विलंब माफीच्याअर्जावर आदेश
दिनांक- 12.12.2013
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
अर्जदार यांनी सदरील अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 (3) (ब) अन्वये तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करुन मिळावा व तक्रार दाखल करण्यास परवानगी मिळावी म्हणून दाखल केलेला आहे.
अर्जदार यांचे थोडक्यात कथन येणे प्रमाणे, अर्जदार हे स्वतःचे मालकीचे अँटो रिक्षा मध्ये प्रवास करीत असताना दि.01.01.2009 रोजी अपघात झाला. सदर अपघातात अर्जदार यांना 30 टक्के कायमचे अपंगत्व आले आहे. अर्जदार यांनी अपघातानंतर धुत हॉस्पीटल औरंगाबाद येथे दि.01.01.2009 ते 18.01.2009 पर्यत औषधोपचार घेतला. अर्जदार हे अंपग झाल्यामुळे ते एकाजागी घरात झोपून असल्यामुळे तसेच अर्जदार यांचे घरातील सदस्य अशिक्षीत असल्यामुळे अर्जदार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. डॉक्टरांनी अर्जदार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अर्जदार हे आजारी असल्यामुळे ते तक्रार या मंचापूढे दाखल करु शकले नाहीत. अर्जदार यांनी जाणूनबूजून विलंब केलेला नाही. अर्जदार यांची विनंती की,तक्रार दाखल करण्यास जो विलंब झाला तो माफ करुन मिळावा व अर्जदार यांना तक्रार दाखल करण्यास परवानगी देण्यात यावी.
सामनेवाले हे मंचापूढे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले यांचे कथन की, अर्जदार यांनी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र मंचापूढे हजर केले नाही. अर्जदार यांनी मंचासमोर कोणतेही संयूक्तीक व वाजवी कारण दिलेले नाही. तक्रार दाखल करण्यास दोन वर्ष सहा महिने विलंब झालेला आहे. सदरील विलंब माफ करण्यास कोणतेही सबळ कारण दिलेले नाही. सबब, अर्जदार यांनी दिलेला अर्ज रदद करावा अशी विनंती केली आहे.
अर्जदार यांचे वकील श्री.कूंभार यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. अर्जदार यांनी तक्रार दाखल करण्यास विलंब
माफीसाठी योग्य व वाजवी कारण दिलेले आहे काय ? नाही.
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ः-
अर्जदार यांचे वकील श्री.कूंभार यांनी असा यूक्ीवाद केला की, अपघातामध्ये अर्जदार हे गंभीर जखमी णले. अर्जदार हे धुत हॉस्पीटल औरंगाबाद येथे अँडमिट होते. अर्जदार यांना 30 टकके अपंगत्व अपघातात झालेल्या जखमामुळे आलेले आहे. अर्जदार हे आजारी असल्यामुळे ते या मंचापूढे तक्रार दाखल करु शकले नाही. तसेच अर्जदार यांचे कूटूंबातील व्यक्ती अशिक्षीत असल्यामुळे तक्रार दाखल करु शकले नाहीत. थोडक्यात अर्जदार यांचे कथन की, तक्रार दाखल करण्यास जो विलंब झालेला आहे तो अर्जदार यांचे चूकीमूळे झालेला नाही.
सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा यूक्तीवाद केला की, अर्जदार हे धुत हॉस्पीटल औरंगाबाद येथे दि.01.01.2009 ते 18.01.2009 या कालावधीत अंर्तरुग्ण म्हणून उपचार घेत आहे. तदनंतर अर्जदार यांनी कोणत्याही दवाखान्यात उपचार घेतले या बाबत दस्ताऐवज हजर केलेले नाही अगर डॉक्टरांचे प्रमाणपत्र हजर केलेले नाही. तक्रार दाखल करण्यास दोन वर्ष सहा महिल्याचा विलंब झालेला आहे. सदरील विलंब माफ करीत असताना अर्जदार यांना ते मंचासमोर तक्रार का दाखल करु शकले नाही ? यांचे योग्य व सबळ कारण देणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी कोणतेही कागदपत्र या मंचापूढे हजर केले नाही. त्यामुळे सदरील विलंब हा अर्जदार यांचे निष्काळजीपणामुळे झालेला आहे, तो माफ होण्यास पात्र नाही.
सामनेवाले यांचे वकीलांनी यूक्तीवादाचे समर्थनार्थ राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी IV (2012) VPJ 530 (NC) “ शशी शर्मा ” विरुध्द “एलआयसी ऑफ इंडिया” यांचे न्यायनिर्णयाचा हवाला दिला आहे. मा. राष्ट्रीय आयोग यांचे न्यायनिर्णयाचे परिच्छेद क्र.12 व 13 मध्ये अर्जदार यांना विलंब का झाला या बाबत योग्य व वाजवी कारण दिले नाही या कारणास्तव विलंब माफ करता येत नाही. तसेच प्रत्येक दिवसांच्या विलंबाचे स्पष्टीकरण दिलेले नाही असे निर्देशीत केलेले आहे.
अर्जदार यांचे वकिलांनी मा.उच्च न्यायालय,मुंबई बेंच औरंगाबाद यांनी रिट पिटीशन नंबर 39/2003, 2013 दि.19.08.2013 या न्यायनिर्णयावर मंचाचे लक्ष वेधले आहे. मा. न्यायमुर्ती मुंबई यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत क्लेम दाखल करण्यास जो उशिर झाला आहे तो माफ करण्या बाबत निर्देश दिले व विमा कंपनीला अर्जदार यांना रु.1,00,000/- दयावे असे निर्देश दिले.
अर्जदार यांनी विलंब माफीचा अर्ज दिला आहे तो माफ करीत असताना विलंब माफीस योग्य व वाजवी कारण आहे काय हे पाहणे गरजेचे आहे. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले असता दि.01.01.2009 रोजी अर्जदार हे वाहनातून जात असताना अपघात झाला. अपघात झाल्यानंतर अर्जदार यांनी जिल्हा रुग्णालय बीड येथे औषधोउपचार केले. जिल्हा रुग्णालय बीड यांचे प्रमाणपत्र पाहता अर्जदार यांना Contused abrasion इजा झाली होती व सदरील इजा ही साधी दर्शवलेली आहे. अर्जदार यांनी सेठ नंदलाल धूत हॉस्पीटल औरंगाबाद येथे वैद्यकीय उपचार घेतल्या बाबत डिसचार्ज कार्ड दाखल केले आहे. अर्जदार यांना दि.5.1.2009 रोजी दाखल करुन घेण्यात आले होते व त्यांना दि.18.01.2009 रोजी दवाखान्यातून सोडण्यात आले. अर्जदार हे 14 दिवस धुत हॉस्पीटल मध्ये उपचार घेत होते व तेथून त्यांना सोडण्यात आले. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले असता दि.18.01.2009 पासून अर्जदार यांनी कोणत्याही दवाखान्यात उपचार घेतले या बाबत कोणताही दस्ताऐवज हजर केला नाही अगर वैद्यकीय प्रमाणपत्र ही हजर केले नाही. अर्जदार यांनी लाईफलाईन मल्टी स्पेशल सर्जीकल हॉस्पीटल बीड यांचे एक प्रमाणपत्र दाखल केले आहे. सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता, अर्जदार हे फक्त धुत हॉस्पीटल मध्ये अँडमिट होते व त्यांना कोणती इजा झालेली होती हे नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे स्पष्ट होते की, अर्जदार हे धुत हॉस्पीटल मधून डिसचार्ज घेतल्यानंतर त्यांनी कोणताही वैद्यकीय उपचार करुन घेतलेले नाहीत. विलंब माफीचा विचार करीत असताना तक्रार दाखल करण्यास जो विलंब झालेला आहे त्यासाठी योग्य व वाजवी कारणे देणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी कोणताही दस्ताऐवज अथवा पुरावा या मंचासमोर हजर केला नाही. त्यामुळे अर्जदार यांना तक्रार दाखल करण्यास जो विलंब झालेला आहे तो योग्य व वाजवी कारणासाठी झाला आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. अर्जदार यांचे चूकीमुळे सदरील विलंब झाल्याचे निदर्शनास येते. सबब, विलंब माफीचा अर्ज रदद होण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. अर्जदार यांचा विलंब माफीचा अर्ज रदद करण्यात येतो.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.