श्री. मनोहर चिलबुले, मा.अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 11 ऑगस्ट, 2016)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे थोडक्यात कथन असे की, तक्रारकर्तीची मुलगी कु. चेतना गजानन उके हिने दि.06.06.2013 रोजी वि.प.बँकेकडे बचत खाते क्र. 60134228018 उघडले होते आणि सदर खात्यासाठी नॉमिनी म्हणून तक्रारकर्ती सौ. गीता गजानन उके हिचे नाव नमूद केले होते.
दि.13.06.2015 रोजी कु. चेतना हिने तिचे वरील बचत खात्याशी संलग्न करुन ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा पॉलिसी काढली होती. सदर पॉलिसीद्वारे भारतीय आयुर्विमा महामंडळ मास्टर पॉलिसी क्र. 900/00075 प्रमाणे रु.2,00,000/- चे जिवन विमा संरक्षण देण्यांत आले होते. त्यासठी कु. चेतना हिने तिच्या वि.प.बँकेतील वरील बचत खात्यातून विमा हप्ता रु.330/- परस्पर वळते करण्यासाठी वि.प.बँकेला अधिकार पत्र भरुन दिले होते व त्याची पावती वि.प.ने कु. चेतना हिला दिली होती.
तक्रारकर्तीची मुलगी कु. चेतना दि.30.08.2015 रोजी मरण पावली. तक्रारकर्तीने मुलीचे मृत्युबाबत आवश्यक सर्व दस्तऐवजांसह प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेंतर्गत विम्याची रक्कम रु.2,00,000/- मिळावी म्हणून वि.प.कडे मागणी केली. परंतू वि.प.ने विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तक्रारकर्तीच्या पतीने अधिक चौकशी केली असता वि.प. विमा हप्त्याची रक्कम रु.330/- कु. चेतना हिचे वरील बचत खात्यातून विमा पॉलिसीसाठी वळती केलीच नसल्याचे कळले.
कु. चेतना हिचे बचत खात्यात दि.28.12.2014 रोजी रु.825/- जमा असल्याने दि.13.06.2015 रोजी सदर खात्यातून विमा हप्त्याची रक्कम रु.330/- बचत करण्याचे वि.प.ला अधिकार पत्र देऊनही वि.प.ने ती वळती न करणे व कु. चेतना हिचे नाव जिवन ज्योती पॉलिसीसाठी समाविष्ट न करणे ही वि.प. बँकेने ग्राहकाप्रती अवलंबिलेली सेवेतील न्यूनता आहे. तक्रारकर्तीने अधिवक्ता श्री. ए.पी.परशुरामकर यांचेमार्फत वि.प.ला दि.29.10.2015 रोजी नोटीस पाठवून विमा रकमेची मागणी केली. मात्र सदर नोटीस मिळूनही वि.प.ने पूर्तता केली नाही, म्हणून तक्रारकर्तीने खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- वि.प.ने तक्रारकर्तीस तिची मुलगी कु. चेतना हिच्या मृत्युबाबत ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा योजनेंतर्गत मिळणा-या विमा लाभाची रक्कम रु.2,00,000/- देण्याचा आदेश व्हावा.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.20,000/- मिावी.
- तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा.
तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पावती विमा संरक्षणाचा दाखला, वि.प.ला दिलेला अर्ज, नोटीस, पोचपावती, मृतकाचा आधार कार्ड व मृत्यु प्रमाणपत्र, कुटुंबाचा दाखला, सरपंच व पोलिस पाटील यांचे प्रमाणपत्र अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प.बँकेने लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्तीची मुलगी कु. चेतना हिने वि.प.मार्फत तिचे तक्रारीत नमूद बचत खात्याशी संलग्न करुन ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा पॉलिसी काढली होती हे नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, मास्टर पॉलिसी क्र. 900/00075 शी संबंधित जिवन ज्योती विमा पॉलिसी काढण्यासाठी कु. चेतना हिने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही. म्हणून सदर पॉलिसी तिच्या बचत खात्याशी संलग्न करण्यांत आली नाही. कु. चेतना हिने तिचे बचत खात्यातून विमा हप्त्याची रक्कम रु.330/- परस्पर वळती करण्यासाठी वि.प.ला अधिकारपत्र लिहून दिले आणि वि.प.ने त्याबाबतची पोच सही शिक्यानीशी दिल्याचे नाकबूल केले आहे. पॉलिसी घेण्यासाठी कु. चेतना हिने पॉलिसी घेतेवेळी संपूर्ण स्वास्थ्य असल्याचे दस्तऐवज किंवा त्याबाबत स्वतःचे शपथपत्र सादर केले नाही. त्यामुळे तिचे बचत खात्यामधून वार्षिक विमा हप्त्याची रक्कम रु.330/- वि.प. बँकेने वळती केली नाही. हप्त्याची कोणतीही रक्कम कु. चेतनाकडून वि.प.ला मिळाली नसल्याने ती पॉलिसी लाभधारक झाली नाही म्हणून सदर पॉलिसी संबंधाने वि.प.ची ग्राहक नाही. अधिवक्ता श्री. परशुरामकर यांचेकडून नोटीस प्राप्त झाली असली तरी कु. चेतना पॉलिसीधारक नसल्याने नोटीसची पूर्तता करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही म्हणून त्याद्वारे वि.प.कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाल्याचे वि.प.ने नाकबूल केले आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार खोटी व बनावट दस्तऐवजांवर आधारित असल्याने खारिज करण्याची विनंती केली आहे.
3. तक्रारकर्तीचे व वि.प.चे कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने न्यूनतापूर्ण व्यवहार केलेला आहे काय ? नाही.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय ? नाही.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारणमिमांसा -
4. मुद्दा क्र.1 बाबत – तक्रारकर्तीचे अधिवक्त्यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले की, तक्रारकर्तीची मुलगी कु. चेतना गजानन उके हिचे वि.प. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेंदुरवाफा शाखेत बचत खाते क्र. 60134228018 होते आणि सदर खात्यात दि.13.06.2015 रोजी रु.825/- (दि.28.12.2014 पासून शिल्लक रक्कम) जमा बाकी होती. सदर खात्याच्या पासबुकाची प्रत दस्तऐवज क्र. 7 वर दाखल आहे. दि.13.06.2015 रोजी कु. चेतना हिने ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा योजनेशी तिचे वरील बचत खाते संलग्न करण्यासाठी आणि सदर योजनेंतर्गत वार्षिक विमा हप्त्यांची रक्कम सदर बचत खात्यातून परस्पर वळती करण्याबाबत अधिकार पत्र वि.प.ला लिहून दिले. त्याची पावती (अनुज्ञेय) आणि विमा संरक्षण दाखला दस्तऐवज क्र. 8 वर दाखल आहे. सदर अधिकार पत्रांन्वये वरील बचत खात्यातून विमा हप्त्यांची रक्कम परस्पर वळती करुन विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी वि.प. बँकेची होती.
तक्रारकर्तीची मुलगी कु. चेतना ही दि.30.08.2015 रोजी मरण पावली. तिच्या मृत्युचा दाखला दस्तऐवज क्र. 1 वर आहे. कु. चेतना हिचे मृत्युमुळे ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा योजनेप्रमाणे विमा लाभ रु.2,00,000/- मिळावा म्हणून नॉमिनी असलेल्या तक्रारकर्तीने वि.प.बँकेस दि.29.09.2015 रोजी अर्ज दिला. त्याची प्रत दस्तऐवज क्र. 9 वर आहे. परंतू वि.प. बँकेने विम्याची रक्कम दिली नाही. अधिक चौकशी केली असता अधिकार पत्राप्रमाणे वि.प.बँकेने तक्रारकर्तीच्या खात्यातून वार्षिक विमा हप्त्याची रक्कम रु.330/- परस्पर वळती केली नाही असे दिसून आले. वि.प.च्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्तीला मुलीच्या मृत्युमुळे मिळणा-या विमा लाभापासून वंचित राहावे लागले म्हणून तक्रारकर्तीने दि.29.10.2015 रोजी अधिवक्ता श्री. परशूरामकर यांचेमार्फत दसतऐवज क्र. 10 प्रमाणे नोटीस पाठवून विमा लाभ देण्याची विनंती केली. नोटीस वि.प.ला मिळाल्याची पोच दसतऐवज क्र. 11 वर आहे. नोटीस मिळूनही वि.प.ने तक्रारकर्तीस विम्याची रक्कम दिली नाही. सदरची बाब सेवेतील न्यूनता आणिअनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
याऊलट, वि.प.च्या अधिवक्त्यांनी युक्तीवादात सांगितले की, ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा योजनेप्रमाणे सदर योजनेत सामिल होण्यासाठी बचत खात्यातून परस्पर विमा हप्ता वळता करण्याचे संमतीपत्र देण्याची अंतिम तारीख 31 मे 2015 पर्यंत होती. तक्रारकर्तीची मुलगी कु. चेतना हिने असे संमतीपत्र 13 जून 2015 रोजी म्हणजे योजनेत नमूद केलेल्या तारखेनंतर दिले असल्याने 31 मे 2015 नंतर 31 ऑगस्ट 2015 पर्यंतच्या काळात असे संमतीपत्र देणा-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी हप्त्याच्या पूर्ण रकमेसोबत चांगल्या आरोग्याबद्दल स्वतःचे शपथपत्र (Those joining subsequently may be able to do so with payment of full amount premium for prospective cover with submission of a self certificate of good health in the prescribed proforma.) देणे अनिवार्य होते. तक्रारकर्तीची मुलगी चेतना हिने 31 मे 2015 नंतर तिच्या खात्यातून विमा हप्त्याची वार्षिक रक्कम वळती करण्याचे अधिकारपत्र दिले. परंतू सोबत अनिवार्य असलेले चांगल्या आरोग्याबद्दलचे शपथपत्र दिले नाही म्हणून तिच्या योजनेत सहभागी होण्याच्या अर्जावर प्रक्रिया पूर्ण करता आली नाही आणि तिच्या खात्यातून वार्षिक विमा हप्त्याची राशी रु.330/- वळती केली नाही. वरीलप्रमाणे आवश्यक शपथपत्राअभावी कु. चेतना ही ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा योजनेची सभासदच झाली नसल्याने तिच्या मृत्युमुळे कोणताही विमा लाभ मिळण्यास तक्रारकर्ती पात्र नाही म्हणून तक्रारकर्तीसविमा लाभ न देण्याची वि.प.ची कृती सेवेतील न्यूनता किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरत नाही.
उभय पक्षांच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद आणि दाखल दसतऐवजांचा विचार करता हे स्पष्ट आहे की, ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बचत खात्यातून एकमुस्त विमा हप्ता परस्पर वळता करण्यासाठी संमती देण्याची अंतिम तारीख 31 मे 2015 होती. कु. चेतना हिने यानंतर योजनेत सहभागी होण्यासाठी संमती दिले असल्याने संमती पत्रासोबत स्वतःच्या चांगल्या आरोग्याबाबतचे शपथपत्र देणे अनिवार्य होते. परंतू ते दाखल न केल्याने तिच्या अर्जावर पुढील प्रक्रिया झाली नाही आणि वि.प.ने तिच्या बचत खात्यातून विमा हप्त्यांची रक्कम वळती केली नाही. त्यामुळे कु. चेतना हिचा ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा योजनेत समावेश झाला नाही. कु. चेतना हिचा विमा योजनेत समावेश न होण्यासाठी तिने चांगल्या आरोग्याबाबत शपथपत्र दाखल न करणे हेच कारण असल्याने तिच्या मृत्युनंतर तक्रारकर्तीने विमा लाभ न मिळण्यासठी वि.प.बँकेला जबाबदार ठरविता येणार नाही. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता कु. चेतना हिचा ‘प्रधानमंत्री जिवन ज्योती’ विमा योजनेत समावेश न झाल्याने तक्रारकर्तीस विमा लाभ मिळू शकत नाही. वि.प. बँकेने विमा पॉलिसीची कोणतीही रक्कम स्विकारली नसल्याने तक्रारकर्तीस विमा लाभ देण्यास जबाबदार नाही. त्यामुळे विमा योजनेत सहभागी न झालेल्या कु. चेतनाच्या मृत्युमुळे तक्रारकर्तीस विमा लाभ नाकारुन वि.प.बँकेने सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार केलेला नाही. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.प.बँकेने सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नसल्याने तक्रारकर्ती मागणी केलेली कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही, मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
3) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत कराव्यात.
4) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.