मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 15/09/2011)
1. सदर तक्रार तक्रारकर्त्याने ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये संयुक्तरीत्या दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, गैरअर्जदार कंपनीने ग्राहकांना आकर्षीत करण्याकरीता “Vehicle of your choice, Income is our assurance” अशा आशयाची जाहिरात दिली. सदर जाहिरातीनुसार तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराने जाहिर केलेल्या योजने अंतर्गत टाटा इंडिया डी एल एस या चार चाकी वाहनांची निवड केली व रु.85,000/- गुंतविल्याचे ठरवून दि.14.05.2009 रोजी तक्रारकर्ता क्र. 1 यांचे नावे रु.20,000/- देऊन चार वाहनांची नोंदणी केली. तक्रारकर्त्याने दि.18.05.2009 रोजी चार वाहनांकरीता रु.85,000/- प्रति वाहन यानुसार दि.3,20,000/- धनादेशाद्वारे गैरअर्जदाराकडे जमा केलेत. हा तक्रारकर्ता क्र. 2 यांचे नावे असलेला धनादेश गैरअर्जदाराकडे देऊन संयुक्तपणे या योजनेत सहभाग घेतला.
गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यांना असे सांगितले की, लवकरच करारनामे नोंदणीकृत करुन जून 2009 पासून प्रतिमाह रु.6055/- मासिक उत्पन्न तक्रारकर्त्यांना धनादेशाद्वारे देण्यात येईल. गैरअर्जदार क्र. 1 यांनी उभय तक्रारकर्त्यांतर्फे तक्रारकर्ता क्र. 2 यांच्याशी करार करुन तो गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे पाठविला व दि.24.06.2009 रोजी करारनामे तक्रारकर्ता क्र. 2 यांचे अनुपस्थीत नोंदणीकृत केलेत. त्यामुळे ते गैरकायदेशीर आहेत. सदर योजनेच्या अटीनुसार गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ता क्र. 2 यांना जून 2009 ते मे 2010 या कालावधीचे रु.6055/- चे 48 धनादेश दिलेत. ते ऑक्टोबर 2009 पर्यंत वटविल्या गेलेत. परंतू त्यानंतरचे धनादेश वटविल्या गेले नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. अशा त-हेने नोव्हेंबर 2009 पासून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांना मासिक उत्पन्न देण्याचे बंद केल्याने गैरअर्जदारांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे, म्हणून तक्रारकर्त्याने दिलेले पैसे गैरअर्जदारांनी परत करावे, तसेच नुकसान भरपाईकरीता सदर तक्रार या मंचासमोर सादर केलेली आहे.
2. सदर तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर दैनिक वर्तमानपत्रात नोटीस प्रकाशित करुन बजावला. परंतू गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे मंचासमोर हजर झाले नाही किंवा त्यांनी आपले लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.20.07.2011 रोजी पारित केला.
3. प्रस्तुत प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता आल्यावर, तक्रारकर्त्याचे वकिलांनी पुरसिस दाखल करुन तक्रार व दाखल दस्तऐवज हाच त्यांचा युक्तीवाद समजण्यात यावा अशा आशयाचे निवेदन केले. गैरअर्जदार अनुपस्थित. मंचाने दाखल दस्तऐवजांचे व शपथपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. सदर प्रकरण हे तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे सादर केलेले असून प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे यावरुन स्पष्ट होते की, निर्विवादपणे तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी जाहिर केलेल्या “Vehicle of your choice, Income is our assurance” या योजने अंतर्गत सहभाग घेतला. तक्रारकर्ता क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना नोंदणीकरीता रु.20,000/- व तक्रारकर्ता क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांना चार वाहनांच्या योजनेकरीता रु.3,20,000/- अदा केलेत ही बाब दस्तऐवज क्र. 1 व 2 वरुन स्पष्ट होते. दस्तऐवज क्र. 3 वरुन असेही निदर्शनास येते की, गैरअर्जदार क्र. 2 यांचेशी या योजनेअंतर्गत करारनामा करुन तो नोंटरीकडे नोंदणीकृत केला. या करारनाम्यानुसार गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास रु.6055/- दरमहाप्रमाणे प्रत्येक महिन्याचे 10 तारखेपर्यंत द्यावयाचे होते. तक्रारकर्त्याचे शपथेवरील कथनानुसार त्यांना गैरअर्जदारांनी दिलेले 48 धनादेशापैकी ऑक्टोबर 2009 पर्यंतचे धनादेश वटल्या गेलेत, म्हणजेच पाच महिन्यांचे रु.6055/- दरमहाप्रमाणे रु.6055 X 5 = 30,275/- तक्रारकर्त्यांना प्राप्त झालेत. तक्रारकर्त्याचे हे म्हणणे खोडून टाकण्यास कुठलाही पूरावा गैरअर्जदाराने सादर न केल्यामुळे, तक्रारकर्त्याचे हे कथन ग्राहक मंच मान्य करीत आहे.
5. वरील वस्तूस्थितीवरुन हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला करारनाम्यानुसार रक्कम अदा न करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे वरील तक्रारकर्त्यास प्राप्त झालेली रक्कम रु.30,275/- वजा करुन उर्वरित रक्कम म्हणजेच रु.3,20,000/- - रु.30,275/- = रु.2,89,725/- तक्रारकर्त्यास परत करण्यास गैरअर्जदार बाध्य राहील.
6. दस्तऐवज क्र. 1 वरील पावतीवरुन असे दिसते की, तक्रारकर्ता क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना नोंदणीकरीता रु.20,000/- दिलेत व दस्तऐवज क्र. 2 वरील पावतीवरुन असे दिसते की, तक्रारकर्ता क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना रु.3,20,000/- चार वाहनांच्या योजने अंतर्गत अग्रीम राशी म्हणून दिलेत. त्यामुळे तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांना त्याप्रमाणे रकमा परत करण्याची जबाबदारी गैरअर्जदारावर राहील. मुख्य करारनामा ठाणे (महाराष्ट्र) येथील मुख्य शाखेशी झाला, म्हणजेच रक्कम गैरअर्जदार क्र. 1 द्वारे गैरअर्जदार क्र. 2 यांना प्राप्त झाली, त्यामुळे सदर रक्कम परत करण्यास गैरअर्जदार 1 व 2 वैयक्तीक व संयुक्तरीत्या जबाबदार राहतील. सबब खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्ता क्र. 1 यांना रु.20,000/- परत करावे.
3) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्ता क्र. 2 यांना रु.2,89,725/- परत करावे.
4) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना दाव्याच्या खर्चापोटी रु.3,000/- द्यावे.
5) या रकमांवर गैरअर्जदारांनी द.सा.द.शे. 12 टक्के व्याज, तक्रारकर्त्यांनी रकमा जमा केल्याच्या तारखेपासून तर रक्कम प्रत्यक्ष मिळेपर्यंत द्यावे.
6) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वैयक्तीकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.