निकाल
दिनांक- 19.06.2014
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार विठठल बळीरामजी तांदळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे सारडगांव ता.परळी जि.बीड येथे राहतात. तक्रारदार हे शेती व्यवसाय करतात. तक्रारदाराचे सामनेवाला यांच्या बँकेत खाते आहे त्याचा खाते क्रमांक 51 अे.5428 असा आहे. तक्रारदाराला नाशिक येथील एका व्यक्तीने रु.2,80,400/- चा धनादेश दिला होता सदर धनादेशाचा क्रमांक 006259 असा आहे. तक्रारदारास सदर धनादेशाची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर त्याचेवर नमुद असलेली रक्कम तक्रारदारास मिळेल असे आश्वासन दिले होते. तक्रारदाराने सदर धनादेश सामनेवाला यांच्या बँकेत स्वतःच्या खात्यावर दि. 07.08.2012 रोजी जमा केला. सामनेवाला यांनी पुढील कार्यवाही करण्याकरता सदर धनादेश जमा केला. सदर धनादेश जमा केल्यानंतर तक्रारदार याने वेळोवेळी सामनेवाला यांच्याकडे धनादेशाबाबत विचारपूस केली परंतू सदर धनादेश वटवून आला किंवा नाही या बाबत सामनेवाला यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.31.10.2012 रोजी सामनेवाला यांना धनादेशबाबत लेखी तक्रार देऊन माहिती मागितली सदर तक्रारीची दखल सामनेवाला यांनी घेतली नाही.
तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे वेळोवेळी चौकशी करुन व लेखी तक्रार देऊन सुध्दा सामनेवाला यांनी धनादेश बाबत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. रिझर्व बॅकेच्या नियमाप्रमाणे धनादेशाची मुदत ही दि.01.11.2012 रोजी संपलेली आहे त्यामुळे सामनेवाला यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांच्या बँकेत दाखल केलेला धनादेश न वटल्यामुळे व सदर धनादेश सामनेवाला यांच्याकडून परत न मिळाल्यामुळे तक्रारदारास धनादेश देणा-या व्यक्ती विरुध्द कोणतीही कार्यवाही करता आली नाही. तक्रारदाराने सामनेवाला यास दि.11.12.2012 रोजी नोटीस पाठविली सदर नोटीस ही सामनेवाला यांना मिळाली असूनही सामनेवाला यांनी नोटीसचे उत्तर दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदारास सदर धनादेशाची रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे. सबब तक्रारदार यांनी धनादेशाची रक्कम रु.2,80,400/- व त्यावरील व्याज 18 टक्के देण्याची विनंती केलेली आहे. तसेच मानसिक त्रासाबददल रक्कम रु.50,000/- व खर्चाची रक्कम रु.10,000/- मिळण्याची विनंती केलेली आहे.
सामनेवाला हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी निवेदन निशाणी क्र.7 वर सादर केलेले आहे. त्यासोबत श्री.उत्तम बाबुराव जोशी यांचे शपथपत्र नि.क्र.8 दाखल केलेले आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदाराचे खाते सामनेवाला यांच्या बँकेत आहे व त्याचा खाते क्रमांक 51 अे.5428 असा आहे ही बाब मान्य आहे. तक्रारदाराने जाणिवपूर्वक धनादेश देणा-या व्यक्तीचे नाव, पत्ता तसेच धनादेश कोणत्या शाखा वरील होते इत्यादी माहिती ही मा.न्यायालयापासून लपवली आहे तसेच धनादेश देणा-या व्यक्तीचे आय सी आय सी आय बँकेच्या कोणत्या शाखेत खाते आहे तसेच धनादेश देणारा व्यक्ती कोणत्या व्यवहारापोटी तक्रारदारास धनादेश दिला या बाबतही माहिती लपविली आहे. तक्रारदाराने दि.31.10.2012 रोजी सामनेवाला यांना लेखी तक्रार दिली ही बाब मान्य आहे. तसेच तक्रारदाराने दिलेली नोटीस ही सामनेवाला यांना मिळाली ही बाब ही सामनेवाला यांना मान्य आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी त्याचे खाते क्रमांक 51 अे.5428 या खाते क्रमांकावर दि.30.07.2012 रोजी धनादेश क्रमांक 6259 रक्कम रु.2,80,000/- चा सादर केला होता, सदर धनादेश सामनेवाला यांनी वैद्यनाथ अर्बन को.ऑप.बँक परळी शाखा लातूर यांचे मार्फत आय सी आय सी आय बँक शाखा लातूर या बँकेचा पाठविला होता सदर धनादेश देणा-या व्यक्तीच्या खात्यात अपूरी रक्कम असल्या कारणावरुन दि.02.08.2012 रोजी धनादेश अनादरीत झाला त्याबाबत आय सी आय सी आय बँक शाखा लातूर यांनी सामनेवाला यांना धनादेश व मेमो देऊन कळवले. सदर धनादेश सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दि.03.08.2012 रोजी परत केले.
तक्रारदाराने त्यानंतर कोणताही धनादेश सामनेवाला यांच्या बँकेत वटवण्याकरता सादर केलेला नाही. तक्रारीतील धनादेश तक्रारदार यांच्याकडून गहाळ झालेला आहे. तक्रारदाराने सदर धनादेश सामनेवाला यांच्या बँकेत दुस-या वेळी दाखल केला होता असे म्हणून सामनेवाला यांच्या बँकेत पत्र व्यवहार केला व नोटीस पाठवली. सामनेवाला यांनी तक्रारदारास सदर धनादेश देणा-या व्यक्ती बाबत संपूर्ण माहितीची मागणी केली परंतू तक्रारदाराने कोणतीही माहिती आजपर्यंत सामनेवाला यांना दिली नाही. सामनेवाला यांनी स्वतःच्या बँकेत तसेच वैद्यनाथ अर्बन को.ऑप.बँक शाखा लातूर यांच्याकडे चौकशी केली असता सदर धनादेश दुस-या वेळेस समाशोधनाकरता बँकेस प्राप्त झालेला नाही. तसेच तक्रारदार यांना ज्या व्यक्तीने धनादेश दिलेला आहे, त्या व्यक्तीला गैरअर्जदार म्हणून सदर तक्रारीत सामील केलेले नाही. तसेच सदरचे आवश्यक पक्षकार गैरअर्जदार केलेले नसल्यामुळे प्रकरण खारीज करण्यात यावे. सदर तक्रार ही खोटी व तथ्यहीन आहे, सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, तसेच दि.31.10.2012 रोजी सामनेवाला यांना दिलेली लेखी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व त्या सोबत तक्रारदार यांचे पासबूकची छायांकित प्रत तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले धनादेश बाबतची पावती व धनादेश यांची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी बँकेचा खाते उतारा दाखल केलेला आहे. तक्रारदार व सामनेवाला यांना वेळोवेळी संधी देऊनही युक्तीवाद केला नाही. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी सिध्द
केली आहे काय? नाही.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? नाही.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदाराचे कथन की, त्यांचे सामनेवाला यांच्याकडे खाते आहे, त्याचा खाते क्रमांक 51 अे.5428 असा आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या बँकेत दि.07.08.2012 रोजी धनादेश क्रमांक 6259 सामनेवाला यांच्या बँकेत वटवण्यासाठी जमा केला होता परंतू सामनेवाला यांनी सदर धनादेशवर कोणतीही कार्यवाही किंवा त्या बाबत कोणताही असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तदनंतर तक्रारदार यांनी दि.31.10.2012 रोजी सामनेवाला यांना लेखी तक्रार दिली. लेखी तक्रार देऊन सुध्दा सामनेवाला यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.11.12.2012 रोजी नोटीस पाठविली सदर नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही किंवा कार्यवाही केली नाही. सबब तक्रारदार यांचे रु.2,80,400/- चे धनादेश वटले किंवा नाही, सदरील रक्कम तक्रारदार यांचे खात्यात जमा झाली किंवा नाही याबाबतही तक्रारदारास कळवले नाही. त्याबाबत तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांचे बँकेमध्ये खाते आहे ही बाब मान्य आहे. तसेच तक्रारदाराने दि.30.07.2012 रोजी रक्कम रु.2,80,000/- चे धनादेश सादर केले होते ही बाब मान्य आहे. सदर धनादेश दि.02.08.2012 रोजी न वटता परत आलेले आहे. धनादेश देणा-या व्यक्तीच्या खात्यात अपूरी रक्कम असल्यामुळे सदरचा धनादेश अनादरीत झाला आहे. त्याबाबत दि.03.08.2012 रोजी तक्रारदार यास कळवले व धनादेश सोबत सर्व दस्त परत केले आहे. तक्रारदार याने सदर धनादेश बाबत कोणतीही माहिती सामनेवाला यांना पुरवली नाही सदर माहिती ही तक्रारदाराने न्यायालयापासून लपवून ठेवलेली आहे. तक्रारदाराची तक्रार ही खोटी व चुकीची आहे तसेच तक्रारदार यांनी ज्या व्यक्तीने धनादेश दिले आहे, त्या व्यक्तीस सदर तक्रारीत गैरअर्जदार म्हणून सामील केलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
वर नमुद केलेले कथन तसेच तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे दि.07.08.2012 रोजी सामनेवाला यांच्या बँकेत धनादेश वटवण्यासाठी जमा केला आहे. सदर धनादेश वटला किंवा नाही या बाबत तक्रारदारास माहिती नसल्याकारणाने तक्रारदार याने दि.31.10.2012 रोजी सामनेवाला यांच्याकउे लेखी तक्रार दाखल केली सदर तक्रारीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी दि.27.07.2012 रोजी खाते नं.5428 नाशिक येथील पार्टीचा चेक नं.006259 रक्कम रु.2,80,400/- चा वसूलीसाठी दिला होता परंतू तो चेक नाशिक येथील पार्टीच्या खात्यात जमा नसल्यामुळे परत आला, तोच चेक परत दि.07.08.2012 रोजी वसूलीसाठी जमा केला होता यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी सदरील चेक हा दि.27.07.2012 रोजी दाखल केला होता. त्याबाबतचे कोणतेही दस्त तक्रारदारांनी मंचासमोर हजर केले नाही. तदनंतर दि.07.08.2012 रोजी बँकेत सादर केलेला चेक त्या बाबतचे ही दस्तऐवज मंचासमोर हजर केले नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेली बँकेची पावती त्यामध्ये सदर धनादेश बाबत स्पष्ट अशी माहिती दिली नाही. जसे की, धनादेश जमा करताना धनादेश क्रमांक, सदरील धनादेश कोणत्या बॅंकेचा आहे, त्या बाबत माहिती दिलेली नाही. तक्रारदाराच्या खाते क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या धनादेशाची छायांकित प्रत याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदर धनादेश हा दि.01.08.2012 रोजीचा आहे व तक्रारदार यांनी दि.27.07.2012 रोजीच सदर धनादेश बँकेत वटवण्यासाठी जमा केला होता त्यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी बँकेत वटवण्यासाठी जो धनादेश सादर केला होता, तो धनादेश हाच आहे, त्याबाबतचा ठोस पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांनी सादर केलेला धनादेश हा सामनेवाला यांच्या बँकेत जमा केला होता ही बाब सिध्द केली नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. यावरुन तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड