निकाल
दिनांक- 12.12.2014
(द्वारा- श्री.रविंद्र राठोडकर, सदस्य)
तक्रारदार रणजित भिमक उर्फ भिमराव तांबे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी विमा पॉलीसी अंतर्गत नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून सदरची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हा राक्षसभुवन ता.शिरुर येथील रहिवाशी असून शेती करुन कुटूंबियांची उपजिवीका भागवितो. दि.19.09.2012 रोजी सायंकाळी 06.20 च्या दरम्यान तक्रारदार गढी ते माजलगाव रोडवर अर्धमसला फाटयाजवळ स्वतःची मोटार सायकल डाव्या बाजूला थांबला असता समोरुन येणा-या टूरीस्ट टॅक्सीच्या चालकाने हयगयीने व निष्काळजीपणाने वाहन चालवून तक्रारदाराच्या मोटार सायकलला जोराची धडक देऊन तक्रारदारास गंभीर जखमी केले. त्या संदर्भात तक्रारदाराने संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. घटनेनंतर तक्रारदाराने विठाई हॉस्पीटल बीड तसेच दौले हॉस्पीटल अहमदनगर येथे आंतर रुग्ण म्हणून उपचार घेतले. त्यावेळेस तक्रारदारावर वेगवेगळया शस्त्रक्रिया, रक्त देणे, एक्स–रे, सोनोग्राफी इत्यादी उपचार केलेले असून ते आजही उपचार घेत आहे. सदरील अपघातात तक्रारदाराचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर होऊन 25 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आलेले आहे. सदरील उपचार घेण्यासाठी तक्रारदारास रु.1,25,000/- खर्च झालेला असून मोटार सायकलचे नुकसान झालेले आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे सदरील मोटार सायकलचा विमा उतरविलेला आहे, म्हणून तक्रारदाराने विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून सामनेवाला यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रासह दावा प्रपत्र दाखल केला असून सामनेवाला यांनी अद्यापपर्यंत कोणतीही रक्कम दिलेली नाही, किंवा त्या संबंधी काहीही कळविलेले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी सेवा देण्यास कसूर केला म्हणून तक्रारदाराने सदरील तक्रार आवश्यक त्या कागदपत्रासह दाखल करुन अशी मागणी केली की, सामनेवाला यांनी तक्रारदारास वैद्यकीय विमा रक्कम रु.2,00,000/-, मोटार सायकलचे नुकसान रु.21,000/-, मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रु.20,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- अशी एकूण रक्कम रु.2,43,000/- 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश करावे.
सामनेवाला हे मंचासमोर हजर होऊन निशाणी 13 अन्वये लेखी म्हणणे सादर केलेले आहे. सामनेवाला यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदाराची तक्रार चुकीची व दिशाभूल करणारी असून खारीज करण्याच्या लायकीची आहे. तसेच तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नाही. कारण तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन वाईट हेतूने केलेले असून ते चुक व अविश्वसनीय आहे. तसेच तक्रारदाराने विमा पॉलीसी अंतर्गत असणा-या अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले असून जास्त रक्कम नुकसान भरपाई मिळावी म्हणून खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदाराची सदरील तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी मागणी सामनेवाला यांनी केली आहे.
तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र आणि सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे या मंचाने अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा पॉलीसी
अंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई न देऊन
सेवा देण्यात कसूर केला आहे, ही बाब
तक्रारदार यांनी सिध्द केली आहे काय? नाही.
2) तक्रारदार हा तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे
नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय? नाही.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांचे विधीज्ञ श्री.काकडे यांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांची तक्रार नि.1, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र नि.4,5,6 आणि पुराव्याचे शपथपत्र नि.15 याकडे वेधले. तक्रारदाराचे विधीज्ञ श्री.काकडे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार दि.19.09.2012 रोजी गढी ते माजलगांव रोडवर अर्धमसला फाटयाजवळ सांयकाळी 6.20 मिनिटांनी मोटार सायकल क्र.एम.एच.23/यू-2609 वर डाव्या बाजूला थांबला असता समोरुन येणा-या टूरिस्ट टॅक्सी क्र.एम.एच.-23/सी-1349 च्या चालकाने हयगईने व निष्काळजीपणाने वाहन चालवून तक्रारदाराच्या मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्याबददल तक्रारदाराने तलवाडा पोलिस स्टेशन येथे दि.21.03.2012 रोजी गुन्हा नोंदविला असून त्यांचा गु.रं.नं.26/2012 असा आहे. घटनेनंतर तक्रारदाराने विठाई हॉस्पीटल बीड येथे दि.19.03.2012 ते दि.21.03.2012 आणि दौले हॉस्पीटल अहमदनगर येथे दि.22.03.2012 ते 05.04.2012 पर्यत अंतर रुग्ण म्हणून उपचार घेतलेले आहेत. त्या दरम्यान तक्रारदारावर वेगवेगळया शस्त्रक्रिया, रक्त देणे, एक्सरे, सोनोग्राफी इत्यादी उपचार केलेले असून आजही तक्रारदार बाहय रुग्ण म्हणून उपचार घेत आहे. सदरील अपघातामुळे तक्रारदाराचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रँक्चर होऊन 25 टक्के कायम स्वरुपी अपंगत्व आलेले आहे. तशा प्रकारचे शासकीय अधिका-याचे अपंगत्व प्रमाणपत्र व वरील कालावधीत उपचार आणि औषधोपचार घेतल्या बददलचे देयके या मंचासमोर दाखल केली आहेत. पूढे असा यूक्तीवाद केला की, तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे मोटार सायकल एम.एच.23/यू-2609 चा विमा उतरविलेला असून त्यांचा पॉलिसी कव्हर नोट क्रमांक 211000088070 असा असून त्यांचा वैध कालावधी 21.09.2011 ते 20.09.2012 असा आहे. म्हणून तक्रारदार हा सामनेवाले याचा ग्राहक आहे. सदरील अपघात हा दि.19.09.2012 रोजी झालेला आहे. म्हणून सदरील अपघात सदरील विमा पॉलिसीच्या वैध कालावधी झालेला आहे. त्या अनुषंगाने तक्रारदाराने दि.30.05.2013 रोजी सामनेवाला यांना अर्ज करुन नुकसान भरपाई म्हणून रु.,2,00,000/- व मोटार सायकलचे नुकसान म्हणून रु.15,000/- खर्चासह देण्याची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी सदरील अर्जानुसार नुकसान भरपाई दिली नाही किंवा लेखी देखील कळविले नाही. म्हणून शेवटी तक्रारदाराने दि.25.09.2013 रोजी वकिलामार्फत सामनेवाले यांना नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. तरी पण सामनेवाला यांने आजपर्यत कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही.तक्रारदाराने या तक्रारीसोबत सर्व कागदपत्रे म्हणजेच एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा,आर.सी बूक, दुखापत प्रमाणपत्र,विकलांग प्रमाणपत्र, पॉलिसी कव्हर नोट, अर्ज, क्लेम फॉर्म, खर्चाची देयके इत्यादी दाखल करुन अशी मागणी केली की, सामनेवाले यांने तक्रारदारास वैद्यकीय विमा रक्कम रु.2,00,000/-, मोटार सायकलचे नुकसान रु.21,000/-, मानसिक व शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु.20,000/- देण्याचा आदेश करावा.
सामनेवाले यांचे विधीज्ञ श्री. आर.व्ही. देशमूख यांनी या मंचाचे लक्ष सामनेवाले यांचे लेखी म्हणणे नि.13, पुराव्याचे शपथपत्र नि.14 आणि त्यांनी दाखल केलेले कागदपत्र याकडे वेधले. सामनेवाले यांचे विधीज्ञ यांने असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराच्या तक्रारीतील कथन चुकीचे आणि दिशाभूल करणारे असून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्याचे लायकीची आहे. पुढे असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहक होऊ शकत नाही. तसेच तक्रारदाराने सदरील तक्रार वाईट हेतूने, चुकीच्या कथनावर दाखल केली असून ती अविश्वसनीय आहे. त्याचबरोबर तक्रारदाराने पॉलिसीच्या अटी व शर्तीचे पालन केले नाही. कारण पॉलिसी काढताना तक्रारदार व सामनेवाला यांचेत करार झालेला असतो. म्हणून त्या करारात ज्या अटी व शर्ती ठरल्या असतील आणि ज्यांचेवर बंधनकारक असतील त्यांनी त्या पाळल्या पाहिजेत. ज्या तक्रारदाराने पाळल्या नाहीत. त्याबददल सामनेवाले यांचे विधीज्ञाने “ Export Credit Guarantee Corporation of India Ltd Vs Garg Sons International 2013 (1) SCALE 410 ” या न्यायनिवाडयाचा संदर्भ दिला असून विमा करारात शर्ती व अटीला जास्त महत्व असते असा अर्थ बोध केला. तसेच तक्रारदाराने नुकसान भरपाई म्हणून जी रक्कम मागितली आहे ती जास्तीची असून जूलमी स्वरुपाची आहे. पूढे असा यूक्तीवाद केला की, तक्रारदाराने मोटार अपघात दावा अर्ज जिल्हा न्यायालय बीड येथे दाखल केलेला असून तो प्रलंबित आहे. त्याबददलचे प्रकरण विवरण या मंचासमोर दाखल केले आहे. म्हणून वरील सर्व कारणामुळे तक्रारदाराची तक्रार कायदेशीर नसून खोटी व बनावट आहे. त्यामुळे सदरील तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी.
वरील सर्व पुराव्याचा व कागदपत्राचे या मंचाने अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदाराच्या तक्रारीत असे कथन केले की, दि.19.09.2012 रोजी तक्रारदाराचा अपघात झाला आहे, परंतू पोलीस पेपर म्हणजे एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा याचे अवलोकन केले असता सदरील अपघात दि.19.03.2012 रोजी झाल्याचे निष्पन्न होते म्हणजेच अपघात कोणत्या तारखेला झाला हे निश्चित होत नाही. कारण सदरील तारखेमध्ये तफावत आहे. त्या अपघाताबददल तक्रारदाराने विठाई हॉस्पीटल बीड व दौले हॉस्पीटल नगर येथे उपचार घेतलेले असून तक्रारदारास 25 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आलेले आहे. तसेच सदरील दवाखान्यामध्ये उपचार घेतल्याबददलचे डिस्चार्ज कार्ड या मंचासमोर तक्रारदाराने दाखल केले नाही. जे विठाई हॉस्पीटल बीड यांचे दाखल केलेले डिस्चार्ज कार्ड हे परिपूर्ण नाही. त्याचबरोबर तक्रारदाराने डॉक्टरांनी कोणते प्रिस्प्रीक्शन दिले याचा कोणताही सबळ पुरावा या मंचासमोर दाखल केला नाही. तक्रारदाराने जे औषधे, देयके दाखल केली आहेत ती काही खाडाखोड, दुरुस्ती व अपूर्ण, अस्पष्ट आहे. वरील सर्व देयके तक्रारदाराने झेरॉक्स स्वरुपात दाखल केलेली आहे. यावरुन या मंचास असे दिसून येते की, सदरील देयके हे बनावट स्वरुपाचे असून अविश्वसनीय आहे. कारण नेमका किती खर्च झाला हे सांगता येत नाही. त्याचबरोबर तक्रारदाराने स्वतःचे वाहन परवाना बददलचा पुरावा सादर केलेला नाही. सदरील अपघातामध्ये तक्रारदाराच्या मोटार सायकलचे रु.15,000/- चे नुकसान झाल्याबददलचा कोणताही सबळ पुरावा तक्रारदाराने या मंचासमोर सादर केला नाही. कारण पोलीस पेपर नुसार मोटार सायकलचे नुकसान रु.15,000/- असे दर्शविले असून तक्रारीनुसार रु.21,000/- कथन केले आहे. तक्रारदाराच्या मोटार सायकल क्र. एम.एच.23/यू-2609 पॉलिसी कव्हर नोट क्र.211000088070 चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, पॉलिसीतील वरील शर्ती व अटीनुसार दावा करताना जी घटना घडली असेल त्यावेळेपासून ठराविक कालावधीत सामनेवाले/विमा कंपनी यांना सुचना देणे अनिवार्य आहे तरच विमा कंपनी नुकसान भरपाईची कार्यवाही करण्यास जबाबदार राहील. कारण विमा हा करार असून करारातील अटी व शर्ती हया ज्या व्यक्तीवर लादल्या असतील त्यांनी त्या पूर्ण करणे कायदयानुसार बंधनकारक असते. परंतु तक्रारदाराने दि.30.05.2013 रोजी सामनेवाले यांना अर्ज करुन नुकसान भरपाईची मागणी केली. म्हणजेच घटनेनंतर ब-याच उशिराने सामनेवाले यांना कळवले. त्याचबरोबर विलंबाबददल कसल्याही प्रकारचा पुरावा या मंचासमोर सादर केलेला नाही. याउलट तक्रारदाराने जिल्हा न्यायालय बीड येथे मोटार अपघात दावा सदरील अपघाता बाबत दाखल केला असून तो प्रलंबित आहे. वरील सर्व बाबीचे या मंचाने अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदाराने विहीत मुदतीत विमा दावा प्रपत्र सामनेवाला यांचेकडे दाखल केला नाही म्हणून सामनेवाला यांने तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. तसेच तक्रारदाराने या मंचासमोर सदरील तक्रारीबददल कुठल्याही प्रकारचे मुळ दस्तऐवज दाखल केले नाही. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत कसूर केला आहे ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाही.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड