निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/08/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/08/2011
तक्रार निकाल दिनांकः- 25/07/2013
कालावधी 01 वर्ष. 11 महिने. 21 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सुनिल पिता सुभाषराव सानप. अर्जदार
वय 28 वर्षे. धंदा.शेती. अड.एस.एन.व्यवहारे.
रा.बेलोरा,ता.जि.हिंगोली.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. अड.आर.बी.वांगीकर.
दयावान कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वाहनाची नुकसान भरपाई विमा अंतर्गत रक्कम देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा बेलोरा ता.जि.हिंगोली येथील रहिवाशी असून तो अटो क्रमांक एम.एच.-38- एफ.1061 चा मालक आहे व सदरच्या अटोचा अर्जदार त्याच्या उदरनिर्वाहासाठी वापर करत होता, व अर्जदाराचे संपूर्ण कुटूंब अर्जदाराच्या कमाईवर अवलंबुन होते अर्जदाराने सदरचा अटो हा गैरअर्जदाराकडे दिनांक 23/01/2010 ते 22/01/2011 पर्यंत विमाकृत केला होता, व सदर विम्याच्या पॉलिसीचा क्रमांक 230601/31/9/01/00018530 असा होता अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 12/05/2010 रोजी अर्जदाराचा भाऊ हा सदरच्या अटो मध्ये गावातील लोकांना घेवुन शेगांव येथे देवदर्शनास जात होता व सदरचा अटो अनिल सानप हा रोडच्या डाव्या बाजूने सावकाश चालवत होता.सदरचा अटो पातूर मालेगाव रोडवर सावरखेड फाटयाच्या पुढे आला असता, समोरुन एक महिंद्रा पिकअप ज्याचा क्रमांक एम.एच.37 बी.1615 असा आहे. वेगात आली व सदरच्या अटोस जोराची धडक दिली व अपघात झाला सदरच्या अपघातात अटो पूर्णपणे नादुरुस्त झाले. अर्जदाराने सदरच्या अपघाता नंतर पोलिस स्टेशन पातूर येथे सदर घटने बाबत फिर्याद दिली तसेच अर्जदाराने गैरअर्जदार यांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर गैरअर्जदार यांनी सदर अटोचा सर्व्हे करण्यासाठी सर्व्हेअरची नेमणुक केली व सदर सर्व्हेअरने अटोचा सर्व्हे केला त्यानंतर अर्जदाराने अटो दुरुस्तीसाठी शांती अटो एजंन्सी हिंगोली यांच्याकडे दिला अर्जदाराने सदर वाहनाचे सर्व कागदपत्रे वाहन चालकाचा परवाना, वाहन दुरुस्तीसाठी अंदाजीत खर्च, इत्यादी कागदपत्रे गैरअर्जदाराकडे सोपवली.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराचे सांगण्यावरुन वाहन दुरुस्त करुन घेतले व गैरअर्जदाराने विम्याची रक्कम लवकर देण्यात येईल, असे अर्जदारास सांगीतले.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने त्याच्या वाहन दुरुस्तीस जवळपास 60,000/- रुपये खर्च केला व दुरुस्तीच्या काळात अर्जदारास 15,000/- रुपये आर्थिक नुकसान झाले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वारंवार जावुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी चौकशी केली असता गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली व त्यानंतर अचानक दिनांक 07/03/2011 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास पत्र पाठवुन कळविले की, घटनेच्या वेळी आपल्या अटोमध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रवाशी असल्याने आपला नुकसान भरपाईचा दावा नामंजूर करण्यात येत आहे. अर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, अर्जदाराने सर्व कागदपत्रे विमा दावा गैरअर्जदाराकडे दाखल केल्यानंतर जवळपास 10 महिन्यानी अर्जदाराचा दावा फेटाळला आहे.व दावा फेटाळण्याचे कारण देखील अयोग्य आहे.म्हणून मंचास अशी विनंती केली आहे की, गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदारास विमा अंतर्गत नुकसान भरपाई म्हणून 75,000/- रुपये द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह घटनेच्या तारखे पासून देण्याचा आदेश व्हावा व तसेच मानसिकत्रासापोटी रु.10,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- अर्जदारास गैरअर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे. तसेच नि.क्रमांक 5 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदाराना मंचातर्फे त्याचे लेखी जबाब दाखल करण्याकरीता नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत हजर, व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे.
गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची तक्रार खोटी व बनावटी असून ती खारीज होणे योग्य आहे.गैरअर्जदारास हे मान्य आहे की, वादातील अर्जदाराचा अटो क्रमांक एम.एच.-38- एफ.1061 हा गैरअर्जदार कंपनीकडे विमाकृत आहे व गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने अपघात झाल्याची माहिती गैरअर्जदारास ताबडतोब दिली नाही, त्यामुळे गैरअर्जदारास सदरच्या अपघाता बद्दलची माहिती नाही व तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वाहनाची आवश्यक कागदपत्रे ताबडतोब कार्यालयात दाखल केलेली नाही तसेच गैरअर्जदाराने हे अमान्य केले आहे की, अर्जदारास अपघातामुळे सदरच्या अटोचा खर्च रु. 60,000/- आला व तसेच अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे नुकसान भरपाईची वेळोवेळी कधीही मागणी केलेली नाही व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने 07/03/2011 रोजी दिलेले पत्र खरे व बरोबर असून नियमाला धरुन आहे.म्हणून सदरची तक्रार फेटाळणे योग्य आहे.गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, विमा कंपनी वाहनाच्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी अथवा ती मंजूर करण्यासाठी काही नियम व अटी असतात शिवाय त्याच्या शर्तीचे पालन करणे आवश्यक असते अपघात कशाने झाला या पेक्षा अपघाताच्या वेळी विम्याच्या शर्ती व अटींचे पालन झाले का हे पाहणे गरजेचे असते व सदरचे केस मध्ये अर्जदाराकडून तसे पालन झाले नाही, कारण वाहनात क्षमते पेक्षा जास्त लोक बसलेले होते आणि म्हणून अर्जदाराचा विमा नियमाने रद्द केला आहे.त्यामुळे गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिली असे म्हणता येणार नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदाराने नि.क्रमांक 14 वर शपथपत्र दाखल केलेले आहे व तसेच नि.क्रमांक 16/1 वर गैरअर्जदाराने सर्व्हेअरचा रिपोर्ट दाखल केलेला आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा अपघात विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा अटो क्रमांक एम.एच.-38- एफ.1061 चा मालक होता हि बाब नि.क्रमांक 5/3 वरील आर.सी.बुक वरुन सिध्द होते तसेच सदर अटोचा विमा गैरअर्जदाराकडे काढलेला होता व सदरची विमा पॉलिसी दिनांक 23/01/2010 ते 22/01/2011 पर्यंत वैध होती ही बाब नि.क्रमांक 5/4 वरील पॉलिसी कव्हरनोट वरुन सिध्द होते.तसेच सदरच्या अटोचा अपघात दिनांक 12/05/2010 रोजी पातूर मालेगाव रोडवर महिन्द्रा पिकअप एम.एच. 37-बी- 1615 या गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे झाला हि बाब नि.क्रमांक 5/1 वरील एफ.आय.आर.व इतर पोलिस पेपरवरुन सिध्द होते.सदरच्या अपघाताच्या वेळी अर्जदाराने काढलेला विमा वैध होता हि बाब नि.क्रमांक 5/4 वरील पॉलिसी कव्हर नोट वरुन सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या अटोच्या अपघातामुळे रुपये 75,000/- चे नुकसान झाले हे मंचास योग्य वाटत नाही, कारण गैरअर्जदार कंपनीने नेमलेले सर्व्हेअर श्री.एस.व्ही.परळीकर यांनी सदर अटोचा सर्व्हे केला होता त्यांच्या सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे सदरच्या अटोचे 20,255/- रुपये नुकसान झाल्याचे म्हंटले आहे.
गैरअर्जदाराचा अपघात विमा नो क्लेम म्हणून क्लेम देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे हि बाब नि.क्रमांक 5/6 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते सदर पत्रामध्ये गैरअर्जदाराने दिलेले कारण मंचास योगय वाटत नाही.कारण मा.राष्ट्रीय आयोगाने न्यु इंडीया इन्शुरंस कंपनी लि. विरुध्द मालती भिखाभाई भोया सी.पी.आर.2013 (2) पान क्रमांक 462 मा.राष्ट्रीय आयोग या प्रकरणामध्ये असे म्हंटले आहे की, Breach of policy जर flagrant नसेलतर Non Standard basis वर 75 टक्के नुकसान भरपाई मिळण्यास विमाधारक पात्र आहे.म्हणून अर्जदार हा सर्व्हेअरने दिलेल्या रिपोर्ट प्रमाणे 20,255/- रुपयाच्या 75 टक्के म्हणजेच 15,191/- रुपये गैरअर्जदार यांच्याकडून मिळण्यास पात्र आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने त्याचा विमादावा देण्यासाठी टाळाटाळ केली व नंतर जवळपास 10 महिन्यानंतर दावा देण्याचे नाकारुन त्यास मानसिकत्रास दिला हे म्हणणे मंचास योग्य वाटते.म्हणून अर्जदार हा मानसिकत्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश तारखे पासून 30दिवसांच्या आत रु.15,191/-फक्त
(अक्षरी रु.पंधराहजार एकशे एक्यान्नव फक्त) दिनांक 12/05/2010 पासून ते
रक्कम अदा करे पर्यंत 9 टक्के व्याजाने द्यावे.
3 या खेरीज गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिकत्रासापोटी रु. 4,000/- फक्त
(अक्षरी रु.चारहजार फक्त) आदेश मुदतीत द्यावे.
4 तक्रारीचा खर्च म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 1,000/- फक्त (अक्षरी
रु.एकहजार फक्त) आदेश मुदतीत द्यावे.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर. मा.सदस्य मा.अध्यक्ष