निकाल
दिनांक- 30.10.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार दगडूबाई माणिकराव दौंड यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला क्र.2 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मौजे दौंडवाडी तालूका परळी जिल्हा बीड येथील रहिवाशी आहे. तक्रारदार यांचे पती माणिकराव दौंड हे मौजे दौंडवाडी येथे तक्रारदारासोबत राहून शेती व्यवसाय करत होते. तक्रारदाराच्या पतीच्या नावे शेतजमीन नोंदलेली आहे. तक्रारदार यांचे पती दि.07.10.2007 रोजी मोटार सायकल क्रमांक एम.एच.24-8397 वरुन अंबाजोगाईकडून दौंडवाडीकडे जात होते. दुपारी 2.वाजून 25 मिनीटाचे सुमारास मोटार सायकलच्या पाठीमागून बस क्रमांक के.एच.38 एफ-358 येत होती, सदरील बस चालकाने बस निष्काळजीपणाने व अतिवेगाने चालवली व मोटार सायकलला पाठीमागून धडक दिली. तक्रारदार यांचे पती मोटार सायकलवरुन खाली पडले व गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात शरीक केले असता ते मयत झाल्याचे घोषित केले. सदरील अपघाताची खबर पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ पंचनामा केला. तक्रारदार यांचे पतीवर मरणोत्तर पंचनामा केला व शव शवविच्छेदनासाठी पाठविले. तक्रारदार यांच्या पतीचा मृत्यू डोक्यास गंभीर मार लागल्यामुळे झाला. तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून सामनेवाला यांच्याकडे अर्ज पाठविला. सामनेवाला क्र.3 यांनी सदरील अर्ज सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविला. सामनेवाला क्र.2 यांनी सदरील क्लेम सामनेवाला क्र.1 कडे पाठविला. सदरील क्लेम प्राप्त होऊनही सामनेवाला क्र.1 यांनी तो मंजूर केला नाही. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्राची पुर्तता करुनही क्लेम मंजूर झाला नाही. म्हणून सामनेवाला यांना पत्र पाठविले. सामनेवाला यांनी अद्यापपावेतो तक्रारदार यांना क्लेम मंजूरी बाबत कळविले नाही. सबब तक्रारदार यांना सदर तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदार यांनी अशी मागणी केली आहे की, सामनेवाला क्र.1 यांच्याकडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावे. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरता कल्याणकारी योजना म्हणून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास योग्य तो प्रस्ताव पाठवून रक्कम अदा करणे गरजेचे आहे. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांना सदरील रक्कम मिळणेकामी तक्रार दाखल करावी लागली. त्याकामी खर्च करावा लागला. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी अशी विनंती केली.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 17 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील कथन नामंजूर केले आहे. तक्रारदार यांनी मुदतीत योग्य ते दस्तऐवज हजर केलेले नाही. तसेच तक्रारदाराला मुदतीची बाधा येत आहे असे कथन केले. सामनेवाला क्र.1 यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार हे मोटार वाहन कायद्यांतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असल्यामुळे सदरील तक्रार दाखल करता येणार नाही असे कथन केले. सबब सदरील तक्रार रदद करण्यात यावी असे कथन केले.
सामनेवाला क्र. 2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 13 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, ते ब्रोकर म्हणून काम करतात, त्याबददल ते कोणताही मोबदला घेत नाही. तक्रारदार यांनी पाठविलेला क्लेम त्यांना प्राप्त झाला, त्या क्लेममध्ये काही कागदपत्राची अपुर्तता होती म्हणून तक्रारदार यांना ते पुरविणेबाबत दि.08.01.2008 रोजी पत्र पाठविले. कागदपत्राची पुर्तता केल्या गेली नाही त्याच स्थितीत प्रस्ताव हा सामनेवाला क्र.1 इन्शुरन्स कंपनीला पाठविण्यात आला, तो प्रस्ताव इन्शुरन्स कंपनीकउे प्रलंबित आहे.
सामनेवाला क्र. 3 यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस तामिल झाली. परंतू ते या मंचासमोर हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाला यांच्याकडे जो क्लेम दाखल केला, त्या क्लेमचे कागदपत्र हजर केले आहे. तसेच स्वतःचे शपथपत्र हजर केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सक्षम अधिका-यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकीलांनी लेखी युक्तीवाद सादर केला त्याचे अवलोकन केले. सामनेवाला क्र.1 याचे वकील श्री.देशमुख यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी
शाबीत केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. दि.07.10.2010 रोजी ते मोटार सायकलवरुन जात असताना पाठीमागून एस.टी.बसने धडक मारल्यामुळे अपघात होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले व त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांनी या मंचासमोर पोलीस पेपर दाखल केले आहे त्यामध्ये घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा अपघातात झाला आहे ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी त्यांचे पतीच्या नावे शतजमीन असल्याबाबत 7/12 चा उतारा दाखल केला आहे. सदरील शेतजमीन ही तक्रारदाराच्या पतीच्या नावे वडिलोपार्जीत असल्याचे निष्पन्न होते. तक्रारदार यांचे पती शेतकरी होते. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांच्याकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला, त्या अर्जासोबत आवश्यक ते सर्व दस्त जोडलेले आहे, तो अर्ज सामनेवाला क्र.1 यांना सामनेवाला क्र.2 व 3 कडून प्राप्त झाला आहे, तो अर्ज सामनेवाला क्र.1 कडे अद्याप प्रलंबित आहे असे सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या लेखी कैफियतमध्ये म्हटलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांना काही कागदपत्राची मागणी केली असता ते पुरविण्यात आले नाही. परंतू सदर दस्तऐवज मागणी करणेबाबत पत्र तक्रारदार यांना प्राप्त झालेले नाही. तक्रारदार यांनी आवश्यक ते सर्व दस्त क्लेम सोबत जोडलेले आहे व प्रस्ताव परिपूर्ण सामनेवाला यांच्याकडे पाठविलेला आहे असे असतानाही सामनेवाला क्र.1 यांनी तो प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर केल्याबाबत अद्याप पावेतो कळविलेले नाही. त्यामुळे सदरील तक्रारीस मुदतीचा बाध येत नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन या मंचाचे मत की, तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचा अपघातात मृत्यू झाला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे संपूर्ण कागदपत्राची पुर्तता करुन क्लेम दाखल केला, तो क्लेम सामनेवाला क्र.1 यांना मिळूनही अद्याप पावेतो त्यावर निर्णय घेतलेला नाही. म्हणून सामनेवाला क्र.1 यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना
आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी
व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) निकाल
कळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावेत, सदर रक्कम विहीत
मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण
रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक
व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/- (अक्षरी
रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-
(अक्षरी रुपये एक हजार) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड