निकाल
दिनांक- 16.03.2015
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे,तक्रारदार हे पेन्शनर असून जालना रोड बीड येथे राहतात. तक्रारदार यांनी इंडीका कार एम.एच.-23-वाय-2485 विकत घेतली आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहनाचा विमा सामनेवाले यांचेकडे काढला आहे. विम्याचा कालावधी दि.30.10.2013 ते 29.10.2014 पर्यतचा होता. दि.23.3.2014 रोजी तक्रारदार हे बीड हून औरंगाबाद येथे जात असताना औरंगाबाद कडून बीड कडे येणा-या ट्रकने तक्रारदार यांचे कारला धडक देऊन अपघात झाला. सदरील अपघातात कारचे दोन्ही दरवाजे चेपले गेले. त्यांच्या काचा फुटल्या तसेच इतर भागाचे नुकसान झाले. अपघात ठिकाणाहून अपघात केलेला ट्रक हा निघून गेला. तक्रारदार यांचे नूकसान रक्कम रु.24,509/- चे झाले. अपघाताची खबर तक्रारदार यांनी दि.23.3.2014 रोजी सामनेवाले यांना दिली. सामनेवाले क्र.1 यांचे कर्मचारी श्री.कलंत्री यांनी अपघातग्रस्त कारची पाहणी केली व दूरुस्तीसाठी गॅरेजला घेऊन जाण्यास सांगितले. तक्रारदार यांनी सदरील वाहन न्यू लक्ष्मी मोटार्स गॅरेज बीड याठिकाणी दुरुस्तीसाठी नेले. सामनेवाले यांचे कर्मचारी यांनी गॅरेजमध्ये जाऊन अपघातग्रस्त कारची पाहणी केली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे संपूर्ण कागदपत्र दिले. तसेच अंदाजे खर्चाचे बिलाच्या पावत्या दिल्या. तक्रारदार यांचे वाहन दूरुस्त झाल्यानंतर त्यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे नुकसान भरपाई साठी विमा दावा दाखल केला. सामनेवाले यांनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार हे 5 ते 6 वेळा सामनेवाले यांचेकडे गेले. सामनेवाले यांनी त्यांना पैसे मिळून जातील असे आश्वासन दिले व दि.3.11.2014 रोजी नुकसान भरपारई देण्यास नकार दिला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि.5.11.2014 रोजी नोटीस पाठविली. सामनेवाले यांनी नोटीसचे उत्तर देऊन तक्रारदार यांचेकडे असलेले ड्रायव्हींग लायसन्सची मुदत दि.23.23.2012 पर्यत होती व अपघातचे दिवशी सदर लायसन्सची वैधता संपलेली होती म्हणून तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला आहे असे कळविले. तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचे कडे लाईट मोटार व्हेईकल नॉन ट्रान्सपोर्टचे लायसन्स आहे. त्याची वैधता दि.22.11.2014 पर्यत होती. तक्रारदार यांची कार नॉन ट्रान्सपोर्ट वाहन म्हणून नोंदलेली आहे. तक्रारदार हेसदरील वाहन चालविण्यास सक्षम होते असे असतानाही बेकायदेशीरपणे सामनेवाले यानी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला आहे व सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी सदरील वाहन दूरुस्तीकामी करावा लागलेला खर्च रु.24,509/- त्यावर व्याज, तक्रारदार यांना झज्ञलेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च एकूण रु.84,079/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
सामनेवाले हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.11 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे वाहनाचा विमा सामनेवाले यांचेकडे काढलेला होता ही बाब मान्य केली आहे. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन तक्रारदार यांचेकडे अपघाताचे दिवशी वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता म्हणून त्यांचा क्लेम नाकारण्यात आलेला आहे. सामनेवाले यांनी दयावयाचे ठेवली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी स्वत-चे शपथपत्र नि.13 वर दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 वर विमा पॉलिसी,अपघातग्रसत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारल्याचे पत्र, तक्रारदार यांनी अपघातग्रस्त वाहन दूरुस्त केल्याच्या पावत्या, तक्रारदार यांचे ड्रायव्हींग लायसन्स, सामनेवाले यांना दिलेली नोटीस, सामनेवाले यांनी दिलेले नोटीसचे पत्र दाखल केलेले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.शिंदे यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री. साळवे यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांचेकडे दि.23.4.2014 रोजी अपघातग्रस्त वाहन
चालविण्याचा वैध परवाना होता काय ? होय
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन सेवेत
त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय
3. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार हे अपघातगस्त वाहन एम.एच.-23-वाय-2485 चे मालक आहेत. सदरील वाहनाचा विमा सामनेवाले यांचेकडे काढलेला आहे. त्यांचा कालावधी दि.30.10.2013 ते 29,10,2014 होता. तक्रारदार यांचे वाहनाचा अपघात दि.24.3.2014 झाला व त्यात वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील वाहन दूरुस्त करुन घेतले व त्याकामी तक्रारदार यांना रक्कम रु.24,509/- खर्च करावा लागला हया बाबी विषयी वाद नाही.
सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा दि.13.05.2014 रोजीच्या पत्राने नाकारला आहे. विमा दावा नाकारण्यास कारण असे दिलेले आहे की, तक्रारदार यांचा वाहन चालविण्याचा परवाना नंबर एमएच-2320-100005006 हा दि.23.12.2012 पयर्पत वैध होता. अपघात हा दि.23.3.2014 रोजी झालेला आहे. अपघाताचे दिवशी तक्रारदार यांचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. सबब, तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला आहे.
तक्रारदार यांचे वकील श्री. शिंदे यांनी या मंचाचे लक्ष् तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वाहन चालविण्याच्या परवान्यावर वेधले व यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालविण्याचा परवान्याची वैधता दि.23.12.2012 रेाजी संपलेली आहे. त्याविषयी वाद नाही. तक्रारदार यांचे वाहन हे ट्रान्सपोर्ट वाहन नव्हते. तक्रारदार यांचे वाहन हे नॉन ट्रान्सपोर्ट वाहन होते. तक्रारदार यांचे नॉन ट्रान्सपोर्ट वाहन चालविण्याचा परवाना हा दि.22.11.2014 पर्यत वैध होता व स्पष्ट नोंद वाहन चालविण्याच्या परवान्यामध्ये केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्ट वाहन चालविण्याचा परवाना लक्षात घेऊन तक्रारदार यांचा दावा चूकीच्या पध्दतीने नाकारलेला आहे. तक्रारदार यांचेकडे ज्या दिवशी अपघात झाला त्यादिवशी वाहन चालविण्याचा वैध परवाना होता. सबब, सामनेवाले यांनी चूकीच्या पध्दतीने तक्रारदार यांचा क्लेम नाकारलेला आहे.
सामनेवाले यांचे वकील श्री.साळवे यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचेकडे ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालविण्याचा परवाना नव्हता. सामनेवाले यांनी कागदपत्राची छाननी करुन तक्रारदार यांचा क्लेम योग्य व रास्त कारणासाठी नाकारलेला आहे. सबब, तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
वर नमूद केलेला तक्रारदार व सामनेवाले यांचे वकिलांचा यूक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्राचे अवलोन केले. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वाहन चालविण्याच्या परवान्याचे अवलोकन केले असता, तक्रारदार हे दि.2.2.11.2014 पर्यत नॉन ट्रान्सपोर्ट वाहन चालविण्यास सक्षम होते. त्यांचे वाहन परवाना वैध होता. अपघात हा दि.21.3.2014 रोजी झाला आहे. म्हणजेच त्यादिवशी तक्रारदार यांचेकडे अपघातग्रस्त वाहन चालविण्याचा वैध परवाना होता ही बाब निर्विवाद सिध्द होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सामनेवाले यांनी ज्या कारणासाठी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला आहे ते संयूक्तीक व योग्य नाही. सबब, तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे विमा दावा दाखल केला त्याकामी तक्रारदार यांना वेळोवेळी पाठपूरावा करावा लागला तसेच संपूर्ण दस्त हजर केले, कायदेशीर नोटीसही दिली. तक्रारदार यांना ब-याच वेळा सामनेवाले यांचे कार्यालयात जावे लागले. त्याकामी खर्च करावा लागला. त्यामुळे तक्रारदार हे शारीरिक व मानसिक नुकसानपोटी रक्कम रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी वाहन दूरुस्तीसाठी केलेला खर्च रु.24,509/- मिळण्यास पात्र आहेत.
म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना अपघास्त वाहनाची नुकसान
भरपाई रक्कम रु.24,509/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आंत
दयावेत, मुदतीत न दिल्यास वरील रककमेवर तक्रार दाखल दि.24.12.2014
पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टकके व्याज दयावे
लागेल..
3) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या
मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.5,000/-
(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी
रु.3000/- (अक्षरी रुपये तीन हजार पाचशे) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मजुंषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड