निकालपत्र :- (दि.05/05/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचा भाचा मयत गणेश धनाजी तोरस्कर यांची शासनामार्फत सामनेवाला कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत पॉलीसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/48/2009/939 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.01/04/2009 रोजी तक्रारदार यांचा भाचा गणेश धनाजी तोरस्कर हा नेहमीप्रमाणे फरशी पॉलिश करणेचे कामाकरिता गेला असता तेथे अचानक फरशी पॉलिश करणेचे मशीनमध्ये इलेक्ट्रीक शॉक उतरलेने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून तो खाली फरशीवरील पाण्यामध्ये पडला. त्यावेळी मशीनमुळे पाण्यातही उतरलेल्या शॉकचा त्याला जबरदस्त धक्का बसला. त्यामुळे त्याला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेले असता तेथे त्यास मयत घोषित करण्यात आले. तदनंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सामनेवालांकडे न्याययोग्य क्लेमची मागणी केली असता दि.03/04/2010 रोजी सामनेवालाने “ M.S.E.B. चा रिपोर्ट क्लेमसोबत पाठविलेला नाही त्यामुळे क्लेम नाकारत आहे.’’ असे पत्र पाठवले. (ब) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, वास्तविक पॉलिसीच्या नियमाप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे क्लेमसोबत पाठविलेली आहेत. तरीदेखील सामनेवाला यांनी चुकीचे कारणाने तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारलेने तक्रारदारांना फार मोठया मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सामनेवाला यांनी अत्यंत चुकीच्या व खोटया कारणाने तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरी तक्रार मा. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- दि.01/07/2009 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ्य सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र, पोलीस खबरी रिपोर्ट, वर्दी रिपोर्ट, इन्क्वेसट पंचनामा, शवपरिक्षेकरिता पोलीस अहवाल, मेडिकल ऑफिसर उत्तूर यांचा रिपोर्ट, पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार खोटी, व लबाडीची व चुकीची असून सामनेवालांना मान्य व कबूल नाही. तक्रारदाराची तक्रार आहे त्या स्थितीत कायदेशीररित्या चालणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांना जादा काही म्हणावयाचे नाही. कलम 2 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांना काहीही माहिती नाही. सदरील बाब तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द करणेची आहे. तक्रारदाराचा भाचा दि.01/04/2009 रोजी मयत झाला हे बरोबर आहे. तक्रारादाराचा भाचा हा फरशी पॉलीशचे काम कामगार म्हणून करत असताना शॉक लागू मयत झालेबाबतचे कथन आहे. सदर कामी एम.एस.ई.बी. रिपोर्ट आवश्यक आहे. तक्रारदारांनी मागणी करुनही सदर रिपोर्ट दाखल न केलेने सामनेवालांना तक्रारदाराचा क्लेम नाकारणे भाग पडले आहे. सदर तक्रार अर्जातील कलम 3 ते 6 मधील मजकूर साफ खोटा, लबाडीचा व चुकीचा असून तो सामनेवालांना कोणत्याहीप्रकारे मान्य व कबूल नाही. ब) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराची तक्रार ही शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत येत नाही. तक्रारदाराचे तक्रारदाराचा भाचा गणेश धनाजी तोरस्कर हा फरशी पॉलीश करणेचे कामाकरिता कामगार म्हणून श्री बाळासाहेब ज्ञानदेव ठोकरे यांचे घरी नवीन बसवलेली फरशी पॉलीश करत असताना विजेचा शॉक बसून मयत झाला असलेचे दिसून येते. शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकरी त्यांचे शेतात शेतीचे काम करत असताना/ शेती व्यवसाय करताना अपघाताने अगर नैसर्गिक आपत्तीमुळे अपघाती मृतयुने मरण पावलेस त्याचा मृत्यू हा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत समाविष्ट होतो व मयत गणेश धनाजी तोरस्कर हा शेतकरी नसलेने व त्यांचा मृत्यू हा शेती व्यवसाय करताना झालेला नसलेने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर होणेस पात्र आहे. मयत गणेश धनाजी तोरस्कर हा तक्रारदाराचा भाचा होता. सबब सदरील क्लेम दाखल करणेचा अगर घेणेचा तक्रारदारास अधिकार नाही. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दिले वारसाचे यादीमध्ये मयताची आत्या या नात्याचा समाविष्ट होत नाही. सबब सदरील तक्रार दाखल करणेचा तक्रारदारास अधिकार (Locus Standi) नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदाराकडून सामनेवालांना कोर्ट देवविण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत महाराष्ट्र शासनाचा शेतकरी अपघात विमा योजना चा दि.06/09/2008 रोजीचा जी.आर. दाखल केला आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- नाही. 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचा भाचा मयत गणेश धनाजी तोरस्कर या शेतकरी अपघात विमा योजनेअतंर्गत पॉलीसी क्र.181200/48/2009/939न्वये सामनेवालांकडे पॉलीसी विमा उतरविलेला होता. पॉलीसीच्या कालावधीतच पिंपळगांव येथील बाळासाहेब ठोकरे यांचे घरी फरशी पॉलीस करताना विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला याबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो सदर विमाधारकाचा मृत्यू हा शेती काम करत असताना झाला आहे का ? याचा विचार करता शासन निर्णय क्र.शेअवि2008/प्र.क्र.187/11अे दि.6सप्टेंबर-2008 मध्ये प्रस्तावनेत- प्रस्तुत विमा योजना ही शेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात उदा. रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर सर्पदंश, विंचूदंश व वाहन अपघात तसेच अन्य कोणतेही अपघात. याचा विचार करता फरशी पॉलीश करणेचे काम हे शेती व्यवसायाशी संबंधीत नाही. तसेच सदरचे काम तो स्वत:च्या घरी करताना सदर घटना घडली नसून श्री ठोकरे यांचे घरी फरशी पॉलीशचे काम करीत असताना मशीनमध्ये इलेक्ट्रीक शॉक शॉ बसल्याने विजेचा धक्का बसून तो मयत झाला ही घटना नैसर्गिक आपत्ती नाही. जरी ही योजना शेतक-यांसाठी असली तरी अपघात हा शेती व्यवसाय व संबंधीत असतो हे वरील नमुद शासन निर्णयातील प्रपत्र ड (4) मध्ये - विजेचा धक्का अपघात- प्रथम माहिती अहवाल, किंवा पोलीस पाटील अहवाल, स्थळ पचंनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टेम अहवाल, मृत्यू दाखला इत्यादी कागदपत्रे नमुद केली आहेत. त्याप्रमाणे तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. सबब सदरचा अपघात हा विजेचा शॉक बसून झाला असला तरी शेती कामातील इलेक्ट्रीक काम मोटार सुरु करणे अथवा शेतीशी संबंधीत अन्य संबंधीत उपकरणामुळे विजेचा शॉक बसुन झालेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवालांनी दि.03/04/2010 रोजी प्रस्तुतचा क्लेम एम.एस.ई.बी.चा रिपोर्ट तक्रारदाराने न दिलेने नाकारलेला आहे. सदर एम.एस.ई.बी. रिपोर्टची मागणी केली नसलेचे तक्रारदाराचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस प्रतिपादन केले आहे. तसेच तक्रारदाराचे अज्ञानामुळे कागदपत्रांची पूर्तता करु शकलो नसलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच शेती कामकाजाशी संबंधीत नसणा-या अपघातांचा समावेश प्रस्तुत परिपत्रकात केला आहे. सबब प्रस्तुतचा अपघात हा परिपत्रकामध्ये समाविष्ट आहे व त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे असा युक्तीवाद केला आहे. सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार ही मयत प्रस्तुत विमाधारकाची अत्या आहे. सबब सदर नात्याचा समावेश होत नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणेचा तक्रारदारास अधिकार (लोकस स्टॅन्डी) नाही. सबब तक्रारदारास सदर विमा दावा दाखल करता येणार नाही असा आक्षेप घेतलेला आहे. वरील आक्षेपाचा विचार करता, वादाकरिता जरी त्याचा अपघाती मृत्यू गृहीत धरला तरी वरील शासन निर्णय मधील पान क्र.9 वर कलम 7 मध्ये- संबंधीत शेतक-याचे अपघातामध्ये निधन झालेले असल्यास त्यांच्या कुटूंबियास दाव्याची रक्कम पुढील प्राधान्यानुसार अदा करावी. अ) मृत शेतक-यांची पत्नी ब) मृत शेतक-यांची अविवाहीत मुलगी क) मृत शेतक-यांची आई ड) मृत शेतक-यांचे मुलगे इ) मृत शेतक-यांची नातवंडे फ) मृत शेतक-यांची विवाहित मुलगी. याचा विचार करता मयत गणेश हा तक्रारदाराचा भाचा आहे. तक्रारदार ही मयताची आत्या आहे व नमुद मयत विमाधारकाच्या कुटूंबियामध्ये आत्या या नात्याचा समावेश प्रस्तुत परिपत्रकात दिसून येत नाही. कारण विमा दावा प्रथम प्राधान्य क्रमात अन्य वारस अशी नोंद नाही. मयत गणेश यास वरीलप्रमाणे कोणीही कुटूंबिय नसून केवळ तक्रारदार ही त्याची आत्या एकमेव वारस असलेचे तक्रारदाराचे वकीलांनी प्रतिपादन केलेले आहे. तसेच तक्रारदाराने अन्य वारस नसलेचे मान्य केले आहे. वरील विस्तृत विवेचनाचा व नमुद शासन निर्णय परिपत्रकाचा विचार करता सामनेवाला यांनी दावा नाकारुन सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनानुसार सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारुन सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |