निकाल
दिनांक- 18.09.2014
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार शेख नसीर शेख मकबूल यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी म्हशीचा विमा रक्कम व नुकसान भरपाई रक्कम रु.53,000/- न देवून सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे, त्याबाबत दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे मौजे चिंचापूर तालूका आष्टी जिल्हा बीड येथील रहिवाशी आहे. त्यांचा शेती व दुग्ध व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी दि.09.07.2011 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड तालूका जामखेड जिल्हा अहमदनगर येथून जाकीर बहादूर पठाण यांचेकडून रक्कम रु.25,000/- ला एक म्हैस खरेदी केली. सदर म्हैस ही दररोज 10 ते 12 लिटर दुध देत होती. तक्रारदारास सदर दुधापासून महिन्याकाठी रक्कम रु.10,000/- ते 12,000/- मिळत होते. दि.11.11.2011 रोजी सर्पदंशाने तक्रारदार यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. घटनेनंतर तक्रारदाराच्या म्हशीचा पोलीस पाटील व सरपंच यांनी पंचनामा केला, तसेच शासकीय पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक जाधव यांनी म्हशीचे शवविच्छेदन केले.
तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे सदरील म्हशीचा रक्कम रु.25,000/- चा विमा उतरविलेला आहे. विमा पॉलीसीचा कालावधी हा दि.02.08.2011 ते 01.08.2014 असा आहे. विमा पॉलीसी करता तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.2,484/- चा विमा हप्ता भरलेला आहे. तक्रारदार यांची म्हैस मयत झाल्यानंतर तक्रारदार यांनी म्हशीची विमा रक्कम मिळण्याकामी सर्व कागदपत्रासह क्लेम सामनेवाला यांचेकडे दाखल केला आहे. सामनेवाला यांनी कोणतेही संयुक्तीक कारण नसतांना तक्रारदारास रक्कम मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. सामनेवाला यांचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. तक्रारदार याने वेळोवेळी सामनेवाला यांचेकडे म्हशीच्या विम्याच्या रकमेची मागणी केलेली आहे परंतू सामनेवाला यांनी आजपर्यंत तक्रारदारास विम्याची रक्कम दिली नाही. उडवा उडवीची उत्तरे दिली आहे. सामनेवाला यांनी विमा दावा न देऊन सेवा देण्यात कसूर केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास म्हशीची किंमत रु.25,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/-, भविष्य काळातील दुधाचे झालेले नुकसान रु.20,000/-, तक्रारीचा खर्च रु.3,000/- देण्यात यावे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मंचासमोर हजर झाली. त्यांनी आपले लेखी म्हणणे निशाणी क्र.17 अन्वये दाखल केलेले आहे. सामनेवाला यांचे कथन की, सामनेवाला यांनी तक्रारीतील मजकूर हा स्पष्टपणे नाकारलेला आहे. तसेच तक्रारदार यांनी म्हशीचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला आहे ही बाब सिध्द करण्यात यावी. तसेच सामनेवाला हे तक्रारदार यांनी मागितलेली नुकसान भरपाई ही योग्य व वाजवी नाही असे कथन केलेले आहे. तसेच तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विमा पॉलीसी, म्हशीचे शवविच्छेदन अहवाल, पंचनामा, म्हैस खरेदी केलेली पावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेली लेखी कैफियत याचे अवलोकन केले. तक्रारदार व सामनेवाला यांचे वकील यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास म्हशीचा विमा
रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे,
ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास पात्र
आहे काय? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.भगत यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी दि.09.07.2011 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथून म्हैस खरेदी केली होती, त्यासाठी तक्रारदार यांनी रक्कम रु.25,000/- दिले. तक्रारदार यांनी सदरील म्हशीचा विमा सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.25,000/- चा उतरविलेला आहे. विम्याच्या पॉलीसीचा कालावधी दि.02.08.2011 ते 01.08.2014 असा आहे. विमा पॉलीसीसाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे विमा हप्ता म्हणून रक्कम रु.2,484/- भरले आहे. दि.11.11.2011 रोजी तक्रारदार यांच्या म्हशीचा सर्पदंशाने मृत्यू झाला त्याबाबतचे कागदपत्र तक्रारदार यांनी मंचासमोर दाखल केलेले आहे. तसेच म्हशीचे शवविच्छेदन अहवाल दाखल केले आहे. म्हशीच्या मृत्यूनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे म्हशीचे विमा रक्कम मिळणेकामी सर्व कागदपत्रासह विमा दावा दाखल केला होता परंतू अद्याप पर्यंत सामनेवाला यांनी दाव्यावर योग्य कार्यवाही केली नाही. त्याबाबत सामनेवाला यांना विचारपूस केली असता योग्य असा प्रतिसाद दिला नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या म्हशीची विमा रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला यांचे वकील श्री.साळवे यांचा युक्तीवाद ऐकला. युक्तीवाद करत असताना त्यांनी असे कथन केले की, जनरल इन्शुरन्स प्रमाणे म्हशीचा विमा हा एक वर्षापर्यंत असतो. तक्रारदारास देण्यात आलेली तीन वर्षाची विमा पॉलीसी ही चुकीची आहे. पॉलीसी ही चुकीची असल्यामुळे तक्रारदारास विमा दावा न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याचे शपथपत्र याचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेला जबाब याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी दाखल केलेली जनावर विक्रीची पावती याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यानी रक्कम रु.25,000/- देऊन एक म्हैस खरेदी केलेली आहे ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या म्हशीचा शवविच्छेदन अहवाल याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारीतील म्हशीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला आहे ही बाब सिध्द होते. म्हशीच्या मृत्यूनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे सदरील म्हशीचा विमा रक्कम मिळण्याकामी आवश्यक सर्व कागदपत्र दाखल केले होते. परंतू सामनेवाला यांनी अद्याप पावेतो तक्रारदारास विमा रक्कम अदा केली नाही. विमा पॉलीसीचे अवलोकन केले असता विम्याच्या पॉलीसीचा कालावधी हा दि.02.08.2011 ते 01.08.2014 असा आहे. तक्रारदार यांच्या म्हशीचा मृत्यू हा दि.11.11.2011 रोजी झाला. यावरुन असे निदर्शनास येते की, म्हैस ज्या वेळेस मयत झाली, त्या वेळेस सदर म्हशीचा विमा रकमेसाठी पॉलीसीची कालावधी संपुष्टात होती. म्हशीची विमा रक्कम ही त्यामध्ये समाविष्ट आहे. तक्रारदार हे आपल्या जनावरांचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याबाबतचा लाभ मिळण्यासाठी सामनेवाला यांच्याकडे विमा उतरवून घेतात. सामनेवाला यांचे आद्यकर्तव्य आहे की, तक्रारदार यांनी उतरविलेला म्हशीचा विमा त्याबाबतची विमा रक्कम तक्रारदारास देण्यात यावे. सदर विम्याच्या रकमेसाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे विमा हप्ता भरला आहे. सामनेवाला यांच्या युक्तीवादानुसार म्हशीच्या विम्याची पॉलीसी ही एक वर्षासाठी असते, तक्रारदारास दिलेली पॉलीसी ही चुकीची आहे. जर ती पॉलीसी चुकीची आहे तर त्या बाबतचे कोणतेही कागदपत्र सामनेवाला यांनी तक्रारदारास दिले नाही किंवा सदर पॉलीसी ही नामंजूर केलेली नाही. जर पॉलीसी ही एक वर्षासाठी असते त्या अनुषंगाने सुध्दा सदर म्हशीची विमा रक्कम ही पॉलीसीमध्ये समाविष्ट आहे. कारण की म्हशीचा मृत्यू हा दि.11.11.2011 रोजी झाला आहे. तक्रारदार यांनी काढलेली विमा पॉलीसी ही दि.02.08.2011 पासून ते 01.08.2014 पर्यंत अशी आहे. त्या अनुषंगाने सुध्दा म्हशीचा मृत्यू हा विमा पॉलीसीच्या कालावधीत झालेला आहे. सबब तक्रारदार हे सदरील म्हशीचा विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास म्हशीचा विमा रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येणार आहे. सबब तक्रारदार हे म्हशीचा विमा रक्कम रु.25,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.500/- मिळण्यास पात्र आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे. सबब मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास
म्हशीचा विमा रक्कम रु.25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस
हजार फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत
दयावेत, सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार
दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9
टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक
व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.1,000/- (अक्षरी
रुपये एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/-
(अक्षरी रुपये पाचशे) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड