निकाल
दिनांक- 04.12.2013
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार सुधाकर भगवानराव गायकवाड यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे व अप्रचलित व्यापार पध्दतीचा अवलंब केला म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे,सामनेवाले क्र.1 हे बाफना मोटर्स प्रा.लि.,या नांवाने बीड येथे सामनेवाले क्र.4 यांने उत्पादित केलेल्या टाटा कंपनीचे वाहन विक्रीचा व्यवसाय करतात. सामनेवाले क्र.2 व 3 हे सामनेवाले क्र.4 ने उत्पादित केलेल्या टाटा कंपनीचे वाहन वितरण व विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेमार्फत सामनेवाले क्र.4 यांनी उत्पादित केलेले टाटा एसके-1616 मॉडेलचे वाहन खरेदी केले. सदरील वाहन रक्कम रु.11,50,944/- खरेदी केले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी खरेदी केलेले वाहन यात कोणतेही तांत्रिक बिघाड होत नाही ते चांगल्या प्रतीचे वाहन आहे असे सांगून सदरील वाहनाचे दूरुस्ती बाबत वॉरंटी दिली. तक्रारदार यांनी सदरील वाहन व्यवसायकामी घेतले आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहन खरेदी केल्यानंतर व्यवसाय सुरु केला. सदर नमूद केलेल्या वाहनातून विटा, वाळू,खडी वाहतुकीचा व्यवसाय तक्रारदार करु लागले. सदरचे व्यवसायातून तक्रारदार यांना प्रत्येक दिवशी रु.10,000/- ते रु.12,000/- चे उत्पन्न मिळू लागले. तक्रारदार यांनी खरेदी केलेले वाहन दोन महिने व्यवस्थित चालले. दि.25.2.2011 रोजी सदरील वाहनात तांत्रिक बिघाड झाला. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांस त्या बाबत कळविले. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना वाहनाचे काम नांदेड येथे शाखेमध्ये केले जाईल, असे कळविले. तक्रारदार हे सदरील वाहन घेऊन नांदेड येथे गेले. नांदेड येथे तक्रारदार यांनी वाहनाचे क्लच प्लेट व प्रेशर प्लेट बदलावे लागले असे सांगण्यात आले. तक्रारदार यांनी वॉरंटी बूक सदर शाखेत दाखवले परंतु वॉरंटी नाकारुन तक्रारदार यांना रु.16,700/- भरावे लागले. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीत पूढे असे कथन केले आहे की, दि.4.4.2011 रोजी पर्यत सदरील वाहन व्यवस्थित चालले. सदरील वाहनात पुन्हा बिघाड झाला. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना सांगितले की, औरंगाबाद येथे सर्व्हीसे स्टेशनमध्ये जाऊन वाहन दूरुस्त करुन घ्यावे. तक्रारदार यांनी टोचन लाऊन सदरील वाहन औरंगाबाद येथे नेले. सदरील वाहनाचे क्लच प्लेट गेल्याचे सांगण्यात आले.सदरील वाहनाची वॉरंटी असतानाही ती नाकारण्यात आली. तक्रारदार यांचेकडून वाहन दूरुस्तीचे पैसे घेण्यात आले.तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, सदरील वाहन दूरुस्त झाल्यानंतर ते 19 दिवस व्यवस्थित चालले. दि.23.4.2011 रोजी वाहनात बिघाड होऊन ते जागेवर उभे राहिले. सामनेवाले क्र.1 यांनी स्वतः दूरुस्त करुन दिले. तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, वाहन हे साधारण सात महिने व्यवस्थित चालले. दि.10.11.2011 रोजी पून्हा वाहनामध्ये बिघाड झाला. तक्रारदार यांनी सदरील वाहन नांदेड येथे नेऊन दूरुस्त करुन घेतले. वॉरंटी कालावधी असतानाही तक्रारदार यांना दूरुस्त कामी पैसे भरावे लागले. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या वाहनाच्या क्लच प्लेट व प्रेशर प्लेट मध्ये वारंवार दोष निर्माण होऊ लागला. त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी वाहन उत्पादन कंपनीकडे मुंबई येथे रितसर तक्रार दाखल केली. तक्रादार हा व्यवसाय करुन उपजिवीका भागवतो. वाहन वेळोवेळी नादूरुस्त झाल्यामुळे तक्रारदार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारदार यांस मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 ते 4 यांचेकडून वैयक्तीक व संयूक्तीक रक्कम रु.2,48,336/- नुकसान भरपाई मिळावी तसेच व त्यावर व्याज मिळावे तसेच तक्रारदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 हे त्यांचे वकिलामार्फत मंचासमोर हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे सादर केले नाही. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी लेखी म्हणणे नि.10 अन्वये दाखल केले ओ. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. सामनेवाले क्र.3 व 4 यांचे कथन की, तक्रारदार यांची सदरील तक्रार रदद होण्यास पात्र आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत.सदरील वाहन हे व्यवसायासाठी वापरले जात होते.तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाहीत.सदरील तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी वाहन कसे वापरावे या बाबत पुस्तिका पुरविली आह. तक्रारदार यांनी पुस्तिकेतील मार्गदर्शक तत्वानुसार वाहनाचा वापर केला नाही. सदरील वाहन हे तक्रारदार यांचे निष्काळजीपणामुळे नादुरुस्त झाले आहे. तक्रारदार यांना वेळोवेळी सदरील वाहन दूरुस्त करुन दिलेले आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहनामध्ये उत्पादित दोष होता ही बाब शाबीत केलेली नाही. तसेच सदरील वाहन हे तज्ञ व्यक्तीकडून तपासून घेऊन सदरील वाहन हे सदोष आहे किंवा काय या बाबत रिपोर्ट सादर केलेला नाही. सदर वाहनामध्ये जो दोष आढळून आला तो सदरील वाहन योग्य प्रकारे चालवले नाही, त्यामुळे झालेला आहे. तक्रारदार हे स्वतः निष्काळजीपणे वागले आहेत. सबब, सामनेवाले क्र.3 व 4 यांनी तक्रार रदद व्हावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार व त्यांचे वकील यूक्तीवादाचे हवेळी गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचा यूक्तीवाद ऐकता आला नाही. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे वकील श्री.पिसूरे यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले क्र.3 व 4 यांहचे वकील श्री.थिंगळे यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी तक्रारी सोबत शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.3 अन्वये दस्ताऐवज हजर केलेला आहे. त्यांची दस्ताऐवजामध्ये तक्रारदार यांनी वेळोवेळी वाहन दूरुस्त करुन घेतले त्या बाबतची बिले दाखल केली आहेत.तक्रारदार यांनी वाहन घेतल्या बाबतचे कागदपत्र दाखल केली आहेत. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी तक्रारदार यांचे वाहन वेळोवेळी दूरुस्त करुन दिले त्या बाबत दस्ताऐवज हजर केलेले आहेत.
न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदया कलम 2(ड) नुसार
ग्राहक या संज्ञेत बसतात काय ? नाही.
2. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेले वाहन व्यावसायीक
कारणासाठी विकत घेतले आहे काय ? होय.
3. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार
यांनी शाबीत केली आहे काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददे क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार व त्यांचे वकील यूक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीले. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार व शपथपत्र व सोबत दारखल केलेला दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे कथन की,त्यांनी सामनेवाले क्र.4 यांनी उत्पादित केलेले टाटा एसके-1616 मॉडेलचे वाहन खरेदी केले. सदरील वाहन तक्रारदार यांनी विटा,वाळू, खडी वाहतूकीचा व्यवसाय करण्यासाठी घेतले. त्या वाहनामध्ये ड्रायव्हर नेमून तक्रारदार हे व्यवसाय करु लागले. सदरील वाहनातून तक्रारदार यांना रु.10,000/- ते रु.12,000/-उत्पन्न मिळू लागले. तक्रारदार यांचे कथन की, सदरील वाहनामध्ये वेळोवेळी तांत्रिक बिघाड होऊ लागला. सदरील वाहन वेळोवेळी सामनेवाले यांचेकडून दूरुस्त करुन घेतले.वॉरंटीचा कालावधी असतानाही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून दूरुस्तीचा खर्च घेतला. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले. सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. सदरील वाहन हे तक्रारदार यांना व्यावसायीक कारणासाठी (Commerial purpose) खरेदी केले होते. तक्रारदार यांनी ड्रायव्हर यांची नेमणूक करुन व्यवसाय सुरु केला होता. तक्रारदार हे स्वतः त्या वाहनावर काम करीत नव्हते व स्वतःची उपजिवीका भागवत नव्हते. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 2(1)(ड) अंतर्गत ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. त्यामुळे सदरील तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही.
तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीत नमूद केलेल्या बाबीचा विचार केला असता व तसेच सामनेवाले यांनी जो बचाव घेतला त्यांचा विचार केला असता या मंचासमोर आलेल्या पुराव्यावरुन असे निष्पन्न होते की, तक्रारदार यांनी सदरील वाहन हे व्यावसायीक कारणासाठी घेतलेले होते. ते त्या वाहनावर स्वतः काम करुन उदरनिर्वाह करीत नव्हते. सबब, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत.
तक्रारदार यांनी या मंचासमोर सदरील वाहनामध्ये वेळोवेळी जो बिघाड होत होता. त्या बाबत दस्ताऐवज दाखल केलेले नाही. तसेच सदरील बिघाड हा सदोष उत्पादनामुळे होत होता ही बाबही तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. तक्रारदार यांनी सदरील वाहनामध्ये वेळोवेळी जो बिघाड होत होता त्यासंबंधी तज्ञ व्यक्तीकडून वाहनाची तपासणी करुन दोषा बाबत अहवालही सादर केलेला नाही अगर ते वाहन तज्ञ व्यक्तीकडून तपासून दोषा बाबत अहवाल देणेकामी या मंचासमोर अर्ज केला नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक