(घोषित दि. 23.03.2011 व्दारा श्रीमती रेखा कापडीया, सदस्या) अर्जदार हे शेतकरी असुन गैरअर्जदार यांच्या डी पी मधील स्पार्कींगमुळे आग लागून त्यांच्या शेतातील पीक जळाले म्हणून त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. गैरअर्जदार यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांची कुंभारी ता.भोकरदन जि.जालना येथे गट क्रमांक 206 मध्ये शेतजमीन आहे. वर्ष 2009/10 मध्ये त्यांनी शेतीमध्ये मक्याचे पीक लावले होते. दिनांक 20.04.2010 रोजी त्यांच्या शेताजवळ असलेल्या डी पी मध्ये आग लागली व ती पसरुन त्यांच्या शेतातील 90 ते 100 क्विंटल मका व अवजारे जळून आर्थिक नुकसान झाले. दिनांक 21.04.2010 रोजी अर्जदाराने तहसील कार्यालयाकडे तसेच दिनांक 23.04.2010 रोजी पोलीस निरीक्षक, भोकरदन जि. जालना यांना सदरील घटनेची माहिती दिली. संबंधित पोलीस स्टेशनद्वारे या घटनेचा पंचनामा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे विद्युत निरीक्षक यांनी देखील गैरअर्जदार यांच्या डी पी ला आग लागल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला आहे. अर्जदाराने दिनांक 09.07.2010 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू गैरअर्जदार यांनी रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असुन, व्याजासह नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत पोलीस पंचनामा, विद्युत निरीक्षकाचा अहवाल, गैरअर्जदार यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करणारे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार 1 व 2 यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराच्या शेतातील पिकाचे नुकसान डी पी मध्ये आग लागल्यामुळे झालेले नाही. अर्जदाराने तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीची त्यांना माहिती नसल्याचे सांगून अर्जदार त्यांचे ग्राहक नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाई मागण्याचा त्यांना अधिकार नाही असे जवाबात म्हटले आहे. अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती त्यांनी मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन मंचास असे आढळून येते की, दिनांक 20.04.2010 रोजी अर्जदाराच्या शेताजवळ असलेल्या गैरअर्जदार यांच्या डी पी मध्ये आग लागून त्यांच्या शेतातील मक्याचे पीक व इतर साहित्य जळाल्याची माहिती त्यांनी दिनांक 21.04.2010 रोजी तहसीलदार, भोकरदन यांना दिली असल्याचे दिसुन येते. दिनांक 23.04.2010 रोजी या घटनेची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक, भोकरदन जि.जालना यांनाही दिलेली दिसुन येते. त्याच प्रमाणे दिनांक 21.04.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना ही माहिती दिलेली दिसुन येते. अर्जदाराने वरील तिनही विभागास दिलेल्या तक्रारीची पोच पावती मंचात दाखल केलेल्या तक्रारी सोबत जोडलेली आहे. दिनांक 21.04.2010 रोजी तलाठी सजा कुंभारी तसेच संबंधित पोलीस स्टेशन तर्फे पंचनामा करण्यात आलेला असुन यात गैरअर्जदार यांच्या डी पी मध्ये लागलेल्या आगीमुळे अर्जदाराच्या शेतातील मका पीक व इतर अवजारांचे अंदाजे 75,000/- रुपयाचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे व यात देखील लघुदाब लाइन एकमेकाशी चिटकल्यामुळे डी पी जवळ स्पार्कींग होऊन आग लागल्याचे व अर्जदाराच्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. विद्युत निरीक्षक हे अशा अपघाताबाबत अहवाल देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नेमण्यात आलेले अधिकृत अधिकारी आहेत. त्यांनी देखील या घटनेबाबत निरीक्षण्ा करुन अहवाल दिलेला आहे व त्यात गैरअर्जदार यांच्या डी पी जवळ स्पार्कींग होऊन आग लागली व अर्जदाराच्या शेतातील मक्याचे पीक जळाले असे स्पष्टपणे नमूद केले आहे. वरील सर्व निरीक्षण केल्यावर गैरअर्जदार यांच्या डी पी जवळ स्पार्कींग होऊन आग लागली व त्यामुळे अर्जदाराच्या शेतातील मक्याचे पीक व इतर साहीत्य जळाल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराचे जरी गैरअर्जदार यांच्या डी पी जवळ लागलेल्या आगीमुळे आर्थिक नुकसान झालेले असले तरी गैरअर्जदार यांनी त्यांच्याकडे वीजेची जोडणी आहे व ते गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत याबाबत कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. सी पी जे 1323-1993 (2) हरीयाना राज्य विद्युत मंडळ विरुध्द राम अवतार सिंग चौहान या निवाडयात देखील अर्जदाराकडे वीज पुरवठा नसल्यामुळे त्यांना उपभोक्ता किंवा ग्राहक मानता येणार नाही असे म्हटले आहे. अर्जदाराने वीज कायदा 2003 मधील तरतुदी प्रमाणे नुकसान भरपाईची तक्रार विद्युत निरीक्षकाकडे करणे अपेक्षीत आहे. आदेश अर्जदार हे ग्राहक नसल्यामुळे तक्रार खारीज करण्यात येत आहे.
| | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | |