निकालपत्र
निकाल दिनांक – ०५/०२/२०२०
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्वये सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी मौजे हनुमान वाडी, सोनई, ता. नेवासा, जि.अहमदनगर येथे गट क्रमांक ५७३ ही शेतजमीन असुन सदरील शेतजमिनीत तक्रारदार यांच्या मालकीचा गोठा आहे. सदर गोठ्यामध्ये दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने विविध जनावरे, गाई ठेवण्यात येतात. याशिवाय तक्रारदाराचे उपजिविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. तक्रारदार यांचा गोठा गट क्रमांक ५७३ मध्ये हनुमान वाडी शिवारात वस्ती वजा छप्पर आहे. त्या गोठ्यामध्ये जनावरे बांधण्याची जागा असुन दिनांक १९-०५-२०१६ दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सदरील शेत जमिनीमधुन गेलेल्या विजेच्या तारांच्या लपटीमुळे अचानक इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होऊन तेथे असलेल्या जनावरांचे चा-यास आणि भुश्यास आग लागुन गोठा पेटला व गोठ्यातील दावणीला बांधलेल्या पाच मोठ्या जर्शी गायी व एक कालवड जागीच भाजुन जळाल्याने मयत झाल्या तसेच गोठ्याच्या दावणीच्या बाजुस असलेल्या आठ गाया व पाच कालवडी भाजुन गंभीर जखमी झाल्या आणि सदरील गोठ्याचे व चा-याचे जळुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सदर घटनेबाबत तक्रारदाराने त्याच दिवशी सामनेवाले यांचे वायरमन, कामगार, तलाठी, पोलिस स्टेशन यांना खबर दिली. यानुसार मा. कामगार तलाठी साहेब व इतर पंचानी समक्ष तक्रारदाराच्या शेतजमिनीस भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली व दिनांक १९-०५-२०१६ रोजी पंचासमक्ष जबाब घेऊन पंचनामा केला. त्यानुसार शॉर्ट सर्कीटमुळे तक्रारदाराचे गट नं.५७३ मधील जनावराच्या गोठ्यास आग लागुन जनावरांची प्राण हानी होऊन जळालेल्या मालावे वर्णनाप्रमाणे पाच जर्शीगाई, एक कालवड यांचा मृत्यु झाला. तसेच पाच गाई, पाच कालवडी भाजलेल्या होत्या आणि गोठ्याचे व चा-याचे नुकसान होऊन तक्रारदाराचे एकुण रक्कम रूपये ८,१०,०००/- चे नुकसान झाले. सदर नुकसान सामनेवाले यांनी सदरील वीज तारांबाबत दाखविलेल्या निष्काळतीपणामुळे झाले असुन सामनेवाले यांनी तक्रारदाराला नुकसान भरपाई देणे भाग पडते. परंतु त्यांनी काही त्यावर दखल घेतली नाही. म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
३. तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवालेने तक्रारदारास झालेले एकुण नुकसान रक्कम रूपये ८,१०,०००/- व्याजासह देण्याचा हुकुम व्हावा, तसेच तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च देणेचा आदेश व्हावा.
४. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सामनेवाले प्रकरणात हजर होऊन निशाणी १४ वर त्यांची कैफीयत दाखल केली. सामनेवालेने कैफीयतीत असे कथन केले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. सामनेवालेने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २ नुसार ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारदार यांना गट क्रमांक ५७३ मध्ये कोणत्याही प्रकारे वीज पुरवठा दिलेला नाही. त्या दरम्यान ग्राहक विक्रेता यांचे नाते नाही. सदर तक्रार चालविण्याचे या मंचाला कोणतेही अधिकारक्षेत्र नाही. सदर तक्रारविषयी दिवाणी न्यायालयात तथाकथित नुकसान भरपाई मिळणेबाबत अर्ज दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक होत. म्हणुन सदर तक्रार खारीज होणेस पात्र आहे. मा. विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग यांनी गट क्रमांक ५७३ मधुन गेलेल्या या सामनेवाले यांचे ३ फेज ३ वायर लघुदाब वाहिनीच्या तारा इत्यादीची त्याखाली उतरवुन पाहणी केली. सदरहु पाहणीमध्ये त्यांना सदरच्या तारांवर कुठेही स्पार्किंगच्या खुणा अथवा जॉईन्टस आढळले नाहीत. तसेच घटनेच्या दिवशी म्हणजेच दिनांक १९-०५-२०१६ रोजी सदर घटनास्थळावरील लघु दाब वाहिनीचा विद्युत पुरवठा सुरळीत सरू होता व तक्रारदार यांचे तथाकथित गायीच्या गोठ्यावरून अगर गोठ्याजवळुन या सामनेवाले यांची कुठलीही लघु दाब वाहिनी अगर उच्च दाब वाहिनी गेलेली नाही. त्यामुळे सदरच्या तथाकथीत अपघातास सामनेवाले हे कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत असा लेखी अहवाल त्यांनी दिनांक २०-०७-२०१६ रोजी दिलेला आहे. सदरची तथाकथित आग ही विद्युतीय कारणामुळे न लागल्याचे निश्चितपणे स्पष्ट होते. तक्रारदाराने सदर तक्रार गैरहेतुने दाखल केलेली असुन, खारीज होणेस पात्र आहे. तक्ररदार यांनी गायींच्या विमा पॉलिसीनुसार संबंधीत विमा कंपनीस कळविलेले होते व त्यानुसार त्यांना संबंधीत विमा कंपनीकडुन नुकसान भरपाई मिळालेली आहे, ही बाब या सामनेवाले यांना समजली आहे. तक्रारदार यांनी सामनेवालेंचे बरोबर कोणताही पत्र व्यवहार केलेला नाही. सदरच्या तथाकथित पंचनाम्याचेकामी सामनेवाले यांना कोणतीही सुचना दिलेली नव्हती. म्हणुन सदर पंचनामा सामनेवाले यांना मान्य नाही. तक्रारदाराला विमा कंपनीकडुन गायींची रक्कम मिळाली असुनही सदर बाब मंचासमक्ष लपवुन तक्रारदाराने एक प्रकारे कोर्टाची फसवणुक केलेली आहे. तक्रारदाराने सामनेवालेला कोणतीही नोटीस दिलेली नव्हती व नाही. म्हणुन सदर अर्ज खारीज करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्तऐवज सामनेवालेने दाखल केलेला जबाब, दस्तऐवज पाहता व उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकला असता मंचासमक्ष खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवालेने तक्रारदाराप्रती न्युनतम सेवा दर्शवीली आहे काय ? | नाही |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
६. तक्रारदाराने निशाणी क्रमांक १९ वर दोन विद्युत देयकांचे छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. सदर विद्युत देयकांमध्ये तक्रारदाराचे वडीलांचे नाव नमुद आहे व त्याचा पत्ता सोनई, तालुका नेवासा, अहमदनगर असा दर्शविण्यात आलेला आहे. म्हणुन तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ -
७. निशाणी क्रमांक १६ खाली तक्रारदाराने विद्युत पुरवठ्याचे देयक दाखल केलेले असुन सदर विद्युत पुरवठा तक्रारदाराने गट क्रमांक ५७३ येथे असेलेली शेत जमीन हनुमान वाडी, सोनई, ता.नेवासा, जि.अहमदनगर याकरीता घेतलेला होता, ही बाब तक्रारदार तक्रारीत शपथपत्राद्वारे सिध्द करू शकले नाही. सामनेवालेने निशाणी क्रमांक १६ वर विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, अहमदनगर यांनी दिलेला दिनांक २०-०७-२०१६ रोजीचे अहवालाची छायांकीत प्रत दाखल केलेली आहे. त्याची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, वादातील घटनास्थळापासुन अंदाजे ३० फुट अंतरावर म.रा.वि.वि.कं.मर्या. यांच्या मालकीच्या १०० के.व्ही.ए. क्षमतेच्या रोहित्रापासुन पाचव्या क्रमांकाच्या स्पॅनमध्ये उभ्या मांडणीच्या, तारांमधील परस्पर लंबांतर नियमानुसार असणारी कृषीपंपाची ३ फेज ३ वायर लघुदाब वाहिनी आहे. सदर ३ फेज ३ वायर लघुदाब वाहिनीच्या तारा खाली उतरवुन तपासणी केली असता सदर ३ फेज ३ वायर लघुदाब वाहिनीच्या तारांवर कुठेही स्पार्कींगच्या खुणा अथवा जॉईंटस आढळले नाही. तसेच घटनेच्या दिवशी दिनांक १९-०५-२०१६ रोजी सदर घटनास्थळावरील ३ फेज ३ वायर लघुदाब वाहिनीचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होता. सदर गायीच्या गोठ्यावरून, गोठ्याजवळुन म.रा.वि.वि.कं.मर्या. यांची कुठलीही लघुदाब वाहिनी अथवा उच्चदाब वाहिनी गेलेली नाही. म्हणुन सदर गोठ्यांना झालेला अपघात दुस-या कारणाने झाला असावा असे निदर्शनास येते, असा अहवाल प्रकरणात नमुद आहे. तक्रारदाराने दाखल केलेले निशाणी क्रमांक ६ सोबतचे दस्तांची पडताळणी करतांना व जबाब यांची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, त्या आग जळुन झालेल्या घटनेमध्ये गायींचा मृत्यु झाला. सदर घटना दिनांक १९-०५-२०१६ रोजी दुपारी २.३० वाजता झाली होती. परंतु सदर घटनेचे पत्र तक्रारदाराने सामनेवाले यांना दिनांक ०५-०७-२०१६ रोजी दिले होते, असे निशाणी क्रमांक १६ खाली दाखल केलेल्या अहवालावरून सिध्द होते. तक्रारदाराने निशाणी क्रमांक १९ खाली घटनास्थळच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. त्या छायांकीत प्रतीवरून असे दिसुन येते की, सदर गोठ्यात आगीची जळीत घटना झाली होती. परंतु त्याचेवरून किंवा त्याचे जवळुन सामनेवालेची विद्युत वाहीनी गेली होती, हे दिसुन येत नाही. सबब सदर तक्रारीत तक्रारदार हे सिध्द करून शकले नाही की, तक्रारदाराचे गट क्रमांक ५७३ मध्ये सामनेवालेकडुन तक्रारदाराने विद्युत पुरवठा घेतलेला होता व त्या शेतात बांधलेल्या गोठ्यावरून विद्युत प्रवाहाची वाहीनी गेलेली होती. सबब तक्रारदाराचे नुकसानीन भरपाईची मागणीबाबत सामनेवालेने कोणताही निर्णय घेतला नसल्याने कोणतीही तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी दर्शवीली नाही, असे सिध्द होते. म्हणुन मुद्दा क्रमांक २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
८. मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. |
२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. |
३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी. |
४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |