निकालपत्र
निकाल दिनांक – १८/०१/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार हे अहमदनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे व्यवसाय करता. तक्रारदर त्यांचे टोयाटो इटॉस लिव्हॉ गाडी नंबर एमएच-१६, ए.टी.९४७१ या वाहनाचा विमा उतरविला होता. त्याचा विमा पॉलिसी क्रमांक ओजी-१७-२०११-१८०१-००००००४१ असा आहे. विम्याचा कालावधी चालु असतांना दिनांक ११-०६-२०१६ रोजी नगर - कल्याण रोडवर माळशेज घटामध्ये रात्री १० वाजण्याचे सुमारास अपघात झाला. याबाबत तक्रारदार यांनी दिनांक १४-०६-२०१६ रोजी सामनेवाले यांना कळवीले. त्यानुसार त्यांच्या सर्व्हेअरने येऊन पाहणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी संपुर्ण कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला व गाडीचे दुरूस्तीसाठी आलेले खर्चाची रक्कम रूपये २,३५,७५५/- मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी दिनांक २६-०७-२०१६ रोजी गाडीचे चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता, त्यामुळे सदरचा विमा दावा नाकारला. त्यामुळे तक्रारदार यांनी तक्रार दाखल करून परिच्छेद क्रमांक ६ प्रमाणे मागणी केली.
२. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत निशाणी १५ नुसार प्रकरणात दाखल केली. त्यामध्ये त्यांनी वाहनाचा विमा उतरविला होता व विमा कालावधी मान्य केला आहे. सामनेवाले यांनी पुढे कथन केले की, तक्रारदाराचे वाहनाचा अपघात दिनांक ११-०६-२०१७ रोजी झाला व दिनांक १४-०६-२०१६ रोजी सामनेवाले कंपनीला कळविले. सामनेवाले कंपनीला उशीरा कळविण्यात आले व पुढे असेही कथन केले आहे की, ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार सदर विमा दावा योग्य कारणाने नाकारला आहे, त्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही त्रुटी दिली नाही. म्हणुन तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.ए.ए. शेख केलेला युक्तिवाद सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, कागदपत्र, शपथपत्र तसेच सामनेवाले यांचे वकील श्री.अशोक के. बंग यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे त्यांचे वाहन टोयाटो इटॉस लिव्हॉ गाडी नंबर एमएच-१६, ए.टी.९४७१ या वाहनाचा विमा उतरविला होता. त्याचा विमा पॉलिसी क्रमांक ओजी-१७-२०११-१८०१-००००००४१ असा आहे. ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२ व ३) : तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे त्यांचे वाहन टोयाटो इटॉस लिव्हॉ गाडी नंबर एमएच-१६, ए.टी.९४७१ या वाहनाचा विमा उतरविला होता. त्याचा विमा पॉलिसी क्रमांक ओजी-१७-२०११-१८०१-००००००४१ असा आहे. विम्याचा कालावधी चालु असतांना दिनांक ११-०६-२०१६ रोजी नगर - कल्याण रोडवर माळशेज घटामध्ये रात्री १० वाजण्याचे सुमारास अपघात झाला. याबाबत तक्रारदार यांनी दिनांक १४-०६-२०१६ रोजी सामनेवाले यांना कळवीले. त्यानुसार त्यांच्या सर्व्हेअरने येऊन पाहणी केली, असे तक्रारदाराने तक्रारीत कथन केले. सदरहु गाडीची तक्रारदाराने गडाख मोटर्स यांच्याकडे दुरूस्ती करून घेतली. सामनेवालेकडे संपुर्ण कागदपत्रांसह तक्रारदार यांनी विमा दावा सादर केला. नंतर सामनेवालेने सदरचा विमा दावा नाकारला. सामनेवालेने प्रकरणात असा बचाव घेतला की, ज्यावेळी सदरची वाहनाचे अपघात झाला त्यावेळी वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. त्यामुळे सदरचा विमा दावा पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे नाकारला. सदर विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे गरजेचे आहे. परंतु वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. मात्र तक्रारदार यांनी चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केलेला आहे. सदर वाहन चालविण्याचा परवाना हा दिनांक २८-०५-१९९८ रोजी दिलेला असुन त्याची वैधता नॉन ट्रान्सपोर्ट करीता दिनांक २७-०५-२०१८ अशी होती. यावरून ही बाब स्पष्ट होते की, वाहन चालकाने वाहन चालविण्याचा परवाना घेतला होता व अपघाताचेवळी त्याच्याजवळ वैध वाहन चालविण्याचा परवाना होता. त्यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव संयुक्तिक नाही, अशा प्रकारे सामनेवाले यांनी चुकीचे कारणाने तक्रारदाराचा विमा दावा नाकारून सेवेत त्रुटी दिली, ही बाब स्पष्ट होते.
६. तक्रारदाराने सदरची अघाताची बाब सामनेवाले यांनी दिनांक १४-०६-२०१६ रोजी कळविले तसेच सामनेवाले यांनी लेखी कैफीयतीत असा बचाव घेतला की, तक्रारदाराचा वाहन अपघात हा दिनांक ११-०६-२०१६ रोजी झाला व त्यांनी सामनेवाले विमा कंपनीला दिनांक १४-०६-२०१६ रोजी कळविले, अशाप्रकारे उशीरा कळविले. परंतु सदरहु वाहनाचा अपघात हा रात्री १० वाजता झाला व त्यानंतर लगेच दोन दिवसात तक्रारदाराने सामनेवाले यांना कळविले आहे व त्यानुसार त्यांचा सर्व्हेअर योन येऊन पाहणी केली. त्यामुळे संबंधीतांना उशीरा कळविले, ही बाब संयुक्तिक वाटत नाही. तसेच तक्रारदार यांनी सदरचे वाहनाची दुरूस्तीसाठी आलेला खर्चाचा तपशील प्रकरणात दाखल केलेला आहे. सदरचे बिलेही निशाणी क्रमांक ६/७, ६/८ नुसार दाखल केलेली आहे. निशाणी ६/७ वर दाखल असलेल्या बिलाचे क्रमांक १५२, १५३, १५६, १५७ असे आहे. सदर संपुर्ण बिले ही गडाख मोटर्स या नावाने असुन या सर्व बिलांची एकत्रित रक्कम रूपये १,४९,३५५/- गडाख मोटर्सने दिलेल्या पावतीवर नमुद केलेली आहे, त्यावर रक्कम स्विकारल्याचा शेरा आहे. यावरून ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदाराला सदरहू वाहन दुरूस्त करण्यासाठी रक्कम रूपये १,४९,३५५/- इतका खर्च आलेला आहे. तसेच तक्रारदाराने दिनांक २०-०५-२०१७ रोजीचे ऑटो केअर सेंटरचे बिल निशाणी ६/०८ वर सादर केले आहे. सदरहु बिल हे रक्कम रूपये ८६,०००/- चे आहे. अशाप्रकारे एकुण रक्कम रूपये २,३५,३५५/- इतका खर्च सदरहु वाहन दुरूस्तीसाठी आला आहे, ही बाब दाखल कागदपत्रांवरून स्पष्ट झाली आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीत सदरचे बिलांविषयी आक्षेप घेतलेला नाही. यावरून त्यांना ही बिले मान्य आहे, असे ग्राह्य धरण्यात येते. तक्रारदार यांच्या वाहनाचा अपघात झाला व विमा पॉलिसीचा कालावधी असतांना सदरचा अपघात झाला आहे, हे त्या दाखल कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे. तसेच सामनेवाले यांनी घेतलेला बचाव की अपघाताचेवेळी वाहनचालकाकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, याबाबत तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रात अपघातावेळी वाहन चालकाकडे वैध वाहन चालवायचा वाहन परवाना होता, ही बाब स्पष्ट झाली आहे. सबब तक्रारदार यांना वाहन दुरूस्तीसाठी आलेल्या खर्चाची रक्कम रूपये २,३५,३५५/- मिळणेस पात्र ठरतात, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुददा क्र.२ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्र.१, २ व ३ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईची रक्कम रूपये २,३५,३५५/- (अक्षरी दोन पस्तीस हजार तीनशे पंचावन्न मात्र) व त्यावर दिनांक २६-०७-२०१६ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार मात्र) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |