निकालपत्र
निकाल दिनांक – ०२/०१/२०२०
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी सिजेंटा कंपनीची टोमॅटो वान १०५७ बाबत कंपनीचे वतीने केलेल्या शिफारशीनुसार १०५७ या टोमॅटो वानाची लागवड तक्रारदाराने करण्याचे ठरविले. त्यासाठी तक्रारदाराने सदर लागवडीसाठी विश्वटेक हायटेक नर्सरी म्हणजेच सामनेवाले क्र.२ यांच्याकडुन दिनांक १५-०२-२०१६ रोजी बील क्रमांक १४२१ नुसार ७२०० रोपांची रक्कम रूपये १.२० पैस प्रति रोपाप्रमाणे ७,४५०/- ची ख्रेदी केली. सदर बिलानुसार सदर रोपाचे बियाणेचे लॉट नं.१२२६६६५६ असा आहे. सदर रोपे खरेदी केलेनंतर तक्रारदाराने दिनांक २०-०२-२०१६ रोजी सदर रोपांची त्यांचे मालकीचे इंदुरी गावातील ग.नं. ४२/२ मध्ये ०.३५ आर क्षेत्रात त्याची लागवड केली. सदर लागवडीकरीता तक्रारदाराला एकुण खर्च रक्कम रूपये १,११,६९०/- इतका खर्च आला. सदर टोमॅटोची रोपे लागवडीनंतर मरू लागली. तसेच त्याची वाढ व्यवस्थित झाली नाही. त्याचे झाड तयार झाले नाही, फुटवा झाला नाही, त्याची फुले सुकून गळू लागली. त्यामुळे पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. खर्च देखिल फिटणार नाही, अशी तक्रारदाराला खात्री झाली. त्यामुळे तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी अधिकारी पंचायत समिती अकोले यांचेकडे सामनेवाले क्र.१ सिजेंटा कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाजे असुन शेतातील पिकाची पहाणी करणेत यावी असा अर्ज दिनांक १८-०४-२०१६ रोजी करण्यात आला. सदर लागवड दिनांक २०-०२-२०१६ रोजी केली असतांना कंपनीच्या शिफारशीनुसार ६५ ते ७० दिवसानंतर म्हणजेच सर्व साधारण एप्रिल २०१६ पासुन टोमॅटो पीक विक्रीसाठी तयार होते व त्याचे प्रती एकरी ३ टनापेक्ष जास्त उत्पदन निघते. परंतु सदरचे वान हे सदोष असल्यामुळे तक्रारदाराचे रक्कम रूपये ६,००,०००/- पेक्षाही जास्त झाले. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाले यांना दिनांक २१-०६-२०१६ रोजी वकिलामार्फत सदरचे बियाणे दोषी निघाल्याबाबत व नुकसान भरपाईबद्दल रकमेची मागणी करीता नोटीस काढली. सदर नोटीसीला उडवाउडवीचे उत्तर सामनेवाले यांनी दिले व नुकसान भरपाई दिली नाही. म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. तक्रारदाराला झालेली नुकसान भरपाई रक्कम रूपये ७,११,६९०/- सामनेवालेने देण्याचा हुकुम व्हावा तसेच इतर योग्य आदेश व्हावेत, अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सदर नोटीस प्राप्त झाल्यावर झाल्यावर सामनेवाले क्र.१ व २ प्रकरणात हजर झाले व त्यांनी निशाणी ९ वर कैफीयत दाखल केली. सदर कैफीयतीत सामनेवाले क्र.१ व २ यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत लावलेले खोटे असुन त्यांना नाकबुल आहे व पुढे असे कथन केले आहे की, सदर टोमॅटोची व्हरायटी ही खरीप व रब्बी, उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध केली होती. तसेच अनुकूल परिस्थितीत उत्पन्न चांगले येते ही बाब सर्वमान्य असून अती उष्ण तापमानात सदर वाण सहनशील आहे, असे कंपनीने नमूद केलेले नाही. तसेच निसर्गातील बदलांवर कोणालाही नियमन करता येत नाही, या सर्व बाबी नैसर्गिक असुन समितीने जो निष्कर्ष काढलेला आहे तो चुकीचा आहे. तसेच बि-बियाणे व पिक हे संवेदनशील आहे, त्यामुळे त्यावर हवामान, ताममान, रोग याचा प्रभाव असतो. सदर तक्रार दाखल करण्याचे करण नव्हते. तक्रारदाराने सामनेवालेंना पाठविलेली नोटीस कायदेशीर व खरी नव्हती, म्हणुन त्याचे लेखी उत्तर देण्यात आले. प्रस्तुत प्रकरणात बियाण्याचा दोष नसतांना आणि नैसर्गिक बदलांमुळे व अती उष्ण तापमानामुळे पिक फुलधारणेच्या अवस्थेत असतांना त्यावर परिणाम झाला व फुल गळती झाली, याबाबत सामनेवाले जबाबदार नाहीत. तक्रारदाराने कलम १३ (१) (सी) ग्राहक संरक्षण कायदा – १९८६ प्रमाणचे बीज परिक्षण प्रयोगशाळेचा अहवाल सदर वाण उष्ण तपमानात सहनशील नाही व सदर बाब ही तक्रारदाराने शाबीत करणे गरजेचे होते, परंतु केले नाही.
४. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्तऐवज सामनेवालेने दाखल केलेली कैफीयत, दस्तऐवज, लेखी युक्तिवाद तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकला असता मंचासमक्ष खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवालेने तक्रारदाराप्रती अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे काय ? | नाही |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
५. सामनेवाले क्र.१ कंपनीचे टोमॅटोचे वान १०५७ बाबत कंपनीचे वतीने केलेल्या शिफारशीनुसार १०५७ या टोमॅटो वानाचे लागवडीसाठी सामनेवाले क्र.२ यांच्याकडुन नर्सरीकडुन दिनांक १५-०२-२०१६ तक्रारदाराने रक्कम रूपये ७,४५०/- देऊन रोपे खरेदी केली. सदरहु बाब सामनेवाले क्र.१ व २ यांना मान्य असुन तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ -
६. तक्रारदाराने निशाणी ४ वर दस्त क्रमांक ४/२ बियाणे तक्रार निवारण समिती यांचा दिनांक २५-०५-२०१६ रोजीचा पाहणी अहवालाची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, परिच्छेद क्रमांक २३ समांतर प्लॉट पाहणी निष्कर्ष यात असे नमुद आहे की, ‘ श्री. पोपट दामोधर नवले रा.इंदुरी याचा त्याच प्लॉटचा टोमॅटो प्लॉटची पाहणी केली असता सदरची प्लॉटमध्ये झाडाची वाढ उभट आढळुन आली. मर रोगाचा प्रादुर्भाव आढळुन आला झाडी पाने वरील बाजुने वळती दिसुन आली. फुलांची संख्या योग्य प्रमाणात आढळुन आली, मात्र मुळ धारणा कमी झाल्याचे दिसुन आले. त्यामुळे शेतक-याचे उत्पादन कमी आढळुन आले. संबधीत वान उष्ण हवामानास प्रतिसाद देत नसल्याचे दिसुन आले.’ तसेच परिच्छेद क्रमांक २४ समिती निष्कर्ष यामध्ये पुढीलप्रमाणे नमुद आहे.
सुभाष सोपान येवले रा.इंदोरी येथील टोमॅटो पिकाची पाहणी केली असता खालील निरिक्षणे नोंदविण्यात आली. १) सध्या टोमॅटो प्लॉटमध्ये चवळीची लागवड करण्यात आली आहे. २) झाडाची वाढ उभट झालेली आढळुन आली. ३) झाडाची पाने वरील बाजुस नसल्याचे दिसुन आले. ४) झाडावर फलाची संख्या योग्य प्रमाणात होती परंतु पुढे सुकल्याची आढळुन आली. ५) फुले सुकल्यामुळे फळधारणा झालेली आढळुन आली नाही. ६) मर रोगाचे प्रमाण १२% आढळुन आले. वरील बाबीचा विचार करता सदरचे संकरीत वाण उष्ण तापमानास सहनशिल नसल्याचे दिसुन येते. |
७. वरील नमुद निष्कर्षामध्ये असे कुठेही नमुद केलेले नव्हते की, तक्रारदाराचे बियाण्यामध्ये दोष आढळुन आलेला आहे. सदर बियाणे किंवा रोपे अती उष्ण तापमानात सहनशिल आहे या संदर्भात कोणताही अहवाल किंवा शिफारस करण्यात आलेली नाही. सदर टोमॉटोची कालावधीमध्ये उष्ण तापमानामध्ये फुले गळुन गेली होती, असा निष्कर्ष निघला असल्याने मा. सर्वोच्च न्यायालय यांचे Haryana Seeds Development Corporation Ltd. Vs G. Venkate Sadhu & Anr. 2005 (II) C.P.J. Page No.13 या न्यायनिवाड्यातील तथ्ये सदर प्रकरणात लागु पडत आहे. फुलधारणा ही सामान्यपणे पिकाच्या त्या अवस्थेमध्ये नैसर्गिक बदलावर अवलंबुन असते. अति उष्ण तापमानामुळे पिक फुलधारणेच्या अवस्थेत असतांना त्यावर परिणाम झाला व फुले गळुन गेली असतील ही शक्यता नाकारता येत नाही. सामनेवालेने तक्रारदार यांना दोषपुर्ण रोपे दिली त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले, ही बाब तक्रारदार सिध्द करू शकले नाही. सदर नुकसानीबाबत तक्रारदाराने सामनेवालेंना वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीसीला सामनेवाले यांनी उत्तर देऊन तक्रारदार यांची मागणी नाकारून सेवेत त्रुटी दिली नाही व तक्रारदाराप्रती न्युनतम सेवेचा अवलंब केला नाही, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
८. मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. |
२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. |
३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी |
४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |