निकाल
(घोषित दि. 06.12.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा जुना जालना येथील रहिवाशी आहे. त्याने त्याच्या व्यवहाराकरता बॅंक ऑफ महाराष्ट्र जुना जालना या शाखेत खाते चालू केले. दि.30.05.2016 रोजी सायंकाळी 6 वाजून 44 मिनीटांनी त्याने एटीएम द्वारे रु.10,000/- त्याचे खात्यातून काढले, सदर रक्कम त्याला मिळाली. त्यानंतर पुन्हा त्याने 6 वाजून 46 मिनीटांनी त्याचे एटीएम मधून रु.10,000/- काढण्याचा प्रयत्न केला परंतू तो प्रयत्न अयशस्वी झाला. तरीही त्याचे खात्यामधून रु.10,000/- वजा करण्यात आले. तक्रारदार यास एटीएम द्वारे त्याचे पैसे कपात झाल्याची स्लीप मिळाली नाही. त्यानंतर तक्रारदार त्याचे बॅंकेच्या शाखेत गेला व तेथील संबंधित कर्मचा-यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी संपूर्ण माहिती भरुन अर्ज करा असे सुचविले. तक्रारदार याने त्याप्रमाणे तक्रार दिल्यानंतर त्याला त्याच्या तक्रारीचा क्रमांक देण्यात आला. काही दिवसांनी बॅंकेच्या अधिका-यांनी तक्रारदार यास बॅंकेमध्ये एटीएम वरील व्हिडीओ फुटेज दाखविले, सदर व्हिडीओ फुटेजमध्ये फक्त तक्रारदाराचे तोंडच दिसते पण बाकीचे शरीर व एटीएम आणि इतर भाग दिसत नाही. त्यानंतर वेळोवेळी तक्रारदार याने बॅंकेत चकरा मारल्या, दर वेळी त्याला बॅंकेतून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. या प्रकरणात अंदाजे दिड महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे तक्रारदार याने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराची अशी विनंती आहे की, त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरता नुकसान भरपाई रु.5,000/- मिळावी तसेच त्याला बॅंकेच्या एटीएम मधून न मिळालेली रक्कम रु.10,000/- मिळावी.
तक्रारदार याने काही आवश्यक कागदपत्रांच्या नक्कला तक्रारीसोबत जोडलेल्या आहेत.
गैरअर्जदार बॅंकेमार्फत दि.19.08.2016 रोजी लेखी जबाब दाखल करण्यात आला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराची तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी एटीएम विभागाकडे पाठपुरावा केला. एटीएम विभागाकडून जेव्हा व्हिडीओ फुटेज मिळाले ते तक्रारदार यास उपलब्ध करुन दिले. शेवटी एटीएम विभागाच्या रिपोर्टनुसार तक्रारदाराची तक्रार बंद करण्यात आली. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.
गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या व्यवहारासंबंधी आवश्यक असलेल्या एटीएम विभागाकडून मिळालेल्या सर्व रिपोर्टच्या झेरॉक्स प्रती अवलोकनार्थ दाखल केलेल्या आहेत.
दि.7 सप्टेंबर 2016 रोजी तक्रारदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र दाखल करावे म्हणून प्रकरण ठेवण्यात आले परंतू त्यानंतर सलग चार तारखा होऊन गेल्या तरीही तक्रारदार ग्राहक मंचासमोर आला नाही व पुराव्याकामी शपथपत्र दाखल करण्याची कार्यवाही केली नाही. गैरअर्जदार यांनी ही शेवटपर्यंत पुरावाकामी शपथपत्र दाखल केले नाही. गैरअर्जदार हे सुध्दा दि.5 ऑक्टोबर 2016, 17 ऑक्टोबर 2016 व 5 नोव्हेंबर 2016 या तारखांना गैरहजर राहीले. तक्रारदार हे सुध्दा याच तारखांना सलग गैरहजर आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षकार यांना हे प्रकरण चालविण्यात रस नाही असे गृहीत धरुन हे प्रकरण गुणवत्तेवर संपविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
एटीएम विभागाच्या पत्र व्यवहारामध्ये दि.4 जून 2016 रोजी अशी नोंद आहे की, व्यवहार यशस्वी झाल्यामुळे तक्रारदाराचा दावा नामंजूर केला आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबात सुध्दा असे स्पष्ट शब्दात लिहीले आहे की, तक्रारदार याचा एटीएममध्ये केलेला व्यवहार यशस्वी झाला व त्याच कारणावरुन तक्रारदाराची तक्रार बंद करण्यात आली आहे.
या मुद्यावर तक्रारदार यांचेकडून अधिक खुलासा होण्याकरता शपथपत्र व इतर ठोस स्वरुपाचा पुरावा आवश्यक होता परंतू तसा पुरावा सादर करण्यास तक्रारदार यांनी कुचराई केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही असे दिसते. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना