निकाल
दिनांक- 23.09.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार महादेव गणपती गव्हाणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
या मंचाने दि.20.05.2014 रोजी सदरील तक्रार या मंचापूढे दाखल होणेस पात्र आहे काय? या मुद्यावर तक्रारदार यांचा युक्तीवाद ऐकण्यासाठी ठेवलेले होते. तदनंतर तक्रारदार यांनी दि.27.06.2014 सदरील तक्रारीमध्ये दुरुस्ती करण्यात यावी असा अर्ज दिला, सदरील अर्ज या मंचाने दि.17.07.2014 रोजी मान्य केला व तक्रारदार यांना तक्रारीत नविन मसूदा टाकण्यास व दुरुस्तीस परवानगी दिली. तदनंतर वेळोवेळी या मंचाने तक्रारदार यांना दुरुस्ती करणेकामी मुदती दिलेल्या आहेत. तक्रारदार व त्यांचे वकील हे नेहमीच या मंचासमोर गैरहजर राहिलेले आहेत. दि.07.08.2014 रोजी या मंचाने निशाणी 1 वर तक्रारदार यांनी तक्रारीत दुरुस्ती अद्याप पावेतो केली नाही तसेच दुरुस्त प्रत दाखल केली नाही. सबब तक्रार पुढील आदेशासाठी ठेवावी असा आदेश केलेला आहे. तदनंतर ही तक्रारदार व त्यांचे वकील मंचासमोर हजर झाले नाही व दुरुस्त तक्रार दाखल केली नाही. तसेच तक्रार या मंचासमोर चालण्यास पात्र आहे याबाबत युक्तीवाद केला नाही. दि.01.09.2014 रोजी या मंचाने निशाणी 1 वर आदेश केला की, तक्रारदार यांनी तक्रारीत दुरुस्ती केली नाही, दुरुस्त प्रत दाखल केली नाही, तसेच तक्रार चालवणे कामी पुढे कोणतीही तजवीज केली नाही म्हणून तक्रार पुढील आदेशासाठी ठेवावी. तदनंतर ही तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर राहिले. सबब तक्रारदार सांना सदरील तक्रार चालवण्यास स्वारस्य दिसत नाही. तसेच तक्रारदार यांना संधी देऊनही त्यांनी तक्रारीत आवश्यक ती कार्यवाही केली नाही. सबब या मंचाचे मत की, तक्रारदार यांचे चुकीमूळे तक्रार रदद होणेस पात्र आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांच्या चुकीमूळे तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड