निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 23/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः-02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 03 /09/2013
कालावधी01 वर्ष. 06महिने.11दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
अण्णासाहेब पिता नारायणराव आमले. अर्जदार
वय 60 वर्षे. धंदा.शेती. अॅड.ए.ए.आमले.
रा.खेर्डा (गंगाकिनारा) ता,पाथरीजि.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या. अॅड.एस.एस.देशपांडे.
जिंतूर रोड,परभणी.
2 उप विभागीय अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या.
सेलु कॉर्नर,रेणुका साखर कारखान्याच्या समोर,पाथरी.
3 कनिष्ठ अभियंता.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या.
पाथरी आर.2
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराने त्याच्या शेतातील डि.पी.च्या शॉर्टसर्किटने ऊसाचे पिकाची, व ठिबक सिंचनाचे साहित्य जळाल्याची नुकसान भरपाई गैरअर्जदार विज कंपनीकडून मिळण्यासाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज केला आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा मौजे खेर्डा (गंगाकिनारा) ता. पाथरी जिल्हा परभणी येथील रहिवाशी असून त्यास खेर्डा येथे गट क्रमांक 79 मध्ये 1 हेक्टर 62 आर जमीन आहे.सदर जमिनीत गेल्या वर्षा पासून त्याच्या 1 हेक्टर (अडीच एकर) एवढया क्षेत्रात अर्जदाराने ऊसाची लागवड केली असून त्या ऊसाला पाणी देण्यासाठी जैन ठिबक सिंचाचा उपयोग केला होता,अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने त्याच्या शेतात एक डि.पी. बसविलेली असून त्या डि.पी.मधून अर्जदारास व इतर शेजारी शेतक-यांना सदरच्या डि.पी.वरुन विद्युत पुरवठा होतो.अर्जदाराचे शेताच्या वरुन उच्च दाबाच्या विद्युत वाहीणी गेल्या असून सदरील उच्च दाबाच्या वाहीणीवरुन अर्जदाराच्या शेतामधील डि.पी.जोडली आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे. व तो गैरअर्जदाराकडे नियमित बिले भरतो, अर्जदाराच्या शेतातून जाणा-या विद्युत तारा हे गैरअर्जदाराने व्यवस्थित उभ्या केलेल्या नाही अर्जदाराच्या विहिरीकडे जाणारी दिशेचे विद्युत खांब वाकलेले आहे.त्यामुळे तारा लोंबकाळल्या गेल्या असून एकमेकांस चिकटतात व त्यामुळे विजेच्या ठिणग्या पडून विजेचे लोळ व आग पडते.याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे व लाईनमन श्री खिल्लारे यांना घटनेच्या वेळी सुचना व तक्रार दिली होती व तक्रार अर्ज दाखल केला होता व त्यामध्ये गैरअर्जदारास विनंती केली होती की, सदरचे विद्युत तारा दुरुस्त कराव्यात व डि.पी. मधील नविन फ्युज टाकावे, अशी वारंवार तोंडी विनंती केली होती,परंतु गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही,त्यामुळे दिनांक 20/12/2011 रोजी दूपारी 1.30 ते 2.00 च्या दरम्यान अर्जदाराच्या शेतात सदरच्या विद्युत वाहीणीची तारा एकमेकांना घासून सदर ठिकाणी ठिणग्या पडून मोठया प्रमाणात आगीचे लोळ व आग पडल्यामुळे अर्जदाराचा ऊस जळाला त्यावेळेस अर्जदार व आजु बाजूचे शेजारी शेतकरी जमा होवुन आग विझविण्यासाठी प्रयत्न केला त्यापैकी खेर्डा येथील माजी सरपंच, यांनी नगर परीषद पाथरी येथे अग्निशामक दलाची गाडी बोलावली व ती गाडी येई पर्यंत अर्जदाराचा 2 एकर ऊस व ठिबक सिचनाचे संच जळाले.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याच दिवशी म्हणजे दिनांक 20/12/2011 रोजी संध्याकाळी 4.00 ते 5.00 च्या दरम्यान अर्जदार हा पाथरी येथील गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 कडे गेला असता तेथे ते नव्हते,म्हणून त्याच दिवशी तहसिल कार्यालय पाथरी येथे सदर ऊस जळाल्या प्रकरणी पंचनामा करण्याच्या संदर्भात अर्ज केला होता व त्यानुसार दिनांक 23/12/2011 रोजी मंडळ अधिकारी हदगाव तालुका पाथरी यांनी अर्जदाराचे शेत गट क्रमांक 79 मध्ये जावुन तहसिलदाराच्या आदेशा नुसार पंचा समक्ष पंचनामा केला त्यास त्यांनी विज वितरण कंपनीच्या तारा एकमेकांना चिटकल्यामुळे शॉर्टसर्किट होवुन ऊस जळून खाक झाला असे नमुद केले आहे.दिनांक 21/12/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास पंचनामा व नुकसान भरपाईसाठी अर्ज केल्यानंतर 22/12/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 व पंच लोकांनी पंचनामा केला त्यात त्यांनी शेतामध्ये ठिबक सिंचनाचे काम दिसून आले ते जळालेल्या अवस्थेत दिसून आले व ऊस ही जळालेले दिसून आले असे नमुद केले आहे.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदारांना घटने पूर्वी अनेक वेळा वाकलेले खांब व डि.पी.मधील फ्युज यांची दुरुस्ती करावी याबाबत वारंवार विनंती करुन देखील गैरअर्जदाराने कोणतीही दखल न घेतल्यामुळे सदरची घटना घडून अर्जदाराचे नुकसान झाले व त्यास गैरअर्जदाराच जबाबदार आहेत.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, ऊसाला सुरवाती पासून सुधारीत पध्दतीने पाणी देण्यासाठी जैन एरिगेशनच्या ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे एकरी उतारा हा 50 टन इतका येतो व चालू वर्षाच्या कारखान्याने दिलेले भाव 2200/- रुपये टन प्रमाणे धरला तर अर्जदाराचे एकरी 110,000/- रुपये इतके उत्पन्न झाले असते, म्हणून 2 एकराचे 2,20,000/- इतके उत्पन्न मिळाले असते,तसेच ठिबक सिंचनाच्या संचाचे 53,025/- रुपये तसेच अग्निशामक गाडीचा किराया 2200/- झाला आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे अर्ज करुन नुकसान भरपाई दिली नाही, तसेच नोटीस पाठवूनही नोटीसीचे उत्तर दिले नाही, म्हणून सदरची तक्रार दाखल केली आहे. व मंचास अशी विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात यावा. व गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, ऊस जळाल्या बद्दल 2,20,000/- अर्जदारास देण्यात यावे व तसेच ठिबक सिंचनाचा संच साहित्य जळाल्या बद्दल नुकसान भरपाई व तसेच अग्निशामक दल, नगर परिषद पाथरी गाडीचा किराया 2200/- रुपये व दाव्याचा खर्च रुपये 2,000/- रुपये व मानसिकत्रासापोटी 5,000/- रुपये असे एकुण 2,82,225/- रुपये गैरअर्जदारांनी अर्जदारास देण्याचा आदेश देण्यात यावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 6 वर 10 कागदपत्रांच्या यादीसह 10 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 6/1 वर गट क्रमांक 79 मौजे खेर्डा येथील 7/12 उतारा, 6/2 वर गजानन ट्रेडिंग कंपनी सेलू यांचे बील, 6/3 वर गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेले पत्र, 6/4 वर तक्रार अर्जाची ऑफीस कॉपी, 6/5 वर गैरअर्जदारांचे ज्युनिअर इंजिनिअर यांनी केलेला पंचनामाची प्रत, 6/6 वर तहसिलदार पाथरी यांची ऑफिस कॉपी, 6/7 वर तहसिलदार पाथरी यांनी केलेल्या पंचनाम्याची प्रत, 6/8 वर नगर परीषद पाथरी यांची पावती, 6/9 वर नगर परिषद पाथरी यांनी दिलेली पावती, 6/10 वर घटनास्थळाचे फोटो कॉपी इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्यावर, गैरअर्जदारास अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराच्या शेतातील जळालेल्या ऊसाची व ठिबक सिंचनचे
साहित्याची नुकसान भरपाईस गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? होय.
2 अर्जदार किती नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 6/3 वरील पावती कागदपत्रावरुन सिध्द होते, अर्जदार हा मौजे खेर्डा येथील गट क्रमांक 79 मधील 1 हेक्टर 62 आर चा मालक आहे ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील दाखल केलेल्या 7/12 उता-यावरुन सिध्द होते, अर्जदाराने सदरच्या शेतामध्ये 1 हेक्टर क्षेत्रावर सनवर्ष 2011-2012 मध्ये ऊसाची लागवड केली होती, ही बाब देखील नि.क्रमांक 6/1 वरील 7/12 वरुन सिध्द होते.तसेच अर्जदाराने सदरच्या शेतामध्ये जैन ठिबक सिंचन संचाचा उपयोग केला होता व सदरचे संच गजानन ट्रेडिंग कंपनी सेलू यांच्याकडून खरेदी केले होते ही बाब नि.क्रमांक 6/2 वरील पावतीवरुन व तसेच 6/5 वरील गैरअर्जदार कंपनीने तयार केलेला पंचनाम्यावरुन सिध्द होते, व अर्जदाराचे दिनांक 20/12/2011 रोजी त्याच्या मालकीच्या सदरील शेतामध्ये शॉर्टसर्किटमुळे ऊसास आग लागली होती ही बाब नि.क्रमांक 6/7 वरील दाखल केलेल्या पंचनाम्यावरुन सिध्द होते व तसेच अर्जदाराचे सदरील शेतामध्ये ठिबक सिंचनाचे आगीमुळे नुकसान झाले ही बाब देखील गैरअर्जदाराने तयार केलेल्या पंचनाम्यावरुन म्हणजे 6/5 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने सदरील दिवशी लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशामक दलास 2200/- रुपये शुल्क भरुन बोलाविले होते ही बाब नि.क्रमांक 6/8 व 6/9 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.तसेच दिनांक 20/12/2011 रोजी अर्जदाराच्या सदरील शेतामध्ये शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून अर्जदाराच्या ऊसाचे नुकसान झाले व ही बाब देखील नि.क्रमांक 6/10 वरील दाखल केलेल्या फोटोवरुन सिध्द होते, गैरअर्जदाराने अर्जदाराची तक्रार व्यस्थित हाताळली असती तर सदरची घटना टळली असती व अर्जदाराचे नुकसान झाले नसते सदरील शॉर्टसर्किटमुळे झालेले अर्जदाराच्या नुकसानीस गैरअर्जदाराच जबाबदार आहेत.व गैरअर्जदाराने योग्य ती काळजी न घेवुन अर्जदारास एक प्रकारे सेवेत त्रुटी दिली आहे.तसेच अर्जदाराचे म्हणणे की, सदरील आगीमुळे अर्जदाराचे 100 टन ऊसाचे नुकसान झाले व त्या वर्षी कारखान्याचा भाव 2200/- रुपये होता, त्यामुळे अर्जदाराचे एकुण 2,20,000/- नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही.कारण त्याबद्दलचा अर्जदाराने कोणताही योग्य पुरावा मंचासमोर आणला नाही. व तसेच अर्जदाराचे म्हणणे सदरच्या आगीमुळे ठिबक सिंचनाचे 53,025/- रुपयांचे नुकसान झाले आहे.त्या किमती बद्दलचा देखील योग्य पुरावा मंचासमोर आणला नाही, त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराकडून अंदाजे एकरी 15,000/- रुपये प्रमाणे 2 एकर ऊसाची 30,000/- रुपये व ठिबक सिंचनाचे साहित्यापोटी 10,000/- रुपये व अग्निशामकचा किराया 2200/- रुपये असे एकुण 42,200/- रुपये अर्जदार गैरअर्जदाराकडून मिळण्यास पात्र आहे.असे मंचास वाटते.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या आदेश तारखे
पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास ऊसाच्या नुकसान भरपाई पोटी व ठिबक
सिंचनाची नुकसान भरपाईपोटी तसेच अग्निशानक गाडीचा किराया बद्दल असे
एकुण रुपये 42,200/- फक्त (अक्षरी रु.बेचाळीसहजार दोनशे फक्त) द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/- फक्त (अक्षरी
रु.दोनहजार फक्त ) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- फक्त
(अक्षरी रु.एकहजार फक्त) आदेश मुदतीत द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.