निकाल
दिनांक- 13.05.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार अशोक सत्याप्पा गुडोदगी यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचे मालकीचे दोन ट्रँक्टर व दोन ट्रॉली आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉली स्वयंरोजगाराने उगार शुगर साखर कारखाना प्रा.लि.उगर ता.चिकोडी जि.बेळगांव यांचे सन 2012-13 चे ऊस गळीत हंगामाकरिता लावलेले होते. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून 20 ऊस तोड कामगाराची सेवा उपलब्ध करुन देऊन ट्रॅक्टर व ट्रॉली यांच्या साहयाने ऊस वाहतूक करण्याचे ठरवले होते.
तक्रारदार यांना स्वयंरोजगारावर प्रत्येक वर्षी ऊस तोडीचे हंगामात कामगाराची आवश्यकता असते. सामनेवाले हे ऊस तोंड कामगार पुरवठा करण्याची सेवा पुरवितात. सामनेवाले यानी तक्रारदार यांना ते ऊस तोड कामगार पुरवठा करतात व ते मूकादम आहेत असे तक्रारदार यांनी भासविले व तक्रारदार यांना गळीत हंगाम सन 2012-13 यासाठी 10 स्त्री व 10 पुरुष कामगार पुरवण्याचे आश्वासन दिले.
तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान दि.20.4.2012 रोजी रु.100/- चे जनरल स्टॅम्पवर ऊस तोड कामगार पुरविणे बाबत करारपत्र झाले व त्या करारपत्राप्रमाणे तक्रारदार यांनी 10 कोयते गळीत हंगाम सन 2012-13 ऊस तोड कामगार पुरवण्याचे मान्य केले. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये एकूण किंमत रक्कम रु.6,00,000/- देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी आगाऊ रक्कम जाबदार यांना रु.1,00,000/- सेवा पुरवठा फि म्हणून दिली. तक्रारदार यानी ऊस तोड करुन वाहतूक करणे बाबत मे 2012 मध्ये करार करुन दिला व उचल म्हणून रक्कम रु.3,50,000/- घेतले. तक्रारदार यांनी दि.22.6.2012 रोजी सामनेवाले यांचे सांगणेवरुन रक्कम रु.2,50,000/- जाबदार यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वडवणी यांचे बचत खाते क्र.6515 वर रोख भरले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रोख रक्कम रु.6,00,000/- दिले आहेत. करारात नमूद केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी ऊस तोड कामगार पूरवले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेशी संपर्क साधून ऊस तोड कामगार घेऊन ऊस तोडीस येण्याबददल विनंती केली. तक्रारदार यांनी ऊडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सामनेवाले यांनी मोबाईल बंद केला होता.
सेवा करारात ठरल्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ऊस तोड कामगार पूरविले नाही व सेवेत त्रूटी ठेवली आहे. सेवा कराराप्रमाणे तक्रारदार हे ऊस तोड करुन कारखान्यास पुरवू शकले नाही. सदरील कारखान्याने तक्रारदार यांचेकडून रु.3,50,000/- व्याजासहीत वसूल केले आहेत. सामनेवाले यांचे कृतीमूळै तक्रारदार यांचा स्वयंरोजगार धोक्यात आला आहे व त्यांची पत व विश्वास यांस तडा गेला आहे. दि.23.6.2013 रोजी तक्रारदार हे सामनेवाले यांचे घरी गेले असता सामनेवाले व काही गुडांनी तक्रारदार यांना धमकी देऊन हूसकून लावले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची आर्थिक फसवणूक केली आहे. तक्रारदार यांनी वकिलामार्फत नोटीस सामनेवाले यांना दिली. सामनेवाले यांनी पुर्तता केली नाही. सबब, तक्रारदार याचे कथन की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून सेवा कराराप्रमाणे घेतलेली रक्कम रु.6,00,000/- देण्याचा आदेश व्हावा व त्यावर द.सा.द.शे. 15 टक्के व्याज देण्यात यावे. तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्हणून रु.3,50,000/- सामनेवाले यांचेकडून मिळावेत व मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/- देण्यात यावेत.
सामनेवाले यांना या मंचाने हजर होणेकामी नोटी काढली. सदरील व्यक्ती गांवी राहत नाही असा शेरा मारुन नोटीस परत आली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दैनिक वर्तमान पत्रात नोटीस बजावणी व्हावी असा अर्ज दिला. त्या अर्जावर झालेल्या हुकूमाचे अनुषंगाने दैनिक पार्श्वभूमी या वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस देण्यात आली. सदरील नोटीस जाहीर होऊन देखील सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले नाही. सबब, त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 अन्वये दस्त हजर केले आहेत. तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र नि.18 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांनी साक्षीदार शिवानंद बाळाप्पा कती यांचे शपथपत्र नि.19 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांनी लेखी यूक्तीवाद नि.21 वर दाखल केला आहे. तक्रारदार यांनी यूक्तीवादासोबत केस लॉ दाखल केले आहेत.
तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा व दस्त यांचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले हे तक्रारदार यांचे ग्राहक आहेत ही बाब
तक्रारदार शाबीत करतात काय ? नाही.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी
ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? नाही.
3. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई नाही.
मिळण्यास पात्र आहेत काय ?
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः-
तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार यांचे मालकीचे दोन ट्रॅक्टर व ट्रॉली आहेत व ते उगार शुगर साखर कारखाना प्रा.लि. ता.चिकोडी ता.बेळगांव या कारखान्यास ऊस वाहतूक करण्यासाठी कराराने देतात. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये दि.20.4.2012 रोजी करारनामा झाला. त्या करारनाम्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ऊस तोडीसाठी मजूर पुरवठयाची हमी घेतली. सामनेवाले यांनी करारात नमूद केल्याप्रमाणे सेवा पुरवीली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून वेळोवेळी रक्कम रु.3,50,000/- उचल घेतली आहे व दि.12.6.2012 रोजी रु.2,50,000/- सामनेवाले यांना दिलेले आहेत. संपूर्ण रककम रु.6,00,000/- सामनेवाले यांना मिळाले आहेत. रक्कम देऊनही सामनेवाले यांनी ऊस तोड मजूर पुरवले नाही. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्ताचे अवलोकन केले असता दि.22.6.2012 रोजी लक्ष्मण रामभाऊ वाघमारे यांचे खातेवर रक्कम रु.2,50,000/- भरल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी दि.20.4.2012 रोजी तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये झालेल्या करारपत्राची झेरॉक्स प्रत दाखल केली. त्या करारपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार व सामनेवाले यांचेवर साखर कारखान्याचे ऊस गळीत हंगामासाठी ऊस तोड करुन वाहनामध्ये रचून लोड भरुन देणारे कामगार पुरवणे बाबत करार झाल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये सदरील करारा अन्वये ऊस तोड कामगार पुरवणे बाबत करार झालेला आहे. त्याकरिता मोबदला सेवा फि म्हणून रक्कम रु.6,00,000/-तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दयावयाचे आहेत. सदरील करारा पूढे असे नमूद केलेले आहे की, सामनेवाले हे काही अडचणीमुळे ऊस तोड कामगार पूरवू शकले नाही तर सामनेवाले हे तक्रारदार यांनी संपूर्ण रक्कम द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने परत करतील. वर नमूद केलेल्या कराराचे स्वरुप लक्षात घेता व त्यामध्ये नमूद केलेली कामे यांचा प्रामुख्याने विचार केला असता तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून सेवा व्यापारी कारणासाठी ठरवली होती असे निदर्शनास येते. ऊस कारखान्यास ऊस पूरवून तक्रारदार यांना नफा मिळणार होता. तक्रारदार व सामनेवाले यांचे मध्ये झालेल्या कराराचे स्वरुप लक्षात घेता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत ही बाब सिध्द होत नाही. सदरील कराराचे स्वरुप व त्यामध्ये नमूद केलेल्या शर्ती व अटी यांचा विचार केला असता सदरील करार व त्यासंबंधी काही वाद उपस्थित झाल्यास तो वाद दिवाणी न्यायालयात चालविण्यास पात्र ठरतो. या मंचासमोर तक्रारदार यांनी ते सामनेवाले यांचे ग्राहक आहेत ही बाब सिध्द करणे गरजेचे आहे. केवळ ऊस तोडीसाठी कामगार पुरविण्याचा करार केला यावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होत नाहीत. त्याच कारणास्तव सदरील तक्रार रदद होण्यास पात्र आहे. तक्रारदार हे दिवाणी न्यायालयात जाऊन सदरील करारा संबंधीत सामनेवाले यांचे विरुध्द दाद मागू शकतात.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड