निकाल
दिनांक- 03.03.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार उषाबाई सुनिल महानोर यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास नकार देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचे पती सुनिल बन्सी महानोर हे कूटूंबिया सोबत शेती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करीत होते. तक्रारदार यांचे पतीचे नांवे मौजे पिंपळगांव धस ता. पाटोदा येथे शेत जमिन नोंदलेली आहे. तक्रारदार यांचे पतीचे दि.16.8.2008 रोजी अपघातानाने निधन झाले. अपघाता बाबत पाटोदा पोलिस स्टेशन मध्ये खबर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा तयार केला. तक्रारदार यांचे पतीची मृत्यूची नोंद केली आहे. तक्रारदार यांचे पतीवर इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला व प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे क्लेम दाखल करुन सर्व कागदपत्राची पूर्तता केली. महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-यासाठी कल्याणकारी योजने अंतर्गत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना लागू केलेली आहे. सामनेवाले क्र.1 यांचेकडे शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळणेकामी विमा शुल्क भरलेले आहे. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 विमा कंपनीचे ब्रोकर म्हणून काम करतात. सामनेवाले क्र.3 यांचेकडे क्लेम दाखल केल्यानंतर त्यांचे मार्फत सामनेवाले क्र.2 कडून सामनेवाले क्र.1 कडे क्लेम मंजूरीसाठी पाठविला जातो. सामनेवाले यांनी कोणतेही संयूक्तीक कारणाशिवाय तक्रारदार यांना विम्याची रक्कम मिळण्यापासून वंचित ठेवलेले आहे. तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास दिलेला आहे. तसेच तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल करणेकामी खर्च करावा लागला आहे. सबब, सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांची तक्रार मंजूर होऊन शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- व त्यावरील व्याज देण्याचे निर्देश सामनेवाले यांना देण्यात यावेत. तक्रारदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- देण्यात यावेत अशी विनंती केली आहे.
सामनेवलो क्र.1 विमा कंपनी हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.12 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांनी दाखल केलेले कोणतेही कागदपत्र त्यांना प्राप्त झालेले नाही. सामनेवाले क्र.1 यांना तक्रारदार यांचा क्लेम व दस्त कधीही मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.10 अन्वये लेखी कैफियत दाखल केंली. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, त्यांना तक्रारदार यांनी दाखल केलेला क्लेम प्राप्त झाला. त्या बाबत दि.20.3.2009 रोजी क्लेम सोबत आवश्यक त्या कागदपत्रासह कागदपत्राची पूर्तता केली नाही म्हणून सूचना देण्यात आली. सदरील बाब ही सामनेवाले क्र.3 यांना कळविण्यात आली. तसेच दि.14.12.2009, 15.4.2010 रोजी पत्र पाठवून कागदपत्राची पूर्तता करण्या बबात कळविले. तक्रारदार यांनी कोणत्याही कागदपत्राची पूर्तता केली नाही. सबब, सदरील क्लेम सोबत आवश्यक ती कागदपत्र नसल्यामुळे तो क्लेम पूढील कार्यवाहीसाठी विमा कंपनीकडे पाठविता आला नाही.
सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.9 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांचा क्लेम दि.12.3.2009 रोजी प्राप्त झाला. तो क्लेम दि.20.4.2009 रोजी विमा कंपनीस सादर केला. विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी दि.28.4.2009 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांचेकडे आक्षेप घेतला व त्यांची पूर्तता करण्यास सांगितले. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना दि.29.4.2009, दि.16.6.2009 व दि.7.7.2009 रोजी पत्र पाठवून व कागदपत्राची पूर्तता करण्यास कळविले. तक्रारदार यांनी सदरील कागदपत्राची पूर्तता केली नाही व सहकार्य केले नाही. सबब, सामनेवाले क्र.3 यांनी सेवेत त्रूटी ठेवली नाही.
तक्रारदार यांनी नि.7 सोबत दाखल केलेले दस्ताचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.1 यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत
अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम न देऊन सेवेत
त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? नाही..
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.भगत यांनी यूक्तीवाद केला की,तक्रारदार यांचे पती सुनिल महानोर यांचा दि.16.8.2008 रोजी अपघातामध्ये मृत्यू झाल. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार यांचे पती अपघातात मृत्यू झाल्या बाबत पाटोदा पोलिस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे.तक्रारदार यांचे पती यांचे प्रेताचे इन्क्वेस्ट पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले. तक्रारदार यांनी त्यांचे पती मयत झाल्यानंतर सामनेवाले क्र.3 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी क्लेम दाखल कला. सामनेवाले यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही व मुदतीत रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सामनेवाले यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी तक्रारीत केलेली मागणी मान्य करण्यात यावी.
सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचा क्लेम सामनेवाले क्र.1 कंपनीकडे प्राप्त झाला नाही. सदरील क्लेम विमा कंपनीला प्राप्त न झाल्यामुळे तो स्विकारण्याचा अगर नाकारण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. सामनेवाले क्र.1 यांनी कोणतीही सेवेत त्रूटी ठेवली नाही. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत क्लेम हा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करुन दाखल करावयाचा असतो. तालुका कृषी अधिकारी तो क्लेम व कागदपत्र पुढील कार्यवाहीसाठी ब्रोकर कंपनी म्हणजे सामनेवाले क्र.2 यांचेकडे प्रस्तावीत करतात. सामनेवाले क्र.2 हे ब्रोकर असल्यामुळे क्लेम सोबत सर्व कागदपत्राची पूर्तता झाली आहे काय यांची शहानिशा करुन तो क्लेम पुढील कार्यवाहीसाठी सामनेवाले क्र.1 विमा कंपनीकडे पाठवितात. सदरील प्रकरणामध्ये तक्रारदार यांना वेळोवेळी मागणी करुनही सामनेवाले क्र.2 यांचेकडे कागदपत्राची पुर्तता केली नाही. त्यामुळे सदरील प्रस्ताव विमा कंपनीकडे पूढील कार्यवाहीसाठी प्राप्त झाला नाही. तक्रारदार हे स्वतः निष्काळजीपणे वागले आहेत. त्यामुळे सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्द सेवेत त्रुटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेल कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती हे मोटार अपघातामध्ये दि.16.8.2009 रोजी मयत झाल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी पाटोदा पोलिस स्टेशनमध्ये दिलेली तक्रार, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल या मंचासमोर हजर केला आहे. त्यावरुन तक्रारदार यांचे पती हे अपघातामध्ये मृत्यू पावले आहेत ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांचे पतीचे नांवे मौजे पिंपळगांव धस ता.पाटोदा येथे गांवी शेत जमिन नोंदलेली आहे. तक्रारदार यांनी गाव नमुना नं.7/12, 7-अ चे उतारे हजर केले आहेत. यावरुन तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते ही बाब सिध्द होते.
या मंचासमोर मुख्य प्रश्न उपस्थित करण्यात आला तो म्हणजे, तक्रारदार यांनी विहीत कागदपत्र क्लेम सोबत जोडून तो प्रस्ताव सादर केला आहे किंवा नाही ? सामनेवाले क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी निवेदनाचा विचार केला असता असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र.2 यांना दि.20.3.2009 रोजी क्लेम प्राप्त झाला. क्लेम सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडलले नव्हते. ते कागदपत्र म्हणजे फेरफार, गुन्हयाची प्रथम खबर, सदरील कागदपत्र प्राप्त होण्यासाठी सामनेवाले क्र.2 यांनी सामनेवाले क्र.3 यांना कळविले आहे. तसेच वेळोवेळी स्मरणपत्रेही दिलेली आहेत. स्मरणपत्रे देऊन सुध्दा आवश्यक ती कागदपत्र प्राप्त न झाल्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम पूढील कार्यवाहीसाठी विमा कंपनीकडे पाठविला गेला नाही असे निदर्शनास येते. त्यासंबंधी सामनेवाले क्र.3 यांनी दस्त हजर केले आहेत त्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचेकडून जो क्लेम पाठविण्यात आला त्यावर आवश्यक ते कागदपत्र जोडले नसल्यामुळे तो क्लेम पूढील कार्यवाहीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यात आला नाही.
सामनेवाले क्र.3 यांनी आपल्या लेखी निवेदनामध्ये कथन केले आहे की, तक्रारदार यांचा क्लेम दि.12.1.2009 रोजी कार्यालयास प्राप्त झाला. कार्यालयाने तो प्रस्ताव दि.20.3.2009 रोजी विमा कंपनीस सादर केला. विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी दि.28.7.2009 रोजी क्लेममध्ये आक्षेप घेतला असल्या बाबत कळविले. सामनेवाले क्र.3 यांनी कार्यालयीन पत्र क्र.712 दि.20.4.2009, कार्यालयीन पत्र क्र.8834 दि.16.6.2009 तसेच कार्यालयीन पत्र क्र.1007 दि.7.7.2009 रोजी तक्रारदार यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करुन कागदपत्राची पूर्तता करणे बाबत कळविले आहे परंतु तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता केली नाही.
या मंचासमोर दाखल केलेला संपूर्ण पुरावा व कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी क्लेम सोबत आवश्यक ते कागदपत्र जोडले नव्हते व तसेच सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी कळवूनही त्याबाबत तक्रारदार यांनी पूर्तता केलेली नाही असे निदर्शनास येते. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत क्लेम मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्र क्लेम सोबत जोडणे आवश्यक आहे. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही तक्रारदार यांनी आवश्यक ती कागदपत्र देऊन पुर्तता केली नाही. सदरील क्लेम हा विमा कंपनीला प्राप्त झाला नाही. सामनेवाले क्र.2 यांनी सदरील क्लेम प्राप्त झाला आहे असे जरी गृहीत धरले तरी क्लेम मंजूर करणेकामी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता न झाल्यामुळे तो क्लेम विमा कंपनीकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.1 विमा कंपनी यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत कार्यपध्दती, निकष व जबाबदारी महाराष्ट्र शासनाने विहीत केलेली आहे. तक्रारदार यांनी विहीत नमुन्यात अर्ज करावा व अर्जासोबत प्रथम खबर तसेच आवश्यक असलेले कागदपत्र जोडावे तसेच अपघाताचे स्वरुपानुसार अपघाताच्या पुराव्यासंबंधी प्रपत्र – ड मध्ये नमूद केलेले कागदपत्र अर्जासोबत जोडावे. तक्रारदार यांनी क्लेम सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम विमा कंपनीकडे पाठविण्यात आला नाही असे दिसते. सदरील क्लेम हा तक्रारदार यांचे निष्काळजीपणामुळे व वेळोवेळी स्मरणपत्रे देऊनही कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे पूढील कार्यवाहीसाठी पाठविता आले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना ही कल्याणकारी योजना असून शेती व्यवसाय करताना शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास अपघातामुळे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात. अशा आर्थिक संकटात पडलेल्या कूटूंबाला मदत करण्यासाठी विमा योजना शासनाने लागू केली आहे. सदरील तक्रारीमध्ये तक्रारदार यांचे पती हे शेती व्यवसाय करीत होते व त्यांचा अपघातात मृत्यू झाला त्यामुळे ते शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र होते परंतु केवळ तक्रारदार यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे तो क्लेम सामनेवाले क्र.1 यांचेकडे पाठविला गेला नाही. वरील कारणाचा विचार केला असता या मंचाचे मत की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 विमा कंपनी यांचेकडे क्लेम व त्यासोबत विहीत केलेले सर्व कागदपत्र सादर करावेत. सामनेवाले क्र.1 यांनी विलंबाचा मुददा वगळून तक्रारदार यांचा क्लेमवर योग्य तो निर्णय घ्यावा.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) तक्रारदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत शेतकरी व्यक्तीगत अपघात
विमा योजने अंतर्गत विहीत नमुन्यातील अर्ज व त्यासोबत
आवश्यक ती सर्व कागदपत्र जोडून सामनेवाले क्र.1 यांचेकडे
प्रस्ताव दाखल करावा. सामनेवाले क्र.1 यांनी विलंबाचा मुददा
वगळून त्या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घ्यावा.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक