(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या) 1. तक्रारदार नं.1 ते 4 यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांचेविरुध्द दाखल केलेली आहे. 2. तक्रारदार नं.1 ते 4 यांची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः- तक्रारदार हे शेतकरी आहेत. तक्रारदार नं.1 ते 4 यांनी खरीप हंगाम सन 2012-13 मध्ये दिनांक 14.08.2012 रोजी इंडियन ओव्हरसिज बँक, शाखा मिरी, ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे तक्रारदार क्र.2 ते 4 व त्यांचे इतर कुटूंबियांचे वतीने तक्रारदार क्र.1 यांनी कपाशी, तुर व बाजरी या पिकांकरीता विमा हप्त्याची रक्कम रु.9,500/- भरलेली होती. या पैकी सन 2013 साली तक्रारदार व त्यांचे इतर कुटूंबियांना कपाशी या पिकाच्या नुकसानीपोटी इन्शुरन्सची रक्कम मिळाली. तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी तुर व बाजरी पिकाचा विम्याची रक्कम भरली आहे. परंतू सामनेवाले नं.2 यांचेकडून तुर व कपाशी पिकाची नुकसान भरपाई मंजूर झालेली होती. पैकी कपाशी पिकाची रक्कम तक्रारदार क्र.1 व त्यांचे इतर कुटूंबियांना मिळाली. कारण कपाशी या पिकासाठी मंडल मिरी ता.पाथर्डी यांना कपाशी पिकाची नुकसान भरपाई मिळाली होती व ढोरजळगांव मंडल ता.शेवगांव जि.अहमदनगर यांना कपाशी व तुर या दोन्ही पिकासाठी नुकसान भरपाई मिळाली होती. परंतू तक्रारदार यांना मिरी या मंडल विभागाकरीता फक्त कपाशी पिकाची रक्कम मिळाली. परंतू तुर पिकाची रक्कम गावातील इतर लोकांना मिळाल्यानंतर तक्रारदार नं.1 ते 4 यांच्या वतीने तक्रारदार नं.1 यांनी बँकेमध्ये जावून चौकशी केली असता सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमचे मंडल, ढोरजळगांव ता.शेवगांव जि.अहमदनगर असे असताना नजरचुकीने ते आमचेकडून मंडल मिरी ता.पाथर्डी जि.अहमदनगर असे नमुद झालेले आहे व मिरी सर्कलला तुर विमा मिळाला नसल्यामुळे आम्ही तुमचा पत्र व्यवहार सामनेवाले नं.2 यांचेशी केला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी वारंवार सामनेवालेकडे चौकशी केली. सामनेवाले क्र.1 यांनी तुर पिकाच्या नुकसान भरपाईकरीता तक्रारदार क्र.1 ते 4 यांना एकुण 1,00,100/- या विमा संरक्षीत रकमेपैकी रु.64,000/- मंजूर झालेले आहेत असे कळविले. परंतू तक्रारदारास सदरची रक्कम अद्याप पावेतो मिळालेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दिनांक 23.10.2013 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, अहमदनगर यांचेमर्फात खरीप हंगाम सन 2012-13 चा पिक विमा भरलेला असून त्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत पत्र व्यवहार केला. परंतू सामनेवालाने अद्याप तक्रारदाराला पिक विम्याची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी मंचात तक्रार दाखल करुन परीच्छेद 12 प्रमाणे सामनेवाला नं.1 व 2 यांचे विरुध्द मागणी केली आहे. 3. सामनेवाला नं.1 यांनी त्यांची लेखी कैफियत निशाणी क्र.17 वर दाखल केली आहे. त्यामध्ये सामनेवाला नं.1 यांनी असे कथन केले आहे की, सदरची तक्रार ही मेंटेनेबल नाही, कारण सामनेवाला नं.1 यांनी कोणताही मोबदला न घेता तक्रारदाराला सेवा पुरविलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (O) अन्वये सदरची तक्रार ही मेंटेनेबल नाही असे कथन केले आहे. पुढे सामनेवाला नं.1 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचेकडून त्यांचे विमा हप्त्याची रक्कम स्विकारली व ती रक्कम A.I.C. अकौंट ऑफ इंडिया, मुंबई यांचे N.E.F.T. यांचेकडे दिनांक 14.08.2012 रोजी पाठविली. सामनेवाले नं.1 यांनी कधीही सर्व्हीस चार्जेस त्यातून वजा केले नाही. तक्रारदाराने कपासी व तुर पिकापोटी सदरच्या विमा रक्कम भरलेली आहे. खरीप हंगाम सन 2012 मध्ये 12 शेतक-यांना विमा हप्ता रक्कम भरलेली आहे. त्यापैकी 4 शेतकरी हे ढोरजळगांव मंडल ता.शेवगांव जि.अहमदनगर यामध्ये मोडत असून उर्वरीत 8 शेतकरी हे मिरी मंडल ता.पाथर्डी जि.अहमदनगर मध्ये त्यांची नांवे नमुद करण्यात आलेली आहेत. सामनेवाला नं.1 यांनी सदरचा विमा रक्कम N.E.F.T. यांचेकडे पाठविली. यामध्ये सामनेवाला नं.1 यांची कोणतीही जबाबदारी नाही. कारण सामनेवाला नं.2 यांनी मंडल ढोरजळगांव यांचेकडे तक्रारदाराचे नाव नमुद करण्यात आलेले आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार सामनेवाला नं.1 यांनी सामनेवाला नं.2 यांचेकडे पत्रव्यवहार केला. तक्रारदाराला अद्याप विम्याची रक्कम प्राप्त झाली नाही असे कळविले. यामध्ये सामनेवाला नं.1 यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला नं.1 यांनी बेजबाबदारपणा करुन कोणतीही चुक केलेली नाही. तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यांचे विरुध्द चुकीची मागणी केलेली आहे. यामध्ये सामनेवाले नं.1 यांचेकडे कोणताही दोष नाही. त्यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार मेंटेनेबल नाही, सदरची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी अशी सामनेवाला नं.1 यांनी मंचाला विनंती केली आहे. 4. सामनेवाला नं.2 यांनी त्यांची लेखी कैफियत निशाणी क्र.19 वर दाखल केली आहे. त्यामध्ये सामनेवाला नं.2 यांनी असे कथन केले की, सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदार पिक विमा हप्त्याची रक्कम भरलेली आहे ही बाब मान्य केलेली आहे. त्यानुसार पिक विम्याचा एरीया जो मंजूर केलेला आहे त्याचा तक्ता त्यांनी त्यांचे लेखी कैफियतीमध्ये नमुद केलेला आहे. सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदाराचा पिक विमा मंजुर केला. परंतू सदरचा विमा हा तूर पिकापोटी मिरी मंडल यांना मंजुर न होता ढोरजळगाव मंडल यांचेसाठी मंजुर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे त्यांना विम्याची रक्कम देण्यात आली होती. मात्र सामनेवाला नं.1 यांनी दिनांक 16.08.2013 रोजी सामनेवाला नं.2 यांना पत्र पाठवून तक्रारदाराचे पिक विम्याची मागणी केली. परंतु सामनेवाला नं.1 यांनी पाठविलेली माहितीनुसार त्यांनी फक्त 4 शेतक-यांची नावे नमुद केलेली आहेत. जी मिरी मंडल मध्ये नमुद करण्यात आली होती. त्याबाबतची सविस्तर माहिती सामनेवाला नं.2 यांनी लेखी कैफियतीमध्ये नमुद केलेली आहे. सन 2012 मध्ये पिक विम्याची रक्कम मंजुर करण्यात आली त्याप्रमाणे सर्व शेतक-यांना विम्याची रक्कम देण्यात आली. मात्र तक्रारदाराचे नाव हे ढोरजळगांव या मंडलामध्ये नसल्यामुळे विम्याची रक्कम त्यांना देता आली नाही. त्यामध्ये सामनेवाला नं.2 यांची कोणतीही चुक नाही. उलट सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदाराचे नाव नमुद तक्रारीत असतांना चुक केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना पिक विम्याची रक्कम प्राप्त झाली नाही यामध्ये सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे सेवेत त्रुटी केली नाही. ज्या शेतक-यांची नावे त्या मंडलामध्ये नाही त्यामुळे त्यांचे त्यांनी पिक विम्याची रक्कम मंजूर केली. त्याप्रमाणे त्यांची रक्कम देण्यात आली. मात्र तक्रारदार यांचे नाव सदरचे मंडलमध्ये नमुद करण्यात आलेले नाही म्हणून विम्याची रक्कम देण्यात आली नाही. यामध्ये सामनेवाला नं.1 यांनी सदोष सेवा दिली असे म्हणता येणार नाही. सदरची तक्रार ही तक्रारदाराने सामनेवाला यांचे विरुध्द चुकीचे कथन करुन दाखल केलेली आहे, सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी सामनेवाला नं.2 यांनी मंचाला विनंती केली आहे. 5. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.गांगुर्डे यांनी केलेला युक्तीवाद तसेच सामनेवाला नं.1 यांनी दाखल केलेली कागदपत्र, शपथपत्र, सामनेवाला नं.1 यांचे वकील श्री.झरकर व सामनेवाला नं.2 यांनी दाखल केलेली कागदपत्र, शपथपत्र व सामनेवाला नं.2 यांचे वकील श्री.मेहेर यांचा यांनी यांचे अवलोकन केले. व न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. | मुद्दे | उत्तर | 1. | तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक या संज्ञेत मोडतात काय.? | ... होय. | 2. | सामनेवाला यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली आहे काय.? | ... होय. | 3. | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून विमा दाव्याची नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास पात्र आहे काय.? | ... होय. | 4. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा 6. मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार नं.1 ते 4 हे शेतकरी असून त्यांनी खरीपाचे हंगाम सन 2012-13 मध्ये दिनांक 14.08.2012 रोजी सामनेवाला नं.1 यांचे शाखेतून सामनेवाला नं.2 यांचेकडे पिक विम्याची रक्कम रु.9,500/- भरलेले होते. सदरचे विम्याची रक्कम ही कपाशी, तुर व बाजरी या पिकाकरीता भरलेली होती. ही बाब सामनेवाला नं.1 यांना मान्य आहे. सामनेवाला नं.1 यांचेमार्फत सदरची रक्कम ही सामनेवाला नं.2 कडे पाठविली ही बाब सामनेवाला नं.1 यांनी त्यांचे लेखी कैफियतीमध्ये नमुद केलेली आहे. सामनेवाला नं.1 यांनी सदरची तक्रार ही मेंटेनेबल नाही असा बचाव घेतला व त्यांनी कोणताही मोबदला न घेता तक्रारदाराला सेवा पुरविलेली आहे असे कथन केलेले आहे. सदरचा पिक विमा हा शासनाने मंजुर केलेला आहे. व शासनाने सामनेवाला नं.1 यांना मध्यस्थी सल्लागार म्हणून नेमले आहे. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा देणे ही त्यांची जबाबदारी आहे. यामध्ये सामनेवालाने कोणताही मोबदला न मिळवता सेवा पुरविली. त्यामुळे सदरची तक्रार ही मेंटेनेबल नाही हा बचाव संयुक्तीक नाही. तक्रारदार यांनी विमा हप्ता रक्कम सामनेवाला नं.1 व्दारे सामनेवाला नं.2 यांचेकडे पाठविला आहे. त्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला नं.1 व 2 यांचा ग्राहक आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. 7. मुद्दा क्र.2 व 3 – तक्रारदार यांनी विमा हप्त्याची रक्कम भरल्यानंतरही सदरचे पिक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदाराला प्राप्त झाली नाही. मात्र इतर शेतक-यांना सदरची रक्कम प्राप्त झाली या विषयी तक्रारदाराने सामनेवाला नं.1 हे मध्यस्थ सल्लागार असल्यामुळे त्यांचेकडे जाऊन चौकशी केली. त्यांनी सांगितले की, तुमचे मंडल ढोरजळगाव ता.शेवगांव जि.अहमदनगर मध्ये असतांना नजरचुकीने त्यांचेकडून मिरी मंडल ता.पाथर्डी जि.अहमदनगर असे नमुद झाले व मिरी सर्कलला तुर विमा मिळाला नसल्यामुळे तुम्हाला रक्कम प्राप्त झाली नाही. व या बाबत सामनेवाला नं.2 यांचेशी पत्रव्यवहार केला आहे असे सांगितले. तसेच रक्कम रुपये 64,000/- मंजुर झालेबाबत कळविले ही बाब स्पष्ट करण्यासाठी तक्रारदाराने निशाणी 6/1 ते निशाणी 6/4 नुसार कागदपत्र दाखल केलेली आहेत. यावरुन तक्रारदाराने पिक विमा घेतला व कोणत्या पिकासाठी घेतला होता ही बाब स्पष्ट होते. तसेच पिक विम्याचे हप्त्याची रक्कम सामनेवाला नं.1 यांचेकडे भरलेली आहे. सामनेवाला नं.1 यांनी दिलेली पावती निशाणी 6/5 प्रमाणे तक्रारदाराने प्रकरणात दाखल केलेली आहे. सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी कैफियतीमध्ये कथन केले आहे की, ज्या शेतक-यांची नांवे ज्या सर्कलमध्ये नमुद केलेली आहेत त्या सर्कलमध्ये त्या पिक विम्याची रक्कम रुपये 64,000/- प्रत्येकी दिलेली आहे. मात्र तक्रारदार यांचे नाव सदरचे लिस्टमध्ये नमुद नसल्यामुळे सदरची रक्कम ही तक्रारदाराला प्राप्त झालेली नाही ही चुक सामनेवाला नं.1 यांचेकडून झालेली आहे. यामध्ये सामनेवाला नं.2 चा कोणताही दोष नाही. मंचाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले व सामनेवाला नं.1 यांच्या कैफियतीमधील कथनाचे वाचन केले. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम ढोरजळगांव सर्कलसाठी मान्य करण्यात आली व त्यात नमुद असलेल्या शेतक-यांच्या नावांप्रमाणे त्यांना पिक विम्याची रक्कम प्राप्त झाली. मात्र तक्रारदाराचे नाव नमुद करतांना सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदाराचे नांव ढोरजळगांव सर्कलमध्ये न दाखवता मिरी सर्कलमध्ये दाखवण्यात आले. यामध्ये सामनेवाला नं.1चा निष्काळजीपणा आहे. विमा कंपनीने पिक विमा मंजुर केला तो दिलेल्या नावाच्या नोंदीप्रमाणे यामध्ये सामनेवाला नं.2 विमा कंपनी जबाबदार धरता येणार नाही. त्यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही असे मंचाचे मत आहे. मात्र सामनेवाला नं.1 यांनी नोंद बरोबर न केल्यामुळे तक्रारदाराला पिक विम्याची रक्कम प्राप्त झाली नाही. तसेच जिल्हा कृषी अधिका-याव्दारे दिनांक 29.10.2013 रोजी पत्र पाठवून रकमेची मागणी केली, मात्र तक्रारदाराला रक्कम प्राप्त झाली नाही. सामनेवाला नं.1 यांनी निष्काळजीपणा केला व त्यासाठी तक्रारदाराला मंचात तक्रार दाखल करावी लागली. यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले व मानसिक, शारीरीक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सदरच्या नुकसानीपोटी तक्रारदाराला काही रक्कम देणे न्यायोचित ठरेल. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. 8. मुद्दा क्र.4 – मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.4 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे. - अं ति म आ दे श – 1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला नं.2 विमा कंपनी यांनी तक्रारकर्त्यांना पिक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम रु.64,000/- [रक्कम रुपये चौसष्ट हजार फक्त] व त्यावर द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज दिनांक 23.10.2013 पासून रक्कम प्राप्त होईपावेतो द्यावेत. 3) सामनेवाला नं.1 यांनी तक्रारकर्त्यांना मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रु.7,000/- [रक्कम रुपये सात हजार फक्त] व आर्थिक खर्चापोटी रक्कम रुपये 5,000/- (रक्कम रु.पाच हजार फक्त) तक्रारकर्त्यांना द्यावेत. 4) वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 व 2 यांनी या आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाचे आत करावी. 5) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क द्यावी. 6) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारकर्त्यांना परत द्यावी. |