निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 09/05/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 15/05/2012
तक्रार निकाल दिनांकः- 18/07/2013
कालावधी 01 वर्ष.02 महिने. 03 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सुखदेव पिता रामभाऊ जाधव. अर्जदार
वय 50 वर्षे. धंदा.शेती. अड.के.व्हि.चव्हाण.
रा.तुरा,ता.पाथरी.जि.परभणी.
विरुध्द
1 बळिराजा कृषी केंद्र. गैरअर्जदार.
मेन रोड,पाथरी,ता.पाथरी जि.परभणी. अड.एस.एन.व्यवहारे.
2 डॉक्टर सिड्स प्रा.लि.लुधियाना. अड.किरण ओस्तवाल.
पाचवा मजला,करनिवल शॉपिंग कॉम्प्लेक्स,
लुधियाना – 141001 (पंजाब भारत )
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास विकलेल्या सदोष काकडीचे बियाणेमुळे अर्जदारास झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी या करीता अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
अर्जदार हा बागायती शेतकरी असून त्यास मौजे तुरा,ता.पाथरी जि.परभणी येथे गट नं. 18 मध्ये 01 हेक्टर 25 आर.जमीन आहे.दिनांक 20/01/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या कृषी केंद्रावर काकडीचे बियाणे खरेदी करण्यासाठी विचारणा केली असता, गैरअर्जदार क्रमांक 1 याने त्यास गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीचे 2 पाकिटे बियाणे ज्याचा लॉट क्रमांक 001444561 आहे. हि काकडी सर्वात चांगले असून काकडी गोड आहे असे सांगुन ते अर्जदारास विकले.अर्जदाराने सदरील बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या सांगण्या प्रमाणे लागवड केली व मशागत केली. व तसेच वेळोवेळी रासायनिक व गावरान खत घातले.
नंतर काकडीचे पिक आल्यावर अर्जदाराने पाडव्याच्या सनाच्या दिवशी काकडी तोडून खाल्ली असता काकडी कडु आढळून आले,म्हणून अर्जदाराने त्याच्या शेतांतील सर्व ठिकाणची काकडी खाऊन पाहिली असता सर्व ठिकाणच्या काकड्या ह्या कडु आढळून आल्या.
अर्जदाराने सदरची बाब गैरअर्जदार क्रमांक 1 यास सांगीतली व नुकसान भरपारई मागीतली असता गैरअर्जदाराने डॉक्टर सिड् कंपनीकडे दाद मागा व मी त्यास जबाबादार नाही, तुम्हाला काय करावयाचे ते करा असे सांगीतले.अर्जदाराने नंतर तालुका कृषी अधिकारी, पाथरी यांना दिनांक 03/04/2012 रोजी अर्ज देवुन सदरच्या पिकाचा पंचनामा करण्यास विनंती केली.अर्जदाराच्या विनंती वरुन तालुका कृषी अधिकारी व पाथरी व त्यांच्या सहकार्यांनी दिनांक 09/04/2012 रोजी सदर काकडीच्या प्लॉटची पाहणी केली व पंचनामा केला व पंचनाम्याची कॉपी अर्जदारास दिली तालुका कृषी अधिका-यांच्या पाहणी मध्ये बियाणे सदोष आहे. असा शेरा लिहून दिलेले आहे. अर्जदाराने पुढे असे म्हंटले आहे की, काकडी पासून होणारे 1,50,000/- रुपयाचे उत्पन्न गेरअर्जदाराने दिलेल्या सदोष बियाण्यांमुळे बुडाले व यास गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे जबाबदार आहेत, म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदारास यास गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडून रु.1,50,000/- नुकसान भरपाई मिळण्याचा आदेश व्हावा, तसेच मानसिक व शारीरिकत्रासापोटी रु.30,000/- देण्याचा आदेश व्हावा.तसेच अर्जदारास दाव्याच्या खर्चापोटी रु. 5,000/- देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे व नि.क्रमांक 4 वर 7 कागदपत्राच्या यादीसह 7 कागदपत्रे दाखल
केली आहेत.ज्यामध्ये अर्जदाराने गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथरी यांच्याकडे नुकसान भरपाई मिळणेसाठी केलेला अर्ज, तसेच कृषी अधिकारी परभणी यांना अर्जदाराने दिलेले पत्र, बळीराजा कृषी सेवा केंद्राचे कॅशमेमो, सदर शेतीचा पाहणी अहवाल, सदर शेतीचा कृषी अधिकारी पंचायत समिती पाथरी यांनी व इतर सहकार्यांनी केलेला पंचनामा, सदर शेतीचा 7/12, बियाणे खरेदी केलेले पाकिटांचे कव्हर, इत्यादींचा समावेश आहे..
गैरअर्जदारांना मंचातपर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 हे आपल्या वकिला मार्फत हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.क्रमांक 9 वर दाखल केलेले आहे गैरअर्जदार क्रमांक 2 हे देखील वकिला मार्फत हजर व आपले लेखी म्हणणे नि.क्रमांक 13 वर दाखल केलेले आहे
गैरअर्जदार क्रमांक 1 चे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे की,अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खर्चासह खारीज करण्यात यावी गैरअर्जदार क्रमांक 1 चे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने बियाणे खरेदी केले हे मान्य केले आहे, परंतु सदर बियाणे हे अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिले आहे ही बाब मान्य नाही सदरील बियाण्यांची मागणी ही अर्जदार याने स्वतः गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे केली होती गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे अस म्हणणे आहे की, संशोधीत काकडीचे बियाणे डॉक्टर सिड्स प्रा.लि. महाराजा हे उत्पादक कंपनीकडून अमोल सिड्स अँड फर्टीलायझर्स परभणी मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी विकत आणून सिल कंडीशन मध्ये अर्जदार यांना बिलाव्दारे विक्री केलेले आहे.म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी काकडीच्या बियाणाच्या दर्जामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ न करता प्राप्त झाल्या सारखेच अर्जदारास बिलाव्दारे विक्री केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 हे उत्पादक कंपनीचा एजंट आहे. म्हणून तो नुकसान भरपाई देण्यास पात्र नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की,सदरील बियाणांची सिल कंडीशनमध्ये विक्री केलेले आहे, म्हणून मा.मंच जो आदेश देईल तो नुकसान भरपाईची रक्कम गैरअर्जदार क्रमांक 2 उत्पादक असल्यामुळे त्यांच्याकडून वसुल करण्याचा आदेश पारीत करण्यात यावा.तसेच अर्जदार याने गैरर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे कोठल्याही प्रकारची तक्रार दिलेली नाही व नोटीसही दिलेली नाही तसेच अर्जदार यांच्या शेतीचा पंचनामा तयार करतांना सुध्दा गैरअर्जदार क्रमांक 1 यांना कळविण्यात आले नाही म्हणून गैरअर्जदार हे आपले म्हणणे समिती समोर मांडु शकले नाही तसेच सदरील बियाणे हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अमोल सिड्स परभणी यांच्याकडून विकत घेतले असल्यामुळे ते आवश्यक पार्टी आहे. त्यांना पार्टी म्हणून अड करण्याचा आदेश परीत व्हावा. तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने अतिशय जास्त उत्पादन दाखवुन जास्तीच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सदरील नुकसान भरपाईची रक्कम ही ढोबळपणे उत्पादन ग्रहित धरुन खोटी मागणी केली आहे.तसेच अर्जदाराने दाखल केलेला पंचनामा व त्यात नमुद केलेल्या खता बाबत शंका वाटत असून त्यावेळेस गैरअर्जदार हे हजर नसल्यामुळे खोटी माहिती नमुद करण्यात आली आहे.तसेच बियाणांच्या उत्पादनासाठी इतर हवामान, पाणी व योग्य व्यवस्थापनाची गरज असते तसे न केल्यामुळे सुध्दा अर्जदाराचे नुकसान झाले असेल.म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 ने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार गैरअर्जदार क्रमांक 1 विरुध्द खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 10 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे व तसेच नि.क्रमांक 11 वर गैरअर्जदार क्रमांक 1 ने 2 कागदपत्रांच्या यादीसह 2 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यामध्ये अमोल सिड्स परभणी यांचे बिल व व्यवसाय परवानाची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी नि.क्रमांक 13 वर आपले लेखी जबाबात असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व खारीज होणे योग्य आहे व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 हे बियाणे विक्रेता असून गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे सिलबंद बियाणे जेसच्या तसे विक्री करतात, म्हणून सदरील प्रकरणात त्यांना जबाबदार धरता येत नाही.गैरअर्जदार क्रमांक 2 ही नामांकीत बियाणे कंपनी असून त्याचे बियाणे पूर्ण भारतभर लावली जाते सर्व बियाणे हे प्रयोगशाळेत चाचणी करुन प्रमाणित करुनच बाजारात आणले जाते, कंपनीचे ब्रिडर सर्टीफिकेट सोबत जोडले आहे.या लॉटच्या बियाणाची नव्हेतर कोठल्याही लॉटच्या बियाणांचे एकही तक्रार कंपनीकडे नाही व कोठल्याही मंचात दाखल झाली नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे असे म्हणणे आहे की,अर्जदाराने सांगीतल्या प्रमाणे 20/01/2012 रोजी खरेदी केले तरी 26/01/2012 रोजी पेरल्याचा कोठलाही पुरावा नाही. 7/12 ची प्रत 20/11/2012 च्या काळात 2 हेक्टर मध्ये फक्त कापूस लागवडीची नोंद दिसत आहे.व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की,सदर बियाणेची पूर्णवाढ होण्यास 50 ते 55 दिवसांचा कालावधी लागतो अर्जदाराने 26/11/2012 रोजी पेरणी केली असली तरी तक्रार केली तेव्हा 29/03/2012 रोजी पिक 63 दिवसाचे तर पहाणी केली दिनांक 09/04/2012 रोजी पिक 75 दिवसाचे होते याचाच अर्थ अर्जदाराने आलेले पिक विकून सर्व झाल्यानंतर 20- 25 दिवसांनी तक्रार केलेली आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की,बियाणे बाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर कशी कारवाई करावी त्या बाबत शासनाने परिपत्रक जारी केलेले आहे. परिपत्रका प्रमाणे तक्रार प्राप्त झाल्यानंतर बियाणे विक्रेत्याकडे जावून 4.1 मध्ये दिल्या प्रमाणे माहिती प्राप्त करणे आवश्यक आहे.त्यानंतर
26/10/98 च्या शासन परिपत्राका प्रमाणे 7 सदस्यांची कमेटी प्रमाणे गैरअर्जदाराच्या उपस्थितीत किंवा त्याच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत शेतीची पाहणी करावी, पंचनामा करुन त्यावर समितीचे सर्व सदस्य तसेच गैरअर्जदार यांची सही घेणे बंधनकारक आहे.सदर तक्रारीत पंचानामाचे दोन वेगवेगळे अहवाल दाखल केले आहे.पहिला अहवाल कृषी सेवकांच्या सहीने तर दुसरा अहवाल कृषी अधिकारी पंचायत समितीच्या सहिने केला आहे.सदर पंचनामा गैरअर्जदाराला न कळवता त्याच्या अनुपस्थितीत केलेला असल्यामुळे त्याच्यावर ते बंधनकारक नाही व पुराव्याच्या कामीही विश्वासार्ह नाही अहवालात निरीक्षण व निष्कर्ष स्पष्ट शब्दांत न देता संदिग्ध स्वरुपात दिलेला आहे तसेच एक ओळीचा अहवाल विश्वासार्ह नाही.अहवालात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून येतात.जसे
1) दोन ओळीतील अंतर 4 X4 फुट अशी नोंद आहे. खरे पाहता अंतर 3 X 15 फूट असायला हवे. 2) 0.30 आर.ला 100 ग्रॅम बियाणेला खरे 300 ग्रॅम बियाणे पेरायला हवे होते. 3) खत देतांना नायट्रोजन – 100 के.जी. फॉस्फरस 75 के.जी. पोटॅश 100 के.जी. त्यामध्ये फॉस्फरस व पोटॅश हे जमीन तयार करतांना तर नायट्रोजन दोन वेळेस करुन पहिल्या 25 दिवसानंतर दुसरे वेळेस 45 दिवसानंतर दिले पाहिजेत.अशा प्रकारे लागवड केली असता मधूर गोड काकडीचे उत्पादन सर्वत्र झालेले आहे, पण अर्जदार धांदांत खोटे बोलून माल विक्री करुन नंतर 75 दिवसा पर्यंत वाढ झालेल्या फळाची चव निश्चितच वेगळी असणार म्हणून कडू बी सदोष म्हणणे चुकीचे आहे केवळ कंपनीला बदनाम करण्यासाठी व पैसे घेण्यासाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
दोन्ही बाजुंच्या कैफियती वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास विकलेले काकडीचे बियाणे
सदोष होते काय? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 20/01/2012 रोजी डॉक्टर सिड्स कंपनीचे लॉट नंबर 4561 रु.180/- चे दोन पाकिट खरेदी केले होते व अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 5/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, व सदरचे काकडीचे पिक अर्जदाराने त्याच्या शेतात घेतले हे नि.क्रमांक 17/1 वरील 7/12 च्या उता-यावरुन व दाखल केलेल्या फोटोवरुन सिध्द होते. सदरची काकडीचे पिक हे कडू निघाले याबाबत अर्जदाराने दिनांक 4 एप्रिल 2012 रोजीचा गावकरी या वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी नि.क्रमांक 17/6 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.व सदरचे काकडीचे पिक कडू निघाल्या बद्दल अर्जदाराच्या शेताचा पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी या करीता अर्जदाराने दिनांक 26 मार्च 2012 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथरी यांना अर्ज लिहिलेला होता ही बाब नि.क्रमांक 5/1 वरील कागदपत्रा वरुन सिध्द होते व तसेच सदरच्या तक्रारी बद्दल अर्जदाराने दिनांक 29 मार्च 2012 रोजी कृषी अधिकारी कृषी विभाग जिल्हा परिषद परभणी यांना तक्रार दाखल केली होती ही बाब नि.क्रमांक 5/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व त्या तक्रारीची दखल घेवुन प्रथम कृषी सहाय्यक श्री.व्हि.पी.हातोळे यांनी दिनांक 03/04/2012 रोजी पाहणी पंचनाम्याचा अहवाल दिला होता अहवालात सदरची काकडी ही चविला कडू लागत आहे असा अहवाल दिलेला आहे, जे की, नि.क्रमांक 5/4 वर आहे तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती पाथरी यांनी तालुका कृषी अधिका-यांसह दिनांक 09/04/2012 सदरच्या शेताचा पंचनामा केलेला आहे व अर्जदाराने सदरची काकडी ही 30 गुंठ्या मध्ये लावलेली होती ही बाब नि.क्रमांक 5/6 वरील दाखल केलेला पंचनाम्याच्या कागदपत्रावरुन सिध्द होते.तसेच काकडी चविला कडू होती हे देखील पंचनाम्या मध्ये लिहिलेले आहे,म्हणून सदरच्या काकडीचे बियाणे हे सदोष होते हे सिध्द होते. व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 चे सदोष बियाणे अर्जदारास विक्री केलेले आहे हे अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे सदरचे बियाणे हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याव्दारे उत्पादित असल्यामुळे त्यास गैरअर्जदार क्रमांक 2 हेच जबाबदार आहे हे सदरचे गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास सदोष बियाणे विकलेले आहे.म्हणून तोही तेवढाच जबाबदार आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे की, त्यांचे बियाणे सदोष नव्हते व केवळ चुकीच्या पध्दतीने लागवड व मशागत केली असल्यामुळे काकडी कडु निघाली हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही व तसेच त्यांनी दाखल केलेल्या Morphological Character of Cucumber जे की, नि.क्रमांक 15/1 वर आहे हे सदरील कॅरेक्टर रिपोर्ट हे लॉट क्रमांक 001444561 दिनांक 13/12/2011 चे आहे की, नाही या बद्दल त्या रिपोर्ट मध्ये कोठेही उल्लेख केलेला नाही. म्हणून सदरील रिपोर्ट या लॉट बद्दल ग्राह्य धरता येणार नाही. तसेच लागवड व मशागत योग्य पध्दतीने केलेली नसेलतर काकडी कडू होते या बद्दलचा पुरावा गैरअर्जदार क्रमांक 2 ने मंचासमोर दाखल केलेला नाही. म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने कडू काकडीचे बियाणे विक्री करुन अर्जदारास सदोष बियाणांची विक्री केलेली आहे हे सिध्द होते व सदरची काकडी ही कडू निघाली यास गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हेच जबाबदार आहेत.अर्जदाराचे म्हणणे की, त्याचे 1,50,000/- चे नुकसान झाले हे मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराने सदरच्या काकडीची पेरणी 30 गुंठ्यावर केलेली आहे व 30 गुंठ्यामध्ये काकडीचा उत्पन्न किती निघतो याबद्दल अर्जदाराने कसलाही ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही. अर्जदाराचे अंदाजे 10,000/- रुपयाचे नुकसान झाले असावे असे मंचास वाटते. म्हणून अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या कडून रु.10,000/- फक्त नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे. असे मंचास वाटते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या ( Joint & severely)
अर्जदारास रु.10,000/- फक्त (अक्षरी रु.दहाहजार फक्त) आदेश कळाल्यापासून
30 दिवसांच्या आत द्यावे.
3 या खेरीज गैरअर्जदाराने अर्जदारास दाव्याचा खर्च म्हणून रु.1,000/- फक्त
(अक्षरी रु. एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
4 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष