पोलिस पेपरचे अवलोकन केले असता मयताच्या नांवे शेत जमिन ही निरगुडी शिवार येथे गट नं.430 मध्ये आहे. तक्रारदार यांनी त्यांचे मयत पती अशोक देवराव भोसले हे शेतकरी होते व शेती व्यवसाय करत होते ही बाब सिध्द केली नाही. तसेच तक्रारदार यांच्या कथनेनुसार अशोक देवराव पोटभरे व अशोक देवराव भोसले या दोन्ही नांवाचे व्यक्ती एकच आहेत ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी मंचासमोर कोणताही असा ठोस पुरावा किंवा त्याबाबतचे कागदपत्र दाखल केले नाहीत जेणेकरुन दोन्ही नांवाचे व्यक्ती एकच आहे ही बाब सिध्द होऊ शकते.
वर नमूद केलेले कथन व सामनेवाले यांच्या जवाब यांचे अवलोकन केले. यावरुन मंचाचे असे मत आहे की, महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत जी योजना राबविली आहे ती शेतक-यांच्या हितासाठी आहे. त्यासाठी मयत व्यक्ती हा शेतकरी असावा व त्यांच्या नांवे शेत जमिन असणे गरजेचे आहे.सदर प्रकरणात तक्रारदार यांनी मयत पती अशोक देवराव भोसले यांच्या नांवे शेतजमिन होती ही बाब सिध्द केली नाही. तसेच तक्रारदार यांनी अशोक देवराव पोटभरे व अशोक देवराव भोसले हे दोन्ही नांवाचे व्यक्ती एकच आहे ही बाब मंचासमोर सिध्द केली नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक