श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 14/09/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांचे वडील श्री. प्रल्हाद अग्रवाल यांचे हृदय विकाराने दि.27.08.2008 रोजी निधन झाले. तक्रारकर्त्यांचे वडील हे गैरअर्जदाराकडे नौकरीवर होते. गैरअर्जदारांनी त्यांच्या कर्मचारी/अधिकारी यांच्या मृत्यु पश्चात, त्यांचेकरीता कल्याणकारी योजनेनुसार मृतक कर्मचारी/अधिकारी यांच्या परिवारातील सदस्याला नौकरी न देता सानुग्रह अनुदान देण्याची योजना सुरु केली होती. मात्र तक्रारकर्त्यांच्या येथील सदस्याला नौकरी दिली नाही व सानुग्रह अनुदान दिले नाही, म्हणून तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांना पत्राद्वारे विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले नाही व रक्कमही दिली नाही. तक्रारकर्त्याचे मते त्यांना रु.8,00,000/- सानुग्रह अनुदान द्यावयास पाहिजे होते. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रारीद्वारा गैरअर्जदारांकडून रु.8,00,000/- सानुग्रह अनुदार मिळावे, मानसिक व शारिरीक त्रासाकरीता नुकसान भरपाई मिळावी व कार्यवाहीचा खर्च मिळावा अशी मागणी केली.
2. गैरअर्जदारांना तक्रारीची नोटीस प्राप्त झाल्यावर, त्यांनी हजर होऊन तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन तक्रारीतील सर्व विपरीत विधाने नाकारली आणि तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक नसल्याने मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही व तक्रार कालबाह्य असल्याचा आक्षेप घेतला. तसेच तक्रारीत नमूद केलेली कल्याणकारी योजना ते राबवित असल्याचे मान्य केले. या योजनेतील तरतूदीप्रमाणे व मृतक व्यक्तीला शेवटी मिळालेली राशी आणि त्याआधारे त्या कुटुंबाचे उत्पन्न मिळून योजनेद्वारे ठरविलेल्या उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त असल्यामुळे यामध्ये सानुग्रह अनुदान देण्याचे प्रयोजन नाही. तसेच या योजनेसंबंधी पात्र व्यक्तीचे निर्णय घेण्याचे अधिकार हे त्याचे विवेक बुध्दीवर व परिस्थितीवर व मर्जीवर अवलंबून आहे व प्रत्येकास अशाप्रकारे सानुग्रह अनुदान दिलेच पाहिजे अशी तरतूद नाही, म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची व गैरकायदेशीर आहे व ती खारीज व्हावी असा उजर घेतला आहे.
3. यातील गैरअर्जदाराच्या योजनेप्रमाणे यासंबंधीची योजना ही मुळात “Welfare Major” 15 (II) अशा स्वरुपाची आहे असे त्या दस्तऐवजात नमूद केले आहे. अशा परिस्थितीत मृतक ह्यांनी गैरअर्जदार या संस्थेला त्यांच्या नौकरी दरम्यान दिलेली सेवा या मोबदल्याच्या स्वरुपात ग्राह्य धरता येते आणि तक्रारकर्ता किंवा मृतकाच्या वारसांना त्याचे लाभार्थी अशा अर्थाने ते ग्राहक ठरतात. त्यामुळे गैरअर्जदारांचा मोबदल्यासंबंधी व तक्रारकर्ता ग्राहक नसल्यासंबंधीचा आक्षेप विचारात घेणे आवश्यक नाही.
4. यातील गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना या प्रकरणात या योजनेला लाभार्थी ठरविता येत नाही, यासंबंधी घेतलेला महत्वाचा आक्षेप विचारात घेणे गरजेचे आहे. गैरअर्जदाराने या प्रकरणात आपल्या उत्तरासोबत उत्पन्नासंबंधी Calculation Sheet दाखल केलेले आहे व त्याप्रमाणे तक्रारकर्त्यांचे व कुटुंबाचे उत्पन्न हे रु.31,513/- एवढे दर्शविलेले आहे व मृतक ह्यांनी मृत्युचे वेळेस उचललेला पगार हा रु.33,178/- दर्शविला आहे. यात गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे उत्पन्न रु.10,000/- गृहीत धरले आहे. ते तक्रारकर्त्याने नाकारल्यामुळे व त्यासंबंधी गैरअर्जदारांनी कोणतेही निश्चित पुरावा न दिल्यामुळे उत्पन्नातून वगळले तरीही रु.31,513/- - रु.10,000/- = रु.21,513/- याप्रमाणे निव्वळ उत्पन्न हे रु.21,513/- एवढे येते आणि हे उत्पन्न मृतक ह्यांना शेवटचे वेतनाच्या 60 टक्क्यापेक्षा जास्त आहे व अशा परिस्थितीत योजनेप्रमाणे सानुग्रह अनुदान देता येत नाही असा गैरअर्जदाराचा आक्षेप आहे. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिउत्तराद्वारे त्याचे स्वतःचे उत्पन्न नाकारले, मात्र इतर उत्पन्नासंबंधी काहीही म्हटले नाही आणि कुटुंबाचे उत्पन्न रु.21,513/- हे 60 टक्क्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. दुसरे असे आहे की, या योजनेच्या परिच्छेद 15 (I) मध्ये योजनेप्रमाणे कोणलाही अधिकार देण्यात आलेले नाही, तर त्यासंबंधीचे हक्क गैरअर्जदारांकडे राखून आहे आणि यासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांचे आहे. ही बाबसुध्दा या प्रकरणात लक्षणीय आहे. वरील परिस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याची तक्रार ही मंजूर होण्यास पात्र नाही. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.