निकाल
दिनांक- 01.01.2015
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार चांगुजी बाबुराव ससाणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी विमा दावा नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार हे अॅपे रिक्षा क्र.एम.एच.-23/एच-7854 चे मालक आहेत. तक्रारदार यांनी सदरील अॅपे रिक्षा स्वतःचा चरितार्थ चालविण्यासाठी विकत घेतला आहे. सदरील अॅपे रिक्षाचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे काढला आहे. विम्याचा कालावधी दि.8.1.2013 ते 07.01.2014 असा आहे.
दि.15.7.2013 रोजी तक्रारदार हे रिक्षा चालवत त्यांचे घरी रांजणी येथे जात होते. रिक्षामध्ये प्रवासी नव्हते. रिक्षा रांजणीचे शिवारात गेवराई ते बीड रस्त्यावर दिव्या हॉटेलचे जवळ आली. समोरुन ट्रक नंबर एच.आर.-47/ए-3732 भरधाव वेगाने आले व रिक्षास धडक दिली. सदरील अपघातामध्ये रिक्षाचा समोरीत भाग तसेच चेसीज व इंजिन डॅमेज होऊन नुकसान झाले. तक्रारदार यांनी अपघाता बाबत सामनेवाले यांना कळविले. सामनेवाले यांनी अपघातग्रस्त रिक्षा दूरुस्त करण्यसाठी गॅरेजला लावण्यास सांगितले. सर्व्हेअर यांनी पाहणी केली. तक्रारदार यांनी अपघातग्रस्त रिक्षा ग्लोबल मोटर्स औरंगाबाद येथे दूरुस्तीसाठी नेली. रिक्षा दूरुस्तीसाठी तक्रारदार यांना रु.1,50,000/- खर्च करावा लागला. तक्रारदार यांनी दूरुस्ती बिले व सर्व कागदपत्र सामनेवाले यांना सूपूर्द केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर केला नाही. तक्रारदार यांचा रिक्षा बंद राहिला. त्यामुळे तक्रारदार यांचे रु.50,000/- चे नुकसान झाले. दि.24.2.2014 रोजी सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्य बाबत पत्र दिले. तक्रारदार यांचेकडे अपघाताचे दिवशी वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता या कारणास्तव तक्रारदार यांचा दावा फेटाळण्यात आला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कळविले की, त्यांचेकडे वैध परवाना आहे परंतु सामनेवाले यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदार यांचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना आहे. अपघाताचे वेळेस ते प्रवासी वाहतूक करीत नव्हते. विमा कंपनीचे शर्ती व अटीचा भंग केला नाही. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, विमा कंपनीच्या शर्ती व अटीचा भंग होत असला तरी विमा कंपनी तक्रारदार यांचा संपूर्ण क्लेम नाकारु शकत नाही. सामनेवाले यांनी नॉन स्टॅडर्ड बेसीसवर तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करणे आवश्यक होते. सदरील क्लेम नाकारुन सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी रिक्षा दूरुस्तीचा खर्च, तक्रारीचा खर्च, व इतर नुकसान भरपाई मागितली आहे.
सामनेवाले विमा कंपनी मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.9 अन्वये लेखी म्हणणे सादर कले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे रिक्षाची विमा पॉलिसी काढली होती ही बाब मान्य केली आहे. सामनेवाले यांनी सदरील रिक्षाची पाहणी करण्यासाठी सर्व्हेअरची नियूक्ती केली होती. तसेच सर्व्हेअरने त्या बाबत रिपोर्ट दिला होता. तक्रारदार यांचा क्लेम योग्य व रास्त कारणासाठी नाकारला आहे. तक्रारदार हे अपघाताचे वेळेस रिक्षा चालवित होते. त्यांचेकडे रिक्षाा चालविण्याचा वैध परवाना नव्हता. सदरील बाब ही विमा कंपनीच्या शर्ती व अटीचा भंग करणारी आहे. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की, सर्व्हेअर आणि लॉस असेंसर यांनी तक्रारदार यांचा अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली तसेच तक्रारदार यांनी दिलेल्या बिलाची पाहणी केली व नुकसान रु.54,000/- झाले आहे असा अहवाल दिला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे ड्रायव्हींग लायसन्स बाबत रिपोर्ट मागवला. तक्रारदार यांचेकडे रिक्षा चालविण्याचे लायसन्स दि27.07.2009 ते 14.07.2012 पर्यतचे होते. तदनंतर ते लायसन्स दि.09.07.2013 रेाजी रिन्यू करण्यात आले. अपघाताचे दिवशी तक्रारदार यांचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
तक्रारदार यांनी नि.3 सोबत अपघाताची फिर्याद, पंचनामा, विमा कंपनीची नक्कल, वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र, लायसन्स, व वाहन दूरुस्त केल्या बाबतची झेरॉक्स पावत्या, तक्रारदार यांचा विमा दावा नाकारल्याचे पत्र, हजर केले आहे. तक्रारदार यांनी स्वतःसचे शपथपत्र पुराव्याकामी हजर केले आहे. सामनेवाले यांनी पूराव्याकामी शपथपत्र, आरटीओ कार्यालयातील तक्रारदार यांचे लायसन्स बाबत माहीती अहवाल हजर केला आहे. तक्रारदार यांचे वकील श्री. चव्हाण यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री. साळवे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन सेवेत
त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? नाही.
- तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.चव्हाण यांनी असा यूक्तीवाद केला की, अपघाताचे वेळेस अॅटो रिक्षामध्ये एकही प्रवासी प्रवास करीत नव्हता. तक्रारदार हे सदरील वाहन चालवित होते. त्यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना होता. तक्रारदार यांची कोणतीही चूक नसताना एक ट्रक समोरुन भरधाव वेगाने आला व रिक्षास धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचे नुकसान झाले. सदरील अपघाता बाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ताबडतोब कळविले. तक्रारदार यांनी रिक्षा औरंगाबाद येथून दूरुस्त करुन घेतला. त्याकामी तक्रारदार यांना रु.1,50,000/- खर्च आला. सामनेवाले यांनी सर्व्हेअरची नियूक्ती केली व त्यांनी रिपोर्ट दिला. तक्रारदार यांचा क्लेम सामनेवाला यांनी कोणत्याही संयूक्तीक कारणाशिवाय नाकारला आहे व सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांचे वकिलांनी पूढे असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी विमा पॉलिसीचे शर्ती व अटीचा भंग केला आहे असे जरी गृहीत धरले तरी तक्रारदार यांना पूर्ण क्लेम नाकारणे योग्य व संयूक्तीक नाही. सामनेवाले यांनी नॉन स्टॅडर्ड बेसीस वर तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करणे बंधनकारक आहे. सबब, तक्रारदार यांनी तक्रारीत केलेली मागणी प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी.
सामनेवाले यांचे वकील श्री. साळवे यांनी असा यूक्तीवाद केला की, सदरील वाहन हे प्रवासी रिक्षा आहे. सदरील प्रवासी रिक्षा चालविण्यासाठी तक्रारदार यांचेकडे वैध परवाना असणे आवश्यक आहे. तक्रारदार हे अपघाताचे दिवशी सदरील वाहन वैध परवानाशिवाय चालवित होते. अपघात झाल्यानंतर तक्रारदार यांनी परवान्याचे नूतनीकरण केले आहे. सदर वाहन चालविण्याच्या परवान्याची मूदत दि.14.7.2012 रोजी संपलेली होती. अपघात हा दि.15.6.2013 रोजी झाला. सबब, अपघाताचे दिवशी तक्रारदार यांचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तसेच तक्रारदार हे नॉन स्टॅडर्ड बेसीसवर नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीचा भंग झाला असल्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व संयूक्तीक कारणासाठी नाकारला आहे. सामनेवाले यांचे वकील श्री. साळवे यांनी त्यांचे यूक्तीवादाचे समर्थनार्थ खालील नमूद केलेले केस लॉचा आधार घेतलो आहे.
1.NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION
NEW DELHI
REVISION PETITION NO.3737 OF 2008
New India Assurance Co.Ltd. Vs. Birender Mishra
Order dated 29-10-2014
It is observed that, insurance company can be held liable only if, driver hold valid driving license to drive the license at the time of accident. A person who does not hold license to drive transport vehicle cannot be drive transport vehicle and if he drives transport vehicle Insurance Company cannot be fastened with any liability.
2. 2014 STPL (CL) 366 (NC)
It is held that, at the time of accident, respondent was not having a valid and effective driving license. It is manifestly clear that, both the Forums below have committed grave error in allowing complaint of respondent and consequently complaint stand dismissed.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताचे अवलोकन केले. तसेच सामनेवाले यांनी शपथपत्र व सोबत दाखल केलेले दस्ताचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे रिक्षाचा अपघात दि.15.6.2013 रोजी झाला या बाबत वाद नाही. तसेच तक्रारदार यांनी अपघातग्रस्त रिक्षाची दूरुस्ती करुन घेतली व त्याकामी त्यांला खर्च करावा लागला याबाबत वाद नाही. तक्रारदार यांचे रिक्षाचा सामनेवाला विमा कंपनीकडे विमा उतरविलेला होता या बाबतही वाद नाही.
तक्रारदार यांचा दावा विमा कंपनीने नाकारलार आहे तो दावा नाकारल्याचे कारण की, तक्रारदार यांचेकडे दि.15.6.2013 रोजी रिक्षा चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तक्रारदार यांचे कथन की, त्यांचेकडे परवाना होता. तक्रारदार यांनी त्यांचा परवाना हजर केला आहे. त्यांचे अवलोकन केले असता थ्री सिटर ट्रान्सपोर्ट व्हेईकलचा परवाना दि.21.6.2006 रोजी काढल्याचे निदर्शनास येते. तसेच दि.1.7.2016 पर्यत परवाना वैध असल्या बाबत दिसते. सदरील परवान्याचे दि.9.7.2013 रोजी नुतनीकरण केल्याचे निदर्शनास येते. सामनेवाले यांनी आरटीओ कार्यालयातील तक्रारदार यांचे वाहन परवान्याविषयी माहीती घेतली आहे. त्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी दि.9.7.2013 रोजी लायसन्स रिन्यू केल्या बाबत निदर्शनास येते. त्यांची मुदत दि.1.7.2016 अशी नमूद केली आहे. वर नमूद केलेला तारखेचा विचार केला असता दि.15.6.2013 रोजी अपघात झाला त्या दिवशी तक्रारदार यांचेकडे रिक्षा चालविण्याचा वैध परवाना नव्हता ही बाब स्पष्ट होते. केवळ रिक्षामध्ये प्रवासी नव्हते या कारणास्तव वाहन वापरण्याचे स्वरुप बदलत नाही. सदरील वाहन हे प्रवासी वाहतूकीसाठी वापराकामी रजिस्ट्रर झालेले आहे. सबब, तक्रारदार यांचेकडे सदरील वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचेकडे वैध परवाना नव्हता. तयामुळे विमा कंपनीच्या पॉलिसीच्या शर्ती व अटीचा भंग झाला. त्यामुळे सामनेवाले यांनी योग्य व संयूक्तीक कारणासाठी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला आहे.
तक्रारदार यांनी असेही कथन केले आहे की, जरी विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीचा भंग जरी झाला तरी नॉन स्ट्रॅडर्ड बेसीसवर तक्रारदार यांचा क्लेम मंजूर होणे आवश्यक आहे. तक्रारदार यांचे वकिलांनी नमूद केलेला केस लॉ चा आधार घेतला.
2010 ACJ 1250 IN THE SUPREME COURT OF INDIA AT NEW DELHI
Amalendu Sahoo Vs Oriental Insurance co.Ltd.
It is held that, insurance company cannot repudiated the claim in to to, claim has to be settled on non standard basis.
वर नमूद केलेल्या केसच्या बाबतचा विचार केला.सदरील केस मध्ये चालकाकडे वैध परवाना होता किंवा नव्हता या बाबत संदर्भ नाही. सदरील केसची परिस्थिती व वस्तूस्थिती हया मंचासमोर असलेल्या केस पेक्षा भिन्न आहे. त्यामुळे सदर केस लॉ हा तक्रारदाराच्या केसला लागू पडणार नाही. वर नमूद केलेल्या कारणमिंमासेवरुन तक्रारदार यांचेकडे अपघाताचे वेळेस वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य कारणास्तव नाकारला आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
मुददा क्र..1 व 2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2)
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड