(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 23/01/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.25.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार तो नामांकीत कंपनीत काम करीत असुन त्याने गैरअर्जदारांकडे 1 लक्ष रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी पॉलिसी काढली होती तिचा क्रमांक 160301/34/07/11/00000389 असा होता. सन 2008 मधे तक्रारकर्ता काही कामाने मुंबईला गेला असता त्याचे डाव्या पायाला अचानक दुखायला लागले म्हणून तो लिलावती हॉस्पीटलमध्ये चाचणी करीता गेला. प्राथमिक चाचणी घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पीटलमध्ये दाखल करुन घेतले व दि.31.05.2008 ते 02.06.2008 या कालावधीकरीता त्याचेवरी उपचार करण्यांत आला.
3. सदर घटनेची माहिती व तक्रारकर्त्यास हॉस्पीटलमध्ये रु.1,00,000/- खर्च आल्याबाबातची माहिती गैरअर्जदारांना फोनव्दारे दिली होती. गैरअर्जदार क्र.1 कंपनीने संपूर्ण चौकशी करुन त्या संबंधाने पत्र व्यवहारही केला, त्यांचे माहिती नुसार तक्रारकर्त्याने आवश्यक कागदपत्रे पुरविली. त्यानंतर तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचेसोबत बराच पत्र व्यवहार केला, परंतु त्यांना कुठलेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.02.02.2010 रोजी गैरअर्जदारांच्या नावे नोंदणीकृत पोष्टाव्दारे पत्र पाठविले, परंतु त्यालाही त्यांनी उत्तर दिले नाही, ही गैरअर्जदारांचे सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल केलेली आहे
4. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी तक्रारकर्त्याने सदरची पॉलिसी त्यांचेकडे काढल्याची बाब मान्य केली असुन इतर तक्रारकर्त्याचे म्हणणे नाकारलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे कथनानुसार तक्रारकर्त्याने संबंधीत लिलावती हॉस्पीटलमधे भरती झाल्याचे व उपचार घेतल्याचे तसेच डिर्स्चाज कार्ड, उपचाराकरीता आलेल्या खर्चाचे बिल गैरअर्जदारांकडे सादर केले नाही व त्यासंबंधाने कुठलाही पत्र व्यवहार केला नसल्याचे नमुद केले आहे. वास्तविक सदर पॉलिसी अंतर्गत दावा निकाली काढण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांची नियुक्ती केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 कडून किंवा तक्रारकर्त्याकडून संबंधीत दाव्यासंबंधी कोणतेही निवेदन नसल्यामुळे सदर प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना प्रश्नच उद्भवत नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचा दावा पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार नाकारल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता दिसुन येत नसल्यामुळे सदरची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी मंचास विनंती केलेली आहे.
5. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.07.01.2012 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. प्रस्तुत तक्रारीतील वस्तुस्थिती तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता निर्वीवादपणे तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे मेडिक्लेम पॉलिसी क्रमांक 160301/34/07/11/00000389 रु.1,00,000/- दि.31.05.2008 ते 02.06.2008 या कालावधीकरीता करीता काढली होती असा होता. तक्रारकर्त्याचे मते त्याने त्याचे आजारासाठी लिलावती हॉस्पीटलमध्ये दाखल होऊन उपचार घेतला होता. व त्या संबंधाने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे सदर हॉस्पीटलचा खर्च मिळण्याकरता तक्रारकर्त्याने दावा दाखल केला होता. सदर दावा गैरअर्जदारांनी मुदतीत सादर केला नाही तसेच पॉलिसी प्रमाणे डिर्स्चाज पासुन 30 दिवसांचे आंत तक्रारकर्त्याने विमा दावा गैरअर्जदारांकडे दाखल करावयाचा होता व तो तक्रारकर्त्याने दि.08.04.2009 दाखल केला म्हणजेच एक वर्षाचे उशिरानंतर तक्रारकर्त्याने सदरचा दावा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे सादर केलेला आहे. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तींप्रमाणे सदरचा दावा ना-मंजूर करण्यांत आला.
7. दस्तावेज क्र.17 वर दाखल केलेल्या दस्तावेजावरुन गैरअर्जदारांकडे तक्रारकर्त्याने दावा उशिराने एक वर्षानंतर दाखल केल्यामुळे ना-मंजूर केल्याचे दिसुन येते. गैरअर्जदारक्र.1 यांचे शाखा व्यवस्थापक यांना दिलेल्या शपथेवरील साक्षीमधे तसेच गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे शपथेवरील जबाबामधे गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी ही बाब मान्य केलेली आहे. तसेच दस्तावेज क्र.15 वरील शपथपत्रातधे असे नमुद केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेशी दाव्यासंबंधी बराच पत्रव्यवहार केलेला आहे आणि याबाबत संबंधीत तक्रारकर्त्याने कुठलाही पुरावा सादर केलेला नाही आणि जे दस्तावेज दाखल केलेले आहेत ते देखिल एक वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर दिलेले दिसुन येते. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार तो गृह व्यवसायातील एका नामांकीत कंपनी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, असे असतांना तक्रारकर्त्याने सदर पॉलिसी अंतर्गत केलेला विमा दावा हा जवळपास डिस्चार्ज मिळाल्यानंतर इतक्या उशिरा का दाखल केला. या संबंधीचे कोणतेही स्पष्टीकरण किंवा पुरावा या मंचासमक्ष सादर केलेला नाही. म्हणून गैरअर्जदारांनी पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार सदरचा दावा तक्रारकर्त्याने विहीत मुदतीत सादर न केल्यामुळे नामंजूर केला. यात गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता दिसुन येत नाही, या निष्कर्षाप्रत हे मंच पोहचते.
वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता दिसुन येत नसल्यामुळे सदरची तक्रार खारिज करण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.