(पारीत व्दारा मा.सदस्या श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर)
(पारीत दिनांक – 24 डिसेंबर, 2018)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्या संबधी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून मृतक जगदीश गोपीचंद जेठे हा तक्रारकर्तीचा पती होता आणि तो व्यवसायाने शेतकरी होता, त्याचे मालकीची मौजा मुजबी, तालुका- जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं- 256 ही शेत जमीन असून त्यावर त्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन तसेच आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे सादर करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला असल्याने ती पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिच्या पतीचा दिनांक-30/10/2016 रोजी शेडवर ईलेक्ट्रीक सीरीज लावण्यास चढला असता उंचावरुन पडल्याने जखमी होऊन मृत्यू झाला. त्यानंतर तिने दिनांक-07/01/2017 रोजी विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिका-यांकडे विमा दाव्या संबधी रितसर प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांच्या प्रतींसह सादर केला. पुढे विरुध्दपक्षांचे मागणी नुसार वेळोवेळी आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता केली. परंतु तक्रारकर्तीला विमा दावा प्रस्तावा संबधाने विरुध्दपक्ष 1 यांनी दिनांक 28/07/2017 व दिनांक 31/08/2017 रोजी पत्र पाठवून 6-ड वर मृतकाचे नाव नसल्याने विमा दावा प्रस्ताव नामंजूर करण्यात येत आहे हे कारण दाखवून विमा दावा फेटाळला. ज्या उद्येश्याने शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्येश्यालाच विरुध्दपक्ष हे तडा देत आहेत. म्हणून तिने या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-07/01/2017 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहे.
विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे मंचासमक्ष पृष्ठ क्रं. 68 वर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारकर्तीच्या तक्रारीला सक्त विरोध केला आहे. विरुध्द पक्षाने आपले लेखी उत्तरात असे नमूद केले की, तक्रारकर्तीने क्लेम फॉर्म सोबत मृतक श्री. जगदीश गोपीचंद जेठे यांचे संबंधात जुना 6-ड तक्रारकर्तीने न दिल्याने विमा कंपनीने विमा दावा रद्द केला आहे. तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्यु संबंधाने विमा दावा मंजूर करण्यासाठी जुना 6-ड फॉर्म आवश्यक आहे व सदर जुना 6-ड फॉर्म ची मागणी करुनही तक्रारकर्तीने सदर कागदपत्राची पुर्तता केलेली नाही, म्हणून विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा पॉलीसीच्या अटी व शर्ती आणि नियमांचे अधिन राहून नामंजूर करण्यात आला असल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) यांना मंचाद्वारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात पारीत करण्यात आला.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, भंडारा, तालुका, जिल्हा भंडारा यांनी पृष्ठ क्रं.64 वर त्यांचे लेखी उत्तर दाखल केले आहे. विरुध्द पक्ष 3 ने त्यांचे लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ती श्रीमती ज्योती जगदीश जेठे हिचा पती श्री जगदीश गोपीचंद जेठे यांचा दिनांक-30/10/2016 रोजी ईलेक्ट्रीक सीरीज लावण्याकरीता खांबावर चढला असता उंचावरुन पडल्याने जखमी होऊन मृत्यू झाला. तक्रारकर्तीने तिचे पतीचा अपघाती मृत्यू बाबत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा प्रस्ताव त्यांचे कार्यालयात दिनांक-09/01/2017 रोजी दाखल केल्यानंतर त्यांनी त्रृटी पुर्तता करुन सदर विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-20/01/2017 रोजी सादर केला. मा. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी कार्यालय भंडारा यांनी सदर प्रस्ताव विरुध्द पक्ष 1 विमा कंपनीचे कार्यालयात सादर केला असता विरुध्द पक्ष विमा कंपनीने सदरचा विमा दावा प्रस्ताव “जुना 6-ड फॉर्म वर मृतकाचे नाव नसल्यामुळे नामंजूर करण्यात येत आहे” या शे-यासह कळविले आहे. विमा दावा प्रस्तावातील त्रृटी संबधाने त्यांनी विना विलंब कार्यवाही केलेली असल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीने तिचे तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-10 नुसार एकूण-09 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय, तक्रारकर्तीचा दावा नाकारल्याबाबतचे वि.प.2 चे पत्र, तिने दाखल केलेल्या विमा दाव्याची प्रत,तिचे पतीचे शेताच्या 7/12 उता-याची प्रत व इतर दस्तऐवज, पतीचे अपघाताबाबत एफ.आय.आर. व इतर पोलीस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, मृत्यु प्रमाणपत्र, मृतकाचा वयाचा पुरावा, तक्रारकर्तीचे ओळखपत्र अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं-66 ते 67 वर तिचे शपथपत्र दाखल केले असून, पृष्ट क्रं-72 ते 73 वर तिचेतर्फे वकीलांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे सिनीअर डिव्हीजनल मॅनेजर यांनी पुराव्या दाखल पान क्रं-70 वर शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 76 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर, शपथपत्र, व लेखी युक्तिवाद आणि उभय पक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे वकील श्री. व्ही. एम. दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारकर्तीचा पती जगदीश गोपीचंद जेठे याचा दिनांक-30/10/2016 रोजी ईलेक्ट्रीक सिरीज लावण्यास चढला असता उंचावरुन पडल्याने जखमी होऊन अपघाती मृत्यु झाला हे वादातीत नाही. तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल केलेले अकस्मात मृत्यु सुचना, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांवरुन देखील सदर बाब सिध्द होते.
09. विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्तीला विमा दावा दिनांक 28/07/2017 रोजी जुना 6-ड न दिल्यामुळे नामंजूर केला आहे. तसेच दिनांक 31/08/2017 चे पत्रानुसार 6-ड वर मृतकाचे नाव नसल्यामुळे दावा नामंजूर करण्यात येईल असे कृषी आयुक्त, पुणे यांना कळविले आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष विमा कंपनीच्या मागणीनुसार 6-ड ची प्रत तालुका कृषी अधिका-याकडे दिनांक 02/05/2017 रोजी सादर केल्याचे पृष्ठ क्रं. 16 वर दाखल अर्जावरुन स्पष्ट होते.
विरुध्द पक्ष विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार 6-ड वर मृतक जगदीश जेठे याचे नाव नमुद नसल्यामुळे विमा दावा नाकारण्यात आला. वास्तविकतः 6-ड फेर पत्रकात शेतजमीनच्या पोट हिस्साची नोंद करण्यात येते. शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत फेरफार पत्रक हे मृतक हा कोणत्या फेरफार नोंदीनुसार शेतकरी म्हणून हक्कदार झाला हे पडताळण्याकरीता आवश्यक असते. तक्रारकर्तीने विमा दाव्यासोबत जुने फेरफार पत्रक जोडले असून त्यात मृतक जगदीश याचे वडील गोपीचंद यांना वारसा हक्काने गट क्रं. 256 वर हक्क प्राप्त झाल्याचे नमुद आहे म्हणजेच गट क्रं.256 हा मृतकाचे वडील गोपीचंद यांच्या मालकीची शेतजमिन होती. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिचा पती मृतक जगदीश जेठे यास गट क्रं.256 वर वारसा हक्काने हक्क प्राप्त झाला. सदर बाब स्पष्ट करण्याकरीता मृतक जगदीशचे वडील गोपीचंद यांचे मरणानंतर त्याचे वारसान चढविण्यात आल्याचा फेरफार दाखल करणे आवश्यक होते, परंतु तक्रारकर्तीने त्यापूर्वीचा म्हणजेच जुना फेरफार पत्रक तसेच तिचे पतीचे मरणानंतर त्याचे वारसान म्हणून तक्रारकर्ती व तिचे मुले यांचे नाव चढल्याचा फेरफार सादर केला आहे.
10. ज्याअर्थी तक्रारकर्ती व तिचे अपत्यांची नावे मृतकाचे वारसान म्हणून 7/12 उता-यावर चढले आहेत त्याअर्थी मृतक जगदीश याचा नक्कीच सदर गट क्रं.256 वर मालकी हक्क होता व तो शेतकरी होता हे अभिलेखावर दाखल 7/12 व फेरफार पत्रकावरुन सिध्द होते. मृतक जगदीश यास सदर हक्क वारसाहक्कानुसार प्राप्त झाला म्हणजेच त्याच्या वडीलांच्या मृत्युनंतर प्राप्त झाला आहे, परंतु मृतक जगदीश याचे वडील गोपीचंद यांचा मृत्यु केव्हा झाला व त्यानुसार वारसानाची नावे चढविल्याचा फेरफार यांचा पुरावा तक्रारकर्तीने मंचासमक्ष दाखल केलेला नाही.
11. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारताना केवळ जुना 6-ड पुरविला नाही व फेरफार पत्रकात तक्रारकर्तीच्या मृतक पतीचे नाव नमुद नाही या कारणाने फेटाळला आहे. वास्तविक पाहता विरुध्द पक्ष विमा कंपनीने नेमके कोणत्या कालावधीतील तसेच कोणत्या नोंदीचे जुना 6-ड/ फेरफार पत्रक पाहिजे ते पत्राद्वारे तक्रारकर्तीला कळविणे आवश्यक होते. तक्रारकर्ती ही साधारण व्यक्ती असल्यामुळे तिला वरीलप्रमाणे तिच्या पतीच्या वडीलांच्या मृत्युनंतरचा फेरफार ज्यानुसार तिचा पती मृतक जगदीश याचे नाव वारसान म्हणून नोंदविण्यात आले तो दाखल करणे आवश्यक होते हे समजेलच असे म्हणता येणार नाही. त्यामुळेच तिने जुना 6-ड व नविन 6-ड विरुध्द पक्षाकडे सादर केला आहे. तसेही शासकीय परिपत्रकानुसार एखादे कागदपत्र उपलब्ध नसल्यास दाव्यासोबत जोडलेल्या इतर कागदपत्रांच्या आधारे विमा दावा निकाली काढणे आवश्यक असते. तसे न करता विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारला ही निश्चितच विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे. कारण तक्रारकर्तीने जोडलेल्या विमा दावा प्रस्तावासोबत नवीन 7/12 तसेच तलाठयाचे प्रमाणपत्र जोडले होते. त्यानुसार तक्रारकर्तीचा पती शेतकरी असून विमाधारक म्हणून नोंद आहे असे नमुद आहे.
12. तक्रारकर्तीने हातातील प्रकरणांत देखील तिच्या पतीच्या वडीलांचा मृत्यु केव्हा झाला व त्यानंतर तिच्या पतीचे नाव वारसान म्हणून केव्हा चढविण्यात आहे याबाबत कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही, त्यामुळे तिच्या पतीच्या म्हणजेच मृतक जगदीश जेठे यांच्या अपघाती मृत्युपूर्वी त्याच्या वडीलांचा मृत्यु झाला होता व त्याचे नाव फेरफारनुसार 7/12 वर चढले होते याबाबत संदिग्धता आहे. केवळ वरील कागदपत्र सादर केले नाही या कारणाने तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज न करता तक्रारकर्तीला विरुध्द पक्षाने सदर कागदपत्र सादर करण्याची संधी देणे आवश्यक होते असे मंचाचे स्पष्ट मत आहे. अश्यापरिस्थितीत तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज करणे उचित होणार नाही, त्यामुळे मंच या निष्कर्षाप्रत येते की, तक्रारकर्तीने तिच्या पतीचे वडील गोपीचंद जेठे यांचे मृत्युचा दाखला तसेच त्यानंतर त्यांचे वारसान चढविल्याचे फेरफार पत्रकाची प्रत सदर आदेशाची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत विरुध्द पक्ष 1 व 2 विमा कंपनीला सादर करावे. तसेच विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीकडून सदर कागदपत्र प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाचे आत तक्रारकर्तीचा विमा दावा पुनश्च विचारात घेवून निकाली काढावा.
सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यांत येतो.
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) तक्रारकर्तीने तिच्या पतीचे वडील गोपीचंद जेठे यांचे मृत्यु प्रमाणपत्र तसेच गोपीचंदच्या मृत्यु पश्चात त्याचे वारसान नोंद फेरफार पत्रक सदर आदेशाची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत विरुध्द पक्ष 1 व 2 विमा कंपनीकडे सादर करावे. तसेच विरुध्द पक्ष विमा कंपनी 1 व 2 यांनी तक्रारकर्तीकडून सदर कागदपत्र प्राप्त झाल्यापासून तिचा विमा दावा पुनश्च विचारात घेवून तीस दिवसाच्या आत निकाली काढावा.
(03) विरुध्दपक्ष -(3) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(04) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(05) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.