निकालपत्र
निकाल दिनांक – २१/१२/२०१९
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्ररदार यांचे गट नं.६७/१ चे क्षेत्र ४१ आर रा.शेन वडगाव, ता.राहुरी, जिल्हा अहमदनगर या शेतात उभ्या ऊसाचे पीक गळितास आलेले होते. दिनांक ०५-०३-२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजेचे सुमारास शेत ऊसाच्या पिकाच्या अतिशय जवळून गेलेल्या ताराचे एकमेकाला घर्षण होऊन त्यातुन अग्नीचा लोळ पडुन उभ्या असलेल्या उसाचे पीकानी पेट घेतला. यामध्ये सुमारे १ हे. ०.४१ आर क्षेत्रातील ऊस जळून गेला असल्यामुळे सदर उसाचे नोंद असलेले ऊस तोडुन नेण्याची टाळाटाळ सुरू केली व तक्रारदाराचे संपूर्ण शेतामधील ऊस पिकाचे नुकसान झाले. सदरचे नुकसान हे म.रा.वि.वि.कं. कंनीचे विद्युत तारा टाकल्यानंतर विजेचे जनरेशन, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन व ट्रेडिंग करताना व जमिनीपासून ग्राउंड क्लियरचे अंतर ठेवतांना नियमाप्रमाणे योग्य ती काळजी खबरदारी न घेतली नसल्याचे ऊसाचे पिकाचे नुसान झाले आहे. तसेच तहसील कार्यालय राहुरी यांच्याकडे म.रा.वि.वि. कंपनी विरूध्द तक्रार दिली त्याचप्रमाणे कामगार तलाठी व तहसीलदार ता.राहुरी यांनी जाळलेल्या ऊसाच्या पिकाचे नुकसानिची पाहणी करून तसा पंच समक्ष पंचनामा केलेला आहे व पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तसेच सदर नुकसानभरपाई मिळणेसाठी वकिलांमार्फत दिनांक १८-०४-२०१६ रोजी सामनेवाले यांना नोटीस पाठविलेली आहे. सदर नुकसान भरपाई सामनेवाले यांनी दिली नाही म्हणुन सदर तक्रार दाखल करणेस कारण घडले आहे.
तक्रारदाराची अशी विनंती आहे की, सदर तक्रार अर्ज खर्चासह मंजुर करण्यात यावा. सामनेवाले म.रा.वि.वि. कंपनीने तक्रारदारास जळीत ऊसाची नुकसान भरपाईपोटी रक्कम रूपये ११,३२,०००/- तक्रारदार यांना द्यावे.
३. तक्रारदाराने तक्रारीसोबत निशाणी २ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तसेच निशाणी ४ ला दस्तऐवज यादीसोबत एकुण ७ कागदपत्रांच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत. त्यामध्ये ज्युनिअर इंजिनिअर सब स्टेशन, पथारेखुर्द दि.०५-०३-२०१६, तलाठी व तहसिलदार पंचनामा सत्यप्रत दि.०९-०३-२०१६, उपकार्यकारी अभियंता कार्यालय, देवळाली प्रवरा नोटीस प्रत दि.१८-०४-२०१६, मा.सहायक विद्युत निरीक्षक उद्योग व कामगार खाते मार्केट यार्ड अहमदनगर नोटीस प्रत दि.२८-०३-२०१६, ठाणे अमलदार पोलिस स्टेशन ता.राहुरी यांना ऊस पीकाचे झालेल्या नुकसानीसंदर्भात भरपाई मिळणेबाबत दिलेला अर्ज. तक्रारदाराने सहाय्यक विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उद्योग व कामगार खाते, मार्केड यार्ड, अहमदनगर येथे तक्रारदाराचे उसाचे झालेले घटनेबाबत अभिप्राय मिळणेसंदर्भात अर्जाची छायांकीत प्रत दिनांक १९-०५-२०१६, सहाय्यक विद्युत निरीक्षक विद्युत निरीक्षण विभाग, उद्योग ऊर्जा व कामगार खाते, मार्केट यार्ड, अहमदनगर यांना अभिप्राय चुकीचा मिळाल्याबाबत पाठविलेला अर्ज दिनांक १८-०६-२०१९, सहाय्यक विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उद्योग व कामगार खाते २ रा मजला, मार्केट यार्ड, अहमदनगर यांना पोलीस निरीक्षक, राहुरी पोलीस स्टेशन यांनी अकस्मात जळीत नं.०३/२०१६ बाबत दिलेले पत्र दिनांक २८-०३-२०१६, विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, अहमदनगर यांनी कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि. कंपनी मर्या., श्रीरामपूर विभाग, ता.जि. अहमदनगर यांना गट नं.६७/१, शेनवडगाव ता.राहुरी जि.अहमदनगर येथे दि.०५-०३-२०१६ रोजी श्री.हरिभाऊ भिकाभाऊ शिेंदे यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेतामध्ये झालेल्या जळीत अपघाताच्या चौकशीचा निष्कर्ष कळविणेबाबत इत्यादी दस्तऐवज दाखल केले आहे.
४. तक्रारदाराची तक्रार दाखल करण्यात येऊन सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली होती. त्यानुसार सामनेवाले यांनी लेखी खुलासा दाखल केलेला होता. सामनेवाले यांनी त्यांच्या निष्कर्षामध्ये तक्रारदारचे पीकाचे नुकसान झाले ही बाब नाकारलेली आहे. तसेच तक्रारदार व सामनेवाले यांचे दरम्यान सेवा देणार व ग्राहक असे संबंध निर्माण होत नाहीत. तक्रारदाराचे शेतातील ऊस पीकाचे विद्युत तारांचे घर्षणाने आग लागुन नुकसान झाले ही बाब मान्य नाही. तक्रारदाराचे ऊस पीकला विद्युत पुरवठा दिलेला नाही. सदर तक्रार चालविण्याचे अधिकार मे. मंचास नाही. तक्रारदार यांनी ऊसाचे पीकला विद्युत तारांमुळे आग लागली होती याबाबतचा पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने साखर कारखान्याकडुन जळीत ऊसाची संपुर्ण रक्कम स्विकारलेली आहे. कारखान्याने रक्कम दिलेली आहे. तसेच सामनेवाले यांच्याकडुन नुकसान भरपाई मिळणेकरीता खोटी तक्रार दाखल केली आहे. सामनेवालेने सेवा देण्यात कसुर केला नाही. तक्रारदार यांनी मे.मंचात खोटी तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
५. तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, तक्रारीसोबत हजर केलेले दस्तऐवज तसेच विरूध्द पक्षांनी दाखल केलेले शपथपत्र. तक्रारदार यांच्या युक्तिवादाचे अवलोकन केले व युक्तिवाद ऐकला. सामनेवालेतर्फे लेखी युक्तिवाद ऐकुण मे. मंचाने दिनांक ०६-०२-२०१८ रोजी खालीलप्रमाणे आदेश केला होता.
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरूध्दपक्ष नं.१ व २ यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी एकत्रीतरित्या किंवा वैयक्तिकरित्या तक्रारदार यांना ऊस पिकाची नुकसान भरपाईपोटी रूपये १,२०,०००/- (रू.एक लाख वीस हजार फक्त) या निकालाची प्रत प्राप्त झाल्याचे दिवसापासून ३० दिवसाचे आत द्यावी. सदरील रक्कम मुदतीत न दिल्यास द.सा.द.शे. ९ टक्के दराने तक्रार दाखल तारखेपासुन रक्कम वसुल होईपावेतो होणारे व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी.
- विरूध्दपक्ष नं.१ व २ यांनी एकत्रीतरित्या किंवा वैयक्तीकरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये ३,०००/- (रू. तीन हजार फक्त) व या तक्रारीचे खर्चापोटी रूपये १,५००/- (रू.एक हजार पाचशे फक्त) अदा करावेत.
- या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना मोफत देण्यात यावी.
या आदेशाविरूध्द सामनेवाले यांनी मे. महाराष्ट्र राज्य आयोग, मुंबई परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे प्रथम अपील क्रमांक १०४/२०१८ दाखल केले होते. मे. महाराष्ट्र राज्य आयोग, मुंबई परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी सामनेवाले यांचे अपीलात आदेश करून जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्दबादल करून सदरील प्रकरण पुन्हा चालविण्यासाठी उभयपक्षांना त्यांचा पुरावा दाखल करण्याची संधी द्यावी व पुन्हा सुनावणी करण्याची संधी देण्यात यावी, असा आदेश करून सदरील प्रकरण हे पुन्हा या मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात पाठविले. त्यानुसार सदर प्रकरण हे पुन्हा मे.मंचासमोर चालविण्यासाठी घेण्यात आले. निशाणी २२ वर तक्रारदाराने मे. महाराष्ट्र राज्य आयोग, मुंबई परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद अपील क्रमांक १०४/२०१८ निकाल दिनांक १९-०३-२०१९ रोजीचा निकाल सोबत जोडून पुढील कार्यवाही करण्यात यावी, असा अर्ज मे. मंचात दिनांक १०-०५-२०१९ रोजी दिलेला आहे. निशाणी २३ ला तक्रारदारातर्फे शपथपत्र दाखल करण्यात आले. निशाणी २५ वर तक्रारदाराने एकुण २५ दस्तऐवज दस्तऐवज दाखल केलेले आहेत, ते पुढीलप्रमाणे. तलाठी पंचनामा दि.०९-०३-२०१६, मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांचेकडे केलेला तक्रार अर्ज व पोच, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग देवळाली प्रवरा यांचा विद्युत कनेक्शन असल्याचा दाखला दिनांक ११-१०-२०१८, विद्युत देय दि.२०-०२-२०१९, जुन २०१७, वायरमनचा लेखी अहवाल दिनांक ०८-१०-२०१८, सहा.लेखापाल म.रा.वि.कं. देवळाली प्रवरा यांची पावती दिनांक ११-१०-२०१८, गट क्र. ६७/१ सातबारा उतारा, तलाठी बोअरवेल नोंदीबाबत फेरफार दि.२०-०३-२०१९, बोअर वेल नोंद गट नं.६७/१ सातबारा उतारा, ऊसताड नोंद कारखान्याचा दाखला दिनांक ०२-०३-२०१६, बोअरवेल फोटो, तलाठी यांचा बोअरवेल असल्याचा दाखला दि.८-१०-२०१८, पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे पत्र दि.२८-०३-२०१६, खबर दि.२३-०३-२०१६, आदेश पोलीस स्टेशन राहुरी २३-०३-२०१६, घटनास्थळ पोलीस पंचनामा राहुरी पोलीस स्टेशन दि.२३-०३-२०१६, जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे पत्र दि.१२-०८-२०१६, विहीर असलेले (श्री.बापुसाहेब भानुदास शिंदे) यांचे वीज देयक दि.२३-०८-२०१६, गट नं.७०/४ चा सातबारा उतारा, फेरफार नोंद अ.क्र. ६५९, सातबारा उतारा गट नं.६९/१/१, विद्युत निरीक्षक, विभाग अहमदनगर यांचे पत्र दि.१३-०५-२०१६, मे.मंचाचे निकालपत्र २५३/१६ दि.०६-०२-२०१८.
६. सदरील आर.बी.टी. क्र.१९/१४१ यात हजर होणेबाबत सामनेवाले यांना दि.२२-०७-२०१९ रोजी नोटीस काढण्यात आली. त्यानंतर नि.२८ वर सामनेवालेतर्फे पुराव्याचे शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की, तक्रारदार यांनी राज्य आयोगासमोर त्यांना सामनेवाले यांनी ते त्यांचे गट नंबर ६७/१ मध्ये ग्राहक ८५०७८००७२३७१ नुसार शेतीचे ग्राहक असल्याचे नमुद केले होते. वास्तविक पाहता सदरहु ग्राहक क्रमांकानुसार या सामनेवाले यांनी तक्रारदार यांना गट नंबर ६७/१ मध्ये कधीही वीज पुरवठा दिलेला नव्हता. तक्रारदाराने केलेला तथाकथित पंचनाम्याचे कामी सामनेवाले यांना कोणतीही सूचना दिलेली नव्हती. त्यामुळे सदरचा पंचनामा या सामनेवालेस मान्य नाही. त्यामुळे सदरची नुकसान भरपाईस सामनेवाले हे जबाबदार आहेत, असे ग्राह्य धरता येणार नाही. कोणतेही रास्त व संयुक्तीक कारण नसतांना तसेच तक्रारदार व सामनेवाले यांचे दरम्यान तथाकथित ऊस जळीत घटनेसंदर्भातील ग्राहक व विक्रेता असे कोणतेही नाते नसतांना फक्त आर्थिक त्रास देण्याचे हेतुने तक्रारदार यांनी सदरचा अर्ज दाखल करून सामनेवाले यांना विनाकारण खर्चात पाडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी व तक्रारदाराकडुन कॉम्पेनसेटरी कॉस्टपोटी रूपये २५,०००/- देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली.
सामनेवाले तर्फे नि.२९ ला खालीलप्रमाणे कागदपत्र दाखल करण्यात आले आहे. सामनेवाले कार्यकारी अभियंता याना दिेलेले पत्र दि.१४-०३-२०१९, विद्युत निरीक्षक यांचे अहवालाची प्रत दि.१३-०५-२०१६ इत्यादी दस्तऐवज दाखल केलेले आहेत. दिनांक २१-११-२०१९ रोजी तक्रारदार यांचा व सामनेवाले यांचे वकील श्री.एस.एच. काकाणी यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. निशाणी ३० सोबत सन २०१६ वर्षातील विद्युत देयके पुढील तारखेस दाख करणेबाबत मुदत मिळावी, असा अर्ज सादर केला आहे, तो मंजुर करण्यात आला आहे.
७. तक्रारदार व सामनेवाले यांचे वकिलांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, तसेच सामनेवाले यांचे पुराव्याचे शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज याचे अवलोकन करता या मंचासमोर न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील कारणमिमांसेप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | नाही |
(२) | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
८. मुद्दा क्र. (१) : मे. महाराष्ट्र राज्य आयोग, मुंबई परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी प्रथम अपील क्रमांक १०४/२०१८ मध्ये निकालात दिनांक २९-०३-२०१९ रोजी खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात आला.
- The appeal is allowed.
- The judgment and order passed by the Distric Forum is hereby quashed and set aside and matter is remanded back to the District Forum for fresh hearing, by giving opportunity to both the parties to lead evidence and opportunity of hearing.
- Inform the District Consumer Forum accordingly.
मे. महाराष्ट्र राज्य आयोग, मुंबई परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी वर नमुद प्रथम अपील क्रमांक १०४/१८ मध्ये तक्रारदाराला विद्युत पुरवठा करणेबाबत उभयपक्षांनी दाखल केलेले विरोधाभासी प्रमाणपत्र पाहता उभयपक्षांना संधी देऊन पुन्हा सुनावणी घ्यावी आणि तक्रारदार ग्राहक आहेत किंवा नाही, याविषयी पुन्हा दोन्ही पक्षांना संधी देऊन निर्णय घ्यावा, असे म्हणुन मे.जिल्हा मंचाकडे प्रकरण परत पाठविले (RBT).
त्यानुसार तक्रारदाराने दाखल केलेले दस्तऐवज मध्ये दिनांक ११-१०-२०१८ रोजीचा उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, देवळाली प्रवरा उपविभाग यांनी ग्राहक क्रमांक ८५०७८००७२३७१ या ग्राहक क्रमांकानुसार श्री.हरिभाऊ भिकाभाऊ शिंदे रा.शेणवडगाव, ता.राहुरी, जि.अहमदनगर यांच्या गट क्रमांक ६७/१ मध्ये दिनांक १०-१०-२०१८ चे विनंतीनुसार जमीन वाटपासाठी दाखला दिला. तसेच मे. महाराष्ट्र राज्य आयोग, मुंबई यांचे परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.२९-०३-२०१९ रोजी दिलेल्या निकालानंतर या मे. जिल्हा मंचात सदर प्रकरण चालविण्यात आले. तक्रारदार हा सामनेवालेचा ग्राहक आहे हे दर्शविण्यासाठी तक्रारदाराने नि.३१ सोबत सी.पी.एल. दाखल केलेले आहे. सदर दस्तऐवजावर तक्रारदाराचे नाव नमुद आहे आणि सदरील दस्तावर राहुरी फॅक्टरी डिव्हीजन, असे नमुद आहे आणि पत्ता शेनवडगाव, मानोरी जिल्हा अहमदनगर, असे नमुद आहे. परंतु सदर विद्युत पुरवठा तक्रारदाराने सामनेवालेकडुन त्याच्या मालकीच्या व वहिवाटीचा गट क्रमांक ६७/१ वर घेण्यात आला होता, ही बाब तक्रारदार सिध्द करू शकले नाही. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालेकडुन त्याचे तक्रारीत नमुद असलेले शेताकरीता विद्युत पुरवठा घेतलेला नाही, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी नि.२५/९ वर डिसेंबर २०१८ चे विद्युत देयक दाखल केले आहे. तसेच नि.२५/४ यावर दि.११-१०-२०१८ रोजीचा दाखला विद्युत पुरवठ्याबाबत घेतलेला आहे, असे दिसते. परंतु दिनांक ०५-०३-२०१६ रोजी तक्रारदाराचे ऊस जळाल्याचे तक्रारीसंबंधी असुन तक्रारदाराने सामनेवालेकडुन विद्युत पुरवठा हा त्याचे शेत गट क्र.६७/१ मध्ये घेतला असल्याचे सिध्द होत नाही. सबब तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम २ (१) (डी) प्रमाणे ग्राहक नाहीत, ही बाब सिध्द होत आहे. म्हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
९. मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. |
२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. |
३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी. |
४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |