जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 48/2011.
तक्रार दाखल दिनांक : 11/02/2011.
तक्रार आदेश दिनांक : 31/05/2012.
निकाल कालावधी: 01 वर्षे 03 महिने 20 दिवस
श्री. अनंतराव परशुराम पिंगळे, वय 65 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. चव्हाण प्लॉट, उपळाई रोड, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. प्रोप्रायटर, पंचगंगा सिड्स प्रा.लि., एफ-15, एम.आय.डी.सी.
वाळूज, ता.जि. औरंगाबाद, पीन 431 136. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: एस.जी. गायकवाड
विरुध्दपक्षयांचेतर्फेविधिज्ञ:ए.एस. तिपोळे
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांची मौजे श्रीपतपिंपरी येथे गट नं.598/2, क्षेत्र 2.19 आर. शेतजमीन क्षेत्र आहे. मागील 10 वर्षापासून ते सदर शेतजमिनीमध्ये तूर पिकाची लागवड करीत आहेत. त्यांनी विरुध्द पक्ष कंपनीचे तूर मोती बॅच नं.009 बियाणे रु.1,000/- किंमतीस बार्शी येथील ए.एस. अग्रो एजन्सी यांच्याकडून खरेदी केले. योग्य मशागत, पाणी नियोजन, खते, औषधांचा वापर करुन तूर बियाण्याची लागवड केली. त्यानंतर तुर पिकाची वाढ झाली, परंतु पिकास 6 महिन्याच्या कालावधीनंतरही शेंगाफळ आले नाही. विरुध्द पक्ष यांच्या सदोष / बोगस बियाण्यामुळे तक्रारदार यांचे रु.4,00,000/- चे नुकसान झाले असून प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी सदर नुकसान भरपाईची विरुध्द पक्ष यांच्याकडून मागणी केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर दि.3/5/2011 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे कथन पुढीलप्रमाणे :-
विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. पंचगंगा सिड्स प्रा.लि. नांवे औरंगाबाद येथे कंपनी असून ते दर्जेदार व उच्च प्रतिचे बियाण्याचे उत्पादन करतात. तक्रारदार यांना दिलेले तूर बियाणे उच्च प्रतिचे असून ते मुळीच दोषीत नव्हते व नाही. त्यांनी बार्शी येथील डिलर मुनोत एन्टरप्रायजेस यांच्यामार्फत विक्री केले असून सबडिलर एस.एस. अग्रो एजन्सी यांच्याकडून तक्रारदार यांनी बियाणे खरेदी केले आहे. त्या बियाण्याविषयी तक्रारदार यांच्याशिवाय कुठल्याही शेतक-याची तक्रार नाही. तूर पिकाची वाढ चांगल्याप्रकारे झालेली असून पिकास फुले व कळया आलेल्या आहेत. तसेच शेंगामध्ये दाणे भरुन तक्रारदार यांना चांगले उत्पन्न मिळालेले आहे. तूर पिकाची वाढ व उत्पन्न मिळणे हे सर्वस्वी हवामान, तापमान, खते, औषधे, जमिनीचा पोत, नैसर्गिक घटक, पाणी इ. वर अवलंबून असते. तक्रारदार यांनी बियाणे लागवड केली त्या कालावधीत म्हणजेच सन 2010 मध्ये महाराष्ट्र राज्यात व सोलापूर जिल्ह्यात ठीकठिकाणी ढगाळ हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे व धुक्याच्या सातत्याच्या वातावरणामुळे तुरीचा फुलोरा फुलगळ होणे, वाढ खुंटणे असे प्रकार झालेले आहेत. तुरीच्या पिकावर रोग पडलेले आहेत. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेला तूर पिकाचा दि.30/12/2010 रोजीचा अहवाल अमान्य आहे. तो त्यांच्या पश्चात केलेला असून त्यांना पूर्वकल्पना दिलेली नाही. अहवाल शासकीय परिपत्रकाप्रमाणे नाही आणि त्यांच्यावर बंधनकारक नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार-अर्ज, विरुध्द पक्ष यांची कैफियत, दोन्ही पक्षांनी दाखल कागदपत्रे, प्रतिज्ञालेख, लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारणमिमांसा देऊन पुढील आदेश पारीत करण्यात आले.
3.1) सदर तक्रार-अर्जामध्ये तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष नं.1 पंचगंगा सिड्सचे प्रोप्रायटर यांना विरुध्द पक्ष केले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 एस.एस. अग्रो एजन्सी, बार्शी यांना विरुध्द पक्षकार म्हणून पार्टी केले होते व आहे. परंतु सदर तक्रार दि.11/2/2011 रोजी दाखल केल्यापासून अखेरपर्यंत विरुध्द पक्ष क्र.2 यांना नोटीस बजावणी झाली नाही व होत नाही, या कारणाने तक्रारदार यांनी दि.23/5/2011 रोजी अर्ज दाखल केला व त्यामध्ये विरुध्द पक्ष क्र.2 यांचे नांव कमी करण्याकरिता विनंती केली. अर्ज मंजूर करण्यात आल्याने विरुध्द पक्ष क्र.2 यांचे नांव सदर तक्रार-अर्जामधून कमी करण्यात आले असल्याने त्यांच्या विरुध्द कोणतेही आदेश पारीत करण्यात आले नाहीत. वास्तविकरित्या तक्रारदार यांनीही विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या विरुध्द अर्जामध्ये कोणतीही मागणी केलेली नाही. तथापि, असे असले तरी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडूनच तक्रारदार यांनी तूर पिकाचे बियाणे खरेदी केले होते व विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.1 यांचे एजंट आहेत. म्हणून पक्षकार करण्यात आले होते. परंतु असे असले तरी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये विक्री करण्यात आलेल्या बियाण्याबाबत कोणतेही आक्षेप घेतलेले नाहीत. दाखल पावती मान्य केलेली आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या विरुध्द तक्रार-अर्ज सुनावणी करण्यात आला आहे आणि अंतीम निर्णय देण्यात आला आहे.
3.2) तक्रारदार यांनी एस.एय. अग्रो एजन्सी यांच्याकडून विरुध्द पक्ष या कंपनीचे बियाणे दि.10/6/2010 रोजी तूर मोती बॅच नं. 009 हे खरेदी केले. त्याची पावती अभिलेखावर दाखल आहे. ती पावती विरुध्द पक्ष यांनी मान्य केलेली आहे. तक्रारदार यांनी सदरचे तूर बियाणे शेतजमिनीमध्ये पेरणी केल्यानंतर त्याची उगवण झालीच नाही. अद्यापि तुरीच्या शेंगा आलेल्या नाहीत. 6 महिने कालावधी लोटला तरीही उत्पन्न न मिळाल्याने बियाणे हे बोगस आहे. म्हणून त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई रु.4,00,000/- मिळावी, अशी मागणी केली आहे. बियाणे पेरणी केल्यानंतर औषधाची फवारणी, नांगरणी, लागवड यासाठी काळजी घेतलेली आहे व त्यावर रु.50,000/- खर्च केलेला आहे. रु.4,00,000/- चे उत्पन्न मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. म्हणून असा खर्च विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळावा, अशी मागणी केली आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी दि.3/5/2011 रोजी लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला आहे. त्यामध्ये तक्रार-अर्ज खोटा, चुकीचा व काल्पपिक आहे, मान्य नाही. विरुध्द पक्ष कंपनी ही नामांकीत कंपनी आहे. औरंगाबाद येथे कंपनी असून दर्जेदार बियाण्याचे उत्पादन करते. बियाणे हे शेती खात्यामधील तज्ञ अधिका-यांच्या देखरेखीखाली उत्पादीत केल्यानंतर प्रयोगशाळेमध्ये चाचणी केल्यानंतर सीड अक्टप्रमाणे प्रमाणित केल्यानंतर सदरचे बियाणे बाजारात विक्रीसाठी आणले आहे. त्यामुळे दोषीत नाही. सदरचे बियाणे बार्शी येथील डिलर मुनोत यांच्यामार्फत विक्री केले आहे व त्यांचे सब-डिलर एस.एस. अग्रो एजन्सी यांच्याकडून तक्रारदार यांनी बियाणे खरेदी केलेले आहे. बियाण्याबाबत अन्य शेतक-यांची तक्रार नाही. त्यामुळे बियाण्यात दोष नव्हता, असे नमूद केले आहे. परंतु सामनेवाला यांनी त्यांचे बियाणे हे उत्तम होते, याबाबत कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. विरुध्द पक्ष यांनी तुरीच्या बियांपासून आलेल्या पिकास फुल व कळ्या आलेल्या आहेत व फुले, कळ्यांचे रुपांतर शेंगामध्ये होऊन दाणे भरुन तक्रारदारांस उत्पन्न मिळालेले आहे. शेंगा येणे, तूर पिकाची वाढ होणे, त्यापासून उत्पन्न येणे, या सर्वस्वी बाबी हवामान, तापमान, खते, औषधे, जमिनीचा पोत, नैसर्गिक घटक, पाणी इ. वर अवलंबून असते. तक्रारदार यांनी बियाणे लागवड केली, त्यावेळी सन 2010 मध्ये महाराष्ट्रात तसेच सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे व धुक्याच्या सातत्याच्या वातावरणामुळे तुरीचा फुलोरा (फुलगळ) होणे, वाढ खुंटणे असे प्रकार झालेले आहेत. सदरील हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे तुरीचे पिकावर रोग पडलेले आहेत. तसेच त्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये माहिती आलेली आहे. या मुद्याची दखल घेऊन व आधार घेऊन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचा तक्रार-अर्ज नाकबूल केला आहे. परंतु सदर कालावधीमध्ये सन 2010 मध्ये हवामान व तापमान हे तुरीच्या पिकास योग्य नव्हते, हे दाखविण्याकरिता व मंचासमोर सिध्द करण्याकरिता कोणताही आवश्यक कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. म्हणून या मुद्याची विरुध्द पक्ष यांच्या बाजुने दखल घेता येणार नाही.
3.3) तक्रारदार यांनी त्यांचे पीक व तुरीचे दाणे हे योग्यरितीने 6 महिने 10 दिवस होऊन गेल्यानंतरही न आल्याने कृषि विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार-अर्ज दाखल केला होता व आहे. त्यानुसार कृषि विकास अधिकारी, सोलापूर यांनी दि.24/1/2011 रोजी तक्रारदार यांच्या बार्शी येथील गट नं.589/2 मध्ये तूर प्लॉटची प्रत्यक्षात भेट दिली व समितीने काढलेला निष्कर्ष अहवालाची प्रत जोडून तक्रारदार यांना अहवाल दिलेला आहे. या अहवालावर विरुध्द पक्ष यांनी गंभीर आक्षेप नोंदविलेले आहेत. त्या अहवालाचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता, अहवाल हा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर, प्रतिनिधी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, प्रतिनिधी, महाबीज, सोलापूर यांच्यासमोर प्रत्यक्षात शेतीची पाहणी करुन अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याबाबतची तक्रारदार यांनी वस्तुस्थिती सिध्द करण्याकरिता मंचासमोर फोटो दाखल केलेले आहेत. त्यावरुन तक्रारदार यांची पीक पाहणी ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेली आहे, हे मंचाने मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. परंतु सदर अहवालावरती नमूद अधिका-यांच्याशिवाय साक्षीदार व प्रत्यक्ष उपस्थित तक्रारदार, विरुध्द पक्ष यांच्या कोणाच्याही सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच परीक्षण करतेवेळी विरुध्द पक्ष यांना नोटीस देण्याचे अत्यंत आवश्यकता व कायदेशीररित्या गरज होती व आहे. परंतु तशी दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून विरुध्द पक्ष यांनी अहवालावर गंभीररित्या आक्षेप नोंदविलेले आहेत व अहवाल मान्य नसल्याचे नमूद केले आहे. त्याकरिता बियाण्यात उगवणशक्ती कमी असते किंवा पीक पेरणीनंतर भेसळ निघाल्यानंतर चौकशी करण्याबाबत संचालनालयाचे पत्र दि.10 जून 1082 व 2 जून 1984 याचे परिपत्रक मंचामध्ये दाखल केले आहे. त्यामध्ये कोणकोणत्या स्थितीमध्ये कृषि अधिकारी व मोहीम अधिका-यांनी बियाण्याची व शेतजमिनीची पाहणी व अहवाल कोणत्या पध्दतीने दाखल करावा, याबाबतचे सर्व मुद्दे नमूद केले आहेत. त्या नमूद मुद्याप्रमाणे कृषि अधिकारी व अन्य अधिकारी यांनी तक्रारदार यांचा निविष्ठा तक्रार निवारण समितीचा अहवाल दाखल करताना योग्य ती दक्षता घेतलेली नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्टया त्या अहवालाची झळ साहजिकच तक्रारदार यांना पोहोचलेली आहे. कृषि विकास अधिकारी व मोहीम अधिकारी व अन्य प्रतिनिधी यांनी अहवाल कोणत्या पध्दतीने तयार करावा, त्यामध्ये निष्कर्षात नेमके कोणते मुद्दे नमूद करावेत, याबाबीमध्ये तज्ञ असूनही योग्य ती दखल घेतलेली नाही. निष्कर्षामध्ये तक्रारदार यांनी खरेदी केलेले तुरीचे बियाणे हे बोगस बियाणे आहे, याबाबत कोणतेही मुद्दे स्पष्ट केलेले नाहीत. तसेच उत्पादनात सरासरी 50 टक्के घट येण्याची शक्यता वाटते, असे गृहीततेवर निष्कर्ष काढलेले आहेत. यामुळे तक्रारदार यांना त्यांचे बियाण्यापासून नुकसान होऊनही तांत्रिकदृष्टया अनेक अडचणींना सामोरे जाणे भाग पडते व नुकसान होऊनही त्या नुकसानीची भरपाई तक्रारदार यांना मिळू शकत नाही. या सर्व घटनेस कृषि विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, प्रतिनिधी हेच जबाबदार आहेत. कारण या तज्ञ व्यक्ती आहेत, असे कायद्याने मान्य व गृहीत धरलेले आहे. त्यामुळे अहवाल कोणत्या पध्दतीने तयार करावेत, पंचनामा कसा असावा यांची पूर्ण ज्ञान असूनही त्याप्रमाणे दखल घेण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे व या कारणानेच तक्रारदार शेतकरी ग्राहकास न्यायापासून वंचित रहावे लागते व या ठिकाणीही हाच मुद्दा मंचासमोर आल्याने अखेर नाईलाजाने त्याची दखल घेणे मंचास भाग पडले आहे. विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर मा. राज्य आयोगापुढील अपील नं. 1139/2009, 1587/2007, 1475/2007, 1476/2007, 671/2007, 857 ते 860/02 मध्ये दिलेले निवाडे, तसेच ए.आय.आर.1999 सुप्रीम कोर्ट 3318, 4 (2010) सी.पी.जे. 119 (एन.सी.) हे न्यायिक दृष्टांत दाखल केलेले आहेत. त्या सर्व न्यायिक दृष्टांतामध्ये अहवालावरच भर दिलेला आहे व अहवाल शाबीत न झाल्यास तक्रारदार यांना नुकसान भरपाई देता येत नाही. परिपत्रकाप्रमाणे अहवाल दाखल करणे व असणे आवश्यक आहे. म्हणून तक्रारदार यांना नुकसान भरपाई रक्कम देता येत नाही व त्यांना वंचित रहावे लागले आहे. म्हणून आदेश.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार-अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
2. उभय पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षकारांना निकालपत्राच्या साक्षांकीत प्रती नि:शुल्क पाठवाव्यात.
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. विद्युलता जे. दलभंजन)(सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/श्रु/31512)