निकालपत्र
दिनांक 21.11.2013
(घोषित द्वारा ः-श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार श्रीमती कमलबाई सदाशिव खराद यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे,तक्रारदाराचे पती सदाशिव जीजा खराद हे मौजे मालेगांव (खुर्द) ता.गेवराई जि.बीड येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू दि.01.04.2010 रोजी ट्रकचे टायर अंगावरुन गेल्यामुळे झाला आहे. सदरील अपघाता बाबत पोलिस स्टेशन चकलंबा यांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ पंचनामा तयार केला. तक्रारदाराने पोलिस स्टेशनची सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदाराचे पती व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नांवावर जमीन गट क्र.133 यामध्ये होती. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढलेला आहे. त्यांची कार्यवाही तालुका कृषी अधिकारी व कबाल इन्शुरन्स कंपनी व विमा कंपनी हयांनी संयूक्तपणे कार्यवाही केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 मार्फत सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेकडे रितसर दावा दाखल केला आहे. . विमा योजने अंतर्गत वर्ष 2009-2010 या एका वर्षासाठीचा प्रिमियम सामनेवाले क्र.1 यांचेकडे जमा केला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी विमा दावा आजपर्यत मंजूर केला नाही. म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल करुन तक्रारदाराला विमा रक्कम रु.1,00,000/- 18 टक्के व्याजासह व शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- दयावेत अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 हे मंचात हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे.तक्रारदारांचे पती सदाशिव यांचा मृत्यू दि.1.4.2010 रोजी ट्रकचे टायर अंगावरुन गेल्यामुळे झाला ही बाब माहीत नसल्यामुळे मान्य नाही.हे मान्य नाही की, चकलांबा पोलिस स्टेशनने पंचनामा केला व मयताचे प्रेत तक्रारदाराकडे सूपूर्द केले. तक्रारदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते हे त्यांना मान्य नाही. तक्रारदार यांचा विमा काढलेला होता हे सुध्दा मान्य नाही.महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत वर्ष 2009-2010 वर्षासाठीचा प्रिमियम त्यांचेकडे जमा केला आहे हा मजकूर मान्य आहे.हे मान्य नाही की, विमा रक्कम न दिल्यास त्यावर व्याज आकारले जाते. सामनेवाले यांचे म्हणणे की, विमा दावा हा त्यांचेकडे आलेलाच नाही.विमा दावा मंजूर करण्यासाठीची कागदपत्र अपूरे असल्यामुळे तक्रारदारांचा अर्ज त्यांचेकडे आलाच नाही.रिजेक्शन पत्र नसल्यामुळे दावा देण्यास काहीही कारण घडलेले नाही. तक्रार मुदतीत नाही. वरील सर्व बाबीमुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.2 यांची नोटीस न बजावता परत आली व त्याबददल तक्रारदार यांने पुढे सामनेवाले क्र.2 विरुध्द कोणतीही तजविज केली नाही. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
सामनेवाले क्र.3 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे.तक्रारदाराचे पतीचा मृत्यू अपघाताने झालेला असून त्यांचा विमा दावा सर्व कागदपत्रासह दि.18.6.2010 रोजी त्यांचे कार्यालयात सादर केलेला आहे. सदर विमा दावा दि.19.6.2010 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचेकडे सादर केलेला आहे. त्यांनी सदर प्रस्ताव दि.06.07.2010 रोजी सामनेवाले क्र.2 यांचेकडे पाठविला आहे. सामनेवाले क्र.3 यांनी त्यांचे सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे.तसेच तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, सातबारा उतारा व आठ-अ चा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, एफ.आय.आर., घटनास्थास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा,बँक पासबूक, मतदान ओळखपत्र, तसेच गावनमुना सहा-क, फेरफार उतारा,शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. सामनेवाले क्र.1 यांचे वकीलानी श्री.शिवाजी विश्वनाथ उलमुले यांचे पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री.जाधव यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा
नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार
शाबीत करतात काय ? होय.
2. तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांहचे अवलोकन केले. तक्रारदारांनी दाखल केलेले पोलिस पेपरचे अवलोकन केले. त्रकारदार यांचे पती सदाशिव जीजा खराद यांच्या मृत्यू ट्रकचे टायर अंगावरुन गेल्यामुळे झाला आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचे पती सदाशिव जीजा खराद यांचा मृत्यू मल्टीपल ऑरगन निकामी झाल्यामुळे झाला आहे. ही बाब सिध्द होते. तक्रारदारांनी दाखल केलेला 7/12 चा उतारा व गावनमुना 8-अ यांचे अवलोकन केले. तक्रारदाराचे पती सदाशिव खराद यांच्या नांवावर मालेगांव (खुर्द) गट नं.133 येथे शेतजमिन आहे व ते शेतकरी होते ही बाब सिध्द होते.
तक्रारदाराने यांचे वकीलांनी यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 कडे शेतकरी व्यक्तीगत विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला व सामनेवाले क्र.3 यांचे जवाबाचे अवलोकन केले असता सामनेवाले क्र.3 यांनी सदर प्रस्ताव सामनेवाले क्र.2 यांच्याकडे म्हणजे कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस कडे पाठविला आहे. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 म्हणजे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे एजंट म्हणून काम करतात. तक्रारदार यांने सामनेवाले क्र.3 यांच्याकडे प्रस्ताव दिला व सदर प्रस्ताव सामनेवाले क्र.2 यांच्याकडे पाठविला. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 विमा कंपनी याचे एजंट म्हणून काम करत असल्याकारणाने सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा प्रस्ताव प्राप्त झाला आहेतरी सुध्दा सामनेवाले क्र.1 यांनी सदर प्रस्तावावर योग्य कार्यवाही केली नाही व तक्रारदार यांचा विमा दावा निकाली काढला नाही.
सामनेवाले क्र.1 यांच्या वकिलांने यूक्तीवादात सांगितले की, तक्रारदारांचा प्रस्ताव हा प्राप्त झाला नाही. सबब, प्रस्ताव हा निकाली काढण्यात आला नाही म्हणून सामनेवाले क्र.1 यांने तक्रारदारास कोणतीही सेवा देण्यास कसूर केला आहे असे सांगता येत नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तसेच तक्रारदार यांच्या वकिलाचे युक्तीवाद व सामनेवाले क्र.1 यांच्या वकिलाचे युक्तीवाद यांचे अवलोकन केले. त्यावरुन सामनेवाले क्र.1 यांना तक्रारदाराचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे काय ? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे पती सदाशीव खराद हे शेतकरी होते. त्यांचा मृत्यू ट्रकचे टायर अंगावरुन गेल्यामुळे झाला आहे. ही बाब सिध्द होते. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 यांच्याकडे रितसर प्रस्ताव दाखल केला आहे व सामनेवाले क्र.3 यांनी सदर प्रस्ताव हा सामनेवाले क्र.2 यांच्याकडे पाठविला. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांचेसाठी काम करत असल्याकारणाने तक्रारदाराचा प्रस्ताव हा सामनेवाले क्र.1 म्हणजे विमा कंपनीला प्राप्त झाला आहे ही बाब सिध्द होते. तरी सुध्दा सामनेवाले क्र.1 यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही व तक्रारदारास सेवा देण्यास निष्काळजीपणा केला आहे.
महाराष्ट्र शासनाने सदर योजना ही शेतक-यांच्या हितासाठी राबविली आहे व त्यांचा पुरेपूर लाभ हा शेतक-याला मिळावा असा सदर योजनेचा उददेश आहे. तक्रारदार यांच्या वकिलांनी युक्तीवाद करीत असताना सदर प्रकरणाच्या समर्थनार्थ मा.राज्य आयोग मुंबई यांचा न्यायनिवाडा सादर केला आहे. मा.राज्य आयोग,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी असा न्यायनिवाडा दिला आहे की,
F.A.No.A/10/1254
ICICI COMBARD GENERAL INSURANCE Vs. DHONDIBA R. BHOGULKAR
वर नमुद केलेल्या न्यायनिर्णया मध्ये असे निर्देश दिले आहे की, प्रस्ताव हा इन्शुरन्स कंपनीचा एजन्ट म्हणजे सामनेवाले क्र.4 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग यांस तालुका कृषी अधिकारी याचेमार्फत पाठविला आहे.त्यामुळे असे गृहीत धरण्यात येते की, सदर प्रस्ताव हा विमा कंपनीला प्राप्त झाला आहे.
वर नमुद केलेला मा.राज्य आयोगाचा न्यायनिर्णय व मंचासमोर चाू असलेले प्रकरण यांचे वस्तूस्थिती सारखी आहे. मा. राज्य आयोगाने दिलेल्या न्यायनिर्णयाशी तंतोतंत लागू होतो.
सबब या मंचाचे मत असे की, तक्रारदारांनी दाखल केलेला प्रस्ताव हा सामनेवाले क्र.1 यांना प्राप्त झाला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सदर प्रस्ताव निकाली न काढल्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे. सबब, तक्रारदार हा शेतकरी विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना विमा दावा रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रुपये एक लाख फक्त)
निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत. सदरील रक्कम 30
दिवसांचे आंत न दिल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज तक्रार
दाखल दि.18.10.2012 पासून संपुर्ण रक्कम वसुल होईपर्यत दयावे.
3. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व दाव्याच्या
खर्चापोटी रक्कम रु.1500/- दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.