निकाल
दिनांक- 02.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार मुद्रिका भिमराव वाघमारे हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
तक्रारदार हि मयत भिमराव रामराव वाघमारे यांची पत्नी आहे. तक्रारदाराचे पती हे रस्ता अपघातामध्ये दि.11.05.2009 रोजी मयत झाले. तक्रारदारांचे पतीकडे अँपेरिक्षा होता. ज्यांचा नोंदणी क्र.एम.एच.-22-टीआर-511/9108 होता. मयत हा त्या रिक्षाचा चालक व मालक होता. सदर रिक्षाचा सामनेवाले यांचेकडे रु.1000/- भरुन विमा उतरवलेला होता. विम्याचा कालावधी दि.08.09.2008 ते 07.09.2009 असा होता. तक्रारदाराचे पती हे दि.11.05.2009 रोजी नातेवाईकांना सोडवण्याकरिता मौजे गोंदी ता.अंबड जि.जालना येथे गेले होते व त्यांना सोडून परत येत असताना दुपारी 12.30 वाजता शहागड येथे त्यांचे रिक्षास समोरुन येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात तक्रारदाराचे पती मयत झाले व रिक्षाचेही नुकसान झाले.
तक्रारदार हिने सदर रिक्षाची नुकसान भरपाई व चालक मालकाचे विम्याची रक्कम मिळावी सामनेवाले यांचेकडे दि.26.06.2009 रोजी मोटार दावा प्रपत्र सहित विमा दावा दाखल केला तसेच आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखल केली. रिक्षा दुरुस्ती बिल रक्कम रु.76,446/-, मयताच्या वाहन चालवण्याच्या परवान्याची प्रत, पॉलिसीची प्रतीक्षा व पोलिस स्टेशनची सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार हिने वेळोवेळी सामनेवाले यांचेकडे विमा दाव्याची मागणी केली परंतु सामनेवाले म्हणतात की, वरिष्ठ कार्यालयाकडे विमा दावा मंजूरीकरिता पाठवण्यात आला आहे.सामनेवाले यांचेकडून तक्रारदारास खालील प्रमाणे येणे आहे.
1. चालक मालक विम्याची रक्कम रु.2,00,000/-
2. रिक्षाची नुकसान भरपाई रक्कम रु.76,466/-
3. मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.15,000/-
4. तक्रारीचा खर्च रु.5000/-
----------------
एकूण रु.2,96,446/-
तक्रारदार हिने शेवटी दि.15.03.2011 रोजी सामनेवाले यांचे कार्यालयात जाऊन विमा रक्कमेची मागणी केली परंतु त्यांनी रक्कम दिली नाही. तक्रारदारांची मागणी आहे की, तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करावी, वरील प्रमाणे मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.2,96,466/- देण्याचा आदेश व्हावा. रक्कम रु.2,96,466/- वर दि.26.09.2009 पासून ते रककम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.12 टक्के वयाज देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले यांनी त्यांचा लेखी जवाब दि.11.06.2012 रोजी दाखल केला. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी आर.सी.बुक, वाहनाचे परमिट, ड्रायव्हींग लायसन्स, चार्ज शिट, हे कागदपत्र दाखल केलेले नाहीत. सामनेवाले यांनी पत्र पाठवून सुध्दा तक्रारदार यांनी कागदपत्र दाखल केलेले नाहीत.सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही त्रूटी केलेली नाही. ट्रकने धडक दिल्यामुळे रिक्षाचा अपघात झाला हे तक्रारदाराने सिध्द करावे तसेच रिक्षाचा विमा उतरविलेला होता हे सिध्द करावे, रिक्षा चालकाकडे वैध ड्रायव्हींग लायसन्स होते ते सिध्द करावे. मयत हे योग्य ती काळजी घेऊन रिक्षा चालवत नव्हते त्यामुळे सामनेवाले हे कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत.तक्रारदाराला दुस-या कोर्टात मोटार वाहन अपघात दावा दाखल करण्यासाठी कार्यक्षेत्र आहे, या मंचाच्या कार्यक्षेत्रात सदर तक्रार येत नाही.तसेच या प्रकरणात ट्रक क्र.केए-32-ए-1751 चा ड्रायव्हर व मालक आणि ट्रकच्या विम्याची इन्शुरन्स कंपनीला पक्षकार करणे आवश्यक होते. सामनेवाले यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांचे शपथपत्र, इन्शुरनस पॉलिसीची प्रत, मोटार दावा प्रपत्रची प्रत, इस्टीमेटची प्रत, मरणोत्तर पंचनाम्याची प्रत, मयताचे वाहन चालविण्याचे लायसन्सची प्रतीक्षा इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.सामनेवाले यांनी लेखी म्हणण्याच्या पृष्टयर्थ विश्वास बंन्सी गायकवाड, यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच कंपनीने तक्रारदाराला दि.24.06.2009 रोजी दिलेल्या पत्राची प्रत,दि.14.08.2009 रोजी दिलेल्या पत्राची प्रत,तक्रारदाराला पाठविलेल्या पाकीट, श्री.एन.सी.जेटाले सर्व्हेअर यांचा अहवाल,रिक्षाचे अपघातानंतरचे फोटो इत्यादी कागदपत्राच्या छायाकिंत प्रत दाखल केले आहेत.
तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र व कागदपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्रुटीची सेवा दिली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय ? आदेशात नमुद केल्याप्रमाणे
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री. धांडे यांनी यूक्तीवाद केला की, तक्रारदार हिचे पती दि.11.05.2009 रोजी वाहन अपघातात मयत झाले. तक्रारदाराचे पती हे त्यांची स्वतःची अँपेरिक्षा चालवत होते. त्यावेळी ट्रकने रिक्षाला धडक दिली. त्या अपघातात तिचे पती मयत झाले. सदरील रिक्षाचा विमा सामनेवाले यांचेकडे उतरविलेला होता. तक्रारदार यांनी सामनेवालाकडे विमा नुकसान भरपाईची रक्कम मागितली व त्याकामी सर्व कागदपत्राची पुर्तता केली परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा दावा निकाली काढला नाही. सबब, सामनेवाले यांनी सेवा देण्यास कसूर केला आहे व तक्रारदार मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
सामनेवाले यांचे वकिल श्री.थिंगळे यांनी यूक्तीवादात सांगितले की, सामनेवाला यांनी कोणताही सेवेत कसूर केलेला नाही. सदरील तक्रार चालविण्यास पात्र नाही. त्यांनी असाही यूकतीवाद केला की, तक्रारदाराने दावा दाखल केल्यानंतर दाव्या सोबत आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी वेळोवेळी त्या बाबत कळविले असतानासुध्दा तक्रारदार यांनी कागदपत्र दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा दावा मंजूर करता आला नाही. तक्रारदार यांनी मागणी केलेली संपूर्ण कागदपत्र इन्शुरन्स कंपनीस सादर केल्यास इन्शुरन्स कंपनी त्यावर योग्य तो निर्णय घेईल. तक्रारदार हया स्वतःच निष्काळजी असल्यामुळे त्यांना गाहक मंचामध्ये अशा प्रकारची तक्रार दाखल करता येणार नाही. सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत त्रूटी केलेली नाही.
वर नमूद केलेला युक्तीवाद व तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती मोटर वाहन अपघातात दि.11.5.2009 रोजी मयत झाले आहेत ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत मयत भिमराव यांचे मरणोत्तर पंचनामा, ड्रायव्हींग लायसन्स, तसेच इनशुरनस कंपनीची कव्हर नोट दाखल केली आहे. यावरुन ही बाब सिध्द होते की, मयत चालवित असलेले वाहनाचा सामनेवाला यांचेकडे विमा उतरविलेला होता. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदार यांनी इन्शुरन्स कंपनी कडे मोटार दावा प्रकरण योग्य त्या कागदपत्रासह दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे मोटार दावा प्रकरण दाखल केले. त्यांची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. त्यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मोटार दावा प्रपत्र हे मयताचे नांवे दाखल केले आहे. त्यावर तक्रारदार या मयताचे वारस आहेत व तसेच त्या विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत. या बाबत सविस्तर वर्णन केलेले नाही.त्या क्लेम फॉर्म वर तक्रारदार यांची सही नाही. तसेच विमा दावा प्रपत्रासोबत कोणते कागदपत्र दाखल आहे यांचाही स्पष्ट उल्लेख केलेला नाही.
सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की,सामनेवाला यांचेकडे मयत भिमराव यांचा मोटार दावा प्रपत्र मिळाल्यानंतर त्यांनी मयत भिमराव यांचा मुलगा सुग्रीव यांस नोटीस काढून दाव्याकामी वाहनाचे आर.सी.बूक, परमिट, गाडी चालविणा-याचे ड्रायव्हींग लायसन्स दाखल केलेले नाही व ते ताबडतोब दाखल करावे असे कळविले आहे. सदरील तक्रार मिळून सुध्दा तक्रारदार अगर मयत यांचा मुलगा सुग्रीव यांनी इन्शुरन्स कंपनीकडे कागदपत्राची पुर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेला दाव्यावर इन्शुरन्स कंपनीला निर्णय घेता आला नाही. जर तक्रारदार यांनी दावा प्रपत्र व्यवस्थित भरले असते व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता केली असती तर सामनेवाला यांनी त्यावर योग्य तो निर्णय घेतला असता. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना कळविले की कागदपत्राची पुर्तता केली नाही. तक्रारदार स्वतः निष्काळजीपणे वागले असे निदर्शनास येते. त्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे ही बाब सिध्द झाली आहे असे म्हणता येणार नाही. इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांचा दावा मंजूर अगर नामंजूर केला नाही. इन्शुरन्स कंपनी संपूर्ण कागदपत्राची पुर्तता झाल्यानंतर तक्रारदार यांच्या दाव्या बाबत निर्णय घेण्यास तयार आहेत.
सबब, या मंचाचे मत तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे मोटार दावा प्रपत्र योग्य रितीने भरुन त्यासोबत सर्व आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करावी तसेच सामनेवाला यांनी ज्या कागदपत्राची मागणी केलेली आहे ती सर्व कागदपत्रे सामनेवाला यांना दयावीत. सर्व कागदपत्र मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या दाव्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा. त्या निर्णयया विरुध्द तक्रारदार यांना योग्य ती दाद मागण्याचा अधिकार राहील. वरील परिस्थितीत तक्रारदार यांची तक्रार मंजूर करता येत नाही.
सबब, मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते व मुददा क्र.2 चे उत्तर आदेशात नमुद केल्याप्रमाणे होय.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. तक्रारदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी सामनेवाला यांचेकडे
दावा प्रपत्र योग्य भरुन त्यासोबत सामनेवाला यांनी मागणी केलेले
आवश्यक ते कागदपत्र निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत
दयावेत, सामनेवाला यांनी कागदपत्र मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत
त्यावर निर्णय घ्यावा.
3. खर्चाबददल आदेश नाही.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.