( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 24 जानेवारी 2012 )
यातील तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.1 कडुन सन 1985 ला भुखंड विकत घेतला होता. मात्र त्याचा ताबा गैरअर्जदार यांनी दिला नाही. पुढे त्यांनी गैरअर्जदार क्रं.2 कडे नियमितीकरणाकरिता रुपये 1000/- एवढी रक्कम भरली. गैरअर्जदार क्रं.2 ने 30/12/2009 ला मौक्का चौकशी करण्याचे ठरविले मात्र तक्रारदाराल उपस्थीत राहीले नाही त्यांचे मुलाने तारीख वाढविण्याची विंनती केली त्यांचे म्हणणे न ऐकता त्याचा अर्ज फेटाळण्यात आला व त्यांना कोणतीही संधी न देता गैरअर्जदार क्रं.2 ने सदर अर्ज फेटाळला ही अतीशय चुकीची कृती आहे व यासाठी गैरअर्जदार क्रं. 1 व 2 जबाबदार आहे म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन 65/3 मौजा सोमलवाडा, नागपूर या ले- आऊट मधील 1500 चौ.फुटाचा भुखंड देण्यात यावा किंवा भुखंड उपलब्ध नसल्यास त्या भुखंडाची किंमत रुपये 20,00,000/- नुकसान भरपाई म्हणुन मिळावी अशी मागणी केली.
तक्रारदाराने आपले तक्रारीसोबत दस्तऐवज यादीनुसार एकुण 14 कागदपत्रे दाखल केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार क्रं 1 ते 3 हजर झाले व त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रं.1 ने तक्रारीशी आपला संबंध नाही व सदरचा वाद हा दिवाणी स्वरुपाचा असून तो गैरअर्जदार क्रं. 3 व तक्रारदार यांचे आपसातील आहे. तक्रारदाराने आपले भुखंडाकडे लक्ष दिले नाही त्यामुळे त्यावर अतिक्रमण झाले असा उजर घेतला.
गैरअर्जदार क्रं.2 ने सर्व विपरित विधाने नाकबुल केली. मोक्का चौकशीचे वेळी तक्रारदाराचा मुलगा हजर होता. त्यांनी कुठलाही अर्ज व मुदतीची मागणी केली नाही. त्यामुळे अर्ज फेटाळण्याचा प्रश्नच येत नाही. दिनांक 19/5/2010 चे पत्राद्वारे तक्रारदाराचे भुखंडाच्या चर्तुःसिमा मिळत नसल्यामुळे त्याचा खुलासा मागीतला. त्यांनी खुलासा दिला नाही. त्यामुळे त्यांचा व त्यांचेकडील गैरअर्जदार क्रं.3 चा नियमितीकरणाचा अर्ज नामंजूर केला. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार योग्य नाही म्हणुन ती खारीज व्हावी असा उजर घेतला.
गैरअर्जदार क्रं.3 यांनी तक्रारीतील तक्रारदाराचे सर्व आक्षेप फेटाळले. त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांची सोसायटी वेगळी आहे. दोन्ही भुखंडाचे क्रमांक एक असले तरीही सोसायटया वेगळया आहेत. गैरअर्जदार क्रं.2 ने प्रत्यक्ष तक्रारदाराला नोटीस देऊन खुलासा मागीतला मात्र तक्रारदाराने खुलासा न दिल्यामुळे त्यांचा दावा निकाली काढला व गैरअर्जदार क्रं.3 चा दावा मान्य केला. यास्तव तक्रार खारील करावी असा उजर घेतला.
गैरअर्जदाराने आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला व सोबत दस्तऐवज यादीनुसार कागदपत्रे दाखल केलीत.
तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकला.गैरअर्जदार क्रं. 1 ने लेखी युक्तिवाद दाखल केला. गैरअर्जदार क्रं.2 ने युक्तिवाद केला. गैरअर्जदार क्रं.3 गैरहजर.
-# #- का र ण मि मां सा -# #-
यातील तक्रारदाराची तक्रार सकृतदर्शनी योग्य नाही हे उघडपणे स्पष्ट आहे. कारण तक्रारदाराने दिलेल्या भुखंडावर त्यांचे आपले नियंत्रण ठेवलेले दिसत नाही व ताबा सांभाळुन ठेवलेला दिसत नाही. त्यामुळे त्यावर अतिक्रमण झालेले असावे हे स्पष्ट होते. विक्रीपत्राप्रमाणे तक्रारदारास भुखंडाचा ताबा, नकाशा इत्यादी दिलले आहे असे नमुद आहे. तक्रारदाराने याबाबत कोणताही खुलासा केला नाही. पुढे तक्रारदाराने नियमितीकरण करण्याकरिता अर्ज केला तेव्हा मुदत वाढवुन मागीतली नाही. त्यांचा मुलगा मौक्का चौकशीचे वेळी हजर होता असे दिसते. इथपर्यत ही काही बिघडले नव्हते. त्यानंतर गैरअर्जदाराने 19/5/2010 रोजी तक्रारदाराला पत्र देऊन तक्रारदाराचा खुलासा मागीतला. ते पत्र तक्रारदाराला मिळाले , ते त्यांनी दाखल केले मात्र त्याचे कोणतेही उत्तर दिले नाही हे स्पष्ट आहे. त्यानंतर गैरअर्जदार क्रं.2 ने आपला आदेश पारित केला. तक्रारदारास या आदेशाविरुध्द काही वाद असले तर त्यांनी या आदेशाविरुध्द नियमाप्रमाणे अपील किंवा सुनावणी होत असेल त्या ठिकाणी आपले म्हणणे मांडावयास पाहिजे होते. त्यासाठी ग्राहक मंचात येण्याचे कोणतेही कारण नाही. गैरअर्जदार क्रं.3 चा दावा गैरअर्जदार क्रं.2 ने फेटाळला असे नमुद आहे. त्यामुळे तक्रारदाराने आपल्या दाव्याकरिता योग्य त्या न्यायालयात कारवाई करणे उचीत ठरते. यास्तव तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची निकली काढण्यात येते.
2. खर्च ज्याचा त्याने सोसावा.
3. तक्रारदार अन्य न्यायालयात दाद मागण्याकरिता गेल्यास या निकालात विचारात घेण्यात आलेली मते विचारात घेण्यात येऊ नये.