जिल्हाग्राहकतक्रारनिवारणमंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 81/2010.
तक्रार दाखल दिनांक : 03/03/2010.
तक्रार आदेश दिनांक : 16/03/2013. निकाल कालावधी: 03 वर्षे 00 महिने 13 दिवस
शंकर गेनदेव पवार, व्यवसाय : शेती,
रा. दारफळ (गावडी), ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
(1) इंडस सिडस्, 141, 11 वा क्रॉस, आयडल होम्स्
टाऊनशिप, राजाराजेश्वरी नगर, बेंगलोर – 560 098.
(2) महावीर कृषि सेवा केंद्र,
शिवाजी चौक, कळंब, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: ए.व्ही. कदम
विरुध्दपक्षक्र.2 यांचेतर्फेविधिज्ञ:बी.आर. पवार
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की,
त्यांची मौजे दारफळ (गावडी), ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर येथे जमीन गट नं.345/1, क्षेत्र 1 हे. 26 आर. शेतजमीन आहे. त्यांनी दि.30/6/2009 रोजी त्यांच्या मुलामार्फत विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उत्पादीत केलेले रु.720/- किंमतीचे एक कि.ग्रॅ. घेवडा बियाणे (Dolichos Beans Babil)विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून खरेदी केले. दि.4/7/2009 रोजी त्यांनी मशागत करुन त्या बियाण्याची लागवड शेतजमिनीत केली. मशागतीकरिता त्यांना एकूण रु.27,750/- खर्च आला. विरुध्द पक्ष यांनी प्रथम पीक उत्पादन हे 45 ते 50 दिवसांमध्ये व उर्वरीत पीक उत्पादन साप्ताहीक मिळणार असल्याचे सांगितले होते. तसेच एक किलोकरिता 810 किलो साप्ताहीक उत्पादन मिळेल, अशी हमी दिली होती. परंतु 15 आठवडे उलटूनही तक्रारदार यांना कोणतेही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे त्यांचे रु.2,50,000/- चे नुकसान झाले. त्याबाबत विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत नोटीस पाठविली असता विरुध्द पक्ष क्र.1 यांच्यातर्फे श्री. आष्टगे येऊन पाहणी केली; परंतु पंचनामा केला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे पीक नुकसान भरपाईपोटी रु.2,50,000/-, मशागत खर्च रु.27,000/-, मानसिक त्रासापोटी रु.23,000/- व तक्रार खर्च रु.3,000/- विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही ते मंचासमोर उपस्थित झाले नाहीत आणि लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.7/9/2010 रोजी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले असून त्यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे :-
विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांची तक्रार चुकीच्या व खोटया कथनावर आधारीत असल्यामुळे अमान्य केली आहे. त्यांनी तक्रारदार यांना बियाण्यापासून मिळणा-या उत्पन्नाबाबत कधीही हमी दिलेली नाही. सन 2009 मध्ये पाऊस कमी पडलेला होता आणि वातावरण दुषित होते. तसेच तक्रारदार यांचे क्षेत्र सोलापूर पासून जवळ असल्यामुळे तापमान जास्त असते. त्यामुळे तक्रारदार यांना पाहिजे तेवढे उत्पन्न मिळू शकले नाही. त्याकरिता विरुध्द पक्ष क्र.2 जबाबदार नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेले पंचनामा देणा-या व्यक्ती सक्षम अधिकारी नाहीत. त्यामुळे ते पंचनामे व दाखल विचारात घेता येणार नाहीत. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती केली आहे.
4. तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार-अर्ज, विरुध्द पक्ष यांची कैफियत, दोन्ही पक्षांनी दाखल कागदपत्रे, प्रतिज्ञालेख, लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारणमिमांसा देऊन पुढील आदेश पारीत करण्यात आले.
4.1) सदर तक्रार-अर्जामध्ये तक्रारदार यांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे घेवडा बियाणे दि.30/6/2009 रोजी खरेदी केले आहे. शेतामध्ये मशागत दि.4/7/2009 रोजी करुन लागवड केली. विरुध्द पक्ष यांनी प्रथम पीक उत्पादन हे 45 ते 50 दिवसांमध्ये व उर्वरीत उत्पादन साप्ताहीक मिळणार असल्याचे सांगितले होते. 1 किलोकरिता 810 किलो साप्ताहीक उत्पादन मिळेल, अशी हमी दिली होती. परंतु 15 आठवडे उलटूनही तक्रारदार यांना कोणतेही उत्पादन मिळालेले नाही. म्हणून तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे तक्रार केल्यानंतर श्री. अस्तगे यांनी वस्तुस्थितीची पाहणी केली व दि.12/11/2009 रोजी पंचनामा केला. तक्रारदार यांच्या शेतामध्ये बियाणे पेरल्यानंतर रोपांची उत्तम वाढ झालेली आहे. ते सिध्द करण्याकरिता अनुक्रम क्र.4, 5 व 6 वर फोटो दाखल केलेले आहेत. त्याचीही सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता संपूर्ण वेलीला कधीही घेवड्याची फुले व घेवडयाच्या शेंगा लागल्याचे दिसून येत नाही. तक्रारदार यांनी गावकामकार तलाठी, दारफळ, ता. उत्तर सोलापूर यांचा पिकाबाबतचा दाखला दाखल केलेला आहे. त्यामध्ये 0.40 आर. एवढे पीक पेरल्याचे नमूद केले आहे. यावरुन तक्रारदार यांनी घेवडा पीक लागवड केले होते, हे सबळ पुराव्याने सिध्द होते व झालेले आहे. दि.16/10/2009 रोजी ग्रामपंचायत, दारफळ, सरपंच, साक्षीदार व अन्य पंच यांच्यामार्फत प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता पाहणीमध्ये इंडस जातीच्या घेवडयाची लागवड दिलेल्या निमाप्रमाणे केलेली असल्याचे दिसून आले. पिकाचे वेल हे अतिशय दाट व हिरवेगार स्वरुपाचे असून त्यावर कधीही फुले किंवा पीक आल्याचे दिसून आले नाही. वेलीची वाढ ही पूर्ण झालेली असून त्या वेलीला फलधारणा झाल्याचे दिसून येत नाही, असा पंचनामा करण्यात आलेला आहे. सदर पंचनामा मंचाचे अभिलेखावर दाखल आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना दि.30/10/2009 कायदेशीर नोटीस पाठवून घडलेल्या घटनेची माहिती दिलेली आहे व नुकसान भरपाई रक्कम मागणी केली आहे. विरुध्द पक्ष यांना नोटीस पोहोच झाल्यानंतरही विरुध्द पक्ष यांनी कोणतीही दखल न घेतल्याने सदरचा तक्रार-अर्ज मंचात दाखल करुन अर्जातील विनंती-मागणीप्रमाणे मागणी केलेली आहे.
4.2) विरुध्द पक्ष क्र.1 यांना मंचामार्फत नोटीस बजावणी झाल्यानंतर उचित संधी दिल्यानंतरही लेखी जबाब दाखल केला नाही. म्हणून ‘नो डब्ल्यू एस’ आदेश पारीत होऊन एकतर्फी सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे व पुढील आदेश पारीत करण्यात आले आहेत.
4.3) विरुध्द पक्ष क्र.2 यांना दि.7/9/2010 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्या लेखी म्हणण्यास कोणत्याही प्रकारे प्रतिज्ञालेख व शपथपत्र दाखल केलेले नाही. आवश्यक ते कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पंचनाम्यावर गंभीर आक्षेप घेतलेले आहेत. परंतु ते मुद्दे खोडून काढण्याकरिता अन्य कोणताही सक्षम पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. विरुध्द पक्ष यांनी सोलापूर हे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे वातावरण दुषित असते. सन 2009 मध्ये जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने व वातावरण दुषित असल्यामुळे पाहिजे तेवढे उत्पादन मिळाले नाही. कंपनीचे प्रतिनिधी श्री.अस्तगे यांनी दि.12/11/2009 रोजी वस्तुस्थितीची पाहणी केली आहे. परंतु प्रत्यक्षात पंचनामा केलेला नाही, असे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर सोलापूर येथील वातावरण भौगोलिकरित्या योग्य व बरोबर नव्हते व नाही, अशी स्थिती असताना शेतक-यास पीक काढण्याबाबत माहिती देणे व अशा बियाण्याची जाणूनबुजून विक्री करणे, ही बाब सुध्दा अत्यंत गंभीर आहे. जर यदाकदाचित विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना घेवडयाचे बियाणे खरेदी करतानाच ही माहिती प्रामाणिकपणे दिली असती तर तक्रारदार यांनी या बियाण्याची पेरणीच केली नसती. म्हणून अशी माहिती वेळोवेळी न देणे, ही सुध्दा सेवेतील त्रुटी आहे. निष्काळजीपणा व हलगर्जीपणा आहे, हे जरी काही क्षणापुरते मान्य व गृहीत धरले तरी विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात नमूद केल्याप्रमाणे वातावरण दुषित असल्याचे व कमी पाऊस पडल्यामुळे वाढलेल्या वेलीस फुले व घेवडयाच्या शेंगा लागल्या नाहीत, हे सबळ पुराव्याने भौगोलिकरित्या सिध्द करण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्ष यांची होती व आहे. म्हणून त्या-त्या वेळी योग्य ती दखल प्रामाणिकपणे घेतलेली नाही. प्रतिनिधीना दि.12/11/2009 रोजी पाठविणे व वस्तुस्थिती कंपनीच्या समोर मिळाल्यानंतरही ग्राहकाचे नुकसानीबाबत योग्य ती दखल न घेणे ही सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा आहे. वास्तविकरित्या विरुध्द पक्ष यांनी त्याच वेळी तक्रारदार यांच्याशी काही-ना-काही तडजोड करुन वादीत विषय मिटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक व गरजेचे होते. परंतु जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तक्रारदार यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक असे अपरिमित नुकसान झाले आहे, ही बाब नाकारता येणार नाही. कारण विरुध्द पक्ष यांनी ही परिस्थितीत कंपनीचे प्रतिनिधी श्री. अस्तगे यांच्यामार्फत कोणत्याही पध्दतीने नाकारलेली नाही. म्हणून या ठिकाणी अन्य कोणत्याही पुराव्याची मंचास आवश्यक नाही. घडलेली घटना व वस्तुस्थिती ही खरी, बरोबर व सत्य आहे, हेच मान्य व गृहीत धरणे व त्या अनुषंगाने तक्रारदार यांचा अर्ज मंजूर करणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे.
4.4) सदर तक्रार-अर्जामध्ये तक्रारदार यांनी 0.40 आर. मध्ये घेवडा पीक लागवड केले होते. चांगली वेल हिरवीगार येऊनही व वाढ चांगली होऊनही संपूर्ण वेलीस फुले लागली नाहीत व फलधारणा न झाल्यामुळे साहजिकच तक्रारदार यांचे नुकसान झाले आहे, हे मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. परंतु असे असले तरी सुध्दा तक्रारदार यांनी नेमके किती प्रमाणात घेवडयाचे पीक मिळाले असते, हे आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्याने सिध्द केलेले नसल्याने त्यांच्या मागणीप्रमाणे रु.2,50,000/- अशी पूर्ण रक्कम देणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक ठरत नाही व ठरणार नाही. परंतु सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या हिशोबाचा ताळमेळ घालून आदेशाप्रमाणे तक्रारदार यांना विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नुकसान भरपाई देणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. म्हणून आदेश.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार-अर्ज अंशत: मंजूर करण्यात आला आहे.
2. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून अर्जात नमूद केल्याप्रमाणे घेवडा बियाणे खरेदी केले आहे. परंतु उत्तम वेल आल्यानंतर त्यास फलधारणा व फुले लागली नाहीत. त्यामुळे घेवडा पीक न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना रु.1,50,000/- (रुपये एक लक्ष पन्नास हजार फक्त) नुकसान भरपाई द्यावी. सदर बियाण्यामध्ये दोष असल्यामुळे तक्रारदार यांचे अपरिमित असे नुकसान झाले आहे, हे मान्य व गृहीत धरुन घोषित करण्यात आले आहे.
3. तक्रारदार यांनी सदर तक्रार-अर्जाचा खर्च रु.3,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.3,000/- विरुध्द पक्ष क्र.1 यांनी द्यावेत.
4. वरील संपूर्ण रक्कम विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रार दाखल दि.3/3/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम फेड होईपर्यंत व्याजासह द्यावी.
5. अशा आदेशाचे पालन विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करण्याचे आहे.
6. उभय पक्षकारांना निर्णयाची प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/श्रु/12313)