न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. मनिषा कुलकर्णी, सदस्या)
1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 11 व 14 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारदाराने जाबदार यांचेकडून खरेदी केलेल्या मोबाईल नंबर 9096382313 या कार्डमध्ये विनाकारण कंपनीकडून कट केलेले रक्कम रु. 1,400/- परत मिळणेकरिता सदरची तक्रार दाखल केलेली आहे. सदरची तक्रार स्विकृत होवून जाबदार यांना नोटीस आदेश झाले. मात्र जाबदार क्र. 1 यांना नोटीस मिळनूही या मंचासमोर हजरही झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले सबब, नि. 1 वर त्यांचे विरुध्द “ एकतर्फा ” आदेश पारीत केलेचे दिसून येते.
2) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदाराचे मोबाईल नं.9096382313 चे विनाकारण जाबदार यांनी रक्कम रु. 1400/- कट केलेले परत मिळण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराचे ऑक्टोंबर 2011 ते डिसेंबर 2012 पर्यंत वर नमूद मोबाईल नंबरचे रात्री 12 नंतर दुसरे दिवशी सकाळी 8 पर्यंत रु.15, 14 व रु. 4 असे वि.प. ही एअरटेकल कंपनी रक्कम कट करीत होते. तसेच ऑक्टोंबर 2011 ते डिसेंबर 2012 मध्ये 1 दिवस दि. 28-12-2012 रोजी रात्री 35.488 असा बॅलन्स असताना शनिवारी दि. 29-12-2012 ला बॅलन्स रिचार्ज करा असा संदेश आला. तक्रारदारांनी त्यानंतर 9923884343 ला फोन करुन 5 मिनिटे तक्रारदार बोलले तर बॅलन्स 0.02 असा शिल्लक म्हणजे 33 रुपये जादा कट केले. 2 पैसेचा बॅलन्स आजअखेर तसाच शिल्लक ठेवला आहे. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 9-09-2012 रोजी दुस-या स्किमचा वापर करुन 95 रु ला 40 सेकंद बॅलन्स मारला व संपला परत 295 चा मारला तर ऑक्टोंबर 12 मध्ये जादा कट झाले. तर पुन्हा दि. 30-12-2012 रोजी 225 रु. ला 35000 सेकंद मिळणार असा बॅलन्स मारला व मागील नवे 2 पैसे बॅलन्स तसा ठेवला. तक्रारदारांनी हुपरी गावामध्ये मोबाईल कंपनी धारकाकडे चौकशी केली असता कोणीही तक्रारदाराला काहीही सांगितले नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांना दि. 7-09-2012 रोजी पत्राने कळविले परंतु जाबदारांनी काहीच उत्तर दिले नाही. तसेच जाबदार कंपनीचे टोल फ्री नं. 121 व 198 वर फोन केले असता तक्रारदारास काहीही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर पुन्हा तीन दिवस कटींग चालू होते. जाबदार नं. 1 व 2 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. सबब, जाबदारामुळे तक्रारदाराचे झालेले नुकसान रु. 20900/- मिळावेत व शारिरीक व व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 5,000/- जाबदार कडून वसुल होऊन मिळावेत अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
3) तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत एकूण सहा (6) कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. नं. 1 व 2 यांना तक्रारदारांनी पाठविलेली पत्रे, वि.प.नं. 2 यांना माहिती अधिकाराखाली पाठविलेले पत्र, रजि. पोस्टाच्या पावत्या, वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारास पाठविलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेले आहेत. तक्रारदाराने शपथपत्र दाखल केलेले आहे.
4) जाबदार क्र. 1 यांना नोटीस मिळूनही ते या मंचासमोर हजरही नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र. 1 यांचे विरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीतक करणेत आले.
5) जाबदार नं. 2 हे मंचासमोर दाखल होवून त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे कथनानुसार तक्रारदाराची तक्रार खोटी व निराधार असून जाबदार यांना त्रास देणेच्या हेतूने केली आहे. प्रस्तुतची तक्रार कायदयाचे दृष्टीने चुकीची आहे. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारी अर्जात ऑक्टोबर 2011 ते डिसेंबर 2012 या कालावधीत रक्कम कापल्याचे कथन केले आहे, त्याबाबतची तक्रार तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे 14 महिन्यात केलेली नाही. तक्रारदारांनी कंपनीचे टोल फ्री नंबरवर तक्रार केलेचे म्हटले आहे. परंतु तक्रारदारांना त्यावेळी तक्रार नोंदविता आलेली नाही. तसेच सदर बाबत दुस-या व्यक्तीची मदतही घेतली नाही. तक्रारदाराचे चुकीमुळे जाबदाराकडे तक्रार नोंद केलेली नाही. तक्रारदारांनी सदरची तक्रार जाबदार यांना त्रास देणेच्या व बेकायदेशीर लाभ मिळविणेचे हेतुने तक्रार अर्ज केला आहे. ऑक्टोबर 2011 ते डिसेंबर 2012 पर्यंत तक्रारदाराच्या मोबाईलमधून रक्कम कापण्यात येत होती हे सिध्द करण्यासाठी तक्रारदाराने मे. मंचासमोर कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदारांनी त्यांचे गावात सर्व मोबाईल कंपनीधारकाकडे जाऊन आपल्या तक्रारीकरिता चौकशी केली परंतु तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकला नाही. तक्रारदार दुस-या कोणत्याही व्यक्तीची मदत घेऊ शकला नाही. तक्रारदारांनी तक्रारीत केलेले आरोप खोटे आहेत. तक्रारदारास नुकसान भरपाई देणेस जाबदार हे जबाबदार नाहीत. तक्रारदाराकडून खर्च जाबदार यांना मिळावा. तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत यावीअसे म्हणणे दाखल केले आहे.
6) तक्रारदारांची तक्रार, दाखल पुरावे, व लेखी युक्तीवाद तसेच जाबदार नं. 2 यांचे कथन, लेखी युक्तीवाद, दाखल पुरावे यावरुन मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1. | तक्रारदार जाबदार यांचे ग्राहक होतो काय ? | होय |
2. | जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय अंशत: |
3 | तक्रारदार हा त्याने मागितलेल्या मागण्या मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
4. | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि व र ण -
7) मुद्दा क्र. 1 -
तक्रारदाराने एअरटेल कंपनीचे मोबाईल क्र. 9096382313 या क्रमांकाचे कार्ड जाबदार नं. 1 यांचेकडे घेतले आहे. त्याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. जाबदार क्र. 2 एअरटेल दूरसंचार यांनीही आपल्या म्हणणेमध्ये कुठेही तक्रारदार हा ग्राहकच नाही हे नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते निर्माण झालेले आहे. सबब तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 2 (1) डी खाली “ग्राहक” होतो. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
8) मुद्दा क्र. 2 ते 3 -
तक्रारदाराने जाबदार नं. 1 यांचेकडे मोबाईल(कार्ड) क्र. 9096382313 हा खरेदी केलेचे दिसून येते. तक्रारदाराचे (ऑंक्टोबर) 2011 ते डिसेंबर 2012 रात्री 12 नंतर दुसरे दिवशी सकाळी 8 पर्यंत कधी रु. 15, कधी रु. 14 व कधी रु. 4/- व दररोज रात्री रु.3 याप्रमाणे विनाकारण जाबदार एअरटेल कंपनी तक्रारदार यांचे मोबाईल बॅलन्स मधून कट करत होती तसेच ऑक्टोबर 2011 ते ऑक्टो 2012 पर्यंत 14 महिने व डिसेंबर 12 मध्ये एक दिवस दि. 28-12-2012 ला रोजी 35.888 असा बॅलन्स असताना शनिवारी दि. 29-12-2012 ला बॅलन्स रिचार्ज करा अशी कॅसेट वाजत होती. तदनंतर फोन नं. 9923884345 ला फोन केला असता व तक्रारदार 5 मिनिटे बोलला तर बॅलन्स 0.02 शिल्लक राहिला म्हणजेच रक्कम रु. 33 कट केले व असे वारंवार दिसून आले.
8) दिनांक 9-09-2012 रोजी तक्रारदार यांच्याच दुस-या स्किमचा वापरकरुन 95 रु पन्नास 40 सेकंद असा बॅलन्स मारला व तोही संपला परत रक्कम रु. 295 चा मारला व तोही ऑक्टोंबर 12 पर्यंत परत कट झाला. दि.7-09-2012 रोजी पुण्याला जाबदार यांना रजि. ए.डी. केले मात्र 3 महिन्यानंतरही त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. सबब, जाबदार यांनी केलेले हे कृत्य ही निश्चितच सेवेतील त्रुटी म्हणावी लागेल असे तक्रारदार यांचे कथन आहे व झालेले नुकसान रक्कम रु.20,900/- तसेच मानसिक व शारिरीक त्रासाची रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- तक्रारदार यांनी मागितलेला आहे.
9) जाबदार नं. 2 यांचे कथनाप्रमाणे तक्रारदाराने खोटी तक्रार मांडलेली आहे व तो तब्बल 14 महिन्यानंतर या मंचासमोर आला आहे असे कथन केले आहे. तसेच जाबदार नं. 2 यांचे कथना नुसार सदरचे तक्रारदाराने जाबदार यांचे कोणत्याही मोबाईलधारकाकडे जावून सदरची तक्रार मांडावयास हवी होती असे कथन केले आहे व तक्रारदार यांचे सर्व मुद्दे खोडून काढलेले आहेत.
10) तथापि वस्तुस्थिती अशी असली तरीसुध्दा जाबदार एअरटेल कंपनीने तक्रारदार यांनी,, नोटीस पाठवूनही त्यास साधे उत्तरही देण्याचे काम केलेले नाही. जर जाबदार यांना तक्रारदार यांची तक्रार खोडून काढावयाची होती तर जाबदार नं. 2 एअरटेल कंपनीने यासंदर्भातील पुरावा म्हणजेच तक्रारदार ज्या कालावधीमध्ये घडलेल्या Call Log चा तक्रार करतो. तो Call Log जाबदार कंपनीने दाखल करावयास हवा होता की, जेणेकरुन वस्तुस्थितीची कल्पना या मंचास आली असती मात्र जाबदार नं. 2 यांनी कोणताही, तक्रारदार यांची तक्रार खोडून काढावयासाठी लागणारा पुरावा हा या मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदार हा सदरचे मानसिक त्रासाने त्रस्त झालेचे दिसून येते. सबब, सहाजिकच तक्रारदारास या गोष्टीचा त्रास झालेशिवाय तो तक्रार दाखल करणार नाही.
11) तसेच जाबदार नं. 2 यांनी आपल्या दि. 20-07-2014 रोजीच्या लेखी म्हणण्यामध्येही कलम 2 मध्ये “In case of prepaid services the applicable charges are only deducted from the available balance of the subscriber mobile number as per the tariff opted by the respective subscriber on actual usage” असे कथन केले आहे. मात्र असे कथन जरी केले असले तरीसुध्दा जाबदार हा सदरच्या रक्कमेव्यतिरिक्त जादा रक्कम ही तक्रारदार यांचेकडून घेतलेली नसलेची बाब पुराव्यानिशी शाबीत करु शकलेला नाही. सबब, निश्चितच जाबदार याने तक्रारदार यांच्या नोटीसीस उत्तर न देवून व तक्रारदार याच्या तक्रारीचे निराकरण न करुन सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे ठाम मत झाले आहे. सबब, त्याने मागितलेल्या मागण्या मिळणेस तो निश्चितच पात्र आहे. मात्र असे असूनही नक्की किती रक्कम खर्च झाली हे या मंचास कळून येत नसलेने, पात्र तक्रारदार कथन करतो त्याप्रमाणे एकत्र 295, 225 . व 195 असे बॅलन्स कट झालेचे कथन केलेले आहे. जाबदार क्र. 1 हा मंचासमोर हजरही नाही व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब, हे मंच जाबदार क्र. 1 तसेच जाबदार क्र. 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वर नमूद तक्रारदार यांची रक्कम रु. 1,400/- तसेच मानसिक व शारिरीक त्रासाचे रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना झाले नुकसान रक्कम रु. 1,400/-(अक्षरी रक्कम रुपये एक हजार चारशे फक्त) अदा करावेत.
3) जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता जाबदार नं. 1 व 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे जाबदार नं. 1 व 2 विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.