निकाल
दिनांक- 03.08.2013
(द्वारा- श्रीमती मजुंषा चितंलागे, सदस्या )
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार हे मौज हिंगणी (बु.) ता.जि. बीड येथील रहिवासी आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 शाखेत दि.08.12.2010 रोजी रु.2,00,000/- एक वर्षासाठी मुदत ठेवीमध्ये जमा केले होते. ती रककमेची मुदत दि.07.12.2011 रोजी संपली होती. मुदत ठेवीचा नंबर 076/001481 असा आहे. तक्रारदार यांने तिच रककम व्याजासह पुन्हा एक वर्षासाठी मुदत ठेवी मध्ये ठेवली. तिचा कालावधी दि.07.12.2011 ते 08.12.2012 असा होता. दि.06.01.2013 रोजी नातीचे लग्न ठरल्यामुळे तक्रारदाराने सामनेवाले क्र.3 कडे रक्कम व्याजासह रु.1,41,531/- ची मागणी केली. सामनेवाले क्र.3 यांनी सामनेवाले क्र.1 यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. दि.01.01.2013 रोजी परत मुदत ठेवीच्या रक्कमेची मागणी केली,परंतु सदर रक्कम देण्यास टाळाटाळ केली. शेवटी तक्रारदाराने दि.01.01.2013 रोजी सामनेवाले यांना लेखी नोटीस पाठविली. ती नोटीस सामनेवाला यांना दि.03.01.2013 रोजी प्राप्त झाली. नोटीस मिळून देखील सामनेवाले हयांनी रक्कम दिली नाही व नोटीसीचे उत्तर देखील दिले नाही. तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, मुदत ठेवीची रक्कम रु.2,87,323/- व त्यावर 18 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह मिळावेत तसेच नुकसान भरपाई म्हणून रु.20,000/- मिळावेत.
सामनेवाले क्र.1 ते 3 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दि.13.06.2013 रोजी दाखल केले आहे. हे मान्य नाही की, तक्रारदार यांनी मुदत ठेव रक्कमेची मागणी केली आहे. हे म्हणणे खोटे आहे की, सामनेवाले रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सामनेवाले यांनी सेवेत कसूर केलेला नाही. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही.सामनेवाले यांचे म्हणणे की, एक ते दोन वर्षापासून बँकेची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, बॅकेवर प्रशासक मंडळ नेमण्यात आले आहे. बँकेचे विविध संस्था व कर्जदारांकडून बाकी कर्ज अंदाजे येणे रक्कम रुपये दहाशे छत्तीस कोटी रुपये बाकी आहे व नवीन ठेवी येणे बंद झालेले आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीच्या पृष्टयर्थ शपथपत्र, पोस्टाची पोहच पावती, प्रशासकीय अधिकारी यांना दिलेले पत्र, मुदत ठेवीची पावती, पोस्टाची पावती इत्यादी कागदपत्राची छायाकींत प्रत दाखल केली आहे. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे सोबत लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र आणि सामनेवाले क्र.1 ते 3 यांचे लेखी म्हणणे व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले, तक्रारदारांचे वकील श्री. मकाळ यांचा युक्तीवाद ऐकला. न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात का की, सामनेवाला यांनी
त्यांना सेवा देण्या मध्ये त्रूटी केली आहे ? होय
2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदारांनी तक्रारी सोबत तक्रारदाराचे शपथपत्र पुरावा म्हणून सादर केलेले आहे.तसेच मुदती ठेवीच्या पावत्यांच्या छायाकिंत प्रती, सामनेवाला यांना रक्कमेची मागणी केली आहे त्याबाबतच्या पत्राची छायाकिंत प्रत, इत्यादी कागदपत्रांच्या छायाकिंत प्रती दाखल केल्या आहेत, सामनेवाला यांनी लेखी जवाबा पृष्टयर्थ कोणाचेही शपथपत्र दाखल केले नाही परंतु त्यांनी लेखी यूक्तीवाद दाखल केला आहे.
सामनेवाले यांचेकडे मुदत ठेवी केलेल्या आहेत याबाबत सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदारांनी मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारांची रककम परत दिली नाही. तसेच रक्कम का परत करु शकत नाही याबददल समर्पक उत्तर देखील दिले नाही सामनेवाले यांनी असा मुददा उपस्थित केला आहे की, तक्रारदाराची रककम बँकेकडे आहे परंतु बँकेची परिस्थिती अत्यंत हलाखीची व बँकेमध्ये अपहार झाल्यामुळे सदर बँकेवर एक ते दिड वर्षापासून प्रशासक मंडळ नेमण्यात आलेले आहे. परंतु सदरील कथन स्विकारता येणार नाही कारण तक्रारदार हे सामनेवाले बँकेचे ग्राहक असून त्यांनी मूदत ठेवी सामनेवाला बँकेत ठेवल्या आहेत. मुदत संपताच मुदत व त्यावर होणारे व्याज परत करण्याची सेवेची जबाबदारी सामनेवाला याची आहे. त्यात त्यांनी कसूर केला आहे.
तक्रारदारांची तक्रार, शपथपत्र व कागदपत्र तसेच सामनेवाले यांचा लेखी जवाब, व लेखी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाले यांनी तक्रारदारांची मुदत ठेवीतील रक्कम न देऊन सेवेमध्ये त्रुटी केली आहे असे मंचाचे मत आहे. ग्राहक हा रक्कम सुरक्षीत ठिकाणी रहावी व त्यांची रक्कम त्यांला वेळेवर परत मिळावी म्हणून तसेच त्यांस व्याज मिळावे म्हणून रक्कम बचत खात्यात न टाकता मुदत ठेवीमध्ये ठेवत असतो. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी त्यांची रक्कम सामनेवाले बँकेमध्ये ठेवली होती. परंतु सामनेवाला यांनी मुदत ठेवीची मुदत संपून सुध्दा तक्रारदारांना मुदत ठेवीची रक्कम दिली नाही व रक्कम न देण्याबाबत कोणतेही कारण दिले नाही. तसेच वेळोवेळी तक्रारदारांनी दिलेल्या पत्राची दखल सुध्दा घेतली नाही. तक्रारदार यांनी शपथपत्रात नमुद केले आहे की, त्यांच्या नातीचे लग्न दि.06.01.2013 रोजी ठरले होते, म्हणजे त्यांना रक्कमेची आवश्यकता होती. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झाला.म्हणून तक्रारदार हे मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच रक्कम न दिल्यामुळे तक्रारदारांला मंचात तक्रार दाखल करावी लागली त्यासाठी तक्रारीचा खर्च रु.2500/- देण्याता यावा.
सबब, मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला त्यांच्या मुदत ठेवीची
रक्कम रु.2,87,323/- (अक्षरी रुपये दोन लाख सत्यांशी हजार तिनशे
तेविस फक्त) ठरलेल्या व्याज दरा प्रमाणे 30 दिवसांचे आंत दयावी
3. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला त्यांचे ठेवीवर तक्रार
दाखल दि.08.02.2013 पासून द.सा.द.शे 10 टक्के दराने संपूर्ण
रक्कम मिळेपर्यत व्याज दयावेत.
4. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला मानसिक व शारीरिक
त्रासापोटी रु.1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत व तक्रारीच्या खर्चापोटी
रु.2500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) दयावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहकतक्रारनिवारणमंच, बीड.