निकाल
दिनांक- 28.01.2015
(द्वारा- श्री.रविंद्र राठोडकर, सदस्य)
तक्रारदार विद्या पिंपळे व इतर यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सेवा देण्यास नकार देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार हया मौजे जांब ता.शिरुर कासार जि.बीड येथे राहतात. तक्रारदार क्र.1 ही मयत बळीराम संतराम पिंपळे यांची पत्नी असून तक्रारदार क्र.2 व 3 ही त्यांची मुले आहेत. तसेच तक्रारदार क्र.1 ही तक्रारदार क्र.2 व 3 यांची पालन कर्ती आई आहे. तक्रारदार क्र.1 ही व्यवसायाने शेतकरी आहे. तक्रारदार यांचे पती मयत बळीराम संतराम पिंपळे हे तक्रारदार यांचेसोबत राहत होते. ते व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार क्र.1 यांचे पतीचे नांवे मौजे जांब येथे शेत दि.30.9.2013 रोजी जमिन गट क्र.354 मधील 0.20 आर खरेदी केलेली आहे. तक्रारदार क्र.1 यांचे पती व तक्रारदार क्र.2 व 3 यांचे वडील दि.06.10.2013 रोजी वाहन अपघाताने मयत झाले. तक्रारदारास फेरफार क्र.903 दि.22.10.2013 रोजी मिळाला आहे. तक्रारदार क्र.1 यांचे पती अपघातात मयत झाल्यामुळे तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह नुकसान भरपाईचा प्रस्ताव सामनेवाला यांचेकडे दाखल केला होता. परंतु सामनेवाले यांनी खरेदीखताची तारीख ग्राहय न धरता फेरफारची तारीख ग्राहय धरुन प्रकरण फेटाळलेले आहे. जे ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अंतर्गत अपिलाचे कारण आहे. महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी योजने अंतर्गत सर्व शेतक-याचा विमा उतरविलेला आहे. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने सामनेवाले क्र.1 यांचेकडे विमा हप्ता भरला आहे. तक्रारदार यांचे पतीचे निधन अपघातात झाल्यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम देण्यास नकार देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रु.1,00,000/- देण्याचा आदेश सामनेवाले यांना दयावा तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळावा म्हणून सदरील तक्रारीत मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 यांना या मंचाची नोटीस मिळूनही ते या मंचासमोर हजर झाले नाही म्हणून या मंचाने त्यांचे विरुध्द दि.20.01.2015 रोजी निशाणी क्र.1 वर सामनेवाला क्र.1 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश केला. त्यानंतर सामनेवाला क्र.1 या मंचासमोर हजर झाले. परंतू त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले नाही.
सामनेवाले क्र.2 तालुका कृषी अधिकारी हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी दि.17.12.2014 रोजी निशाणी क्र.7 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी असे कथन केले की, मयत बळीराम यांचा विमा प्रस्ताव दि.13.11.2013 रोजी सादर झाला. सदरील प्रस्ताव पूढील कार्यवाहीस्तव या कार्यालयाचे पत्र क्र.2634 नुसार दि.13.11.2013 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचेकडे मुळ प्रतिसह सादर केला आहे. एवढेच त्यांचे काम असल्यामुळे सदर प्रकरणात त्यांनी कोणतीही दिरंगाई कलेली नाही.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत खरेदी खताची नक्कल, फेरफारची नक्कल, गट क्र.354 ची नक्कल, प्रकरण फेटाळण्यात आल्याची नक्कल, 7/12, 8-अ ची नक्कल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. सामनेवाले क्र.2 यांनी शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.जी.एम.केकान व सामनेवाला क्र.1 यांचे वकील श्री.वाघमारे यांचा यूक्तीवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले क्र.1 यांनी शेतकरी जनता अपघात विमा
योजने अंतर्गत तक्रारदार यांचा दावा नाकारुन सेवेत त्रूटी
ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत करतात काय ? होय.
2. तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत
लाभ मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.केकान यांनी असा युक्तीवाद केला आहे की, तक्रारदार क्र.1 चे पती व तक्रारदार क्र.2 व 3 चे वडील मयत बळीराम हे वाहन अपघातात मयत झाले. त्यांनी दि.30.09.2013 रोजी जमिन गट क्र.354 मधील 0.20 आर जमिन खरेदी केली. म्हणजे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या खरेदी खताचे अवलोकन केले असता त्यांनी शेत दि.30.9.2013 रोजी खरेदी केल्याचे दिसते. तक्रारदार क्र.1 यांचे पती व तक्रारदार क्र.2 व 3 यांचे वडील यांचा वाहन अपघातात मृत्यू हा दि.06.10.2013 रोजी झालेला आहे. पॉलिसीचा कालावधी दि.23.9.2013 ते 23.10.2013 रोजीचा आहे. म्हणजेच मयताचा मृत्यू व खरेदी खत हे पॉलिसी कालावधीतील आहे. तक्रारदार यांनी पतीच्या मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम मागून सुध्दा त्यांना विमा दावा रक्कम दिली नाही, याउलट विमा दावा नामंजूर केला. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला व मंचात तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदारानी वरील प्रमाणे केलेली मागणी मिळावी असा यूक्तीवाद केला आहे.
सामनेवाले क्र.1 यांचे विधिज्ञ यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार क्र.1 यांचे पती व तक्रारदार क्र.2 व 3 यांचे वडील दि.06.10.2013 रोजी वाहन अपघातात मयत झाले. परंतू त्यांच्या नावे त्याने दि.30.09.2013 रोजी खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार हा दि.22.10.2013 रोजी मंजूर झाला. म्हणून ते पॉलीसीच्या कालावधीमध्ये नोंदणीकृत शेतकरी नाही. म्हणून त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मागता येत नाही म्हणून सदरील प्रकरण नामंजूर करावे.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यानुसार मयत बळीराम यांचा विमा प्रस्ताव दि.13.11.2013 रोजी कार्यालयात सादर झाला. सदरील प्रस्ताव पूढील कार्यवाहीस्तव या कार्यालयाचे पत्र क्र.2634 दि.13.11.2013 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचेकडे मुळ प्रतिसह सादर केला आहे. म्हणून त्यांचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवली नाही. या कारणास्तव त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
वर नमूद केलेला युक्तीवाद, शपथपत्र व कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले. सर्व शेतक-याची शासनाने सामनेवाले क्र.1 यांचे कडे शेतकरी अपघात विमा पॉलिसी काढलेली आहे. जर विमा कालावधीमध्ये शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास तर त्यांचे वारसाना नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,000/- मिळावी असे निर्देशित केले आहे. सदरील प्रकरणात तक्रारदाराचे मयत पती हे शेतकरी होते. त्यांनी दि.30.09.2013 रोजी मौजे जांब ता.शिरुर कासार जि.बीड येथील जमिन गट क्र.354 मधील 0.20 आर जमिन खरेदी केली आहे. म्हणजे तक्रारदार क्र.1 चे पती हे घटनेच्या वेळी व्यवसायाने शेतकरी होते ही बाब सिध्द होते. कारण त्यांचा दि.06.10.2013 रोजी वाहन अपघातात मृत्यू झाला आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा विमा दावा फेटाळल्याचे दि.25.2.2014 रोजीचे पत्र दाखल केले आहे. त्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांनी शेतकरी विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह प्राप्त झाला. परंतू तक्रारदार क्र.1 यांचे पती यांनी सदरील जमिनीचा फेरफार हा पॉलिसी कालावधीत केलेला नाही. या मुददयावर सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला आहे. पण तक्रारदाराने जमिन दि.30.09.2013 रोजी खरेदी केली आहे त्यामुळे पॉलिसीच्या अटीनुसार तक्रारदार क्र.1 चे पती व तक्रारदार क्र.2 व 3 चे वडील शेतकरी होते. तसेच त्यांचा पॉलिसी कालावधीत वाहन अपघातात मृत्यू झाला आहे ही बाब सुध्दा सिध्द झाली आहे. फक्त सदरील शेतीचा फेरफार झाला नाही या कारणास्तव सामनेवाले क्र.1 यांना तक्रारदाराचा विमा दावा फेटाळता येणार नाही. कारण ज्या दिवशी त्यांने शेतीचे खरेदी खत केले त्याच दिवशी तो शेतकरी झाला आहे. तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर एकतर्फा आदेश झाल्यानंतर सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले परंतू पुरावा दिला नाही. जर तक्रारदार क्र.1 चे पती शेतकरी नाहीत हे त्यांना मान्य नव्हते तर त्यांनी मा. मंचासमोंर ती बाब पुराव्यानिशी सिध्द करणे आवश्यक होते. तसेच विमा योजनेचे नियम व अटी याबाबत पुरावा मंचासमोर सादर करणे आावश्यक होते. सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले पण त्यांनी कोणतीही बाब सबळ पुराव्यानिशी सिध्द केली नाही. सबब, या मंचाचे मत की, तक्रारदार क्र.1 चे पती व तक्रारदार क्र.2 व 3 चे वडील हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली आहे. म्हणून तक्रारदार क्र.1 ते 3 हे विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराचा दावा मंजूर न करुन सेवेत त्रूटी केली आहे. म्हणून तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे त्याबददल रक्कम रु.3,000/- मिळण्यास पात्र आहे व तक्रारीच्या खर्चापोटी रककम रु.2000/- मिळण्यास पात्र आहे.
म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड