श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे खुल्या मंचातील आदेश. - आदेश - (पारित दिनांक – 25/07/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. सदर प्रकरणी तक्रारकर्तीचे पती श्री. विजय तडस ह्यांचा मृत्यू 28.06.2009 रोजी अपघाताने झाला. गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 2 सोबत करार करुन ते विशिष्ट कालावधीत सेवा उपलब्ध करुन घेणा-या ग्राहकांसाठी गैरअर्जदार क्र. 2 कडे पॉलिसी काढली होती. त्याप्रमाणे त्याप्रमाणे मृत्यु दाव्यापोटी रु.50,000/- एवढी रक्कम संबंधीत मृतकांच्या वारसांना मिळणे अपेक्षीत होते आणि ती रक्कम गैरअर्जदार क्र. 2 ने दिली नाही. गैरअर्जदार क्र. 2 ने, तक्रारकर्तीने पत्र पाठवून 60 दिवसांच्या आत मागणी करणे गरजेचे होते, ती केली नाही, म्हणून दावा नामंजूर केल्याचे कळविले आहे. म्हणून तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल करुन, तीद्वारे विम्याची रक्कम रु.50,000/-, त्यावर सुचना दिल्यापासून व्याज, तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.10,000/- द्यावे अशी मागणी केली. 2. दोन्ही गैरअर्जदार हजर झाले आणि त्यांनी लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 1 चे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्तीने त्यांच्याकडे अर्ज करणे गरजेचे होते आणि यासंबंधिची माहिती बिलावर व अधिक माहिती त्यांच्या वेबसाईटवर बघावी असे नमूद असून तेथे जाऊन कार्यवाही करणे गरजेचे होते आणि त्यांनी दाखल केलेला दावा 60 दिवसाचे आत नाही, म्हणून तक्रारकर्ती दावा मिळण्यास पात्र नाही. 3. गैरअर्जदार क्र. 2 ने लाभार्थी स्वरुपाची पॉलिसी आहे व तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र. 1 तर्फे मागणी करणे गरजेचे आहे आणि तसे त्यांनी केलेले नाही व मुदतीच्या आत त्यांचेकडे दावा दाखल केलेला नाही, म्हणून तो खारीज व्हावा असा उजर घेतला आहे. 4. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेले दस्तऐवज, प्रतिज्ञालेख यांचे अवलोकन मंचाने केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. यातील पॉलिसीची बाब उभय पक्षांनी मान्य केलेली आहे. विवाद एवढाच आहे की, विहित मुदतीत म्हणजे 60 दिवसाचे आत तक्रारकर्तीने दावा गैरअर्जदार क्र. 1 मार्फत गैरअर्जदार क्र. 2 कडे करणे गरजेचे होते व तसे केलेले नाही. दोन्ही विरुध्द बाजूंच्या वकिलांना असे विचारले की, संबंधित व्यक्तीने 60 दिवसाचे आत दावा करावा अशी त्या व्यक्तीला किंवा ग्राहकाला सुचाना देण्यात आली आहे काय ? यावर दोन्ही वकिलांचे म्हणणे नकारार्थी होते. गैरअर्जदारांनी वेबसाईटचा उल्लेख केलेला आहे. मात्र अनेक सर्वसामान्य ग्राहक वेबसाईटचा उपयोग करीत नाही. तशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. गैरअर्जदाराने 50,000/- चा दावा पॉलिसी करारा अंतर्गत देणे गरजेचे होते. तो दिला नाही, चुकीची कारणे पुढे केली ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) रु.50,000/- ही रक्कम गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रार दाखल केल्याचे दिनांकापासून 11.10.2010 पासून प्रत्यक्ष रक्कम अदायगीपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह तक्रारकर्तीला 30 दिवसाचे आत द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्तीला मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 1 यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्यात येते. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे अन्यथा गैरअर्जदार 9 टक्के व्याजाऐवजी 12 टक्क व्याज देण्यास जबाबदार राहतील.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |