द्वाराः मा.अध्यक्ष श्री. विजय चंद्रलाल प्रेमचंदानी
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्वये सदर तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून तक्रारदाराच्या मालकीची असलेली शेतीकरीता वीज पुरवठा घेतलेला आहे. सामनेवाले वीज वीतरण कंपनीचे कनिष्ठ अभियता श्री.ए.बी. कोपणर शिर्डी कार्यालय यांनी कुठलीही सुचना न देता तक्रारदाराचा विद्युत पुरवठा दिनांक ३१-०८-२०१६ रोजी खंडीत केला. तिथे असलेल्या केबल, स्टार्टर, ऑटो स्वीच हे त्यांनी पॅनल बॉक्सचे कुलुप तोडून स्वतः घेऊन गेले आहे. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवालेकडे तोंडी तक्रार केली होती व दिनांक ०६-०९-२०१६ रोजी लेखी तक्रार दिली होती. परंतु सदर तक्रारीत सामनेवालेने कोणतीही दखल घेतली नाही व तक्रारदाराला शारीरीक व मानसिक त्रास झाला म्हणून तक्रारदाराने सामनेवालेकडे दिनांक ०९-०९-२०१६ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवीली त्यावरही सामनेवालेने कोणतीही दखल घेतली नसल्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आलेली आहे.
३. तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराचे शेतातुन काढलेले केबल, ऑटो स्वीच, स्टार्टर हे त्याने आणून तक्रारदाराचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करून द्यावा. तसेच तक्रारदाराला झालेले आर्थीक, शारीरीक, मानसिक त्रासापोटी सामनेवालेने तक्रारदाराला नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावे.
४. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सदर नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाले प्रकरणात हजर झाले व निशाणी क्र. १५ वर कैफीयत दाखल केली. सदर कैफीयतीमध्ये सामनेवालेने असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. सदर तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकारक्षेत्र नाही. सामनेवाले यांच्या भरारी पथकाने दिनांक ३१-०८-२०१६ रोजी तक्रारदार यांचे शेतीमध्ये अधीकृत विज पुरवठयाची तपासणी केली असतांना सदरहु शेतीमधील विहीरीच्या उत्तरेस १ बोअर व पुर्वेसएक बोर असे दोन अनधीकृत बोअर आढळून आले व सदर बोअरवर तक्रारकर्ताने कोणतीही प्रकाराची अधिकृत वीज पुरवठा घेतलेला नव्हता. सदरहु बोअर चालविण्यासाठी तक्रारदाराने बोअरच्या काढलेला असलेला पोलवरून आकडे टाकुन वीज पुरवठा घेतलेला होता, असे दिसून आले. त्यामुळे तक्रारदाराचा अनधिकृत वीज पुरवठा खंडीत करण्यात आला व विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार तक्रारदाराला वीज चोरीचे देयक तसेच तडजोडी करीताचे देयक दिनांक १६-०९-२०१६ रोजी देण्यात आले. सदरबाब तक्रारदाराने तक्रारीत लपवीलेली आहे व वीज चोरीचे संदर्भात ग्राहक मंचाला तक्रार चालविण्याचा कोणताही कायदेशीर अधिकारक्षेत्र नसल्याने सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
५. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालेची कैफीयत, तक्रारदाराचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद, सामनेवालेचे शपथपत्र व तोंडी युक्तिवादावरून खालील निष्कर्षाप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
निष्कर्ष
६. तक्रारदाराने निशाणी क्रमांक ५/३ वर दाखल देयकाची पडताळणी करतांना असे दिसून आले की, दिनांक ०६-०९-२०१६ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराला अतिरीक्त सुरक्षा जमा रक्कम रूपये २,९९०/- चे देयक दिलेले होते. तसेच निशाणी क्रमांक ५/५ ते ५/१२ वर तक्रारदाराने बोअरवेलचे छायाचीत्र दाखल केलेले आहे. तसेच निशाणी क्रमांक ५/१३ वर तक्रारदाराने सामनेवाले यांना पाठविलेल्या नोटीसीची प्रत दाखल केलेली आहे. निशाणी क्रमांक ५/१३ वर दाखल केलेली नोटीस सामनेवाले यांना पाठविण्यात आलेली होती यासंदर्भात तक्रारदाराने कोणताही दस्तऐवज पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदाराची शेतातील असलेल्या विद्युत पुरवठयाची पडताळणी दिनांक ३१-०८-२०१६ रोजी करण्यात आली होती व दिनांक १६-०९-२०१६ रोजी तक्रारदाराला कलम १३५ वीज चोरीचे तडजोड देयक देण्यात आले होत, ही बाब सामनेवालेने दाखल निशाणी क्रमांक १६ वरील शपथपत्रावरून सिध्द होते. मे. सुप्रीम कोर्ट यांच्या निकालानुसार ‘ एखादा वीज चोरीचा वाद ग्राहक मंचाला चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही ’ सदर तक्रारीत तक्रारदार व सामनेवाले यात वीज चोरीविषयी व त्यामुळे विद्युत खंडीत करण्याबाबत वाद असल्याने सदर तक्रार या मंचाला चालविणचे अधिकारक्षेत्र नाही, असे मंचाचे मत आहे व सिध्द होत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश.
आदेश
1. सदर तक्रार चालविण्याचे या मंचाला अधिकारक्षेत्र नसल्याने तक्रार नस्तीबध्द करण्यात येत आहे.
2. उभयपक्षाने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3. उभयपक्षांना तक्रारीची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
4. तक्रारदाराला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करण्यात यावी.