तक्रारदारातर्फे वकील - श्रीमती. वारूंजीकर
सामनेवाले तर्फे वकील - श्री.अकोटकर
आदेश - मा. शां.रा.सानप, सदस्य. ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 03/08/2015 रोजी घोषित)
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा देऊन तक्रारदारानी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीप्रमाणे आहे.
3. सामनेवाले ही मोबाईल सेवा पुरविणारी कंपनी असून तक्रारदाराने सामनेवाले कंपनीकडून मोबाईल कनेक्शन नं. 9890608067 (पोस्टपेड) घेतले आहे. व त्या गेली 7 वर्षा पासून सदरची सेवा उपभोगत आहेत. तक्रारदार डिसेंबर 2010 मध्ये पुण्यावरुन मुंबईला स्थलांतरीत झाल्या व त्यानंतर जानेवारी 2011 मध्ये त्यांनी सामनेवाले यांच्याकडे अर्ज सादर करुन बदललेल्या पत्याबाबत कळविले व सोबत आवश्यक ती कागदपत्रे सुध्दा पाठविली. फेब्रुवारी 2011 मध्ये तक्रारदाराच्या पत्यामध्ये झालेल्या बदलाची नोंद सिस्टीममध्ये घेण्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदाराला कळविले. तथापी, तक्रारदाराला सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या नविन पत्यावर कोणतेही मोबाईल बिल प्राप्त झाले नाही. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाले यांना वेळोवेळी पत्र व स्मरणपत्रे पाठवून कळविले. तथापी सामनेवाले यांच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अचानकपणे सामनेवाले यांच्याकडून तक्रारदाराला आक्टोबर 2011 मध्ये मोबाईलची एकूण 5 बिले मिळाली. त्यानंतर तक्रारदार हे सामनेवाले यांच्या कंन्जुमर केअर ऑफिसमध्ये गेले व त्यांनी बिलाची एकूण रक्कम रु.1082 भरण्याची तयारी दाखविली. तथापी सामनेवाले यांनी ती घेण्यास नकार दिला म्हणून तक्रारदाराने सदरची रक्कम चेकद्वारे अदा केली. तक्रारदाराने ऑगस्ट 2011 पर्यंतचे बिल सामनेवाले यांना अदा केले. असे असतांनाही सामनेवाले यांनी त्यांना ऑक्टोबर 2011 मध्ये एकूण 5 बिले पाठविली. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या. पण त्यांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. शेवटी तक्रारदाराने पोलीस स्टेशनमध्ये सुध्दा तक्रार दाखल केली. त्यांनी सामनेवाले कडून तक्रारी बाबतचा तपशिल मागितला असता, तो त्याना देण्यात आला नाही. ही सामनेवाले यांच्या सेवेतील त्रुटी आहे. तक्रारदाराने मोबाईलचे बिल भरल्यानंतर देखील सामनेवाले यांनी त्यांचे मोबाईल कनेक्शन खंडीत केले. व अशाप्रकारे त्यांना दोषपूर्ण सेवा दिली. तक्रारदाराने सामनेवाले यांना शेवटी वकीलामार्फत नोटीस पाठवून देखील काही उपयोग झाला नाही. परिणामतः तक्रारदाराला प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले असे कथन करुन सामनेवाले यांनी तक्रारदाराचे मोबाईल कनेक्शन पुन्हा सुरु करावे, तक्रारदाराला नुकसान भरपार्इ व तक्रारीचा खर्च दयावा अशी विनंती तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारीत केली आहे.
तक्रारदाखल करुन घेतल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले तर्फे श्री संदीप निकम, लिगल मॅनेजर यांनी मंचासमक्ष हजर होऊन सामेनवाले यांचा लेखी जबाब दाखल केला. तक्रारदाराने केलेले आरोप खोटे असल्याचे सामनेवाले यांचे म्हणने आहे. सामनेवाले यांनी आपल्या लेखी जबाबात काही प्राथमिक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्तुत तक्रारीमधील वाद हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाही. त्यांनी असे कथन केले आहे की,
उभयतांमधील वाद मोबाईल फोन सेवेच्या संदर्भात आहे. असा वाद इंडियन टेलिग्राफ अॅक्ट 1885 अंतर्गत लवादाकडे सोपवीणे आवश्यक आहे. मात्र तक्रारदाराने तसे न करता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे
जी चालविण्याचा अधिकार ग्राहकमंचाला नाही. व या एकमेव कारणास्त ती फेटाळण्यास पात्र आहे. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, जानेवारी 2011 मध्ये तक्रारदाराकडून पत्ता बदल्याबाबत त्यांना कोणतीही सूचना प्राप्त झाली नाही. उलट सामनेवाले यांनी पाठविलेली बिले तक्रारदारांना त्यांच्या पत्यावर प्राप्त झाली. तक्रारदाराने जुन व जूलै 2011 पर्यंतच्याच बिलाची रक्क्म अदा केली. मात्र त्यानंतर ऑगस्ट 2011 पासून तक्रारदाराने बिलाच्या रक्कमेचा भरणा केला नाही. तक्रारदाराने ऑगस्ट 2011 ते जानेवारी 2012 या कालावधीतील बिलाची रक्कम रु.2062.79 सामनेवालेकडे अदा केली नाही परिणामतः त्यांचे मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले. सामनेवाले यांनी नियमानुसार कृती केली असल्यामुळे त्यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली असे म्हणता येणार नाही. तक्रारदाराने खोटे आरोप करुन प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. व यासर्व कारणास्तव ती फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली.
5. तक्रारदाराने आपली तक्रार सिध्द करण्यासाठी स्वतःचे पुराव्याचे शपथपत्र व काही कागदपत्रे अभिलेखावर दाखल केली. तसेच सामनेवाले श्री.धीरज सेठ, लिगल मॅनेजर यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. उभयपक्षांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. मंचाने यासर्वांचे अवलोकन केले तसेच उभयपक्षांचा तोंडीयुक्तीवादही ऐकला.
6. तक्रारदाराची तक्रार सामनेवाले यांचा लेखी जबाब, त्यांच्यातर्फे उपस्थित करण्यात आलेले मुद्दे लक्षात घेता प्रस्तुत तक्रारीच्या निवारणार्थ पुढील मुद्दे उपस्थीत होतात त्यावर मंचाने आपला निष्कर्ष खालील प्रमाणे नोंदविला आहे.
मुद्दे | निष्कर्ष |
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदाराने सिध्द केले आहे काय? | नकारार्थी |
2. मागीतलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत काय? | नकारार्थी |
3. काय आदेश? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 व 2
7. सामनेवाले ही मोबाईलसेवा पुरविणारी कंपनी असून तक्रारदाराने सामनेवाले कडून मोबाईल कनेक्शन घेतले याबाबत कोणताही वाद नाही. तक्रारदाराने आपल्या पुराव्यात असे कथन केले आहे की, डिसेंबर 2010 मध्ये ते पुण्याहून मुंबर्इला स्थलांतरीत झाले. व त्यानंतर जानेवारी 2011 मध्ये त्यांनी सामनेवाले यांच्याकडे अर्ज पाठवून नविन पत्याची नोंद रेकॉर्डमध्ये घेण्याची विनंती केली. नविन पत्याची नोंद त्यांच्या सिस्टीम मध्ये घेण्यात आल्याबाबत सामनेवाले यांनी त्यांना फेब्रुवारी 2011 मध्ये कळविले. तथापी, पत्ता बदलाबाबत कोणतेही अपडेशन करण्यात आले नव्हते. त्यांनी सामनेवाले यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करुन त्याबाबत कळविले. पण सामनेवाले कडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. व अचानकपणे ऑक्टोबर 2011 मध्ये त्यांना सामनेवालेकडून एकूण 5 बिले प्राप्त झाली. सदर बिलाची रक्कम रु1082/- अदा करण्यास ते तयार असूनही सामनेवाले यांनी ती स्वीकारली नाही शेवटी तक्रारदाराने सदरची रककम सामनेवाले यांना चेक दवारे अदा केली असे असतांनाही सामनेवाले यांनी त्यांचे मोबाईल कनेक्शन बंद केले. दुस-या बाजूला सामनेवाले यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदाराने पत्ता बदलाबाबत त्यांना जानेवारी 2011 मध्ये कधीही कळविले नव्हते. त्यानंतर त्यांना तक्रारदाराच्या बदललेल्या पत्याबाबत सूचना मिळाल्याबाबत त्यांनी त्याची नोंद घेतली व तक्रारदाराला सदर पत्यावर बिले पाठविणे चालू केले. सदरची बिले तक्रारदारांना प्राप्त झाली पण त्यांनी जुन-जूलै 2011पर्यंतच्याच बिलाचीच रक्कम अदा केली. ऑगस्ट 2011 ते जानेवारी 2012 या कालावधीतील बिलाची रक्कम तक्रारदाराकडून प्राप्त न झाल्यामुळे सामनेवाले यांनी त्यांचे मोबाईल कनेक्शन बंद केले.
8. उभयपक्षांनी वरील प्रमाणे केलेली परस्पर विरोधी कथने विचारात घेता त्यांच्यामधील वाद हा मोबार्इल फोन सेवा संदर्भातील वाद असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. सामनेवाले यांच्या तर्फे असा मुद्दा उपस्थीत करण्यात आला की, उभयतांमधील वाद हा टेलिकॉम सेवा संदर्भातील असल्यामुळे सदर वाद ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाही. हया युक्तीवादाच्या पुष्टयर्थ सामनेवाले यांनी खालील केसेसचा दाखला दिला.
अ) मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील नं.7687/2004 जनरल मॅनेजर, टेलिकॉम विरुध्द एम.क्रिष्णन व इतर. हया प्रकरणात दि.01/09/2009 रोजी दिलेला निकाल.
ब) मा. राष्ट्रीय आयोगाने रिव्हीजन पिटीशन क्र.1703/2010 मध्ये दि.21/05/2010 रोजी दिलेला निकाल.
क) मा. राज्य आयोग चंदीगढ यांनी अपील नं. 42/2009 दि.23/04/2010 मधे दिलेला निकाल.
9. मंचाकडून उपरोक्त न्याय-निवाडयांचे वाचन करण्यात आले. मा.सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त प्रकरणात पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे.
‘ In our opinion when there is a special remedy provided in Section 7-B of the Indian Telegraph Act regarding disputes in respect of telephone bills, then the remedy under the Consumer Protection Act is by implication barred.’
10. उपरोक्त निरीक्षणांवरुन हे स्पष्ट आहे की, जेव्हा उभयपक्षांमध्ये टेलिफोन बिलाबाबत वाद असेल तर त्याबाबतची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाही. या ठिकाणी इंडियन टेलिग्रॉफ रुल्स च्या रुल 413 चा संदर्भ देणे सूध्दा उपयुक्त ठरेल. रुल 413 मध्ये पुढीलप्रमाणे तरतुद करण्यात आली आहे.
Rule 413 of the Telegraph rules provides that all services relating to telephone are subject to telegraph rules. A telephone connection can be disconnected by the Telegraph Authority for default of payment under Rule 443 of the rules.
11. उपरोक्त कायदेशीर तरतुदीचा विचार करता, प्रस्तुत तक्रारी मधील वादावर निर्णय देण्याचे अधिकार ग्राहक मंचाला नाहीत हे स्पष्ट आहे. हया एकमेव कारणावरुन प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
12. वर नमुद कायदेशीर मुद्या व्यतिरिक्त प्रस्तुतची तक्रार गुण-दोषावर देखील फेटाळण्यास पात्र आहे. कारण तक्रारदाराने जानेवारी 2011 मध्ये त्यांच्या पत्यामध्ये बदल झाल्याबाबतची सूचना सामनेवाले यांना दिली होती हे दाखविणेसाठी त्यांनी कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही. या ठिकाणी हे नमुद करणे महत्वाचे आहे की, तक्रारदाराला ऑक्टोबर, 2011 मध्ये सामनेवाले यांच्याकडून एकूण 5 बिले प्राप्त झाली होती हे तक्रारदाराने स्वतः मान्य केले आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदाराच्या पत्यात बदल झाल्यानंतर त्याची नोंद सामनेवाले यांनी आपल्या सिस्टीममध्ये केली व त्यानंतर नविन पत्यावर तक्रारदाराला बिले पाठविली. अशा परिस्थितीत सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी होती असे म्हणता येणार नाही. दुसरे असे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराला ऑक्टोबर, 2011 मध्ये बिले पाठविल्यानंतर तक्रारदाराने ऑगस्ट, 2011 पर्यंतच्याच बिलाची रक्कम अदा केल्याचे दिसते. व त्यानंतरच्या बिलाची रक्कम अदा केल्याबाबत त्यांनी कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही. यावरुन तक्रारदार हे स्वतः थकबाकीदार असल्याचे सिध्द होते. अशा परिस्थीतीत सामनेवाले यांची कृती समर्थनीय वाटते. सामनेवाले यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली हे उपलब्ध्ा पुराव्यावरुन सिध्द होत नाही. सबब, मागितलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र नाही या निष्कर्षा पर्यंत मंच आलेला आहे. शिवाय वर नमुद कायदेशीर तरतुदीचा विचार करता देखील प्रस्तूतची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चा निष्कर्ष नकारार्थी नोंदविण्यात आला असून मंच पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्रमांक 167/2012 फेटाळण्यात येते.
2. उभयपक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
3. सदर आदेशाची प्रत उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
ठिकाणः बांद्रा (पू) मुंबई.
दिनांकः 03/08/2015.