(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 23/11/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.26.05.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत
तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदारांशी त्याच्या प.ह.नं.11, मौजा-नारा, खसरा नं.8/1 मधील भुखंड क्र.42, एकूण क्षेत्रफळ 1250 चौ.फूट एकूण रक्कम रु.90,000/- ला खरेदी करण्याकरीता दि.20.11.2006 रोजी करार केला होता व कराराचे दिवशी रु.15,500/- नगदी देऊन उर्वरीत रक्कम दरमहा रु.2,000/- प्रमाणे 24 महिन्यात देण्यांचे ठरलेले होते. तक्रारकर्त्याने आतापर्यंत गैरअर्जदाराला रु.77,000/- दिलेले असुन त्यांना भुखंडाची उर्वरीत रक्कम रु.13,000/- घेऊन विक्रीपत्र करुन देण्याबाबत वारंवार विनंती केली. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही व करारनाम्याचेवेळी व दरमाह किस्तीने दिलेले रु.77,000/- परत केले नाही. तसेच दि.17.12.2010 रोजीचे पत्रालाही उत्तर दिले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल करुन भुखंडाचे विक्रीपत्र करुन व मोजमाप करुन वास्तविक ताबा द्यावा, रु.77,000/- वर दि. 20.11.2006 पासुन 18% दराने व्याज मिळावे, तसेच मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळण्याबाबत मंचास विनंती केलेली आहे.
3. मंचामार्फत गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
4. गैरअर्जदारांनी आपल्या जबाबात तक्रारकर्त्यासोबत प.ह.नं.11, मौजा-नारा, खसरा नं.811 मधील भुखंड क्र.42, एकूण क्षेत्रफळ 1250 चौ.फूट एकूण रक्कम रु.90,000/- ला खरेदी करण्याकरीता दि.20.11.2006 रोजी करार केला होता व त्यापैकी रु.77,000/- तक्रारकर्त्याकडून मिळाल्याबाबत मान्य केले आहे. परंतु शेतमालकाने सदरची जमीन अनुक्रमे नवल इंकाजी पटेल व सेवकबाई इंकाजी पटेल यांना विक्री करुन दिल्याचे गैरअर्जदाराला कळल्यामुळे शेतमालक श्री. कोठीराम तुळशीराम बोंद्रे यांचे विरुध्द पोलिस आयुक्त, गुन्हे अन्वेशन विभाग, नागपूर यांचेकडे तक्रार दाखल केल्याचे नमुद केले आहे. गैरअर्जदारांचे म्हणणे असे आहे की, ते तक्रारकर्त्यास रु.77,000/- किंवा भुखंड यापैकी तक्रारकर्त्याला जे योग्य वाटेल ते देण्यांत तयार आहेत. मात्र त्यांची शेत मालका विरुध्दची तक्रार गुन्हे अन्वेशन विभागाकडे तडजोडीकरीता आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रलंबीत निकालापर्यंत थांबावे, तसेच तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे अमान्य केलेले आहे.
5. सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता दि.23.11.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकीलांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला, गैरअर्जदारांनी युक्तिवादासंबंधी पुरसीस दाखल केली. तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. सदर प्रकरणातील एकंदर वस्तुस्थीतीवरुन या मंचाच्या असे निदर्शनांस येते की, गैरअर्जदार हे आकांशा डेव्हलपर्स या नावाने भुखंड विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलल्या दस्तावेज क्र.1 तसेच शपथपत्रावरुन असे दिसुन येते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांशी त्यांच्या प.ह.नं.11, मौजा-नारा, खसरा नं.811 मधील लेआऊटमधे भुखंड क्र.42, एकूण क्षेत्रफळ 1250 चौ.फूट एकूण रक्कम रु.90,000/- ला खरेदी करण्याकरीता दि.20.11.2006 रोजी रु.15,500/- नगदी देऊन करार केला होता. तसेच गैरअर्जदारांना रु.77,000/- दिल्याचे तक्रारीसोबत दाखल पावत्यांवरुन स्पष्ट होत असुन गैरअर्जदारांनी आपल्या जबाबात सदर बाब मान्य केलेली आहे. तसेच उर्वरित `.13,000/- घेऊन गैरअर्जदारांनी सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे अशी मागणीही केल्याचे तक्रारकतर्याचे शपथपत्रावरुन दिसुन येते. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, करारात नमुद केलेली वरील वर्णनाची जमीन शेतमालकाने अन्य व्यक्तिस विकल्याने वाद निर्माण झालेला आहे व शेतमालक श्री. कोठीराम तुळशीराम बोंद्रे यांचे विरुध्द पोलिस आयुक्त, गुन्हे अन्वेशन विभाग, नागपूर यांचेकडे तडजोडीकरीता प्रलंबीत आहे. आमच्या मते गैरअर्जदारांनी सदर जमीन कायदेविषयक सर्व बाबींची पूर्तता करुनच मग तक्रारकर्त्यासोबत भुखंड विक्रीचा व्यवहार करावयास पाहिजे होता, परंतु तसे न करता तक्रारकर्त्याची फसवणूक केलेली आहे.
7. वरील वस्तुस्थिती पाहता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, तक्रारकर्त्याकडून जास्तीत-जास्त रक्कम स्विकारुनही गैरअर्जदारांनी भुखंडाचे विक्रीपत्र करुन ताबा देण्याची कार्यवाही केली नाही, ही गैरअर्जदारांची कृति निश्चितच सेवेतील कमतरता आहे. सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून उर्वरित रक्कम घेऊन त्यांच्या प.ह.नं.11, मौजा-नारा, खसरा नं.811 मधील लेआऊटमधे भुखंड क्र.42, एकूण क्षेत्रफळ 1250 चौ.फूटचे विक्रीपत्र करुन ताबा द्यावा. सदर भुखंडाचे विक्रीपत्राचा खर्च व विकास खर्च देण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची राहील.
किंवा
तक्रारकर्त्यास रु.77,000/- शेवटचा हप्ता दिल्याचा दि.21.05.2010 पासुन द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह परत करावे.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा वरील रकमेवर द.सा.द.शे. 12% ऐवजी 15% व्याज देय राहील.