जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 80/2013 तक्रार दाखल तारीख – 28/07/2013
तक्रार निकाल तारीख– 20/02/2014
ज्ञानोबा व्यंकटी कोपनर
वय 60 वर्ष धंदा शेती
रा.कौडगांव घोडा ता.परळी (वै) जि.बीड ...अर्जदार
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक,
फयुचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
इंडिया बुल्स, फायनान्स सेंटर, टॉवर 3,
सहावा मजला, सेनापती बापट मार्ग,
इल्फीनस्टोन (वे.) मुंबई. ...गैरअर्जदार
2. विभाग प्रमुख
डेक्कन इन्शुरन्स अँड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
6 परखडे बिल्डींग, भानूदास नगर, बीड बझार मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद 431 001.
3. तालुका कृषी अधिकारी
कृषी अधिकारी कार्यालय परळी (वै)
ता.परळी (वै) जि.बीड
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष
श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य.
------------------------------------------------------------------------------------तक्रारदारातर्फे - अँड.ए.एस.पावसे
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – अँड.एस.एल.वाघमारे
गैरअर्जदार क्र.2 तर्फे - स्वतः
गैरअर्जदार क्र.3 तर्फे - कोणीही हजर नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------
निकाल
दिनांक- 20.02.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार ज्ञानोबा व्यंकटी कोपनर यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे कोडगांव घोडा येथील रहीवासी असून शेती करुन स्वतःचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदाराची सून यशोदाबाई यांचा मृत्यू दि.11.9.2012 रोजी रस्ता अपघातामध्ये झाला. घटनेची माहीती तक्रारदाराने पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा व तपास करुन मयताचे प्रेत तक्रारदाराकडे सूपूर्द केले. मयताचे नांवे जमीन गट क्र.44/1 होती. ती व्यवसायाने शेतकरी होती. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शेतक-याचा विमा काढलेला आहे. तक्रारदार यांने विमा योजने अतंर्गतचा नुकसान भरपाईचा दावा तालुका कृषी अधिकारी परळी मार्फत सामनेवाले क्र.1 यांचेकडे कागदपत्रासह दाखल केला.महाराष्ट्र शासनाने वर्ष 2012-13 वर्षासाठी विमा सामनेवाले क्र.1 कडे जमा केला आहे. तक्रारदार यांस एक महिन्याचे आंत रक्कम देणे आवश्यक होते. रक्कम न दिल्यामुळे तिन महिन्यानंतर 9 टक्के व तीन महिन्याच्या पूढे 15 टक्के व्याज देणे कंपनीस बंधनकारक आहे. सामनेवाले क्र.1 यांनी दि.18.3.2013 रोजी तक्रारदारास नुकसान भरपाईचा दावा फेटाळल्याचे कळविले. सामनेवाले क्र.1 यांनी संयुक्तीक कारणाशिवाय नुकसान भरपाईचा दावा मंजूर करता येत नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. तक्रारदार यांनी अशी मागणी केली आहे की, विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासहीत व शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व दावा खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोरे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांना तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही.तक्रारदार यांनी मयताचे वारस असल्याबदल कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. तक्रारदार यांनी घटनेबददल कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. महाराष्ट्रातील शेतक-याचा विमा शर्ती व अटीनुसार काढलेला होता ही बाब मान्य केली आहे. दि.15.8.2012 रोजी तक्रारदार यांनी पॉलिसी काढली त्यावेळेस तीचे नांवावर शेती नव्हती.त्याबाबत तक्रारदार यांनी कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.म्यूटेशन नोंदणी ही दि.22.8.2012 रोजी झाली आहे व पॉलिसी ही दि.15.8.2012 रोजी घेतलेली आहे. सामनेवाले यांनी कोणतीही सेवेत त्रूटी ठेवलेली नाही. पॉलिसी मधील शती व अटीनुसार तक्रारदार यांचा विमा दावा नामजूर करण्यात आलेला आहे. तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे मुदतीत दाखल केले. सामनेवाले क्र.2 यांच्या कथने नुसार, संस्था मध्यस्थ म्हणून काम करते. तक्रारदाराचा विमा दावा कागदपत्राची छाननी करुन विमा कंपनीस सादर करणे असे आहे. त्यामुळे सामनेवाले क्र.2 यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विंनती केली आहे.
सामनेवाले क्र.3 हे नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश दि.23.10.2013 रोजी करण्यात आला.
तक्रारदार यांनी पुराव्याचे समर्थनार्थ स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच प्रपत्र, क्लेम फॉर्म क्र.1 व 2, 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा,एफ.आय.आर. मृत्यू प्रमाणपत्र,घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, फेरफार, वयाचा पुरावा, बँक पासबूक, इन्शुरन्स कंपनीचे पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी अभिजीत विजय डिजवलकर यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी नंदकूमार प्रभाकर देशपांडे यांचे शपथपत्र पुरावा म्हणून दाखल केले आहे.
न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी विमा रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली
आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय.
2. तक्रारीत मागणी केलेली रक्कम मिळण्यास तक्रारदार
पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे अँड.पावसे यांनी असा यूक्तीवाद केला की, मयत यशोदाबाई हया व्यवसायाने शेतकरी होत्या. दि.11.9.2012 मोटार अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. तक्रारदार हे मयत यशोदाबाई यांचे सासरे आहेत. तसेच यूक्तीवादाचे वेळेस या मंचाने त्यांचे लक्षात आणून दिले की, मयत यशोदाबाई यांस महेश नावांचा अज्ञान मुलगा आहे व तक्रारदार हे त्या मुलाचे आजोबा आहेत. त्या बाबत गाव नमुना वारसा हक्क नोंद झालेली आहे.त्यावर अँड.श्री.पावसे यांनी असा यूक्तीवाद केला की, मयत यशोदाबाई हीस अज्ञान महेश नांवाचा मुलगा आहे. ही बाब ते नाकारत नाहीत. अँड.श्री. पावसे यांनी असा युक्तीवाद केला की, अपघात दि.11.09.2012 रोजी झाला. त्यादिवशी मयत यशोदाबाई हया शेतकरी होत्या. त्यांचे नांवे शेत जमिन नोदंलेली होती. सामनेवाले क्र.1 यांनी क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांना शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळावी व तक्रारीचा खर्च व झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी तक्रारीत मागणी केलेली रक्कम मिळावी.
सामनेवाले यांचे वकील श्री.वाघमारे यांनी असा युक्तीवाद केला की, शेतकरी अपघात विमा पॉलिसी ज्यादिवशी लागू करण्यात आली त्यादिवशी मयत यशोदाबाई हया शेतकरी नव्हत्या. त्यांचे नांवे शेती नव्हती.दि.15.8.2012 रोजी पूर्वी जे शेतकरी आहेत त्यांचीच जबाबदारी पॉलिसी अंतर्गत स्विकारलेली आहे. मयत यशोदाबाई हया पॉलिसी लागू झाली त्यादिवशी शेतकरी नसल्यामुळे त्यांचे वारसांना विम्याची रक्कम अनुज्ञेय नाही. सामनेवाले हयांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व वाजवी कारणासाठी नाकारला आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला व तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी यशोदाबाई मयत झाल्यानंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मिळण्यासाठी सामनेवाले यांचेकडे प्रस्ताव पाठविला. तो प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांनी नाकारला असल्याचे निदर्शनास येते. सदरील प्रस्ताव नाकारण्याचे कारण की, विमा पॉलिसी लागू केली त्यादिवशी मयत यशोदाबाई हया व्यवसायाने शेतकरी नव्हत्या. सोबत दाखल केलेला दस्ताचे अवलोकन केले असता मौजे कोडगांव घोडा ता.परळी वैजनाथ जि.बीड येथे गट क्र.44/1 पैकी 20 आर क्षेत्र मयत यशोदाबाई हिचे नांवे फेरफार नोंद 1987 अन्वये नोंदलेली दिसते. सदरील नांवाचा फेरफार रजिस्ट्ररचा उतारा तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे.त्यात फेरफार नोंदीचे अवलोकन केले असता दि.5.8.2012 रोजी संमतीपत्राने अर्जदार ज्ञानोबा व्यकंटी कोपनर यांनी मयत हिचे नांवे शेत जमिन दिलेली दिसते. सदरील नोंद ही दि.22.8.2012 रोजी करण्यात आली. अपघात हा दि.11.09.2012 रोजी झाला व त्यात मयत यशोदाबाई हया मयत झाल्या आहेत. सदर अपघात घडण्याचे अगोदर मयत यशोदाबाई यांचे नांहवे शेत जमिन नोंदलेली होती व त्या व्यवसायाने शेतकरी होत्या ही बाब सिध्द होते.दि.5.8.2012 रोजी संमती पत्राने मयत यशोदाबाई यांहचे नांवे शेत जमिन देण्यात आलेली आहे. सबब दि.15.8.2012 पूर्वी त्या व्यवसायाने शेतकरी होत्या ही बाब स्पष्ट होते. सामनेवाले यांचा यूक्तीवाद त्यामुळे ग्राहय धरता येत नाही. सामनेवाले क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. त्यामुळे मयत यशोदाबाई मारोती कोपनर यांचे वारसांना शेतकरी अपघात विमा योजने अतर्गत रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे.
संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता, मयत यशोदाबाई मारोती कोपनर यांना अज्ञान मुलगा महेश मारोती कोपनर आहे. तक्रारदार हे महेश कोपनर यांचे आजोबा आहेत. त्यांचे अज्ञानपालनकर्ता म्हणून नोंद झालेली आहे. तक्रारदार यांनी क्लेम दाखल करताना महेश मारोती कोपनर यांचे अज्ञानपालनकर्ता म्हणून तलाठयाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. सबब, मयत यशोदाबाई मारोती कोपनर यांचा अज्ञान मुलगा महेश हा कायदयाने वारस ठरतो व तोच ती रक्कम मिळण्यास पात्र आहे. तक्रारदार हे महेश कोपनर यांचे आजोबा आहेत व ते अज्ञानपालनकर्ता आहेत. सबब, अज्ञानाचे हित लक्षात घेऊन सदर मिळणारी रक्कम अज्ञानाचे नांवे तो सज्ञान होईपर्यत ठेवावी असे या मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की,तक्रारदार यांना
शेतकरी अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत या मंचात भरावी, रक्कम न
दिल्यास वरील रक्कमेवर दि.28.7.2013 पासून ते संपूर्ण रक्कम
मिळेपर्यत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज दयावे.
3) सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना
मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रु.1000/- दयावेत.
4) सदर रक्कम या मंचात जमा झाल्यानंतर ती अज्ञान महेश मारोती
कोपनर यांचे नांवे तक्रारदार ज्ञानोबा व्यंकटी कोपनर
अज्ञानपालनकर्ता म्हणून महेश सज्ञान होईपावेतो राष्ट्रीयकृत बँकेत
ठेव म्हणून ठेवावी.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड