(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 22/12/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.17.08.2012 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तिचे पति श्री. रमेश शंकर भोयर यांनी त्यांचे ह्यातीत गैरअर्जदार कंपनीकडे त्यांच्या हीरो होंडा सीडी-100 डिलक्स वाहन क्र.एमएच-31/एआर-2133 या वाहनाचा विमा दि.18.12.2008 ते 17.12.2009 पर्यंतचे कालावधीकरीता उतरविला होता. त्याचा पॉलिसी क्र.166202/31/08/02/00004451 असा असुन त्यामधे मालक चालकाची जोखीम सुरक्षीत करण्यांत आली होती. दि.12.01.2009 रोजी तक्रारकर्तीचे पती मोटारसायकलने कामठी ते कळमना मार्गाने जात असतांना त्यांचा अपघात होऊन त्यामधे ते गंभीर जखमी झाले व बेशध्दावस्थेत त्यांना पोलिसांनी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, येथे प्राथमिक उपचार करुन इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हॉस्पीटल, नागपूर येथे नेण्यांत आले. त्यानंतर दि.24.09.2009 रोजी ऑर्थोनोव्हा क्रिटीकल केअर हॉस्पीटल येथे भरती करण्यांत आले व दि.08.02.2009 रोजी तक्रारकर्तीच्या पतीचे उपचारा दरम्यान निधन झाले. तक्रारकर्तीने सदर बाबीची सुचना गैरअर्जदार कंपनीला देऊन दि.20.10.2009 रोजी दावा दाखल केला, तसेच दाव्यासोबत कंपनीने मागितलेली कागदपत्रे, मृत्यू प्रमाणपत्र, ऑर्थोनोव्हा हॉस्पीटलचे डेथ सर्टिफिकेट, घटनास्थळ पंचनामा इत्यादी कागदपत्रे सादर केली. परंतु गैरअर्जदारांनी वस्तुस्थितीचा विचार न करता दि.04.05.2010 रोजी तक्रारकर्त्याने एफ.आय.आर. व पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल केला नाही या अल्प कारणास्तव विमा दावा फेटाळला असुन गैरअर्जदारांची ही कृति सेवेतील कमतरता असल्याचे तक्रारकर्तीचे म्हणणे आहे. म्हणून सदर तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदारांनी स्वतःच्या स्वार्थाकरीता नाकारल्यामुळे सदर रकमेवर 12% दराने व्याज मिळावे, तसेच तक्रारकर्तीला झालेल्या त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 13 च्या छायांकीत प्रती पान क्र.7 ते 35 वर जोडलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदाराने आपल्या जबाबत हे भाष्य केले की, तक्रारकर्तीचे मयत पती यांनी त्यांचे वाहनाकरीता त्यांचेकडे सदरचा विमा काढल्याचे मान्य केले आहे, परंतु तक्रारकर्तीचे इतर आरोप अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदारांच्या कथनानुसार तक्रारकर्तीने मागणी केल्याप्रमाणे पोस्टमार्टम रिपोर्ट, एफ.आय.आर. पुरविला नाही व दाव्याकरता सदर दस्तावेज आवश्यक आहे. परंतु तक्रारकर्तीने मागणी करुनही सदर दस्तावेज सादर केले नाही म्हणून पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अनुसरुन विमा दावा नाकारल्याचे नमुद केले आहे. तसेच वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी विनंती गैरअर्जदारांनी मंचास केलेली आहे.
5. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.22.12.2011 रोजी आली असता दोन्ही पक्षांचे वकील हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. सदरच्या प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता निर्वीवादपणे तक्रारकर्तीचे मयत पती श्री. रमेश शे. भोयर यांनी हीरोहोंडा सीडी-100 डिलक्स वाहन क्र.एमएच-31/एआर-2133 या वाहनाचा विमा दि.18.12.2008 ते 17.12.2009 पर्यंतचे कालावधीकरीता गैरअर्जदार कंपनीकडे उतरविला होता व त्याचा पॉलिसी क्र.166202/31/08/02/00004451 हा असल्याची बाब दाखल दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्तीच्या पतीचा दि.12.01.2009 रोजी अपघात झाला होता. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दि.12.01.2009 रोजीचे घटनास्थळ पंचनामा, ऑर्थोनोव्हा क्रिटीकल केअर हॉस्पीटलचे मृत्यू प्रमाणपत्र, नागपूर महानगर पालिकेचे मृत्यू प्रमाणपत्र या सर्वांचे अवलोकन केले असता मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीच्या पतीचा डोक्याला मार लागल्यामुळे पॉलिसीच्या वैध कालावधीमध्ये मृत्यू झालेला आहे. गैरअर्जदारांच्या मते तक्रारकर्तीने मागणी करुनही एफ.आय.आर. व पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल केला नाही, म्हणून तिचा विमा दावा नाकारण्यांत आला. वास्तविक पाहता सदर दस्तावेजांनुसार तक्रारकर्तीच्या पतीला अपघातामध्ये गंभीर स्वरुपाची इजा होऊन त्यावर करण्यांत आलेल्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारकर्तीने पोस्टमार्टम रिपोर्ट, एफ.आय.आर. दाखल केला नाही या तात्रीक कारणास्तव तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याची गैरअर्जदारांची कृति निश्चितच अयोग्य असुन सेवेतील त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते.
वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- दि.04.05.2010 पासुन ते रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे.